घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार
1
पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली. तक्रारीचा विषय होता, पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप. आरोपात काय होतं, तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही. त्याच्या बापजाद्यांना ही चव कळली नव्हती, यालाही कळली नाही आणि पुढच्या गाढवांनाही कळणार नाही.
हे प्रकरण हातघाईवर आलं. पिंकूने लाथही उचलली. ढिंकूही मागे हटायला तयार नव्हता. कसंतरी हे प्रकरण सिंकू हत्तीनं मिटवलं. पण तेव्हढ्यापुरतच. तीनचार दिवसांनी पुन्हा हाच प्रकार घडला. तेव्हा पिंकूचा राग अनावर झाला. त्याने यावेळी लाथा हाणल्या नाहीत की वादविवादही केला नाही. त्याने थेट सिंह महाराजांकडे तक्रार केली.
महाराजांकडे तक्रार आल्यावर आधी तर ते हसले. पिंक्याला काही अक्कल नाही, असं प्रधानजी वाघोबांकडे वळून म्हणाले. ही तक्रार फाडून फेकून द्या, असा आदेश ते देणार, तेव्हा सेनापती अस्वलरावांनी त्यांना थांबवलं.
महाराज, प्रजा मूर्ख असेल नाहीतर आणखी काही असेल, पण महाराजांनी त्यांना न्याय दिला पाहिजे. पिंकूचं म्हणणं काय आणि ढिंकूचं म्हणणं काय, हे आपण ऐकलं पाहिजे.
महाराजांनी प्रधानजीकडे एक नजर टाकली. दुसरी नजर सेनापती अस्वलरावांकडे टाकली. तिसरी नजर सरदार कोल्होबांकडे टाकली. सर्वांनी होकार दिला.
पिंकूच्या तक्रारीवर न्यायनिवाडा करण्यासाठी विशेष दरबाराचं आयोजन करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. पण गाढवाला गुळाची चव काय, याचा निवाडा कसा करायचा हा प्रश्न महाराजांना पडला. त्यांनी आपल्या दरबाऱ्यांसमवेत बराच खल केला. पण कुणासही गूळ कसा असतो, हेच माहीत नव्हतं. ही चव जोपर्यंत कळत नाही, तो पर्यंत अचूक न्यायनिवाडा होऊ शकत नाही, असं महाराजांनी दरबाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आधी ही चव समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यानंतरच विशेष दरबार बोलावला जाऊ शकतो, ही बाब महाराजांनी स्पष्ट केली. सर्व दरबाऱ्यांना त्यांचं म्हणनं पटलं.
महाराजांच्या सूचनेनुसार प्रधानजींनी दुसऱ्या जंगलप्रांतातील सिंह महारांजाकडे दूत पाठवून गुळाच्या चवीची विचारणा केली. पण त्यांनाही गुळाची चव सांगता आली नाही. त्या दुसऱ्या महाराजांनी तिसऱ्या प्रांतातील सिंहमहाराजांकडे विचारणा केली. त्यांनाही काहीच सांगता आलं नाही. मात्र हे गुळाच्या चवीचं प्रकरण महत्वाचं असल्याचं वाटून या तिसऱ्या महाराजांनी थेट दक्षिण आफ्रिकेतील सिंह महाराजांकडेच त्यांचे दूरस्थ नातेवाईक चित्तेसिंह यांच्याकरवी विचारणा केली.
0000
2
दक्षिण आफ्रिकेतील सिंहमहाराजांकडे ही विचारणा जेव्हा आली तेव्हा, ते आणि त्यांचे दरबारी अतिशय गंभिर झाले. सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. सूई पडल्यावर सुध्दा आवाज येईल अशी शांतता दरबारात निर्माण झाली. काही क्षणानंतर महाराज, खोSखो असं जोरजोरानं हसू लागले. त्यांचं खोखो हसणं बघून इतर दरबारी होSहो करत जोरजोराने खिदळू लागले.
महाराज कशासाठी हसताहेत, हे विचारण्याची सोय नव्हती. एकदाचं महाराजांचं खोखो हसणं थांबलं, तेव्हा दरबाऱ्यांचही होहो हसणं थांबलं. पुन्हा सूई पडल्यावरही आवाज येईल अशी शांतता दरबारात निर्माण झाली.
मुर्खांनो, महाराज गरजले, आम्ही कां हसलो, हे तुमच्यापैकी एकालाही विचारावं वाटलं नाही. अशी जर गाढवामागून वरात निघाली तर आपण सारे गटारगंगेत नाही का जावून पडणार?
महाराज काय बोलताहेत हे नकळून सर्व दरबाऱ्यांनी होकारार्थी मान हलवली. आपल्या दरबाऱ्यांना काहीच येत नाही, सगळेच्या सगळे मूर्खशिरोमणी. आपणच तेव्हढे शहाणेसुर्ते, बुध्दीमान आणि हुषार,असं महाराजांना वाटलं. त्याचं समाधान त्यांच्या जबड्यावर विलसलं. या समाधानाचा आनंद मनवण्यासाठी त्यांनी दरबाऱ्यांसाठी खासा नास्ता आणण्याचे आदेश प्रधानजींना दिले. महाराजांच्या खोखो हसण्याला, होहो हसण्यानं प्रतिसाद दिल्यावर, आपणास काहीच कळत नाही असं सांगितलं वा दर्शवलं की खासा नाश्ता मिळू शकतो, ही बाब सर्व दरबाऱ्यांच्या मनानं टिपली.
नाश्ता येईस्तोव महाराज दरबाऱ्यांशी बोलत राहिले, ते म्हणाले,
आम्ही हसलो ते तुमच्या मूर्खपणावर नव्हे. आम्ही हसलो ते चित्तेसिंह यांनी आणलेल्या निरोपावर. पहिल्या महाराजांकडून दुसया आणि दुसऱ्याकडून तिसऱ्या महाराजांकडे आणि तिसऱ्या महाराजांकडून आमच्याकडे आलेल्या या निरोपात हसण्याचं बीज रोवलं आहे.
ते कोणतं महाराज, युवराज पुटपुटले.
बरं झालं युवराज तुम्हीच हा प्रश्न विचारलात ते. आपल्या दरबाऱ्यांना प्रश्नही पडत नसतात. ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असली तरी कधी– कधी प्रश्न पडल्यास गाढवांचं साम्राज्य थोडच निर्माण होणार आहे, नाही का? तेव्हा दरबाऱ्यांनो अधूनमधून प्रश्नही विचारत जा. आम्हास वाटलं तर त्याचं उत्तर देऊ. वाटलं तर तुम्हास बक्षीस देऊ, वाटलं तर हाकलून लावू.
होय होय महाराज, सर्व दरबारी एकसुरात म्हणाले. महाराज आता काय सांगतात याकडे सर्वांनी कान टवकारले.
महाराज म्हणाले,
आमच्याकडे चित्तेसिंहांनी जो निरोप आणला त्यावरुन आम्हास असं दिसतं की तिन्ही सिंह महाराजांची बुध्दी कामातून गेली आहे.
ते कसं काय महाराज, नम्रतापूर्वक प्रधानजींनी विचारलं.
प्रधानजी, गाढवाला गुळाची चव काय, हा काय प्रश्न झाला. हा प्रश्न कोणत्यातरी घोड्याला पडला. त्याने गाढवाला चिडवलं. या चिडवाचिडवित गाढवानं तक्रार केली. या तक्रारीच्या निराकरणाची शेपूट एव्हढी लांबली की ती आपल्यापर्यंत पोहचली. एकाही महाराजाला गुळाची चव काय असते हे ठाऊक नाही.
पण महाराज, आपणास तरी…युवराज कसेबसे बोलले.सर्व दरबाऱ्यांच्या पोटात हास्याचा कल्लोळ निर्माण झाला. पण सर्वांनीच तो दाबून धरला. फट म्हणता डायनोसॉर व्हायचा नि महाराज आपणासच लाथ हाणायचे, सर्वांनी हा विचार करुन मोठ्या कौतुकानं युवराजांकडे बघितलं. महाराजांनीही युवराजांकडे कौतुकानं बघितलं. त्यांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून प्रेमानं कुरवाळलं.
बघा दरबाऱ्यांनो, भविष्यातील तुमच्या राजाला कसे बुध्दिमान प्रश्न पडतात ते. आजपासून त्यांना आम्ही उत्तर आफ्रिका प्रांतातील जंगलाचं स्वतंत्र राज्य बहाल करत आहोत. सर्व दरबाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दरबाऱ्यांनो, युवराजांच्या प्रश्नाच्या पोटात जे होतं ते तुमच्या ओठांपर्यंत आलं होतं. पण तुम्ही फिरत बसलात गाढवाभोवती. जाऊ द्या.मुद्दा असा आहे की, पहिल्या तिन्ही महाराजांना गुळाची चव ठाऊक नाही, तशीच आम्हाला सुध्दा नाही ना. पण आम्ही कुठे तसं सांगितलं. आपले पत्ते कधी असे उघडे करायचे नसतात. पण या तिकडच्या महाराजांना ते कळलं नाही. त्यांचा अडाणीपणा मात्र यातून आपणास कळला. या त्यांच्या अडाणीपणात आपल्या राज्यासाठी एक मोठी संधी आहे दरबाऱ्यांनो.
कोणती महाराज, प्रधानजी भितभित म्हणाले.
काय प्रधानजी, कोणत्या गाढवानं आपणास प्रधानजी बनवलं. ही साधी बाब आपणास कळू नये. आपले प्रधानजीपद अशाने काढून आपल्या जागी,त्या पहिल्या महाराजांच्या प्रांतातील गाढवास गुळाची चव काय, असा सवाल विचारणाऱ्या घोडेरावांनाच नेमावं लागेल.
क्षमा असावी महाराज, चुकूभूल झाली.घाम पुसत प्रधानजी म्हणाले.
प्रश्न नाही विचारले तरी मूर्खपणा आणि विचारले तर घोडेराव उरावर, त्यामुळे गप्प बसण श्रेयस्कर,हे सर्व दरबाऱ्यांनी ताडलं, महाराज सांगू लागले,
दरबाऱ्यांनो, गाढवाच्या गुळाच्या चवीच्या कथेत आपल्या राज्याचा कारभार तिन्ही महाराजांच्या प्रांतापर्यंत पोहचवता येऊ शकतो, याची बिजं दडलेली असल्याचं आमच्या चाणाक्ष बुध्दीनं ताडलं आहे. या तिन्ही महाराजांना आपण गुळाच्या चवित ढकलून देऊ आणि आपण त्यांचे राज्य ताब्यात घेऊ. आपण आता सम्राट आहोत, पण गाढवाच्या गुळाच्या कृपेनं चक्रवर्ती सम्राट होऊ.
हो हो हो महाराज,अगदी बरोबर. एकासुरात दरबारी म्हणाले. आपला महाराज खरोखरच आपल्यापेक्षा दहापट बुध्दीमान असल्याची सर्वांची खात्री पटली. प्रधानजींनाही तसच वाटलं. आपलं प्रधानजीपद कायम राहू देरे देवा, असं साकडं त्यांनी घातलं. एव्हाना नाश्ता आला होता. तो सर्वांनी भक्षण केल्यावर, महाराज म्हणाले,
या तिन्ही महाराजांना गाढवाला गुळाची काय चव असते हे सांगण्यासाठी आम्ही स्वत:च त्यांच्या राज्याकडे सैन्यासह कूच करावं म्हणतो…
पण महाराज, आपणास कुठे ठाऊक आहे, गाढवाला गुळाची चव काय असते ते. युवराजांनी प्रश्न विचारला.
युवराज तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. ते उत्तर म्हणजे, नाही. गाढवाला,त्याच्या बापाला आणि त्याच्याही बापालासुध्दा गुळाची चव ठाऊक नाही. मग आपणास कुठे ठाऊक असणार? पण आपण ठोकून द्यायचं आम्हास ठाऊक आहे म्हणून…
अशानं त्यांनी आपणासच गाढव समजलं तर. युवराज घाबरत घाबरत विचारते झाले.
मग उत्तमच ठरेल. गाढव बणून जायचं आणि सिंह बणून वार करायचा. आपण म्हणजे सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव थोडेच आहोत. खऱ्या सिंहानं गाढवाचं रुप घेतलं तर काम सोपं नाही का होणार.
होय महाराज, होय महाराज. सर्व दरबारी पुन्हा एका सुरात बोलले. गाढवाला गुळाची चव काय हे सांगण्यासाठी ते स्वत: येणार असल्याचा निरोप दक्षिण आफ्रिकेतील सिंह महाराजांनी चित्तेसिंहांमार्फत तिसऱ्या महाराजाकडे पाठवाला, तिसऱ्याने दुसऱ्याकडे हा निरोप पाठवला. दुसऱ्याने पहिल्या महाराजांकडे पाठवला.
000
2
दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय, या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे, असे म्हंटल्यावर पहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली.
पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं दिसू लागलं. दक्षिण आफ्रिकेतील या सिंहमहाराजांना गाढवाचा एव्हढा पुळका येण्याचं कारणच काय? असा प्रश्न त्यांना पडला. या प्रश्नानं त्यांची झोप उडाली. त्यांनी सर्व प्रमुख दरबाऱ्यांना आपली शंका विचारली. पण सर्वांनी ही शंका हसण्यावारी नेली.
गाढव आणि घोड्याचा तर हा कुटील डाव नसेल ना, असेही पहिल्या महाराजांना वाटून गेले.
तो कसा काय, महाराणींनी विचारलं..
अहो, आपणास या अशा आरोपाच्या तक्रारीत गुंतवून ठेवायचं आणि आपलं राज्य ताब्यात घ्यायचं. गाढव राजा आणि घोडा प्रधान.
पण यात, त्या दक्षिण आफ्रिकेतील महाराजांचा काय संबंध?
त्याची मदत घेऊन हा डाव साधतील ते. त्यालाच हे राज्य देऊन टाकतील. मग त्याच्या वतिने गाढव आणि घोडा राज्य करतील. आपणास हाकलून लावेल तो सिंह महाराज.
एव्हढा काय बलाढ्य असतो आपल्यापेक्षा. तुम्हीसुध्दा शक्तीशाली आहातच ना महाराज. त्याने असा काही प्रयत्न केला तर त्याला आपण जमीनदोस्त करुन टाकूना. महाराणी म्हणाल्या. महाराजांना त्यांचं बोलणं ऐकूण बरं वाटलं. पण त्यांना धोका दिसतच होता.
दुसऱ्या प्रांतातल्या राजाने बलिष्ठ असला तरी काय म्हणून आपल्या राज्यात येऊन निवाडा द्यायचा. आपणच समर्थ नाहीत का, असा प्रश्न त्यांनीच स्वत:ला विचारला. याप्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी एका विशेष दरबाराचं आयोजन केलं. पिंकू गाढव आणि ढिंकू घोडा यांनाही या दरबारात सन्मानानं बोलावण्यात आलं. दोघांना महाराजांनी उच्चासनी बसवलं. त्यांचा सत्कार केला. इतर दरबाऱ्यांसाठी हे सारं चमत्कारिक होते. आपल्या हुषार महाराजांच्या बुध्दीला चार दिवसात कसा काय गंज लागला याचा विचार ते करु लागले. महाराजांनी दरबाराचं कामकाज सुरु केलं. ते म्हणाले ,
पिंकू गाढवराव आणि ढिंकू घोडेराव यांचा आपणास अभिमान वाटतो. कारण एकानं प्रश्न निर्माण केला आणि दुसऱ्यानं त्यावर आक्षेप घेतला. असं जेव्हा घडतं. तेव्हाच ज्ञान वाढतं. आम्हास यांचं वागणं फार आवडलं आहे. आम्ही मधल्या काळात गुळाची चव काय असते आणि गाढवरावांना गुळाची चव कळतं काय, याचा शोध घेतला.
अरे वा महाराज, मग आपणास काय कळलं महाराज, प्रधानजी उत्सुकतेने म्हणाले. घोडेरावांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. गाढवरावही आनंदले.
महाराज म्हणाले,
आम्हास जे कळलं ते आणि दक्षिण आफ्रिकेतील महाराजानांही कळलं ते एकच आहे का हे आधी बघून घ्यायला हवं, असं आम्हास वाटतं. आपल्याकडचे गाढवराव आणि तिकडचे गाढवराव वेगळे थोडेच आहेत, नाही का?
अगदी बरोबर. सेनापती म्हणाले.
तेव्हा गाढवाला गुळाची चव काय, या तक्रारीवर निर्णय देण्याआधी आपण पिंकू गाढवराव आणि ढिंकू घोडेराव यांना दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडचे सिंह महाराज या दोघांना त्यांची माहिती देतील. हे दोघेजण ती माहिती इकडे घेऊन आले की, आम्हाला मिळालेली माहिती आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून आणलेली माहिती ताडून बघू आणि मग योग्य तो निवाडा देऊ. चालेल ना दरबाऱ्यांनो, महाराजांनी विचारलं.
सर्वांनी होकार दिला. काही दरबाऱ्यांना पिंकू आणि ढिंकूचा हेवाही वाटला. एका साध्या तक्रारीतून या दोघांना महाराजांच्या खर्चातून दक्षिण आफ्रिकेची सफर घडत होती. इतरांपेक्षा हे दोघेही हुषार निघाल्याचं काही दरबाऱ्यांना वाटलं.
पिंकू आणि ढिंकूही आनंदले. बरेच दिवस ते राज्याच्या बाहेर गेले नव्हते. इतर प्रांतातल्या मोफत सफारीची संधी अशी मिळेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. पहिल्या महाराजांनी लगोलग या दोघांच्या जाण्याची तयारी करुन दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या महाराजांकरवी दक्षिण आफ्रिकेतील महाराजांना तसा निरोप धाडण्यात आला.
000
3
दक्षिण आफ्रिकेतील महाराज या निरोपानं चक्रावलेच. कारण आपण समजतो तसे हे पहिले महाराज अडाणी नाहीत ,याची त्यांना खात्री पटली. या महाराजाला गाढवाला गुळाची चव काय समजू शकते, पण आपणास नाही. याचा अर्थ आपल्या दरबाऱ्यांसह आपणही महामूर्ख आहोतच, असा मनात विचार करत महाराजांनी आरशात बघितले. त्यांना आपण खरोखरच मूर्ख आहोत. आपल्या राज्यातील गाढवापेक्षाही आपली बुध्दीमत्ता कमी आहे, असं वाटू लागलं. असं वाटावं म्हणूनच तर आपल्या आणि तिकडच्या गाढवांनी कट रचला नसेल ना, असंही त्यांना वाटून गेलं. या सर्व गाढवांचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि घोड्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे असं त्यांनी त्याक्षणी मनोमन ठरवून टाकलं.
त्यांनी दरबार भरवून आपला निर्णय घोषित केला. दक्षिण आफ्रिकेतल्या जंगलातील गाढवे आणि घोड्यांना जंगलातून हाकलून लावण्याची निर्णय घेत असल्याचं त्यांनी दरबाऱ्यांना सांगितलं.
सर्व दरबाऱ्यांनी उत्तम, असं या निर्णयाचं वर्णन केलं.
या निर्णयाचं पालन ताबडतोब झालं. जंगलातील घोडे आणि गाढव जंगलाबाहेर आले. या महाराजांनी आपला बुध्दीमान निर्णय तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या महाराजांना कळवला. तुम्हीही असा निर्णय घेतला तर आपण कधीच तुमच्या प्रांताकडे येणार नाही असही त्यांनी कळवलं. सर्व महाराजांनी दक्षिण आफ्रिकेतील महाराजांचा निर्णय योग्यच वाटला.
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार हा सगळ्या महाराजांसाठी अपमानास्पदच प्रकार होता. त्यामुळे तिन्ही महाराजांनी लगोलग आपल्याही प्रांतातील घोडे आणि गाढव यांना जंगलातून बाहेर काढले.
पिंकू आणि ढिंकूला याची काहीच कल्पना नव्हती. ते आपले रमतगमत, मजा करत दक्षिण आफ्रिकेकडे प्रवास करत राहिले. ते तिकडे पोहचले की नाही, याची चौकशी ना पहिल्या महाराजांनी केली. ना दक्षिण आफ्रिकेतल्या महाराजांनी …
गाढवाला गुळाची चव काय हा प्रश्न मात्र जिथल्या तिथे राहिला तो राहिलाच राहिला.या प्रश्नामुळे मात्र गाढव आणि घोड्यांना जंगलातून बाहेर पडावं लागलं ते कायमचं.
000
सुरेश वांदिले