(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मावशीला आज मामांची फारच आठवण येऊ लागली. कारणही तसच होतं म्हणा, मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. तिच्या घमघमाटाने आसमंत दरवळून गेला होता. मालकीन बाईंनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास त्याला भरवायची मग स्वत: खायची. नेहमी सकाळपासून तिच्या आसपास घुटमळणारा मामा आज अद्यापही आला नव्हता.मावशीच्या पोटात कावळे ओरडायला लागले. भूक मी म्हणत होती. पण शिरस्ता तर मोडायचा नव्हता. मावशीने मामाच्या नावाने आदळआपट सुरु केली. त्याला शिव्या देऊ लागली.तोच मामा तिथे हजर.

                       अगं मावशे कशाला शिव्या देऊन तोंड कडू करतेस.

                       माम्या, होतास कुठं तू आतापर्यंत? एरव्ही सकाळपासून मिशी हलवत, डोळे इटकत-मिटकत फिरत असतोस माझ्याभोवती.

                                              पण मावशे काय झालं? ते तर सांग…

                       तुझं तोंड गोड करण्यासाठी माझ्या मालकीनबाईंनी खिर बनवली.

                       माझं नाही तुझं…

                       हो हो माझं…पण तुला पहिला घास दिल्या शिवाय खायचं नाही असं आमच्या गुरुजींनी सांगून ठेवलय ना…

                       मग, आता विलंब कशाला? सुरुवात करतोच की] असं म्हणून मामाने पातेल्यात तोंड खुपसलं. जिभल्या चाटत खिर खाऊ लागला.

                       मावशे, काय मस्त गोड आहे गं? मावशीही मग खिरीवर तुटून पडली.

                       खरंच कीरे माम्या, झक्कास गोड आहे ही खिर…

                       मावशे, मी काल एके ठिकाणी पेढ्यावर ताव मारला, तो मात्र इतका गोड नव्हता.या गोडा गोडात पण फरक असतो की का?

                       हो रे माझ्या राज्या, तुला सांगतेच ना सारं की गोडाची गोष्ट!खिर खात खात मावशी म्हणाली.

                                              माम्या,खिर गोड कशामुळे लागते?

                                        साखरेमुळे,मामा तत्काळ उत्तरला.

                                              वा माम्या, हुषार झाला की माझ्या सोबत राहून…मावशी त्याची मिशी ओढत म्हणाली. मामा लाजून लाल झाला.

                       पण मावशे, साखरेमुळे गोड चव येत असेल तर मग खिर अधिक गोड आणि पेढा कमी गोड हे कसं?

                       माम्या  साखरेच्या गोडी गोडीत फरक पडतो हे लक्षात आल्यावर या हुषार मानवानं साखरेची गोडी मोजण्यासाठी एकक आणि पध्दत शोधून काढली.

आँ!

हाँ!!

तुला ठाऊकाय का ती पध्दत?

मग, उगाच मी तुझी मावशी आहे का?

मग सांग की जरा…

मावशी सांगू लागली,

माम्या, या खिरीमध्ये जी साखर टाकतात ना तिला मोनोसॅकराइड म्हणतात.

अच्छा…त्याचं काय कारण?

साखर किंवा शर्करा नावानं ओळखल्या ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादित अनेक रसायनं असतात.

हो का…

हो ना…गहू, मका, तांदूळ यांच्या पीठात स्टार्च असतं. ती सुध्दा साखरच.

मीच भेटलो का मूर्ख बनवायला मावशे. आपण गव्हापासून तयार केलेल्या एवढ्या पोळया हादडतो, पावावार ताव मारतो, भातही गट्टमगुट्टम करतो. हे पदार्थ तर कधीच गोड लागत नाही. मी ऐकून घेतो म्हणून तू काहीही सांगू नकोस हं.

मी काहीही सांगत नाही. गोडागोडात फरक कां असतो असं तूच विचारलंस ना? स्टार्च जरी साखर असली तर त्याचा गोडपणा जाणवत नाही. असं का घडतं हे शोधण्यासाठी मानवाने पध्दत आणि एकक शोधून काढली.

हो हो…सॉरी उगाचच तुझ्यावर संशय घेतला.

आता मध्येमध्ये बोललास तर शेपटीला धरुन आकाशात भिरकावून देईन.मावशी डोळे वटारत म्हणाली.

सॉरी म्हणालो ना मावशे.पुढे सांग.

अरे माम्या, तांदूळ गहू या पदार्थांना कार्बोहायड्रेट म्हणतात. तर या पदार्थांनी बनवलेला भात, चपाती किंवा पाव गोड लागत नाही कारण स्टार्च मधील साखर असंख्य छोट्या मोनोसॅकराइड रेणुंपासून बनलेल्या साखळीसारखी असते. ही साखळी प्रचंड म्हणजे प्रचंडच मोठी आणि लांब असते.

पण त्याचा आणि गोडाचा काय संबंध?

शाब्बास, छान प्रश्न… मामाची मिशी ओढत मावशी म्हणाली.

माम्या, आपल्या लाळेत असलेल्या विकरांमुळे या प्रचंड लांब साखळीचे तुकडे होऊन त्याचं रुपांतर लहान तुकड्यात होतं. हे सगळयात लहान तुकडे म्हणजे ग्लुकोज. ही असते साधी साखर.

पुढे काय?

दुसरा एक रेणू असतो, तो महणजे फ्रुक्टोज.याच्या आणि ग्लुकजोच्या रचनेत फरक असतो.

त्याने आपल्याला काय फरक पडतो? मामा जांभई देत म्हणाला.

माम्या, साखरेची गोडी, कमी जास्त घडवण्याची किमया, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ही राम और शामची जोडी करते.

ऑ! मामाने तोंड फाकले.

म्हणजे असं माम्या की या ग्लुकोजचा एक रेणू आणि फ्रुक्टोजचा एक रेणू एकत्र येऊन सुक्रोजचा एक रेणू बनतो…

आता, हा सुक्रोज राम और शामचा तिसरा भाऊ का? मामा डोळे मिचकावत म्हणाला.

माम्या, पांचट विनोद पुरे झाला. या खिरीत जी साखर टाकली जाते, मालकीन बाई जी कॉफी पिते, मालकसाहेब चहा पितात त्या साखरेत हा सुक्रोज रेणू असतो.

याचा अर्थ सुक्रोजचे रेणू कमी जास्त झाले की साखरेची गोडी कमी जास्त होते म्हणायचं. मामा बोलून गेला. मावशी त्याच्याकडे कौतुकाने बघतच राहिली. तिने लाडाने त्याचा गालगुच्चा घेतला

अगदी बरोबर बोललास हं तू.सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणात कोणत्याही पदार्थाची गोडी मोजली जाते. सुक्रोजच्या गोडीचं प्रमाण एक असतं. फ्रुक्टोजच्या गोडीचं प्रमाण १.१ ते १.८ पर्यंत असतं. अस्पार्टेम नाव्याच्या एका कृत्रिम साखरेत सुक्रोजच्या १८० पट अधिक गोडी असते.

बापरे बाप!

मधुमेह झालेल्यांना साखर चालत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी हीच ही अस्पार्टेम साखर मानवानं शोधून काढली.

मावशे, ही सुक्रोजपेक्षा तर १८० पट अधिक गोड असतेस असं म्हणालीस ना, मग...

म्हणूनच मधुमेहींच्या चहा-कॉफित फक्त एक किंवा दोन कणच टाकलं तरी भागतं.

कित्ती छान!

नैसर्गिक पदार्थात असणाऱ्या सर्व साखरेची गोडी सुक्रोजपेक्षा कमीच असते. फ्रुक्टोज  त्याला अपवाद.

तो कसा?

त्याची गोडी सुक्रोजच्या दीडपट असते. सायक्लमेट या कृत्रिम साखरेची गोडी सुक्रोजच्या तीस पट असते. सॅक्रिन या कृत्रिम साखरेची गोडी सुक्रोजच्या तीनशे पट असते.

ओह माय गॉड!

हे तर काहीच नाही काही. ऑफ्रिकेतील काटेम्फे नावाच्या फळात थॉमॅटिन नावाच्या पदार्थात असणारी साखर सुक्रोजच्या ३ हजार पट गोड असते.

मामा ऑ वासून बघून लागला. या गोडपुराणाने त्याला गुंगी येऊ लागली. या गुंगीत झोप लागली तर ही मावशी आपल्याच खाऊन टाकेल असा कडू विचार त्याच्या मनात डोकावला.असं काही घडू नये म्हणून त्याने हळूच तिथून पोबारा केला.

सुरेश वांदिले