(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सिनेमा सुरु होतो नि धाडदिशी तुमच्या अंगावर एक अणुकचिदार सुळे असलेला भयावह चेहरा आदळतो. थ्रीडी तंत्राचा चष्मा लावून तुम्ही बघत असाल तर मग काय बघायलाच नको. काही क्षण तुम्हाला असं वाटतं की, हा जबडा आपल्‍या मानेचा लचका घेणार. हे सगळं कसं चित्तथरारक नि अंगावर शहारे आणणारं!

तर, हा असा भयावह चेहरा असतो आमचा. या चेहऱ्याने आम्हाला खलनायकच बनवून टाकलय. सिनेमात असं दाखवतात की आमच्यापैकी एखाद्याला अगदी सहज वाटतं की, चला आज आपल्याला मानवाची शिकार करायचीय किंवा चला आज आपल्याला एखाद्या प्रवाशी जहाजावरच हल्ला करायचाय. असं वाटलं की, तो ते तसं करु पाहतो. सुरुवातीला त्याला थोडंफार यश मिळतं. मग त्याची दहशत निर्माण होते. प्रसंग पुढे जात असताना किंवा कथा पुढे सरकत असताना अचानक धाडदिशी पुन्हा एकदा तो अजस्त्र सुळ्यांचा चेहरा तुमच्या अंगावर आढळतो नि ढँग S डँग S फँग s मँग , असा काही विचित्र दणदणाट तुमचं कर्णपटल भेदून जातो. थरार आणि भीती या दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच वेळी अनुभवता.

सिनेमात आम्हाला कायम खलनायक दाखवलं जातं नि आम्ही केवळ मानवावर हल्ला करण्याचाच एकमेव उद्दोग करतो असं साधारणत: बिंबवलं जातं.

पण, प्रत्यक्षात खरंच तसं आहे का?

खरंच, आम्ही खलनायक आहोत का?

तुम्हाला आता जे काही सांगेन ना, ते वाचल्यावर मग तुमच्या लक्षात येईल की खरे खलनायक कोण ते?

फार ताणून धरण्याआधी आमची ओळख करुन देतो. सिनेमात तुमच्या अंगावर येणारे अजस्त्र जबड्याचे आम्ही म्हणजे शार्क! आमचा जन्म झाला ४५ कोटी वर्षापूर्वी. आमचं खरं काम हे समुद्रातील इतर माशांवर नियंत्रण ठेवणं नि पोषक द्रव्याचं चक्र राखण्याचं. जंगलातील वाघोबा जसा, निसर्गचक्राला संतुलीत ठेवतो. जंगलातील समतोल साधतो आणि पर्यावरण रक्षणासही साहाय्य करतो. तसच आम्ही महासागरात करतो.

महासागराचं पर्यावरण रक्षण केवळ पाण्यातील जीवांसाठीच उपयुक्त नाही तर जमिनीवर पशुपक्षी ,वृक्ष, वनस्पती, मानव या सगळयांसाठी फार गरजेचं. हे पर्यावरण संतुलन बिघडलं तर ही तुमची माझी पृथ्वी संकटात येऊ शकते. त्याचबरोबर आपण सारे सुध्दा! हे तुम्हास चांगलं कळतं, पण कां कोण जाणे ते वळत नाही. त्यामुळे तुम्ही मानवांनी आमची बेसुमार कत्तल चालवलीय. आमचे कल्ले, मांस यासाठी ही कत्तल केली जाते. यावर आधारित कारखाने तुम्ही काढले आहेत. त्यासाठीचा हा कच्चा माल, तुम्ही आम्हाला ठार करुन मिळवता.

आपल्या पृथ्वीवर आतापावेतो पाच वेळा मोठ्या प्रमाणावर प्रजाती नष्ट होण्याची प्रक्रिया घडली. त्या पाचही वेळा आम्ही बचावलो. मात्र तुमच्या तडाख्यात सापडलेला आमचा “सिल्की शार्क” नावाचा नातेवाईक कोणत्याही क्षणी पृथ्वीवरुन नष्ट होण्याच्‍या पातळीपर्यंत आलाय. २०१७ सालीच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर  या तुम्हीच स्थापन केलेल्या संस्थेनेच तसं सांगितलय.

तुमची बाबा वेगळीच गंमत असते. तुम्हीच आम्हा प्राण्यांना, जलचरांना असं जीवावरच्या संकटात टाकता नि मग, संकटात सापडलेल्या प्राण्यांची अशी यादीबिदी करुन अश्रूही आढळता.

हे अश्रू खरे की खोटे, हे आम्ही सांगू शकत नाही. पण खरे खलनायक कोण,मात्र हे मात्र नक्कीच सांगू शकतो.

पटतय ना तुम्हाला!

सुरेश वांदिले