(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एकदा गाढवोबा त्याच्या मुलांसह रमत गमत वनभ्रमंतीला निघाले होते. वाटेत त्यांच्या मुलांना एक कातडं पडलेलं दिसलं. ती मुलं तिकडे धावली. त्या मुलांना ते कातडं कोणत्या प्राण्याचं आहे,  हे कळेना. तेव्हा त्यांनी गाढवोबास विचारलं. गाढवोबाने त्या कातड्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. तेव्हा ते सिंहाचं कातडं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तसं त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं.

“बाबा, आपण हे कातडं पांघरलं तर आपण सिंहासारखं दिसू ना. म्हणजे मग आपणास सर्वजण भितील. आपल्या आज्ञेत राहतील.

गाढवोबाने, त्या मुलाचं कान ओढले. सिंहाचं कातडं ओढण्याचा अविचार असल्याचं त्यांना समजावून सांगितलं.

“तुम्हाला कसं ठाऊक?” गाढवोबाच्या एका मुलानं विचारलं. त्यावर गाढवोबा हसले आणि त्यांनी आपल्या एका पूर्वजाने सिंहाचं कातडं पांघरुन केलेल्या मूर्खपणाची गोष्ट मुलांना सांगितली.

“पण बाबा, यात कसला आलाय मूर्खपणा? उलट त्यांना काही काळ तरी सिंह म्हणून सन्मान मिळाला असणार ना?”दुसऱ्या मुलानं विचारलं.

“नाही रे राज्या, असं काही झालं नाही.आपले हे पूर्वज महाशय, सिंहाचं कातडं पांघरुन वननगरीत मोठ्या तोऱ्यात जाऊ लागले. तेव्हा सुरुवातीला काही वेळ, आजूबाजूच्या प्राण्यांना खरंच भीती वाटली.”

“बघा, मी जे म्हंटल, तसंच झालं.” पहलिा मुलगा म्हणाला.

“अरे, असा उतावळा होऊ नकोस. आपल्या पूर्वज महाशयांना वाटलं, वा वा, हे प्राणी आपणास भिताहेत याचा अर्थ आपणच आता जंगलाचे राजे!”

“मग?”

“मग काय, त्या आनंदाच्या भरात त्याने आरोळी दिली.”

“मग?”

“अरे, कातडं जरी सिंहाचं होतं तरी आवाज तर गाढवाचाच निघाला ना.त्यामुळे अवतीभवतीचे प्राणी आश्चर्यचकित झाले. सिंह महाराजांचा आवाज गाढवाच्या आवाजासारखा कां येतो, असं त्यांना वाटलं.”

“मग?”

“मग काय, गंमतच झाली. आपल्या या पूर्वज महाशयाच्या समोर एकदा दोन कुत्रे उभे ठाकले. ते त्याच्यावर भुंकू लागले. त्या भुंकण्याने हे आपले पूर्वज महाशय घाबरले. कातडे तिथेच सोडून ते धूम पळाले. पळताना त्यांना काही भान राहिले नाही. त्यामुळे ते थेट सिंह महाराजांच्या गुहेजवळ येऊन पोहचले. खूप धावल्यामुळे त्यांना दम लागला. ते धापा टाकू लागले. आता त्यांच्याच्याने पुढे धाववेना. त्यांनी तिथेच फतकल मारली. आपल्या गुहेसमोर कोण येऊन बसलय हे बघण्यासाठी सिंह महाराज तिथे आले. त्यांना बघून या गाढव महाशयांची बोबडी वळाली. ते बेशुध्द झाले. सुदैवानं सिंह महाराज नुकतेच शिकारी वरुन भोजन करुन आले होते. पोट भरलं असलं की ते कुणावर सहसा हल्ला करत नाही. त्यामुळे बेशुध्द पडलेल्या गाढवाकडे नजर टाकून ते गुहेत निघून गेले. कधीतरी रात्री हे गाढव शुध्दीवर आले. आपण इथे कसं आलो हे त्याला आठवलं, सिंह महाराज आपल्यासमोर उभे ठाकल्याचं आठवलं .या आठवणिने ते ताडकन उभे राहिले. तेवढ्या रात्रीच ते तिथून पळून गेले. थोडक्यात काय तर थोडक्यात त्यांचा जीव वाचला.”

“पण बाबा, तेव्हा तसं घडलं म्हणून आताही तसंच  घडेल, असं नाही ना.” दुसरा मुलगा म्हणाला.

“म्हणजे, तुला म्हणायचं काय?”

“बाबा अहो, आपणसुध्दा हे कातडे पांघरुन बघू या ना. या कातड्यामुळे आपणास सिंह समजून वननगरीतील प्राणी आपल्या आज्ञेत येतील. आपण त्यांच्यावर राज्य करु.”

“अरे, गधड्या, असं करणं म्हणजे आगिशी खेळणं! आगिशी खेळलं की होरपळणं आलच. हे सत्य माहीत असूनही आपण आपल्या पूर्वजासारखेच वागलो तर आपल्याइतके मूर्ख कुणी नाही. पटतय का तुला?” गाढवोबा मुलाला म्हणाले.

वडिलधाऱ्यांच्या सांगण्याकडे लक्ष देणं, त्यांचं ऐकणं फार हिताचं असतं, अशी शिकवण लहानपणापासूनच मिळत असल्याने दोन्ही मुलांनी होकारार्थी मान डोलावली.

सिंहाचं कातडं तिथेच टाकून गाढवोबा आणि त्यांच्या मुलांनी आपली वनभ्रमंती पुन्हा सुरु केली.

सुरेश वांदिले