परवा सोसायटीची बैठक पार पडली. सगळी चर्चा संपल्यावर अध्यक्ष काकांनी तेजोमयी आणि टोळीचा सत्कार करण्याचं घोषित केलं.सर्वांनी टाळ्या वाजवून यास संमत्ती दिली.
तुम्हास प्रश्न पडला असेल, तेजोमयी आणि टोळीनं असा कोणता पराक्रम गाजवला बरं? की ज्यामुळे ते असे सत्काराचे धनी झाले.
या टोळीनं जे केलंय किंवा करुन दाखवलं त्याला पराक्रम समजायचा की आणखी काही, हे आता ज्याचं त्यानं ठरवावं.
तर झालं काय की, तेजोमयी आणि टोळीनं यंदाच्या दिवाळीत वेगळीच धम्माल केली. तेजोमयीस ही कल्पना सुचली. तिने दिवाळीच्या महिन्याभर आधी टोळीला व्यवस्थित सारं काही समजावून सांगितलं.
जे काही करायचं होतं, त्यासाठी पैसे लागणार होते. त्यासाठी मग प्रत्येकानं पॉकेटमनीतले पैसे दररोज वाचवायचं ठरवलं. कशासाठी बरं?
कुणाला वाटेल, फटाके घेण्यासाठी, कुणाला वाटेल पिज्जा पार्टी करण्यासाठी, कुणाला वाटेल पाणीपुरी पार्टी करण्यासाठी.
पण छे छे! तसं काही टोळीनं केलं नाही. तर मग काय केलं?
पॉकेटमनीमधून वाचवलेल्या पैशाची त्यांनी एके दिवशी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन मोजदाद केली. ९ हजार रुपयांच्या आसपास ही रक्कम होती.
“वा S व!” तेजोमयी म्हणाली.
“टॉ S व!”इतरांनी प्रतिसाद दिला.
या पैशाचं काय केलं, या टोळीनं?
तर, एके दिवशी टोळीतले तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी, टिल्लू आणि अभिमन्यू ही मंडळी दादर रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या एका मोठया पुस्तकाच्या दुकानात गेली. त्या दुकानाच्या खुल्या प्रांगणात एका मोठ्या टेबलवर दिवाळी अंक विक्रीसाठी ठेवले होते. दिवाळी अंकांचं प्रदर्शनच होतं ते. त्याठिकाणी १०० च्या आसपास दिवाळी अंक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
आता या १०० अंकातून कोणता अंक घ्यायचा? हा प्रश्न मुलांना पडला. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. मुलांची ही धांदल, दुकानदारकाका बघत होते. मुलांना दिवाळी अंक तर घ्यायचेत पण, त्यांना सुचत नाहीय हे त्यांच्या लक्षात आलं. तासाभरानंतरही, मुलांचं दिवाळी अंक पुन्हापुन्हा बघणं, काहीतरी हळू आवाजात बोलणं, पुन्हा बघणं हे चक्र थांबलेलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी चौघांनांही आपल्याजवळ बोलावलं. त्यांना नेमकं काय हवं, ते विचारलं. तेजोमयीने कल्याणीकडे बघितलं. तिने वैष्णवीकडे बघितलं. तिने अभिमन्यूकडे.
“मुलांनो, जे सांगायचय ते थेट सांगा की. कशाला इकडेतिकडे बघता?”
तेजोमयी हसली. तिने मग आपण कशासाठी तिथे आलो ते सविस्तर सांगितलं.
सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरी एक दिवाळी अंक सप्रेम भेट देण्याचं टोळीनं ठरवलं होतं. त्यांच्याकडे नऊ हजार रुपये गोळा झाले होते. तीस अंक हवे होते त्यांना. पण अंक कोणता घ्यायचा नि त्यासाठी पैसे पुरेसे पडतील का, याची त्यांना शंका वाटत होती. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता.
काही मुलं असाही विचार करतात हे बघून दुकानदारकाका खूप आनंदले.
ते म्हणाले,
“मी तुमची समस्या सोडवली तर चालेल का?”
सर्वांनी एका सुरात हो म्हंटलं.
दुकानदारकाकांनी मग, सर्वात जास्त विकला जात असलेला दिवाळी अंक मुलांना दाखवला. त्याची किंमत होती ४०० रुपये. तीस अंकांसाठी लागणार होते बारा हजार रुपये. याचा अर्थ तीन हजार रुपये कमी पडत होते.
“आता काय काका?”
“अरे, तुम्ही काळजी कशाला करता?”
“तुम्ही नऊ हजारातच हे ३० अंक घेऊन जा. या अंकांवर तुमच्यासाठीची खास सुट समजा, माझ्याकडून.”
“वाSव”, असा जोरदार गलका मुलांनी केला.
या आरडाओरडीने इतर ग्राहकांनी त्यांच्याकडे वळून बघितलं. दुकानदार काकांनी, मुलंच ती, गलका करणारच, असं काहीसं एकदोन जणांना सांगितलं.
काकांनी, मग मुलांना टॅक्सी करुन दिली. त्यात नोकराकरवी ३० अंक ठेवले. इकडे कॉलनीत पोहचण्यापूर्वी टोळीने आपल्या इतर सदस्यांना मारुतीरायाच्या मंदिरात येण्याचा निरोप दिला.
मंदिराजवळ टॅक्सी थांबली. तेजोमयीने मारुतीरायांना अंक दाखवला. तिने आणि इतरांनी त्यांना मनोभावे नमस्कार केला. त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याचा भास तेजोमयीस नेहमीप्रमाणे झाला.
आता टोळीतील प्रत्येक सदस्याने प्रत्येकी तीन अंक गुपचूप घरी नेले.
त्या आठवड्यातील रविवारी, टोळी सोसायटीच्या मैदानात अंक घेऊन गोळा झाली. त्यांनी मग प्रत्येकाच्या घरी जाऊन एकएक अंक सर्वांना सप्रेम भेट दिला.
“हे गं काय?”,कल्याणीच्या बाबांनी विचारलं.
“ही दिवाळी सप्रेम भेट!” कॉलनीच्या तमाम बच्चेमंडळींकडून तेजोमयीनं सांगितलं.कल्याणीच्या आईबाबांना पोरांचं कौतुक वाटलं.कल्याणीच्या आईने सर्वांना चॉकटलेट दिले. त्यावर ताव मारत टोळी कॉलनीतल्या प्रत्येक घरी गेली.घरटी एक असा दिवाळी अंक सप्रेमभेट दिला.पोरांच्या या कल्पकतेनं अख्खी सोसायटी भारावून गेली.जे मोठयानं सुचलं नाही.ते या लहानग्यांनी करुन दाखवलं.सर्वजण हीच प्रतिक्रिया देते झाले.
त्याचच कौतुक म्हणून सोसायटीनं टोळीचा जोरदार सत्कार करायचं ठरवलंय.
०००