तेजोमयीला तिच्या हिताच्या असलेल्या गोष्टी आईबाबा सांगत. बरेचदा त्याकडे ती दुर्लक्ष करायची. आपण करतो तेच तिला बरोबर वाटायचं. त्यामुळे नुकसान व्हायचं. गडबड व्हायची. मग ती आईबाबांची क्षमा मागून यापुढे असं करणार नाही, असं सांगायची. पण काही दिवस गेल्यावर, पुन्हा तिचं येरे माझ्या मागल्या! आता हिला कसं बरं समजावून सांगायचं, याचा विचार करत असताना बाबांना एक गोष्ट सुचली.
एके दिवशी तेजोमयीने आईबाबांच्या सांगण्याकडे लक्ष न दिल्यानं बरीच गडबड झाली. तेव्हा तिला बाबा चांगलेच रागावले.
“आता यापुढे असं कधी होणार नाही. प्रॉमिस!” तेजोमयी गळ्यावर बोट ठेवत रडवलेल्या सुरात म्हणाली.
“अगं, तू अशीच वागत राहिलीस तर एक दिवस तुझा उपचर वसू व्हायचा.” बाबा म्हणाले. त्या अवघडलेल्या अवस्थेतही तिने मान खाली घालून खालच्या स्वरात विचारलं,
“म्हणजे हो काय बाबा?”
तिने उपचर वसू हे नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्याच्याशी आणि आपला काय संबंध? असा प्रश्न तिला पडला. तिने अलेक्झांडरकडे बघितलं. त्याने दुसरीकडेच मान वळवली. हे बघून बाबा हसले. वातावरणातला ताण कमी झाला.
“अगं, त्याला काय विचारतेस मीच सांगतो ना. ये इकडे, बैस माझ्याजवळ.” बाबा म्हणाले. तेजोमयी त्यांच्या बाजूला येऊन बसली.
“सांगा बरं बाबा, हा किंवा हे उपचर वसू कोण होते, ते?”
“अगं, ते मोठे ऋषी होते. महाभारत ज्यांनी रचलं त्या व्यासमुनींचे आजोबा. या वसूंना आकाशात संचार करण्याची यंत्रविद्या अवगत होती.”
“वा s व! म्हणजे पंख न लावताच ते उडू शकत असत. किती ग्रेट!!”
“ते कसे उडत, हे ठाऊक नाही गं बाळ, मात्र त्यांना उडता येत असल्यानं देवराज इंद्र यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. हे उपचर वसू सत्यप्रिय आणि सत्यवचनी होते.”
“मग, त्यांनी पुढे सत्यवचनीपणा सोडून दिला का?” तेजोमयीनं अधिरतेनं विचारलं.
“इतकी अधिर होऊ नकोस. मला सांगू तर दे.”
“सांगा बघू.” तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरही कान लांब करुन ऐकू लागला.
“एकदा इंद्र महाराज आणि पृथ्वीवरील ऋषीमुनींमध्ये वाद झाला.”
“कशावरुन?”
“यज्ञामध्ये पशुंचा बळी द्यायला हवा, असा इंद्र महाराजांचा आग्रह तर ऋषींचं म्हणणं होतं की निरपराध पशुंचा बळी कां द्यायचा? त्याऐवजी यज्ञात धान्य टाकूया.”
“ऋषीचं म्हणनं अगदी योग्य होतं. इंद्र महाराज दुष्ट म्हणायचे. पुढे काय झालं?” तेजोमयीने विचारलं.
“हा वाद काही मिटेना. तेव्हा, यावर निर्णय देण्यासाठी सत्यप्रिय उपचर वसूंकडे इंद्र महाराज आणि ऋषी गेले.”
“मग?”
“वसूंनी योग्य निर्णय देण्याची अपेक्षा असताना, त्यांनी इंद्र महाराजांसोबतची आपली मैत्री लक्षात घेऊन, यज्ञात प्राण्यांची आहुती देणं योग्य, असा निर्णय दिला.”
“दुष्ट लेकाचा!”
“ऋषींनाही तसंच वाटलं. इंद्र महाराजांची बाजू चुकीची असून, वसूंनी त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने, ऋषी रागावले. त्यांनी वसूंना शाप दिला. त्यामुळे त्यांची आकाशात उडण्याची शक्ती निघून गेली.”
“तसच व्हायला हवं, अशा दुष्टांसोबत.”
“या वसुंना नंतर आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यांनी श्री विष्णूचे तप करायला सुरुवात केली.”
“विष्णू भगवान प्रसन्न झाले का त्यांना?”
“वसुंची तपश्चर्याच इतकी कठोर होती की, त्यांना प्रसन्न होण्यावाचून पर्याय उरला नाही. विष्णू भगवान वसूंसमोर प्रगटले. त्यांनी वसूंना शापातून मुक्त केले. यापुढे सत्यप्रियता सोडू नका असा सल्ला दिला.”
“बाबा, मला कळलं ते. पण माझा आणि या उपचर वसूंचा काय संबंध?”
“सांगतो ना. अगं, शापमुक्त झालेल्या वसूंनी पुढे मोठा अश्वमेध यज्ञ केला.”
“काय? मग या यज्ञात त्यांनी पशुंची आहुती दिली का?” तेजोमयीनं आश्चर्यानं विचारलं.
“नाही गं. त्यांनी यज्ञामध्ये धान्याची आहुती दिली.”
“याचा अर्थ, त्यांनी योग्य तेच केलं म्हणायचं.”
“अगदी बरोबर. पण योग्य कधी केलं तर शिक्षा झाल्यावर. नाही का? एखादी गोष्ट चुकीची आहे, त्यापासून नुकसान होणार आहे, असं माहीत असूनही तसं करणं हे चूक नाही का? चुकीच्या वागण्याची शिक्षा होण्याची कां बरं वाट बघायची.”
“काय रे अलेक्झू बरोबर ना. बाबा त्याच्याकडे बघून म्हणाले.
तेजोमयी, काय ते बरोबर समजली. आपला यापुढे उपचर वसू होऊ द्यायचा नाही, असं तिने मनोमन ठरवलं.
सुरेश वांदिले