भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक प्रबळ सक्षम आणि समर्थ असलेल्या प्रमुख नौदलांमध्ये येते. नौदलाला हे सामर्थ्य हे, या दलाकडे असलेली अत्याधुनिक जहाजे, पाणबुड्या, विमानवाहू नौका, क्षेपणास्त्रे, इतर सामग्री यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळामुळे प्राप्त झाले आहे. नौदलासाठी वेगवेगळया पध्दतीने मनुष्यबळाची नियुक्ती केली जाते. यापैकी एक नियुक्ती सेलर किंवा खलाशी या पदाची आहे.
खलाशी बनण्याची संधी १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला मिळू शकतो. हे खलाशी वेगवेगळ्या शाखांसाठी त्यांची गरज आणि आवशक्यतेनुसार निवडले जातात. सध्या नौदलातील वैद्यकीय शाखेसाठी आवश्यक असणाऱ्या खलाशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी इच्छुक पुरुष विद्यार्थ्याने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. या प्रत्येक विषयात त्याला किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत. यंदा विज्ञानशाखेतून या विषयांसह १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांना मनाजोगती ज्ञानशाखा मिळाली नसल्यास त्यांनी नौदलातील खलाशी(वैद्यकीय शाखा) यासाठी प्रयत्न करायला हवा. या क्षेत्रात चांगलं करिअर निश्चितपणे घडू शकते.
या पदाच्या नियुक्तीसाठी दोन टप्पे आहेत- (१) १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी काढून उमेदवारांची यादी (शॉर्टिलिस्टिंग) तयार केली जाते. याचा अर्थ विशिष्ट संख्येतील उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. हे शार्टलिस्टिंग राज्यनिहाय केले जाते. उदा.- महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची यादी वेगळी केली जाते. प्रत्येक राज्यातील एकूण जागा लक्षात घेऊन किमान सरासरी गुण अथवा कटऑफ वेगवेगळे राहू शकतात. एखाद्या उमेदवारास समान गुण असल्यास, ज्याची जन्मतारीख आधीची असेल त्याचा समावेश शॉर्टलिस्टिंगच्या यादित, दुसऱ्या उमेदवाराच्या आधी केला जातो.
टप्पा दोन- या टप्प्यात शारीरिक क्षमता चाळणी (फिजिकल फिटनेस टेस्ट पीएफटी), लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाळणीपरीक्षेचा समावेश असतो. ही परीक्षा देशातील नौदलाच्या केंद्रावर घेतली जाते.
पीएफटीध्ये ६ मिनिटे ३० सेकंदात १.६ किलोमिटर धावणे, २० उठकबैठक, १५ पुशअप्स, १५ गुडधे वाकवून बसून उठणे(बेंट-नी सिटअप्स)चा समावेश असतो.
लेखीपरीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी पध्दतीची असते. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र ,सामान्य अध्ययन/ तार्किक विश्लेषण या घटकांवर प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जातात. पेपरचा दर्जा १२वीचा असतो. हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका दिली जाते. परीक्षेचा कालावधी एक तास. प्रत्येक विषयघटकात उमेदवाराला उत्तीर्ण होणे आवश्यक. शिवाय एकूण सरासरी गुणसुध्दा मिळणे आवश्यक . सरासरी गुण आणि प्रत्येक विषय घटकात उत्तीर्ण होण्यासाठीचे गुण नौदलामार्फत ठरवले जातात. किमान गुणांपेक्षा अधिक गुण मिळणे केव्हाही उत्तमच. मात्र एखाद्या विषयात पैकीच्यापैकी गुण मिळाले नि एका विषय घटकात किमान गुणापेक्षा एक जरी गुण कमी पडला तरी उमेदवार पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम www.jionindiannavy.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे.
पीएफटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय चाळणीला सामोरे जावे लागते. ही चाळणी यशस्वी झालेल्याच उमेदवारांना गुणवत्ता यादित स्थान दिले जाते. या चाळणीत अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित उमेदवारांना अपिल करण्याची संधी दिली जाते. तशी संधी उमेदवारांनी घ्यावी, असा सल्ला नौदलानेच दिला आहे. असे अपिल पाच दिवसाच्या आत करावे लागते. ही वैद्यकीय चाचणी, यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या नौदलाच्या वैद्यकीय केंद्रावर करावी लागते. नौदलाच्या या वैद्यकीय केंद्र/ रुग्णालयांव्दारे दिलेले वैदकीय प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) ग्राह्य धरले जाते. इतर कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नाही. अपिलाचा निर्णय लागल्यानंतर तो अंतिम समजला जातो. पुन्हा अपिलाची संधी दिली जात नाही.
या परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर २४ च्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाऊ शकतो.
प्रत्यक्ष प्रशिक्षण ओडिशा राज्यातील आयएनएस चिल्का येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरु होईल. प्रशिक्षणाच्या कालावधीत, पुस्तके, गणवेश, निवास, भोजन इत्यादी खर्च नौदलामार्फतच केला जाईल. या काळात दरमहा १४ हजार ६०० रुपये विद्यावेतन दिले जाईल.
हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रारंभी २० वर्षासाठी नियुक्ती दिली जाते. या उमेदवारांना, मास्टर चिफ पेटी ऑफिसर या पदापर्यंत पदोन्नतीची संधी मिळू शकते. ७५ लाख रुपयांचा सहभागी विमा योजनेचा लाभ दिला जातो. वैद्यकीय सुविधा, कुटंबासह रजा प्रवास सवलत, समुह गृहनिर्माण लाभ, वार्षिक आणि नैमेत्यिक रजा, मुलांचे शिक्षण, घरभाडे भत्ता आदी लाभ-सुविधा दिल्या जातात. नियमानुसार निवृत्तीनंतरचे फायदे दिले जातात.
या सगळ्या बाबी लक्षात घेता, बारावीनंतर मनाजोगती शाखा न मिळाल्याचे नैराश्य झटकून टाकून, खलाशी होण्याची संधी कशी प्राप्त करुन घेता येईल, याचा विचार मराठी मुलांनी करायला हवा व त्यानुसार तयारीला लागायला हवं.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे. अर्ज ऑनलाइनच भरावा लागतो. अर्जाचा नमूना व अर्ज भरण्याच्या विस्तृत सूचना www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरील करंट ॲपॉर्च्युनिटीज या ठिकाणी बघायला मिळतात. याच ठिकाणी नाव नोंदणी करावी लागते.
०००