(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जे काही माझ्या बाबतीत घडलंय,त्याचं दु:ख किती दिवस कुरवाळत बसणार?शिवाय मला कुणी बिच्चारी,अरेरे,असं म्हंटलेलं अजिबातच आवडत नाही.जरी मी लहानपणापासून दृष्टिहीन असले म्हणून, मी बिच्चारी कशी बरं झाली?हीच पुढं काय होणार,असं कुणी माझ्या आईबाबांना म्हंटल तर मला फार फारच राग यायचा.मग मी निश्चयच केला की,आपण काही स्वत:ला दुबळं समजायचं नाही नि दृष्टिहीन आहे म्हणून कुढत बसायचं नाही.या निश्चयापासून मी कधीच ढळले नाही. त्यामुळे मी दृष्टिहीन असूनही मला दिशा स्पष्ट दिसू लागल्या.मार्ग कळू लागले.माझ्यातली शक्तीही मला कळली.

मला विज्ञान आणि गणितात तशीही गती असल्याचं मला,माझ्या आईबाबांना आणि शिक्षकांना लक्षात आलंच होतं.त्यामुळे मी त्यावर छान लक्ष दिलं.इतकी मला दहावित९६ टक्के गुण मिळाले.बारावीत ८८ टक्के गुण मिळाले.तेव्हाच मी ठरवलं आता आपण जाईंट एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा द्यायची.इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सारख्यां महत्वाच्या संस्थेत या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.ही आपल्या देशातील सर्वाधिक कठीण परीक्षा समजली जाते.या परीक्षेत भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्र या तिनही विषयात चांगली कामगिरी करावी लागते.या पेपरमधील ऑर्ग्यानिक केमिस्ट्री(सेंद्रिय रसायनशास्त्र)हा पेपर माझी खडतर परीक्षा घेणारा होता.या पेपरमध्ये खूपसारखे चित्र आणि रेखांकने काढायची असतात.ते काही लॅपटॉपव्दारे किंवा मला देण्यात आलेल्या मदतनीसाकडून शक्य नव्हतं.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग.हा खडतर मार्ग सुलभ कसा होईल याचा मी विचार केला.या विचारातूनच मी मग,संबंधित प्रश्नाचं उत्तर मनात चित्रित करु लागले.त्याचं उत्तर शोधू लागले आणि मग माझ्या साहाय्यासाठी दिलेल्या लेखनिकास सांगू लागते.हे सर्व मी न हडबडून न जाता केलं.जेईई मेन परीक्षेत मला चांगले गुण मिळाले.माझा क्रमांक१०८१वा होता.या माझ्या चांगल्या कामगिरीमुळे मला लखनौच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेश्न टेक्नॉलॉजी या संस्थेत यंदा म्हणजेच २०२३ साली बीटेक-इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला.या संस्थेची स्थापना २०१५ साली झाली. याठिकाणी एखाद दृष्टिहिनास प्रवेश मिळवणारी मी पहिलीच विद्यार्थीनी ठरली.

या संस्थेत दिव्यांगांसाठी खास सुविधा आहेत.पण मी त्या नाकारल्या.सामान्य विद्यार्थ्यांसारखंच मला वागणूक देण्याचा मी हट्टच केला म्हणा ना.याचं फार फार कौतुक अरुण मोहन शेर्री सर वाटतं.ते आमच्या  या संस्थेचे संचालक आहेत.परवा माझ्या समोरच त्यांनी माझ्या बाबांना फोन केला नि त्यांना ते सांगत होते,” काका इतकी प्रज्ञावंत विद्यार्थीनी आमच्या संस्थेत शिकते याचा आम्हाला अभिमान वाटतो.तिने दिव्यांगासाठी असलेल्या सुविधा नाकारल्याने तर या अभिमानात आमच्या आणखी वाढच झाली आहे.माझ्या तीन दशकांच्या कारकीर्दित तंत्रज्ञान आणि कोडिंग मध्ये इतकी गती असलेली आणि डेडिकेटेड विद्यार्थीच मी बघितलेला नाही.ब्रेल लिपीतून लिखाण ते कोडिंगमध्ये इतकं यश मिळवण्याचा माझ्या प्रवास काही निश्चिच सोपा नव्हता.पण मी बिच्चारी नसल्याचं हे मला सिध्दच करायचं होतं.त्या निष्ठने,प्रेरणेने आणि नैराशाल्या अजिबात आपल्या अवतीभवती फिरु द्यायचं नाही याचा ठाम निर्धार केल्यानेच मला हे यश मिळू शकलं.आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत कुथत बसण्यापेक्षा जे आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं की यश मिळतच.

मी मुंबईची.येथील सेंट जॉन युनिव्हर्सल शाळेत शिकले.माझी आई गृहिणी आहे तर बाबा एका खाजगी कंपनीत काम करतात.मी दृष्टिहीन आहे,हे त्यांनी मला कधी जाणवू दिलं नाही आणि तेही त्याचं दु:ख करत बसले नाहीत.त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं.ठामपणे उभी राहण्याची शक्ती दिली.

तर मी भुविका…भुविका अग्रवाल.

000