(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एकदा बादशहा अकबराच्या स्वप्नात राक्षस आला. या राक्षसाने अकबरास झोपलेल्या अवस्थेत उचलले आणि तो एका मोठ्या पर्वतावर पोहचला. खाली नदी वाहत होती. त्याने अकबरास नदीत फेकून दिले.

झोपेतच बादशहा अकबर प्रचंड घाबरला. वाचवा..वाचवा.. असे जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी असणारे सैनिक धावत शयनगृहात आले.

अकबरास जाग येऊन तो पलगांवर थरथर कापत बसला होता.

काय झाले खाविंद? एका सैनिकाने भीत भीत विचारलं.

राक्षस राक्षस आला होता.त्याने मला पर्वतावरुन नदीत ढकलून दिले. अकबर थरथर कापत म्हणाला. त्याच्या घशाला कोरड पडली होती. एका सेवकाने त्याला पाणी दिले. तेव्हा त्यास बरे वाटले.

ताबडतोब बिरबलास बोलावून आणा..अकबराने फर्मान सोडले.

पण खाविंद एवढ्या रात्री, बिरबलांना कसे बोलवणार? ते झोपले असतील ना. सुरक्षा सैनिक म्हणाला.

या बोलण्याचा अकबरास राग आला. अंग थरथर कापत असतानाही उशीच्या बाजूला असलेली तलवार उचलून त्याने सुरक्षा सैनिकाच्या गळयास लावली.

मी सांगितलं तेवढच करायचं. फालतूचे प्रश्न विचारायचे नाहीत. अकबरल गरजला.

तो सैनिक पुरता गर्भगळीत होऊन गेला होता. त्याने कशीबशी अकबराच्या तावडीतून सुटका करुन घेतली. आणखी काही सैनिकांना घेऊन तो बिरबलाच्या घरी दौडत पोहचला.

एवढया रात्री झोपमोड झाली म्हणून बिरबलास संताप आला होता. पण एका सैनिकाने त्याच्या पायावर लोटांगण घातले, तर दुसऱ्याने त त प प करत बादशहाचा निरोप दिला. तिसऱ्याने काय काय घडले ते सांगितले.

बादशहाचा निरोप म्हंटल्यावर बिरबलास जाणे भागच होते. त्याने घोडा काढला नि त्यावर बसून तो महालात पोहचला. घोड्यला पागेत बांधून थेट अकबराच्या शयनकक्षात पोहचला.

अकबर अजूनही भीतीने थरथर कापत होता. बिरबलास बघताच अकबर त्याच्या गळयात पडला नि ओक्साबोक्सी रडू लागला.

खाविंद, असे रडू नका, हिंदुस्थानच्या सम्राटास असे रडणे शोभत नाही. काय झाले ते सांगा. बिरबल अकबरास सांत्वना देत म्हणाला.

या धिराच्या बोलण्याने अकबराचे रडणे थांबले. त्याने स्वप्नातल्या राक्षसाने पर्वतावरुन नदित कसे ढकलून दिले, ते सांगितले.

पण खाविंद, ते स्वप्न होते. अशी स्वप्न पडतच असतात. त्याने घाबरुन जायचे नसते. तुम्हाला त्याने फेकले म्हणता, पण तुम्हाला तर काहीच झाले नाही. तुम्ही सुरक्षित आहात.

बिरबला…बिरबला, अरे, समजून घे..हा स्वप्नातला राक्षस प्रत्यक्षात येऊन मला पळवून नेऊ शकतो ना.

खाविंद, असे काही होत नाही. तुम्ही उगाचच भीता. तुम्ही आता निवांत झोपा.

ते शक्य नाही बिरबला. आताच्या आत्ता आपण या राक्षसाच्या शोधात निघालं पाहिजे. तू माझ्या सगळयात जवळचा विश्वासू आणि बुध्दीमान म्हणून तुला इतक्या रात्री मी बोलणे धाडले.

पण खाविंद, इतक्या रात्री असे बाहेर पडणे बरोबर नव्हे. तुमची परवानगी असेल तर मी आज रात्रभर डोळयात तेल ओतून तुमचं संरक्षण करतो. उद्या सकाळी आपण प्रधानजींना सांगून राक्षसाच्या शोधात निघू. बिरबल म्हणाला.

अकबरास बिरबलाचं म्हणणं पटलं. त्याच्याकडून रात्री शयनकक्षातच थांबण्याचे वचन घेऊन अकबर झोपी गेला.

०००

सकाळी सकाळी अकबराच्या परवानगीने बिरबलाने, प्रधानजी आणि काही प्रमुख सरदारांना तातडीने बोलावून घेतले.

सगळी मंडळी पळत पळत महालात पोहचली.

बिरबलाने त्यांना काल रात्रीला घडलेला प्रसंग समाजवून बादशहा आणि तो स्वत: राक्षसाच्या शोधात जात असल्याचे सांगितले.

आम्ही येईपर्यंत राज्यकारकाभार व्यवस्थित सांभाळा. अकबराने प्रधानजीस आदेश दिला.

होय खाविंद, तुम्ही अजिबात काळजी करु नका, तुम्ही येईपर्यंत आम्ही सर्वजण राज्यकारभार उत्तम पध्दतीने करु. प्रधानजी म्हणाले.

प्रधानजींना धन्यवाद देऊन अकबर आणि बिरबलाने राक्षसाच्या शोधासाठी कूच केले.

जाण्यापूर्वी बिरबलाने आपल्या काही विश्वासू माणसांना प्रधानजीवर लक्ष ठेऊन प्रत्येक खबरबात तातडीने कळवण्याची व्यवस्था करुन ठेवली.

०००

बादशहा आणि बिरबल महालाच्या बाहेर जाताच, प्रधानजींच्या आनंदाच्या उकळया फुटू लागल्या. हे दोघेही इथे नसताना आपण शेजारच्या राजाला बोलावून हे राज्य आपल्याच ताब्यात घेऊ शकू याची त्याला खात्री पटली. त्यादृष्टिने त्याच्या हालचाली सुरु झाल्या. तो शेजारच्या राजाशी गुप्तपणे भेटीगाठी घेऊ लागला. बिरबलाची माणसं , प्रधानजीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन, त्याची बित्तमबातमी बिरबलाकडे पोहचवत होते.

प्रधानजीच्या मदतीने बाजूचा राजा हल्ला करुन राज्य ताब्यात घेण्याची तयारी पूर्ण झाल्याची बातमी येताच, बिरबल अकबरास म्हणाला..आपण आतापर्यंत खूप दौडधूप केली, राक्षसाला पकडण्याची. पण तो काही सापडला नाही. पण मला नुकतेच कळले तो राक्षस कुठे आहे तो.

कुठे आहे? कुठे आहे? तो दडलेला. सांग मला. अकबर अधिरतेने म्हणाला.

खाविंद असे अधिर होऊ नका. मी तुम्हाला त्याच्या समोरच उभा करतो. चला माझ्यासोबत. असे बोलून बिरबलाने अकबरासोबत महालाकडे वेगाने कूच केले.

म्हणजे राक्षस महालात पोहचला की काय?अकबराने विचारलं.

चला तर खाविंद, तुम्हाला प्रत्यक्षच कळेल.

०००

अकबर आणि बिरबल एक दोन दिवसातच महालात परतले.ते असे अचानक इतक्या लवकर परततील असे काही प्रधानजी व इतरांनाही वाटले नव्हते. प्रधानजी तर आपणच बादशहा झाल्याच्या थाटात वावरत होते.

अकबर आणि बिरबल जेव्हा महालात पोहचले तेव्हा एक व्यक्ती प्रधानजींना संशास्पदरीतीने एक लखोटा देताना बिरबलाने बघितला. अकबर आणि बिरबलास असे अचानक समोर बघून प्रधानजीचे अवसान गळाले.

खाविंद, मिळाला का राक्षस? त्याने कसेबसे विचारलं.

बिरबल म्हणतो, हा राक्षस महालातच आहे..

अरे बापरे.कुठे आहे?आम्हास तर काही दिसला नाही.प्रधानजी कसेबसे बोलले.

कसा दिसणार प्रधानजी तुम्हाला कारण तुम्ही डोळयावर कातडी पांघरलीय ना.असे बोलून बिरबलान तलावर काढून प्रधानजीच्या गळयाला लावली. आणि त्याच्या खिशात दडवलेला लखोटा काढून अकबराच्या हातात दिला.

या प्रकाराने भांबावून गेलेला, अकबर, तो लखोटा उघडून वाचू लागला.

प्रत्येक वाक्यागणिक अकबराच्या चेह-यावरचे भाव बदलत होते. प्रधानजीचे पाय लटलट कापू लागले होते. शेवटचे वाक्य वाचून झाले तेव्हा, अकबाराने प्रधानजीच्या कानशीलात झणझणीत थप्पड लगावली.

प्रधानजी तुम्ही माझ्याशीच बेईमानी कराल असे वाटले नव्हते. मी इथे नाही बघून तुम्ही शेजारच्या राजाला आक्रमणासाठी बोलावले होय. त्याची तयारी कशी झाली,हे या लखोटयात आहे.

खाविंद, स्वप्नात राक्षस असतो की नाही माहीत नाही पण हा तुमचा प्रधानच खरा राक्षस असून तुमचा घात करायला निघाला होता…

अकबराने सैनिकांना बोलावून प्रधानजींना त्यांच्या ताब्यात दिले. बिरबलाच्या या कामगिरीवर खुष होऊन त्याला एक प्रांत भेट म्हणून देऊन टाकला.

खाविंद खोट्या राक्षसापेक्षा आपल्या अवतीभवती बरेच राक्षस असतात .ते आपणास ओळखता आले पाहिजे. बिरबल म्हणाला. अकबराने होकारार्थी मान हलवली.

सुरेश वांदिले