तेजोमयीच्या कॉलनीतलं झाड परवाच्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळं कोसळलं. सकाळी सहाची वेळ असावी. धडाडधूम असा जोरदार आवाज झाला. विजेच्या कडकडापेक्षा हा आवाज भयावह होता. त्याने आई-बाबा आणि तेजोमयी गडबडून जागे झाले. आईबाबांना भूकंप झाला की काय असं वाटलं. तर तेजोमयी कावरीबावरी होऊन त्या दोघांकडे बघत बसली. अलेक्झांडरही घाबरुन बाबांना बिलगला. घर हलत नसल्याचं आणि घरातलं काहीच पडलं नसल्याचं लक्षात घेताच आईला हायसं वाटलं. याचा अर्थ घराबाहेर काहीतरी घडलं होतं. आईने खोलीची खिडकी उघडली.
अरे बापरे, ती जोरानं ओरडली.
काय झालं, किंचाळायला, बाबांनी विचारलं.
अहो हे बघा, आपल्या समोरचं झाड कोसळलय. असं आईनं सांगताच बाबांच्या लक्षात काय घडलं ते आलं. ते तिघेही आणि अलेक्झांडर गॅलरित आले. कोसळलेलं ते झाडं बघून दोन क्षण कुणीच काही बोललं नाही. आईबाबांनी त्या वृक्षाला २० वर्षापासून बघितलं होतं. तेजोमयीला कळायला लागल्यापासून या झाडाच्या आठ-दहा वर्षाच्या स्मृती तिच्या मनात होत्या.
हे झाड थेट त्यांच्या गॅलरिच्या आणि स्वयंपाकाच्या खोलीसमोर होतं. त्यामुळे या झाडावर येणारे बहुरंगी पक्षी, त्यांचा किलबिलाट-चिवचिवाट-ओरडणं सारं काही आईबाबा आणि तेजोमयीच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला होता. झाडावर राहणाऱ्या काही कावळ्यांनी आईशी गट्टी केली होती. ते ठरलेल्या वेळी स्वयंपाकखोलिच्या खिडकीजवळ येऊन आईला साद घालत. आई आणि त्यांचा संवाद चाले. आई त्यांना खाऊ-पिऊ घाली. खारुताई, चिमणी, टिटवी हे गॅलरीतल्या खिडकीजवळ येत. गॅलरीतून बाहेर डोकवणाऱ्या बागेतील फांद्यावरुन इकडे तिकडे जात. त्यांच्यासाठी गॅलरित एके ठिकाणी आई पाणी ठेवत असे. त्यांच्या खाण्यासाठी एक भांड तिने गॅलरित ताराला डकवून ठेवलं होतं.
झाडाच्या सावलित संध्याकाळी तेजोमयी आणि आई बॅडमिंटन खेळत. झाडाखाली बसण्यासाठी दोन बाकं होती. त्यावर रात्री फिरायला गेलं की कधीकधी आईबाबा तेजोमयी आणि अलेक्झांडर बसत असतं. असं हे झाडं पडल्याचं बघून आईच्या डोळयात अश्रू आलं. बाबांचं ह्रदय गलबलून आलं. तेजोमयीला हुंदका आला. काहीतरी विपरित घडल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलं. तो काळजीपोटी आईच्या पायाशी घुटमळू लागला आणि तिच्या पायाला अंग घासू लागला.
आता काय हो बाबा. तेजोमयीनं विचारलं..
कशाचं काय?
या झाडाचं…त्याला किती वेदना होत असतील ना..
होत असणारच बाळ… प्रत्येक वृक्ष वल्लीमध्ये आपल्यासारख्याच भावना राहू शकतात. त्यांना त्या व्यक्त करता येत नाहीr. पण वृक्ष-वल्ली एकमेकांशी बोलू शकतात, असं थोर शास्त्रज्ञ डॉ जगदिश चंद्र बोस यांनी नाही का शोधून ठेवलय.
मग आता, याचं दु:ख कसं दूर करणार आपण ?
असा प्रश्न आईने बाबांना विचारला आणि बाबा विचारात पडले.. पडलेल्या झाडाचं दु:ख दूर करण्याचं औषध त्यांनाही ठाऊक नव्हतं.
०००