इंडस्ट्री फोर हे नाव तुमच्या कानावरुन गेलेच असणार. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा हा महत्वाचा भाग ठरण्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीसाठी पाणी आणि वाफेद्वारे निर्मित उर्जा या दोन बाबींनी महत्वाची भूमिका बजावली. मानवीश्रमापासून यांत्रिकी श्रमापर्यंतचा हा प्रवास होता. दुसऱ्या औद्योगिक क्रांतिमध्ये विजेने महत्वाची भूमिका बजावली. या उर्जेमुळे उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा आधार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ठरले. यामुळे मानवी श्रम खूप कमी झाले. स्वंयचलीकरणाला गती आली. आता चौथी औद्योगिक क्रांती डिजिटलायझेशनमुळे घडणार आहे किंवा ती प्रक्रिया झपाट्याने सुरु झाली आहे.
अत्याधुनिक डिजिटल तंत्र
डिजिटलायझेशनमुळे विविध वस्तू आणि सेवा एकमेकांशी जोडल्या जात आहेत. यामध्ये माहितीचा साठा, संगणकीय उर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, व्यवसाय प्रकियेचे विश्लेषण-बिझिनेस अॅनालिटिक्स, कृत्रिम बुध्दिमत्ता, प्रगत रोबो तंत्रज्ञान आदी अत्याधुनिक डिजिटल तंत्रांचा समावेश आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे प्रत्यक्ष आणि आभासी जगाचे अभिसरण झालेय. त्यामुळे आधुनिक आणि पारंपरिक तंत्रांचा समन्वय साधून निर्मिती प्रकियेस गती मिळाली आहे. स्मार्ट फॅक्ट्री वा स्मार्ट उद्योगाच्या प्रारंभाचा हा आरंभबिंदू ठरलाय. यामुळे संसाधनांचा सुयोग्य व प्रभावी वापर, बहुविविधतता आणि विक्री आणि विपणनाशी थेट एकात्मिकरण सुलभ झालेय. निर्मिती व उत्पादनाच्या संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. या अत्याधुनिक स्मार्ट तंत्राला अवगत केलेल्या मनुष्यबळाची मोठी गरज पुढील काळात लागेल.
१० कोटी नवे रोजगार
सध्या भारतात सेवाक्षेत्राची वाढ वेगाने होत असली तरी अर्थकारणाची गती वाढण्यासाठी निर्मिती किंवा उत्पादन क्षेत्राची वाढ होणे गरजेचे ठरते. त्याशिवाय मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर किंवा विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही किंवा भविष्यकाळात सुपर पॉवर म्हणून झेप घेणे शक्य होणार नाही. भारताच्या सकल उत्पादनात सध्याच्या १६ टक्क्यापासून २०२५ पर्यंत ३० टक्के वाढ, झाली तरच भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढचे पाऊल टाकण्यास सक्षम आणि समर्थ ठरु शकतो. असे झाले तर १० कोटी नवे रोजगार सुध्दा निर्माण होऊ शकतात.
देशात इंटरनेट जोडणीची गती वाढलीय. कोरोनात्तर काळात ई-कॉमर्सची गती आणखी वाढलीय. इंटरनेटवरील उद्योजकतेची वाढ विस्मयकारक दिसते. ही गती यापुढील काळात आणखी वाढेल. भारत सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे देशाला डिजिटली सक्षम, साक्षर आणि ज्ञानवंत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे सुरु केले आहेत.
स्मार्ट फॅक्टी, कारखान्यांमुळे पारंपरिक निर्मिती किंवा उत्पादन प्रक्रियेची व्याखा, संकल्पना, व्यवस्थापकीय कौशल्य, तंत्र, संवाद कौशल्य, वितरण आणि विपणन पध्दती बदलतील. नव्या व्यावसायिक समिकरणाचा उदय होईल. त्यातून नव्या संधी निर्माण होतील. उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढेल. त्यामुळे निर्मिती क्षमतेत वाढ होण्यासोबतच औद्योगिक क्षेत्राची वाढ होईल. नव्या सेवा आणि वस्तुंची निर्मिती प्रभावीपणे होईल.
नवी क्षेत्रे
पुढील क्षेत्रात डिजिटली सक्षम मनुष्यबळाची गरज भासेल. (१) बिग डाटा अॅनॅलिटिक्सशी निगडित गुणवत्ता नियंत्रण— औद्योगिक डाटा म्हणजेच माहितीच्या साठयाचे विश्लेषण करण्याची क्षमता असलेले तज्ज्ञ,
(२) रोबोट नियंत्रित उत्पादन– रोबोटचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक कामगारांची गरज कमी होणार असली तरी रोबोचे संनियंत्रण करणाऱ्या मनुष्यबळाची गरज वाढेल.
(३) स्वयंचलित वाहतूक यंत्रणा– अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये स्मार्ट वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मानवी वाहतूक कमी झाली असली तरी तांत्रिक मनुष्यबळ व अशा स्मार्ट वाहतुकीचे संनियंत्रक आणि डिझानयर्सची गरज वाढेल.
(४) प्रॉडक्शन लाइन सिम्युलेशन– ग्राहकोपयोगी वस्तुंच्या प्रत्यक्ष निर्मितीआधी या आभासी तंत्राचा वापर करुन निर्मिती प्रक्रिया अधिक प्रभावी किंवा गतिमान कशी होईल याची प्रतिकृती तयार केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाचे कार्यान्वयन अधिक सुलभ आणि सहज होते. या तंत्राशी अवगत असणाऱ्या इंडस्ट्रिअल अभियंत्यांची यापुढे मोठी मागणी वाढू शकते.
(५) स्मार्ट पुरवठा साखळी– पुरवठा साखळीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने वस्तुंचा पुरवठा व वाहतुकीचे समन्वयन प्रभावीरीत्या करणे शक्य होईल. त्यामुळे लहान आकारातील वस्तुपुरवठा करणाऱ्या प्रक्रियेवर संनियंत्रण ठेवणाऱ्या मनुष्यबळाची गरज वाढेल.
(६) प्रेडिक्टिव्ह मेंटनन्स (सुचक देखभाल) – एखाद्या यंत्रसामग्रीत येऊ पाहणारा दोष किंवा तांत्रिक बिघाड स्मार्ट तंत्रज्ञानामुळे दुरुस्त करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही यंत्रसामग्री कोणत्याही टप्प्यावर कार्य करणे थांबवणार नाही. या नव्या तंत्रज्ञानाशी अवगत असणारे सिस्टिम डिझायनर्स, आयटी आणि डाटा सायंटिस्ट, यांची गरज पुढील काळात वाढेल. क्षेत्रीय पातळीवर सुध्दा या डिजिटल यंत्रणेला साहाय्यभूत ठरणा-या तंत्रज्ञांची गरज भासेल.
(७) मशिन सेवा – यापुढे ग्राहकांच्या घरी बसवलेल्या यंत्राद्वारेच स्वयंपाकाचा गॅस, कॉम्प्रेस्ड गॅस आदींचा पुरवठा उद्योजक करतील. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे महत्व कमी होईल. मात्र निर्मिती वा उत्पादन क्षेत्र वा सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज अधिक वाढेल.
(८) सेल्फ ऑर्गनायझिंग प्रॉडक्शन (स्वयंनियंत्रित उत्पादन) – निर्मिती प्रक्रियेमध्ये स्वयंचलित समन्वयन यंत्रणेची उभारणी केली जाईल. त्यामुळे प्रत्येक बाबींचा काटेकोर व अधिकाधिक वापर शक्य होईल. या व्यवस्थेमुळे निर्मिती आणि नियोजन विभागातील मनुष्यबळाची गरज कमी होणार असली तरी डाटा सायन्स आणि डाटा विश्लेषकांची गरज वाढेल.
(९) गुंतागुंतीच्या वा किचकट यंत्रणेची सुलभरीत्या निर्मिती थ्रीडी प्रिटिंग तंत्राद्वारे करणे शक्य होईल. त्यामुळे थ्रीडी कॉम्प्युटर साहाय्यित डिझायनर्स आणि मॉडेलर्सची आवश्यकता वाढेल. या क्षेत्रातील संशोधन आणि विकास करणाऱ्या तंत्रज्ञांचीही गरज वाढेल.
(१०) ऑगमेंटेड वर्क, मेंटनन्स आणि सर्व्हिस– या तंत्राचा वापर करुन कंपनी,संस्था आणि उद्योजकांना त्यांच्या ठिकाणी वस्तुंचे प्रत्यक्ष वितरण,वहन आणि स्थानाची माहिती मिळू शकेल. बारकोडचे स्कॅनिंग स्वयंचलित पध्दतीने करता येऊ शकेल. ग्राहकाच्या गरजा वा आवश्यकतेनुसार पॅकेजिंग करणे शक्य होईल. मूलभूत देखभाल प्रकियेला साहाय्यक असे हे तंत्र असेल. यामुळे सेवा पुरवठा तंत्रातील प्रकियेतील प्रभावीपणा वाढण्यास मदत होईल. या तंत्राच्या वाढत्या उपयोगामुळे उद्योजकांना संशोधन कार्यास प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय आयटी, डिजिटल साहाय्य प्रकियेला गती मिळेल.
करिअर संधी
या नव्या तंत्रामुळे पुढील क्षेत्रात करिअर संधी उपलब्ध होतील (१) ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग- थ्रीडी प्रिटिंग, (२) सेन्सर्स, (३) रोबोट्स – ऑटो आणि को-बॉट्स,(४) सिम्युलेशन, (५) ऑगमेंटेड रिॲलिटी, (६) क्लॉउड कॉम्पुटिंग, (७) बिग डाटा अॅनालिटिक्स, (८) इंडस्ट्रिअल इंटरनेट, (९) सायबर सिक्युरिटी, (१०) हॉरिझाँटल ॲण्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन.
या सगळया बाबी लक्षात घेऊन, महाराष्ट्रीय तरुण-तरुणींनी आपले ज्ञान आणि कौशल्य कसे वाढत राहील याची दक्षता घेतली पाहिजे. त्याअनुषंगानेच अभ्यासक्रमांची निवड करायला हवी. ते करताना चांगल्या दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यायला हवा. विशेषत: अशा संस्थांमध्ये उत्तम प्रयोगशाळा आणि उच्चप्रशिक्षित अध्यापक असणे आवश्यक आहेत. प्रवेश घेण्यापूर्वी याची सांगोपांग माहिती करुन घ्यायला हवी.
सुरेश वांदिले