(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

खोटं कधी बोलायचं नाही.हा सर्वात मोठा सद्गुण असल्याचं बाबांनी एकेदिवशी तेजोमयीस सांगितलं.

बरोबर ना गं, त्यांनी आईस विचारलं आणि हळूच अलेक्झांडरकडे चोरुन बघितलं. आईस विचारलेल्या प्रश्नाविषयी बाबा माझ्याकडे कां बघत असावेत असे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले. तो शेपूट हलवत त्याच्या जागेवरुन उठला नि बाबासमेार येऊन त्याने.. म्हणजे हो काय, असं मान उंच करुन बाबांना खाणाखुणा केल्या.

अरे, ते काय सांगणार कप्पाळ, मीच सांगते असं आई अलेक्झांडरकडे वळून म्हणाली. अलेक्झांडर आईच्या कुशित विसावला.

अरे, त्यांनी मला टोमणा मारला. ती अलेक्झांडरकडे बघत म्हणाली. अलेक्झांडरने रागाने बाबांकडे बघितलं.

खरचं बाबा, तुम्ही आईस टोमणा मारला? तेजोमयीनं आश्चर्यानं बाबांना विचारलं.

आई खोटं बोलण्याचा आणि टोमण्याचा काय संबंध? तेजोमयीने आईस विचारलं.

हा सद्गुण माझ्याकडे नाही, असं तुझ्या बाबांना म्हणायचय.

बाबा, हे बरोबर नाही हं..तेजोमयी लटक्या रागाने बाबांना म्हणाली.

अगं, मी कुठे असं म्हणालो..आईनेच स्वत:च्या मनास हे लावून घेतलय. कर नाही त्याला डर कशाला?बाबा तेजोमयीस समजावत म्हणाले.

हे बघ बाळ, कधीकधी चांगल्या कामासाठी खोटं बोललं असेनही, तर तेच त्यांनी लक्षात ठेवलय. आई तेजोमयीस म्हणाली.

चांगलं खोटं आणि वाईट खोटं असे खोट्याचे दोन प्रकार असतात का? तेजोमयीनं विचारलं.

हे बघ, तुला मी एकनाथ महाराजांची गोष्ट सांगते. म्हणजे चांगलं आणि वाईट खोटं , यातला फरक तुला तुला कळेल. आई म्हणाली.

वा S व गोष्ट..तेजोमयी उत्साहाने म्हणाली. अलेक्झांडरनेही कान टवकारले.

तुम्हीसुध्दा ऐका हो, असं बाबांकडे वळून आई सांगू लागली..

पैठणमधील एका सावकाराला त्याच्या संपत्तीचा खूप गर्व झाला. त्या गर्वाने आणि अंहकाराने फुलून तो घरचे आणि बाहेरचे या सगळयांशीच वाईट वागू लागला. त्यामुळे गावकरी आणि घरातली सगळी मंडळी त्रासून गेली.अखेर कंटाळून ही मंडळी एकनाथ महाराजांकडे गेली. महाराजांना सर्व काही सांगितलं. महाराज म्हणाले,तुम्ही काळजी करु नका,मी करतो सारं काही सुरळीत.

मग काय झालं..तेजोमयीनं विचारलं..

एकनाथ महाराज,सावकाराच्या वाडयात त्याला भेटायला गेले. महाराजांना भविष्य कळतं,असं सावकाराला कळलं होतं.त्यामुळे एकनाथ महाराज आसनावर बसताक्षणी सावकाराने महाराजांपुढे हात समोर केला. महाराजांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला नि डोळे बंद केले. दहा मिनिटे ते काहीच बोलले नाहीत..त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.

महाराज काय झालं,सावकाराने विचारलं..

सावकारबुवा..भविष्य फार वाईट आहे तुमचं..म्हणून मी सांगावं की न सांगावं या विचारात होतो.

सांगा की महाराज..माझ्या मनाची तयारी आहे वाईट ऐकण्याची….

सावकारबवुवा तुमचा आठ दिवसात मृत्यू होईल, असं तुमच्या तळहातावरील रेषा बोलताहेत.असं सांगून महाराजांनी सावकाराचा निरोप घेतला.

मग खरोखरच तो सावकार मेला का आठव्या दिवशी..तेजोमयीनं उत्सुकतेनं विचारलं.

अगं,हे भविष्य ऐकून तो सावकार फार घाबरला.त्याला दरदरुन घाम फुटला.काय करावं ते त्याला सूचेना..काही वेळाने त्याला बरं वाटू लागलं,तेव्हा त्याने ठरवलं की आपण आठ दिवसात मरणार असल्यानं आता सगळयांशी चांगलं प्रेमानं वागायल हवं.तसं तो खरोखरच वागू लागला.त्यामुळे घरातील आणि पैठणमधील व्यक्ती खुष झाल्या.आंनदी झाल्या.घरात तर दिवाळीच वातावरण निर्माण झालं. बघता बघता आठ दिवस झाले..

मग तो सावकार मेला का आठव्या दिवशी? तेजोमयीनं विचारलं. तिची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती.

नाही गं..तो मेला नाही..

म्हणजे, एकनाथ महाराज खोटं बोलले असं म्हणायच का तुला..

हो असचं म्हणायचं..आठव्या दिवशीही आपला मृत्यू न झाल्याचं बघून सावकारासही असच वाटलं.

मग तो रागावला की काय,एकनाथ महाराजांवर…

तसं नाही झालं.महाराजांनी असं खोटं सांगितल्यामुळे सावकाराचे आठ दिवस आतापर्यंतच्या आयुष्यात सगळयात आनंदी गेले. त्यामुळे आपण असचं प्रेमानं वागलं पाहिजे असं त्या सावकाराच्या लक्षात आलं. महाराजांनी सांगितलेलं खोटं भविष्य आपल्यासाठी फायद्याचं ठरलं, हे त्याच्या लक्षात आलं.यासाठी त्याने महाराजांना धन्यवाद दिले.

याचा अर्थ एकनाथ महाराजांचं हे चांगलं खोटं बोलणं, सावकाराच्या हिताचं ठरलं म्हणायचं…

अगदी बरोबर. आईच्या अगोदर बाबा बोलून गेले.

असंच मी एखादेवेळेस कुणाच्या हितासाठी खोटं बोललं असेल तर तुझ्या बाबांना वाटतं मी नेहमीच खोटं बोलतं..

सॉरी.. आईकडे बघून बाबा म्हणाले. अलेक्झांडरने आनंदाने शेपूट हलवली.

पण बाळ, शक्यतो चांगलं खोटं की वाईट खोटं असा भेदभाव न केलेलाच बरा..म्हणजे शक्यतो आपण खोटे न बोललेच बरं.. बाबा म्हणाले तसं हा मोठाच सदगुण आहे बर का..आई बाबांकडे बघून म्हणाली..बाबा खुदकन हसले ..

०००