महाराजांना मिळाला धडा
वननगरित एकदा सिंहमहाराज वनभ्रमंतीला निघाले होते. त्यांच्यासोबत राणी सरकार, दोन राजपूत्र आणि एक राजकन्याही होती. वनभ्रमंतीचा आनंद घेत घेत पाचहीजन राजवाड्यापासून खूप दूर निघून आले. दुपारी एके ठिकाणी शाही मेजवाणी झाली.थोडीशी विश्रांती घेऊन खासा स्वारी पुन्हा वनभ्रमंतीस निघाली.
सूर्य मावळण्यापूर्वी राजवाड्यात परतूया, असं महाराज, राणीसरकारांना म्हणाले. राणीसरकार राजपुत्र आणि राजकन्येस हे सांगण्यासाठी मागे वळल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजकन्या गायब झालीय.
त्यांनी महाराजांना ओरडून तसं सांगितलं. महाराज गर्रदिशी मागे वळले. राजपुत्रही वळले. राजकन्या आपल्यासोबत नाही हे बघताच राणीसरकारांच्या पायाखालची वाळू सरकली. महाराजही घाबरले. दोन्ही राजपुत्रही सैरभर झाले. वनभ्रमंती करत असताना राजकन्या एखादी वाट चुकली असण्याची शक्यता होती. पण अशी वाट चुकली तर कोणतही संकट अंगावर कोसळू शकतं. राजकन्या फारच लहान असल्याने तिच्यावर इतर प्राणीही हल्ला करु शकले असते. राणीसरकार रडत रडत महाराजांना म्हणाल्या.
महाराजांनी त्यांना धीर दिला. राजकन्येस काहीही होणार नाही असा दिलासा दिला. जंगलाच्या मध्यभागी थांबून काही उपयोग नव्हता. त्यामुळे महाराजांनी राणीसरकारांना समजावून महालात आणलं.
०००
इकडे खरोखरच राजकन्या जंगलाची वाट चुकली होती. खूप वेळाने आई-बाबा आणि दादा दिसत नसल्याचं जेव्हा तिच्या लक्षात आलं,तेव्हा ती घाबरली. इकडे जावं की तिकडे जावं हा प्रश्न तिला पडला. तिला काहीच सुचेना, त्यामुळे वाट मिळेल तिकडे ती पळत सुटली.
तिला असं पळताना गजराजांच्या चार पाच मुलांनी बघितलं. ते तिच्यासमोर उभे राहिले. राजकन्या आणखीच घाबरली. पाचही मुलं तिच्या अवतीभवती उभे राहिल्याने पळावं तरी कुठून आणि कसं हे तिला काही कळेना. तिची ती घाबरलेली अवस्था बघून ती पाचही मुलं जोराजोराने चित्कार करु लागली. राजकन्येस आणखी चिडवू लागली.
गजराज आणि हत्तीण अवतीभवतीच्या आपल्या कळपात होते. त्यांना आपली मुलं दिसत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी राजकन्येस मुलांनी अडवले होते त्या ठिकाणी ते लवकरच आले. घाबरलेल्या राजकन्येस आपली मुलं आणखी छळताहेत, त्रास देताहेत हे लक्षात येतात गजराज त्यांच्यावर फार रागावले. त्यामुळे घाबरुन ती मुलं बाजूला सरली.
हत्तीणकाकू राजकन्येजवळ पोहचली. तिने हलकेच तिच्या मस्तकास आपली सोंड लावली. आपल्या आईच्या स्पर्शासारखा तो स्पर्श असल्याचं राजकन्येस जाणवलं. त्यामुळे तिची भीती कमी झाली. ती हत्तीण काकूकडे केविलवाण्या नजरेने बघू लागली.
गजराज तिच्यासमोर येऊन म्हणाले,’घाबरु नकोस राजकन्या.तुला काही होणार नाही.मी तुला सुखरुप घरी पोहचवीन.‘
हे ऐकून राजकन्येस धीर आला.गजराजाने राजकन्येस आपल्या सोंडेवर बसण्यास सांगितलं.ती कशीबशी सोंडेवर बसली.गजराज आणि हत्तीण काकू राजमहालाकडे निघाले.
०००
इकडे राजवाड्यात महाराज,महाराणी आणि राजपुत्रांच्या डोळयास डोळा लागत नव्हता. महाराणीचं रडणं थांबत नव्हतं. महाराज त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थच जात होते.
महाराज इकडून तिकडे, तिकडून इकडे फेऱ्या मारत होते. बराच वेळानंतर त्यांना गजराजांचा चित्कार ऐकू आला. इतक्या रात्री गजराज कसा काय आपल्याकडे आलाय याचं महाराजांना आश्चर्य वाटलं.ते लगबगीने महालाच्या बाहेर आले. गजराजांच्या सोंडेवर बसलेली राजकन्या त्यांना दिसली. महाराज खूप आनंदले. त्यांनी महाराणींना हाक मारली. महाराणी आणि राजपुत्र लगेच बाहेर आले. तोपर्यंत गजराजांनी राजकन्येस अलगद सोंडेवरुन खाली उतरवलं होतं.
आईबाबांना बघताच राजकन्या आंनदली आणि धावतच आईकडे येऊन तिला बिलगली.महाराजांच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.
त्यांनी गजराजांचे आभार माणले.राणीसरकार यांनीही आभार माणले.
महाराज गजराजांना म्हणाले,
‘गजराज, मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण वनगरीचे राजे असूनही आपल्याला प्रजेचं प्रेम कां मिळत नाही आणि तुम्ही कुणीही नसताना तुम्हाला प्रेम कां मिळतं?’
‘आपणास प्रेम कां मिळत नाही आबासाहेब?’एका राजपुत्राने पटकन विचारलं.
‘अरे, आपल्या वागणुकीमुळे!आपल्याला या गजराजाचा मुलगा किंवा मुलगी सापडली असती तर आपण त्याला असं गजराजाकडे स्वत:हून पोहचवलं नसतं. आयती मेजवाणी मिळाली म्हणून खूष झालो असतो.‘
‘होय हो, बरोबर आहे, तुमचं म्हणणं.आपणास इतर प्राणी दिसले की लगेच त्यांना भक्ष करावसं वाटतं.ही मोठीच चूक आपण करतो.‘राणी सरकार डोळयात अश्रू आणत म्हणाल्या.
‘सिंहमहाराज, तुमच्या लक्षात चूक लक्षात आली ना!आता अशी चूक करु नका.किमान कोणत्याही प्राण्याच्या लहान मुलांची शिकार करु नका.तुमच्या मुलांसारखी असतात ती निष्पाप! राजकन्या हरवल्याने राणीसरकार जशा कासावीस झाल्या तशाच इतर प्राण्यांच्याही आया होतात.‘
महाराज आणि राणी सरकारांनी प्रजाजनांसोबत चांगलं वागण्याचं, त्यांच्याशी प्रेमानं वागण्याचं, त्यांच्या अडीअडचणीला मदतीस जाण्याची शपथ गजराजांसमोर घेतली.
०