बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक आहे. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तिकस्वामी यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि शंकर भगवान यांना वंदन करुन कार्तिकस्वामी पृथ्वीप्रदक्षिणेसाठी निघाले सुध्दा.
मात्र, बाप्पा तेथेच घुटमळत राहिले. अरे, तू गेला नाहीस अजून. नारदमुनींनी विचारलं.
मला जायची गरज नाही..बाप्पा उत्तरले.
या स्पर्धेत हरशील अशी भीती वाटतेय का तुला? नारदमुनी, पार्वतीमाता आणि शंकर भगवान यांनी एकाच वेळी बाप्पांना विचारलं.
नाही हरणार? मीच जिंकणार. बाप्पा आत्मविश्वासानं म्हणाले. नारदमुनी, पार्वती माता आणि शंकर भगवान यांना आश्चर्य वाटलं.
कार्तिकस्वामी त्यांचे वाहन असलेल्या मोरावर बसून कधीचेच खूप दूर निघून गेले होते. बाप्पांचे वाहन मुषकस्वामी मोदक खात पहुडले होते. हा जाणार कधी आणि पृथ्वीला प्रदक्षिणा मारणार कधी? तिघांनाही प्रश्न पडला. अखेरीस नारदांनी विचारलेच.
गणेशा, अरे तू अद्याप इथेच आहेस .कार्तिकेयाने तर एव्हाना अर्धी पृथ्वी पालथी घातली असेल. तू आता जरी इथून निघालास तरी तू कार्तिकेयाच्या निम्म्यावर सुध्दा जाऊ शकणार नाही.
बाप्पा हसले. त्यांनी पार्वती माता, शंकरभगवान आणि नारदमुनींना वंदन करुन पार्वतीमातेस प्रदक्षिणा घातली. नारदांकडे वळून म्हणाले,
महर्षी झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा. कार्तिकेय दादा तर दूरुन दूरुन सुध्दा दिसत नाही मला..
हे कसं शक्य, नारदमुनींना प्रश्न पडला. मात्र शंकरभगवान आणि पार्वतीमातेस कळून चुकलं होतं.
अहो, नारदमहर्षी, पृथ्वीचं दुसरं रुप कोणतं? आईचच ना. गणेशाने त्याच्या आईला प्रदक्षिणा घातली म्हणजे, पृथ्वीला प्रदक्षिणा नाही का घातली. शंकर भगवानांनी नारदांना समजावून सांगितलं. पार्वतीमातेने कौतुकाने बालगणेशाला कवटाळलं. नारद मुनिंना गणेशाच्या बुध्दीचं आणि चातुर्याचं कौतुक वाटलं. त्यांनीही त्याची तोंडभरुन स्तुती केली.
वेळप्रसंग पाहून अशी हुषारी, अशी बुध्दी चालवावी लागते. हा धडा यातून आपण शिकायचा. बाबा तेजोमयीस सांगते झाले.
०००
अहो, किती दिवस हा धडा तुम्ही सांगत राहणार आपल्या लेकिला.. हॉलमध्ये आवाज घुमला.. सर्वांनी चमकून दाराकडे बघितलं.
दस्तुरखुद्द बाप्पांचं आगमन झालं होतं घरी..
बाप्पांना बघताच तेजोमयी आणि बाबांना खूप आनंद झाला. आई, लगबगीने स्वयंपाकघरातून बाहेर आली. बाप्पांना बघून ती गहिवरुन गेल्याने त्यांना दंडवत घालायची विसरली. आई दररोज बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार घालते हे अलेक्झांडर बघत असे. आज बाप्पा, समोर दिसत असताना ती बाप्पांना दंडवत कां घालत नसावी, असे आश्चर्ययुक्त भाव अलेक्झांडरच्या डोळयात उमटले. त्याने त्याच्या पध्दतीने खाणाखुना करुन ,तसे सुचवायचा प्रयत्न केला,तरी आईच्या लक्षात आले नाही. मग, अलेक्झांडरच बाप्पांच्या पाया पडला. तेव्हा कुठे आई-बाबा आणि तेजोमयीस कळलं. तेव्हा, तिघांनीही बाप्पांना दंडवत घातला.. बाप्पांनी सर्वांना आशीर्वाद दिला. बाप्पा आसनस्थ झाले.
बाप्पांसोबत आलेला मूषकस्वामी हा थोराघरचा असल्याचे अलेक्झांडरने लगेच ओळखले होते. त्यामुळे त्याने मूषक स्वामींसोबत सलगी केली. ते दोघेही तिथेच खेळत बसले..
बाप्पा, तुम्ही आमच्याकडे येत असताना म्हणालात की, पृथ्वी प्रदक्षिणेचा धडा किती दिवस सांगणार म्हणून.. याचा अर्थ काय ? तेजोमयीनं विचारलं.
बाप्पा असं कां म्हणाले असतील याचं आश्चर्य आई- बाबांनी वाटलं होतं, त्यामुळे ते बाप्पा काय सांगतात, याकडे कान देउुन ऐकू लागले.
बाप्पा सांगू लागले..
अहो, आई-बाबा, काही गोष्टी प्रतिकात्मक असतात. मात्र ती प्रतिके किती दिवस मिरवत बसायची आपण.
म्हणजे हो काय बाप्पा.. बाबांनी विचारलं.
अहो बाबा, आता माझंच बघाना. दादा आणि मला पृथ्वी प्रदक्षिणा कोण आधी घालू शकतो हे सांगितलं गेलं तेव्हा मी पार्वतीमातेस प्रदक्षिणा घालून बाजी मारली. आईचं प्रतिक पृथ्वी आणि पृथ्वीचं प्रतिक आई असल्यानं मी स्पर्धा जिंकली. पण पुढे सारा घोटाळाच झाला ना..
कसला घोटाळा बाप्पा.. आईनं उत्सुकतेनं विचारलं..
अहो, आमच्या वार्षिक परीक्षेत पृथ्वीवरील पाच ठिकाणांची माहिती विचारली. मी पृथ्वी प्रदक्षिणेला गेलोच नसल्याने मला एकाही ठिकाणाचं वर्णन करता आलं नाही. मात्र कार्तिकेय दादास हा प्रश्न उत्तम रितिने सोडवता आला. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस माझी दांडीच उडाली. इथे कोणतेही प्रतीक माझ्या कामी आलं नाही.
पार्वतीमातेने चमत्कार कां नाही केला, तुम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी ? तेजोमयीनं विचारलं.
अगं बाळ, चमत्काराने परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. त्यासाठी ज्ञान लागतं. परीश्रम करावं लागतं. प्रतीकं त्याच्या जागी ठीक असतात, पण प्रत्यक्ष कार्याच्या वेळी ती फारशी किंबहुना काहीच कामाची नसतात, हा धडा मी तेव्हा शिकलो. हाच धडा आताच्याही मुलांना द्यायला नको का..
बरोबर आहे बाप्पा तुमचं…आई म्हणाली..आमचे डोळे उघडल्याबद्दल तुमचे किती आभार माणावे तेच कळत नाही.
आभार माणायचेच असतील तर तुम्ही माझ्यासाठी उकडीचे मोदक बनवाना आई..बाप्पांनी फर्माईश केली. आई आनंदाने तत्काळ उकडीचे मोदक बनवण्याच्या तयारीला लागली…
आईचे मोदक होईस्तोव बाप्पांसोबत बाबा आणि तेजोमयीच्या गप्पा चांगल्याच रंगल्या…खेळून खेळून कंटाळा आल्याने मूषक स्वामी आणि अलेक्झांडरही त्यांच्याजवळ येउुन बसले.
आईचे मोदक तयार झाले. ती जेव्हा बाहेर मोदक घेउुन आली तर बाप्पा तिथे नव्हतेच.
बाबा आणि तेजोयमी बाल गणेश मालिका पाहण्यात गुंग झाले होते. अलेक्झांडरही जिभ लांब करत तन्मयतेने मान डुलवत होता..
अहो, बाप्पा गेले कुठे..आईनं विचारलं..
ते तर देवघरातच आहेत, ते इथे कुठे आले होते.. बाबा म्हणाले.
आँ..
तुला भास झाला की काय , तेजोमयीनं विचारलं.
नाही गं, त्यांनीच तर हे उकडीचे मोदक बनवायला सांगितलं ना..मोदकांकडे बोट दाखवत आई म्हणाली..
अगं आई, तू दरवर्षीच त्यांच्यासाठी मोदक नाही का करत..नवं काय त्यात..
त्यांना आवडतात म्हणून करते गं..
ते आवडण्याचं प्रतीक आहे आई, बाप्पांसाठी प्रेमानं काहीही केलं तरी चालतं..बरोबर ना बाबा..
हो अगदी बरोबर..
म्हणजे मी उभ्या उभ्या स्वप्न बघत होते की काय? आई म्हणाली. तिने मग स्वप्नात काय बघितलं ते सांगितलं.
तर, बाळ या स्वप्नाचा अर्थ काय बरं लावायचा, बाबांनी तेजोमयीस विचारलं..
प्रतिकापेक्षा प्रत्यक्ष कार्य करणं महत्वाचं. प्रतीकं तात्पुरती असतात, काम मात्र कायमस्वरुपी राहतं..बरोबर ना रे अलेक्झू.. त्याच्याकडे बघत तेजोमयी म्हणाली.
तुमचं तुम्ही बघा म्हणून त्याने आईकडून बळजबरीने मोदक मिळवून त्यावर त्यावर अलेक्झांडर ताव मारु लागला.
सध्या तरी मोदकच महत्वाचे हे ध्यानात आल्याने तिघांनीही मोदकाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
०००