सशाच्या कोणत्यातरी पूर्वजाने म्हणे सिंह महाराजांना युक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सशाच्या कुटुंबात सांगितली जायची.
खूप खूप वर्षापूर्वी, सध्याच्या सिंह महारांजाच्या पणजोबांचे पंजोबा खूप दुष्ट होते. वननगरीत त्यांची फार दहशत होती. त्यांच्या मनात आले की, ते कुणालाही महाली बोलवत नि त्याचा फडशा पाडत. त्यामुळे सगळे नागरिक त्रस्त झाले होते. या दुष्ट महाराजांना कसं वठणीवर आणायचं नि त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे कुणालाच कळेना.
अशा दहशतीखाली वननगरीचं जीवन किती दिवस चालायचं, असा प्रत्येकाला प्रश्न पडायचा. पण कुणीही काहीच करु शकत नव्हतं. आला दिवस कसा तरी पुढं ढकलणं हेच प्रत्येकजण करु लागला.
मात्र एके दिवशी सध्याच्या ससोबाच्या पणजोबाच्या पणजोबास वाटलं की आपण काही तरी केलं पाहिजे. सिंहमहाराजांना धडा शिकवला पाहिजे. तसं त्याने आपल्या बाबांना सांगितलं. मित्रांना सांगितलं. हत्तीरावांनाही सांगितलं. बाबा घाबरले. मित्र हसले.
हत्तीराव म्हणाले,
ससोबा कशाला जीव धोक्यात घालता स्वत:चा. आगीची परीक्षा घेऊ नये म्हणतात.
पण ससोबानं कुणाचं ऐकलं नाही. तो हिम्मत करुन महाराजांच्या समोर उभा ठाकला. महाराजांना म्हणाला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिमान प्राणी आपल्या वननगरीत आल्याचं मी बघितलंय महाराज. त्याला आपण हाकलून दिलं नाही तर तो एके दिवशी आपलं राज्यच हिसकावून बसेल.
ससोबाचं बोलणं ऐकताच सिंह महाराजांनी मोठी गर्जना केली. या गर्जनेनं जंगल घाबरलं. ते ससोबास म्हणाले,
सशा, कुठे आहे तो माझ्यापेक्षा मोठा श्रेष्ठ प्राणी. तू जर तो प्राणी दाखवू शकला नाहीस, तर मात्र आज तूच माझी मेजवाणी.
महाराज, हे मला ठाऊक नाही का? तुमच्याशी मी कसा असत्य बोलेन. तुम्ही चला माझ्यासोबत मी दाखवतो तुम्हाला तो प्राणी.
पुढची गोष्ट साऱ्यानांच ठाऊक आहे. ससोबाने सिंह महाराजांना एका मोठया विहिरीजवळ नेलं. त्यात त्यांना बघायला लावलं. सिह महाराजांना त्यांचं प्रतिबिंब दिसलं. महाराजांनी गर्जना केली. त्या प्रतिबिंबानेही गर्जना केल्याचं दिसताच महाराजांना आला प्रचंड राग. त्यांनी मारली उडी विहिरीत. त्यात त्यांचा झाला अंत.
दुष्ट सिंह महाराजांच्या तावडीतून वननगरीला मुक्त केल्याबद्दल मग ससोबांचं खूप कौतुक वगैरे झालं.
तर सध्याच्या ससोबाच्या पणजोबांच्या पणजोबांची ही खरी असलेली किंवा नसलेली पराक्रमाची गाथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत राहिली. सध्याच्या ससोबांनाही वाटलं की आपले पूर्वज जर एवढे पराक्रमी होते तर आपणही तेवढेच पराक्रमी असलो पाहिजे. त्यांचंच रक्त ना आपल्या अंगी. मग आपणसुध्दा सध्याच्या सिंह महाराजांना असाच धडा शिकवला पाहिजे. आपल्या मनीची ही इच्छा ससोबानं त्याच्या बाबांना सांगितली. बाबांनी त्याच्या कानशीलात ठेऊन दिली. याचं कारण काही त्याला कळेना.
मुर्खा, तुझ्या पणजोबाच्या पणजोबांनी खरोखरच तेव्हाच्या सिंह महाराजांना अद्दल घडवली की नाही हे सांगायला काय त्यांचं भूत आलं होतं तुला सांगायला? असल्या गावगप्पांवर फार विश्वास ठेवायचा नसतो. सिंह महाराज कुठे नि आपण कुठे? त्यांची आपली बरोबरी तरी होऊ शकते का!
पण बाबा, तुमचं असं सांगणं आपल्या पणजोबाच्या पणजोबाच्या कीर्तिला कलंक लागू शकतोना ! ससोबा हुंदका देत म्हणाला.
अरे, जी गोष्ट आपणास ठाउुक नाही. त्याचा काही पुरावा नाही. सांगोवांगी पराक्रम अर्थहीन असतो. सिंह महाराजांनी डरकाळी फोडली तर आपण उडून जावू, इतका आपला जीव पिटुकला. त्यांच्या पंजांचं नख जरी लागलं तरी आपल्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागेल. त्यांच्या समोर जाऊन आपण कोणता पराक्रम गाजवू शकतो? की पुन्हा तीच थाप नव्याने सांगणार. सिंह महाराजांना विहिरीवर नेणार. त्यांना त्यांचं प्रतिबिंब दाखवणार. मूर्खा, तुला जर कळू शकते की पाण्यात दिसतं ते आपलं प्रतिबिंब असतं तर सिंह महाराजांना कां कळू शकत नाही? तुझ्या पणजोबाचा पणजोबा एवढाच हुश्शार असता तर तोच नाही का या जंगलाचा राजा झाला असता. आपल्या कुटुंबात या जंगलाचा राजाच सोड आतापर्यंत एकही जण साधा शिपाईसुध्दा होऊ शकला नाही. कुणी तरी थाप दिली ठोकून नि आपण बसलो त्यातच गुंतून. असे जे गुंतून बसतात ना ते प्रगती करत नाही. समजलं.
ससोबाने मान डोलावली. पण त्याला काही आपल्या बाबांचं म्हणनं पटलं नाही.
००००
ससोबाने आपल्या मित्रांना सध्याच्या सिंह महाराजांना नमवण्याचा पराक्रम करु इच्छितो असं सांगितलं. त्यांनी ससोबाच्या डोक्यात हवाच भरली. तुझ्याशिवाय कुणीही म्हणजे कुणीही सिंह महाराजांना नमवू शकत नाही असंच काहीसं प्रत्येकजण म्हणाला. या सर्व मित्रांनी ससोबाचा जयजयकार केला नि ते त्यास म्हणाले. शुभस्य शीघ्रम! तू उशीर कशाला करतोस. आजच आपण जाऊ या महाली. झालं. सगळेजण निघाले. वाटेत त्यांना एक गाढव भेटले. तो ससोबास म्हणाला,
ससोबा, असा कसा तू असा चालत जाणार. माझ्या पाठीवर बस नि चल एखाद्या वीराच्या थाटात. ससोबा खुष झाले. ते गाढवोबाच्या पाठीवर बसले नि निघाले सिंह महाराजांच्या महालाकडे.
महाल आल्यावर ससोबा गाढवाच्या पाठीवरुन उतरले. नि सर्व मंडळी मग दरबारात पोहचली.
महाराजांनी येण्याचं कारण विचारलं,
ससोबा छाती समोर करुन म्हणाला, महाराज, या वननगरीत तुमच्यापेक्षा शक्तीमान प्राणी आलाय. तो आम्ही बघितलाय. त्याला तुम्ही हाकलून लावलं पाहिजे. अन्यथा तो एके दिवशी आपणास वननगरीतून हद्दपार करेल.
ससोबा आम्हास तो प्राणी ठाऊक आहे की..महाराज म्हणाले.
काय सांगता महाराज? महाराजांचं उत्तर ऐकून ससोबा चपापलाच.
होय ससोबा, तो प्राणी वननगरीतल्या त्या मोठ्या विहिरीत राहतो. रोज आम्ही भेटतो त्यास.
पण महाराज, तो तुमच्यापेक्षा शक्तिमान आहे. तो एखाद्या दिवशी आपणास हद्दपार करेल वननरीतून…असं काहीसं त त प प करत ससोबा बोलून गेला. आपलं काही खरं नाही. हे त्याच्या लक्षात आलं. त्याचं उसनं अवसानही गळालं. त्याने धावत जाऊन महाराजांचे पाय पकडले आणि क्षमा मागितली. आपला अंतस्थ हेतू सांगितला. आपल्या बाबांचं न ऐकता फुकाचं शौर्य गाजवायला निघाल्याचं त्यानं महाराजांना सांगितलं. तो भीतीनं थरथर कापू लागला. त्याची ती अवस्था बघून महाराज हसू लागले. ससोबाला धिर देत ते म्हणाले..
अहो ससोबा, पूर्वजांच्या अशा सर्वच कथा खऱ्या नसतात. त्यात भाकडकथा अधिक असतात. तुमचे बाबा खरं तेच म्हणाले. समजा अशा कथा खऱ्याही असतील तरी त्या त्या काळात खऱ्या होत्या. काळ बदलतो. परिस्थिती बदलते. आपले पूर्वज पराक्रमी होते म्हणजे आपणही तसेच असू असं नाही. ते जसे वागले तसेच आपणही वागायला हवं असंही नाही ना. काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. स्वत:च्या अंगी असलेली शक्ती आणि बुध्दी जोखली पाहिजे. पूर्वजांच्या कर्तृत्वावर पराक्रम गाजवता येत नाही ससोबा.सिंह महाराजांनी ससोबाला समाजावलं.
यापुढे असं मुर्खासारखं वागणार नाही अशी कबुली देऊन ससोबानं महाराजांचा निरोप घेतला.