वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढ लागली. आपणच एकमेव या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं, आपली हांजी हांजी करायला हवं असं त्यांना वाटायच.
शुल्लकशुल्लक गोष्टींवरुन इतर प्राण्यांना त्रास द्यायला त्यांना फार आवडे. एखाद्या प्राण्याची छेड केली नाही तर त्यांचा दिवस चांगला जात नसे. रात्री झोप येत नसे. त्यांच्या अरेरावी आणि दुष्टपणामुळे सारे प्राणी त्रस्त झाले. त्यांच्या जाचाला कंटाळून काही प्राण्यांनी वननगरीला रामराम ठोकण्याचा विचार सुरु केला. पण जाणार कुठं? हा प्रश्नच होता. या प्रश्नाचं उत्तर काही कुणाला सापडलं नाही. याच परिस्थितीत आपल्याच वननगरीत राहण्याचा निर्णय प्राण्यांनी घेतला.वाघोबांच्या जाचाला सहन करीत ते आला दिवस काढू लागले.
हत्तीदादा, अस्वलराव या बलाढ्य प्राण्यांनी वाघोबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण वाघोबाने त्यांचं म्हणणं उडवून लावलं.
” मी तर या वनाचा मालक. कसाही वागेन. मला कुणाची काय भीती? कुणाची हिम्मत असेल तर त्यांनी रोखून दाखवावं मला.” असं त्यांनी छाती फुगवून या दोघांना सांगितलं. वाघोबाला माज आलाय.त्याला आता चांगला धडा शिकवायला हवा, असं इतर प्राण्यांनी ठरवलं.
०००
वाघोबाला धडा शिकवण्यासाठी काय करायला हवं हे ठरवण्यासाठी हत्तीदादाच्या नेतृत्वाखाली वननगरीत एका गुप्त जागी सभा झाली. या सभेत, करु किंवा मरु अशी शपथ प्राण्यांनी घेतली.
” पण करणार काय? वाघोबा म्हणजे मुंगी नव्हे.”हत्तीदादा म्हणाले.
“त्याला धडा शिकवायचा म्हणजे केवळ शक्ती असून चालणार नाही. त्याच्यासारखी शक्ती आपल्या कुणाकडेही नाही. ” घोडेराव म्हणाले.
“मग युक्तीने काम घ्यावं लागेल.”अस्वलराव म्हणाले.
हत्तीदादा,घोडेराव आणि अस्वलरावाचं म्हणणं प्राण्यांना पटलं. वाघोबाला धडा शिकवणं काही सोपं नव्हतं. त्याने एक डरकाळी फोडली तरी अनेक प्राण्यांची फें फें उडत असे. माकडासारखा प्राणी तर त्याच्या सावलीलाही घाबरत असे. त्यामुळे वाघोबाला अद्दल घडवायची असेल तर युक्तीशिवाय पर्याय नव्हता.
आता ही युक्ती कुणी आणि कशी करायची यावर बराच वेळ चर्चा झाली. वेगवेगळया कल्पना समोर आल्या. हे करु...ते करु...असं करु...तसं करु, यूँव करु नि त्यूँव करु असं प्रत्येकजपण सांगू लागला. पण या सर्व युक्त्या या प्राण्यांचीच फसगत करणाऱ्या आणि वाघोबाच्या तोंडी स्वत:हून जाण्यासारख्या होत्या.दिवसभर चर्चा होऊन काहीही निष्पन्न झालं नाही. वाघोबांना आपणापैकी कुणीही शह देऊ शकत नाही यावर सर्वांचं एकमत होऊ लागलं.
यापुढे त्याचा त्रास सहन करीतच आपल्याला वननगरीत राहावं लागेल याविषयी प्राण्यांना तीळमात्रही शंका उरली नाही.सर्व प्राणी खिन्न झाले. त्यांचे चेहरे पडले. काय करावं कुणालाच सूचेना. सभेत स्मशान शांतता पसरली.
प्राण्यांची ही गंमत, ही सभा ज्या झाडाखाली भरली होती त्यावर राहणारी खारुताई बघत होती. प्राण्यांचं असं निराश होणं, हताश होणं तिला आवडलं नाही. एकेक प्राणी जेव्हा सभेतून जायला निघाला. तेव्हा ती सुर्रकन खाली आली नि हत्तीदादांसमोर जावून म्हणाली,
” हत्तीदादा हत्तीदादा, वाघोबाला धडा शिकवण्याच्या कामी मी तुम्हाला मदत केली तर चालेल काय?”
” तू आणि मदत!अगं तुझा जीव केवढासा आणि वाघोबाची शक्ती किती मोठी.त्याला बघितलं की आमचीच जिथे बोबडी उडते, तिथे तुझं काय चालणार?” रानडुक्करकाका हसत हसत म्हणाले.
काही प्राण्यांनी खारुताईची टिंगलटवाळी केली. त्या सर्वांना हत्तीदादाने झापलं. त्याने खारुताईचं काय म्हणनं आहे हे शांतपणे ऐकून घेतलं. खारुताई वाघोबाला धडा शिकवण्याचं आव्हान स्वीकारायला तयार होती.
“आपल्यासारख्या प्राण्यांना जे शक्य नाही, ते ही हातभर खारुताई कशी काय करेल?”असं घोडेरावास वाटलं.तिच्याशी चर्चा करुन हत्तीदादा आपला वेळ उगाचच घालवताहेत असं काही प्राण्यांना वाटलं. सभेत चलबिचल सुरु झाली. अस्वस्थता वाढली. काही प्राण्यांनी हत्तीदादालाच दुषणं द्यायला सुरुवात केली. काहीजण हातघाईवर आले.काही जणांनी आपल्याला नशिबाला दोष देणं सुरु केलं. हत्तीदादाने हा कलकलाट बंद केला.तो म्हणाला,
“हे बघा आपण आज दिवसभर एवढा काथ्याकूट केला पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.आता ही खारुताई स्वत:हून म्हणते तर तिला आपण संधी देऊया. कधीकधी छोटया प्राण्यांकडूनच जिगरबाज गोष्टी घडून जातात.”
बऱ्याच प्राण्यांना हत्तीदादाचं सांगणं पटलं. काहींनी ते हसण्यावारी नेलं. पण बहुसंख्यांचा कल खारुताईला संधी देण्याकडेच असल्याने खारुताईला,”ऑपरेशन वाघोबाची जिरवणे”, या मोहिमेचं कॅप्टन केलं गेलं.
०००
आता कसोटी खारुताईंची होती.तिलाही प्रश्न पडला आपण फार शौर्य दाखवत आव्हान तर स्वीकारलं. नेमकं करायचं काय? हे काही तिला सूचेना. पण आता पाऊल मागं घेणं नाही. असं मनात म्हणून ती कामाला लागली.
तिने वाघोबांवर पाळत ठेवली. ते कुठे जातात, कुठे आराम करतात, कुठे पाणी प्यायला जातात, अशी माहिती तिने गोळा केली. या माहितीतूनच तिला कळलं की वाघोबा दररोज दुपारी भोजन झाल्यावर वननगरीतील तलावाच्या काठी असलेल्या झाडाखाली विश्रांतीला येतात. तिथे दोन-तीन तास आराम करतात.
ज्या झाडाखाली वाघोबा विश्रांती घेत त्या झाडावर खारुताई जावून बसली.
दुपारच्या भोजनावर ताव मारुन वाघोबा आले. तलावातलं पाणी प्याले. मस्तपैकी आळस देत त्यांनी झाडाखाली ताणून दिली. काय करायला हवं? काय करायला हवं? याचा विचार खारुताई करु लागली. वीज चमकून जावी तसा एक विचार तिच्या मनात आला. सुर्रकन एका फांदीवरुन खाली येऊन वाघोबांची मिशी जोरात ओढून ती झर्रदिशी वर पळाली. मिशी ओढल्याने वाघोबांना वेदना झाल्या. ते धडपडत उठले. त्यांनी इकडे-तिकडे बघितलं तर आजूबाजूला कुणीही नव्हतं. ते पुन्हा झोपी गेलं. खारुताईने हीच गंमत पुन्हा केली. वाघोबा खाडकन जागे झाले. आजूबाजूला तर कुणीच नाही मग आपली मिशी ओढण्याचं धाडस करतं तरी कोण? त्यांना आश्चर्य वाटलं. भयंकर रागही आला.आपल्याशी गंमत करणारा, तो जो कोण असेल त्याला फाडूनच खायचा निर्धार त्यांनी केला. जोरदार डरकाळी फोडली नि पुन्हा झोपी गेले.
पुन्हा सर्रदिशी खाली येऊन खारुताई आली नि वाघोबांची मिशी ओढून वर पळाली.आता वाघोबांची झोप पूर्णच उडाली. त्यांनी पुन्हा इकडे-तिकडे, वरखाली बघितलं पण कुणीच दिसलं नाही.ही भुताटकीच असली पाहिजे असं समजून त्यांनी तिथून पोबारा केला.
दुस-या दिवशी ते दुस-या झाडाखाली विश्रांती घ्यायला आले. खारुताईने तिथेही वाघोबाला असच भंडावून सोडलं. वाघोबा जिथे जिथे जात तिथे तिथे खारुताई त्यांचा पिच्छा पुरवित असे. त्यामुळे वाघोबांना दररोज झाडं बदलावी लागत.
दुपारची झोपमोड दररोज होत असल्यानं त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. त्यांची चपळता कमी झाली. आपल्या पाठीमागे कोणतीतरी भुताई शक्ती लागल्याचं त्यांच्या मनानं पक्क घेतलं. त्याचाही त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. त्यांची भूक कमी झाली. शिकार करण्याची इच्छाच राहिली नाही. ते एके ठिकाणीच पडून राहू लागले.
या भुताई शक्तीच्या तावडीतून स्वत:ची सुटका कशी करुन घ्यायची, हे त्यांना सूचेना. वाघोबा हवालदिल झाल्याचं खारुताईच्या लक्षात आलंच होतं.
एके दिवशी गलितगात्र झालेल्या वाघोबासमोर खारुताई हिमतीने उभी राहिली. वाघोबांनी कसेबसे डोळे उघडले. खारुताईनं त्याची विचारपूस केली.काय झालं वगैरे विचारलं. कुणीतरी आपली चौकशी करायला आलय, याचं वाघोबांना बरं वाटलं. त्यांनी सारंकाही तिला सांगितलं. यातून सुटका करण्याचा काही मार्ग सूचतो का, हे ही त्यांनी विचारलं. वाघोबा बोलत असताना, खारुताईला मात्र हसू येत होतं.
भुताई जादूचा वाघोबांनी खूपच धसका घेतला. या जादूची भीती त्यांच्या मानगुटीवर बसल्याने ते आपल्याच तालात आणि तंद्रित राहू लागले.त्यांचा उत्साह कमी झाला.त्यांना आता कशाचीही भीती वाटायला लागली.या भीतीपोटी त्यांनी वननगरीतून फेरफटका मारणं खूप कमी केलं. ते भटकंतीला निघायचे तेव्हा भीतीच्या सावटाखाली असल्याने भेदरल्यासारखे वागायचे. त्यामुळे त्यांचं इतर प्राण्यांना त्रास देणं बंद झालं. त्याची अरेरावी बंद झाली.
खारुताईच्या युक्तीमुळे वाघोबा वठणीवर आले. खारुताईंनी केलेली युक्ती मात्र कुणालाही कळली नाही.
हत्तीदादांनी खारुताईचं मनसोक्त कौतुक केलं. कधीही कुणाचं उणदुणं काढायचं नाही. लहानतला लहान प्राणी-पक्षीही आपल्या मदतीला येऊ शकतो. हा धडा वननगरीतल्या प्राण्यांना यामुळे मिळाला.
000