मार्गारेट मावशीच्या मालकीनबाई दर दोनतीन दिवसांनी घरातलं अन्न कचराकुंडीत फेकून देत. आपल्याला खायला देण्यासाठी कांकू करणारी ही बया अशी अन्नाची नासाडी कां करत असेल बॉ? असा प्रश्न बरेचदा मार्गा मावशीला पडायचा. एकदा तिने याबद्दल रॉबिन्सन मामाला विचारलं. मामा हॅ हॅ हॅ करत म्हणाला,
“मार्गे मावशे, तू पण कमाल करतेस. अगं मला प्रश्न पडणं म्हणजे गाढवानं स्वत:ला स्मार्ट समजण्यासारखं झालं. हॅ हॅ हॅ!!!”
“अरे गधड्या…”
“बघ बघ, तू मला कायम गधड्या म्हणतेस. म्हणजे मी तसाच आहे, याची तुला खात्री पटलीय ना. मग मला कसं बरं प्रश्न पडतील. प्रश्नांनी छळण्याचं कंत्राट तुलाच मिळालय. त्यामुळे तुलाच त्यांना तुडवण्याचाही अधिकार मिळालाय. “
“रॉबेटल्या, काहीही काय बरळतोस. प्रश्नाला तुडवण्याचं म्हणजे, मी काय लाथा हाणते की काय?”
“अगं मावशे, प्रश्नाला तुडवण्याचं म्हणजे भिडण्याचं. प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचं, असं मला म्हणायचं होतं. जस्ट स्लिप ऑफ टंग. टिंग टाँग टंग!” मामा वेडेवाकडे हातवारे करत म्हणाला.
“मग, दाखवू का आता माझा खरा रंग. तुझी जिभ कापून करते तुझ्या टंगीचा भंग! बस मग कण्हत टिंग टाँग टंग!” रॉबिन्सचा कान पिरगाळीत मावशी, म्हणाली.
“सॉरी मावशे, चुकलच माझं, करु नकोस आता रसभंग, मालकीन बाई अन्न कां फेकते, याचा शोध घेण्यासाठी तूच आहे दबंग!” असं काहीतरी बडबडत मामा मावशीच्या पाया पडला. आपल्या कौतुकाने आणि मामाने सॉरी म्हंटल्याने मावशी खुष झाली. मामाला जवळ घेत म्हणाली,
“मामू, फक्त एकदाच तुझ्या इटुकल्या मेंदुला ताण देऊन जरा काही उत्तर मिळतं का बघ ना.” मामा डोकं खाजवू लागला. खाजवता खाजवता तो मावशीला म्हणाला,
“मावशे अगं, याचं उत्तर अगदी सोप्पय. तू डायरेक्ट मालकीनबाईंनाच कां विचारत नाहीस?” मावशीने कपाळावर हात मारुन घेतला. मामाची मिशी ओढत मार्गारेट म्हणाली.
“मामेटल्या अरे, ती खाष्ट, दुष्ट, पुष्ट, मुष्ट बया मलाच फेकून देईल कचराकुंडीत, असं काही विचारायला गेले तर…”
“अगं मावशे, जरा लाडीगोडी कर की, म्हणजे मग प्रसन्न होऊन ती तुला सांगेल बघ आणि प्रयत्नांती परमेश्वर असं नाही का सम्राट नेपोलियनच्या महालात राहून गेलेल्या तुझ्या खापरपणजोबांच्या खापरपणजोबांच्या ८७ व्या पिढितल्या बोकोबारावांनी सांगून ठेवलेलं वचन विसरलीस की काय?”
“खरंच की रॉब्या, तुला बरोबर सुचलं की रे…”
“मावशे मी, जरी तुला गधड्या वाटत असलो ना तरी तुझ्या संगतीत राहून राहून कधी माझा पिटुकला मेंदू इटुकचन स्मार्ट होऊन जातो. हॅ हॅ हॅ!!!” मामा म्हणाला. मावशीला त्याचं म्हणणं पटलं.
एके दिवशी मालकीनबाईंचा मूड चांगला असल्याचं लक्षात आल्यावर ती त्यांच्या पायात गोंडा घालू लागली. मालकीनबाईने तिला जवळ घेऊन कुरवाळलं. तिच्याकडे बघून हसल्या. तिच्याशी काहीतरी बोलणार तोच मालकीनबाईंना काहीतरी आठवलं नि त्या लगबगीने स्वयंपाकखोलीत गेल्या. रात्रीचं शिल्लक राहिलेलं अन्न कचराकुंडीत टाकण्यासाठी त्यांनी बाहेर आणलं. त्या येईपर्यंत मार्गारेट कचराकुंडीच्या झाकणावर जाऊन बसली. आडोशा आडोशाने रॉबिन्सन कान टवकारुन मालकीनबाई आता मावशीचं काय करणार? याचा अदमास घेऊ लागला.
मालकीनबाईंनी प्रेमाने मार्गारेटला कचराकुंडीच्या झाकणावरुन खाली यायला सांगितलं. त्या रागावल्या नाहीत हे मावशीच्या लक्षात आलं. हीच संधी आहे, हे तिने ओळखलं.
“अन्न कां फेकता हो?” असं तिने हावभाव करत विचारलं. मालकीनबाई पुन्हा हसल्या.
“अगं तू, आधी झाकणावरुन बाजूला तर हो.”
“नाही नाही, तुम्ही हे असं का करता, हे सांगा आधी.” डोळे फिरवत, मानवर करत हावभावाने मावशी म्हणाली. मालकीनबाईला तिच्या मनातले हावभाव बरोबर कळतात. तिने मार्गारेटला उचललं नि जवळ घेत म्हणाल्या,
“अच्छा, आज मार्गूला मी अन्न कां फेकतेय हे समजून घ्यायचय तर?”
“होय, होय, होय…” अशा आशयाची मान मार्गारेटने हलवली. मालकीनबाई तिला घेऊन सोफ्यावर बसल्या. तिच्याकडे बघून सांगू लागल्या. रॉबिन्सन कान टवकारुन ऐकू लागला.
“अगं मार्गू, मी अन्न फेकत ते नासलेलं असतं. तुला आता प्रश्न पडेल की हे अन्न नासतं कसं? बरोबर नं.” मावशीने होकारार्थी मान हलवली.
“तर मार्गे, शिजवलेल्या अन्नात चरबी, जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिनं असतात. काही अन्नपदार्थात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. भाकरीसारख्या कोरड्या पदार्थात किंचित पाणी असतं.” अरे वा, असे भाव मावशीच्या डोळ्यात उमटले. आडोशाला लपलेल्या मामानेही हेच भाव व्यक्त केले.
“तर मार्गू, अन्नपदार्थ बराच वेळ उघड्यावर राहिले तर संधीसाधू जिवाणू त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे जिवाणू अन्नपदार्थांच्या रासायनिक घटकांवर हल्ला करतात. त्यांचे विघटन करुन ते खाऊ लागतात. त्यात त्यांची वाढही होते. नवे जिवाणू ते जन्माला घालतात. अन्नातलं पाणी यासाठी त्यांची मदत करतात. या कृत्यामुळे प्रथिनं किंवा कर्बोदकांचं रुपांतर आम्लात होतं. त्यांच्या दुर्गंधीमुळे अन्नाची चव बिघडते. अशा अन्नातील जिवाणू आपल्या तब्येतीसाठी घातक ठरतात. विशिष्ट तपमान आणि वाढलेली आद्रता यामुळे जिवाणूंची संख्या वेगाने वाढते. त्यामुळे अन्नपदार्थ खराब होतात. म्हणून हे अन्न फेकावं लागतं. कळलं का तुला?”
“हो हो हो.” अशा आशयाची मान मावशीने हलवली. मालकीनबाईंनी पाठ थोपटून तिला सोफ्यावर ठेवलं नि अन्नपदार्थ कचराकुंडीत टाकले. दारावरची बेल वाजली म्हणून त्या बाहेर गेल्या.
ही संधी साधून मामा आडोशातून बाहेर आला. बाहेर येताच त्याने टाळीसाठी डावा पाय मावशीसमोर केला. मावशीने उजव्या पायाने टाळी दिली.
“मग मावशे, कळलं ना तुला, मालकीनबाई अन्न कां फेकतात ते?”
“कळलयरे रॉब्या. पण मालकीनबाईंना जर अन्न कां नासतं हे कळतय तर त्या अन्नपदार्थ जास्त कां शिजवतात? अन्न उघड्यावर कां ठेवतात? ओलावा असलेल्या ठिकाणी कां ठेवतात? असे प्रश्न मला आता पडलेत. अन्न नासू नये म्हणून त्यांनी संधीसाधू जिवाणूंपासून अन्नांचं संरक्षण करायला हवं की नाही?”
“अगदी बरोबर मावशे, पण हे मालकीनबाईंना सांगणार कोण? आहे का हिंमत तुझी?” मामाने डोळे मिचकावत विचारलं.
“नाहीरे मामू, आपली काही हिंमतबिंमत नाही बॉ, मालकीनबाईंना विचारण्याची. देव त्यांना सद्बुध्दी देवो एव्हढच म्हणू शकतो आपण.” मावशी म्हणाली.
दोघांनींही खोलीत असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघून मालकीनबाईंना सद्बुध्दी मिळू दे म्हणून मनोमन प्रार्थना केली.
सुरेश वांदिले