रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे.
परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी किती समजावलं. पण याचं रडणं काही थांबेचना. शेवटी, ते रवीला रागावले. एकच्याऐवजी तीन इंजेक्शन देईन अशी धमकीच दिली. तेव्हा कुठे याचं रडणं थांबलं.
जखमेवर मलमपट्टी करुन नि टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन रवी घरी आला. घरी पुन्हा त्याचं रडणं सुरु झालं. मला आता चालताच येणार नाही, असंच तो सारखा बडबडू लागला.
आता त्याला, बाहेर पडायचीही भीती वाटू लागली. त्याच्या खोलीच्याबाहेर तो पडेना. याला कसं समजवायचं, हा प्रश्न आईबाबांना पडला. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारलं. रवीच्या मनातील भीती काढणं गरजेचं असल्याचं डॉक्टर म्हणाले. हीच त्यावरची खरी मात्रा ठरेल असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी एक युक्ती सांगितली.
घरी आल्यावर या युक्तीचा प्रयोग आईबाबांनी रवीवर केला.
“एव्हढ्याशा लहानसहान पडण्यानं काय कुणी चालू शकत नाही का? जे भीत्रे असतात. ते त्यांनाच असं वाटतं. त्यामुळे मग तसच होतं कारण, भीतीचं भूत अशा भीत्रोबांच्या मानगुटीवर बसतं.” बाबा समजावत म्हणाले.
भुताचं नाव कानावर पडताच, रवी दचकला. इकडेतिकडे बघू लागला.
“काय बघतोस असा?”आईने विचारलं.
“भ भ भूत!” तो त त पप करत म्हणाला.
“ते तर तुझ्या मानगुटीवर बसलेय.” बाबा म्हणाले.
“ब ब बापरे!” असं पुटपुटत त्याने हळूहळू हात मानेकडे नेला. तिथे कुणीच नव्हतं. रवी आणखी घाबरला.
“कुठे गेलं ते भूत?” त्याने घाम पुसत बाबांना विचारलं.
“ते घराबाहेर शेवंतीच्या झाडाजवळ जाऊन बसलय.”
“न न नाही, तुम्ही खोटे बोलताहात.”
“जे खोटे बोलतात त्यांचे कान हे भूत कापून नेतं. माझे कान शाबूत आहेत, बघ”,बाबांनी कान ओढून दाखवले.
“आता काय करायचं?”
“ज्याच्या मानगुटीवर भूत बसलं असतं त्यानेच ते हाकलून लावायचं असतं.”आई म्हणाली
“त्यामुळे तू पटकन बाहेर जा, नि भुताला हाकलून लाव.”बाबा म्हणाले.
“ पण, मला तर चालताच येत नाही. मी कसा जाणार खोलीच्या बाहेर?” हाताने चेहऱ्याला झाकत रवी म्हणाला.
“मग ते भूत पुन्हा इथे येईल. तुझ्या मानगुटीवर बसेल. त्याला कंटाळा आला तर तुलाच घेऊन जाईल दूर कुठेतरी”.
“मग तुम्ही काहीच मदत करणार नाही का ?”रवी बाबांकडे केविलवाण्या नजरेनं बघत म्हणाला.
‘अशा भुताला ज्याचं त्यानेच हाकलून लावायचं असतं. दुसरा कुणी त्यांच्यामध्ये आला तर त्याला ते मुंगी करुन गिळून टाकतात. तुला तसं हवंय का? आई गंभीर चेहऱ्यानं म्हणाली.
“नाही नाही, मला असं नकोय.”
“कोणत्याच शहाण्या मुलाला त्याच्या आईबाबांना मुंगी झालेलं नको असतं.आता तुला ते ठरवायचय. बाबा गंभीर भाव चेहऱ्यावर आणत म्हणाले.
“पण,मला तर चालताच येत नाही. अरे, तू फक्त उठून बघ. म्हणजे कळेल तुला.”आई म्हणाली.
“अखेर मोठ्या कष्टाने रवी उठला.जखम अजून बरी न झाल्यानं गुडघा ठणकत होता.किंचिंत उठायलाही त्रास होत होता. पण भुताच्या भीतिने हळूहळू रवी उठला. बाबांनी त्याला हात धरुन खोलीच्या बाहेर काढलं.
आपल्याला व्यवस्थीत चालता येतं हे रवीच्या लक्षात आलं.बाहेर येताच,त्याने इकडे तिकडे बघीतलं. त्याला भूत कुठेच दिसलं नाही.
तो बाबांकडे वळून म्हणाला.
“बाबा, इथे तर भूत नाही.कुठे गेलं ते?”
‘तू, खोलीच्या बाहेर येताच, ते घाबरुन पळून गेलं. तू घराभोवती एक चक्कर मारुन खात्री करुन घे. आम्ही येतो, तुझ्यासोबत.” आईबाबा म्हणाले.
त्यांनी मग, रवीसोबत घराला एक चक्कर मारली. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन आले. पण भूत काही सापडलं नाही. आपल्याला भूत घाबरुन पळालं याचा आनंद रवीला झाला.
“पण तू, जर घरातच बसून राहिला असतास तर मात्र हे भूत कायम तुझ्या मानगुटीवर बसून राहिलं असतं.” घरी परतताना आई प्रेमानं थोपटत म्हणाली. भूताची मात्रा चांगलीच लागू पडल्यानं आईबाबा खुष झाले. या मात्रेनं रवी पुन्हा चालू लागला.
सुरेश वांदिले