गेल्या काही दिवसात अर्थकारणाच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असल्याचं दिसून आलं. आधी गोखले इंस्टिट्यूट ऑफ: पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या दर्जेदार शिक्षण संस्थेच्या कुलगुरु पदावरुन नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना बडतर्फ केलं गेलं किंवा त्यांना जावं लागलं. त्यानंतर भारतीय शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळला नि काही लाख कोटी रुपये (आभासी कां होईना) अक्षरक्ष: पाण्यात गेले.
हे सगळं घडत असताना मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील यंदाच्या प्रवेशाचे विश्लेषण करणारी बातमी आली. या बातमीचा मुख्य गाभा हा अर्थकारणच होता. म्हणजे असं की, यंदा मुंबई आयआयटीत प्रवेश घेणाऱ्या देशातील सर्वोच्च प्रज्ञावंतांनी चौथ्या क्रमांकाची पसंती इकॉनामिक्स अर्थातच अर्थशास्त्राला दिली. (पहिली पसंती कॉम्प्युटर सायंस, दुसरी इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर मेकॅनिकल या शाखांना इतर प्रज्ञावंतांनी दिली.)
आयआयटीमधील प्रज्ञावंत जेव्हा एखाद्या विषयाला किंवा शाखेला अशी पसंती देतात, तेव्हा वारे कोणत्या दिशेन वाहताहेत हे लक्षात येतं.
आयआयटीत बॅचलर ऑफ सायंस इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- ॲडव्हान्स्ड, या कठीणतम परीक्षेत अत्युकृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. मुंबई आयआयटीत, अर्थशास्त्र या शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या ५०० किंवा ६०० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांपेक्षा फारतर दोन किंवा तीन गुण कमी पडलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी ठरवले असते तर इतर शाखा किंवा इतर टॉपच्या आयआयटीत कोणत्याही शाखेत सुलभतेने त्यांना प्रवेश मिळाला असता. पण त्यांनी अर्थशास्त्राला प्रवेश घेऊन, पुढील काळात या ज्ञानशाखेस मिळणारे अत्याधिक महत्व अधोरेखित केलं आहे. या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय आणि विश्लेषणात्मक कौशल्य, सादरीकरण किंवा संवादसंप्रेषण कौशल्याला महत्व देण्यात आलेय. त्यामुळे विविधांगी करिअर संधी उपलब्ध होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आघाडीच्या वित्तीय आणि गुंतवणूक सल्लागार संस्था, खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये तत्काळ मोठ्या पदावर आणि मोठ्या वार्षिक पॅकेजसह सामावून घेतलं जातं.
तर, अर्थकारणातील ही तिसरी घटना विद्यार्थ्यांसाठी महत्वाची. आयआयटीत अर्थशास्त्र शिकवला जातो नि विद्यार्थी त्याला पसंती देतात म्हणून काही अर्थशास्त्राचं महत्व आहे, अशातला भाग नाही. अर्थशास्त्र ही कायमच महत्वाची ज्ञानशाखा राहिली आहे. अर्थशास्त्रात उच्च प्रशिक्षित असणारे डॉ. मनमोहन सिंघ हे आधी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर आणि पुढे देशाचे पंतप्रधान झाले. सध्या बांगला देशाचे राष्ट्राध्यक्ष असणारे मोहम्मद युनूस हे अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. अर्थशास्त्र या ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांना अशा मोठमोठ्या संधी कायम मिळत आल्या आहेत. प्रत्येक देशातील राज्यप्रमुखांच्या मदतीला एक किंवा अनेक अर्थसल्लागार असतात. बहुतेक सर्वच मोठ्या कॉर्पोरट कंपन्यांमध्ये फायनांस कंट्रोलर किंवा वित्तीय नियंत्रक अशा मोठ्या पदावर अर्थकारणीच विराजमान आहेत.
सगळ्या जगाच्या नाड्या राजकीय सत्ताधिशांच्या हातात असल्याचं दिसत असलं तरी सारे राजकारण, समाजकारण धर्मकारण हे अर्थसत्तेभोवतीच फिरत असल्यानं, अर्थशास्त्रातील तज्ज्ञांचं महत्व लक्षात यावं.
आपल्याकडील गुणवंत मुले किंवा मुली अजुनही बहुदा इंजनीअरिंग किंवा मेडिकल या शाखांच्या पलिकडे बघत नाहीत किंबहुना त्यांचे पालकही या दोन शाखांच्या पलिकडील तिसरी शाखा नाइलाजानेच स्वीकारताना दिसतात. अर्थशास्त्राचं हे सध्याचे आणि भविष्यातील महत्व लक्षात घेऊन प्रज्ञावंत मुलामुलींना आपला पहिला पर्याय अर्थशास्त्र ठेवायला हवा.
याचा अर्थ कुणीही अर्थशास्त्र या ज्ञानशाखेत प्रवेश घेऊ नये, हे स्पष्टच आहे. जसं, केवळ प्रवेश सुलभतेने मिळतो म्हणून इंजीनीअरिंग करण्याला काहीही अर्थ नसतो, तसंच कोणत्याही महाविद्यालयात अर्थशास्त्राला प्रवेश घेऊन पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केल्यास करिअर घडवण्यासाठी फार उपयोग होत नाही.
अर्थशास्त्र हा विषय सांख्यिकी विश्लेषण आणि त्यावर आधारित निष्कर्ष याच्याशी निगडित असल्याने गणित आणि सांख्यिकी या विषयात चांगली गती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढे अभ्यासक्रमाच्या कालावधीत आणि नंतर करिअरमध्ये उत्तम कामगिरी करत येते.
या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जोखावे आणि या ज्ञानशाखेला स्वीकारावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आयआयटीतच प्रवेश मिळेल हे तर शक्य नाही. तशी अपेक्षासुध्दा ठेऊ नये. मात्र आपल्या देशात अर्थशास्त्राचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करायलाच हवा. अर्थातच या संस्थांमध्ये गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेचा ठळकपणे उल्लेख करावा लागतो.
गोखले इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिटिक्स
१९३० साली स्थापन झालेली ही आपल्या देशातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि संशोधन करणारी सर्वात जुनी संस्था. या संस्थेने गेली अनेक दशके आपली गुणवत्ता आणि दर्जा टिकवून ठेवला आहे. सामाजिक हिताचे विविध प्रश्न आणि समस्यांवर सखोल संशोधन केले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अशा तिनही क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.
अभ्यासक्रम-
(१) बीएस्सी इन इकॉनॉमिक्स, कालावधी तीन वर्षे, (२) बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, कालावधी चार वर्षे
मुख्य अर्थशास्त्रीय संकल्पनांचा पाया मजबूत करणे, सध्याचे प्रश्न आणि समस्यांच्या निराकरणासाठी अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा उपयोग, विविध समस्यांकडे बघण्यासाठी विश्लेषणात्मक दृष्टीचा विकास ही प्रमुख उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.
अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट (सीयूइटी-यूजी) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
(२) एम.एस्सी इन (१) इकॉनॉमिक्स, (२) ॲग्रिबिझिनेस इकॉनॉमिक्स, (३) इंटरनॅशनल बिझिनेस इकॉनॉमिक्स ॲण्ड फायनांस, (४) पाप्युलेशन स्टडीज ॲण्ड हेल्थ इकॉनॉमिक्स, (६) जिओ पॉलिटिक्स ॲण्ड जिओ इकॉनॉमिक्स, (७) पब्लिक पॉलिसी आणि एम.ए इन इकॉनॉमिक्स
अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट (सीयूइटी-यूजी), या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
प्लेसमेंट– या संस्थेत पुढील कंपन्या / विभाग प्लेसमेंटसाठी येत असतात-
(१) इंडिया बुल होम लोन्स, (२) एडेलविस म्युच्युअल फंड, (३) टाटा स्टिल, (४) निल्सेन, (५) रिलायंस, (६) निती आयोग, (६) भारत सरकारचा वित्त विभाग, (७) एसबीआय, (८) एसबीआय म्युच्युअल फंड, (९) इंडियन ऑइल, (१०) बिर्ला सन लाइफ, (११) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, (१२) केपिएमजी, (१३) थरमॅक्स, (१४) फिक्की, (१५) मॉर्गन स्टॅन्ले, (१६) जे.पी.मॉर्गन, (१७) आयसीआयसीआय बँक, (१८) आयसीआयीसआय प्रुडेंशिअल (१९) हिंदुस्थान लिव्हर, इत्यादी
या संस्थेत पदवीला प्रवेश मिळाला नसेल, तर पदव्युत्तर पदवीसाठी प्रयत्न करायला हवा. यंदा १२वीत असणाऱ्या सर्वच शाखांमधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना आपलं पहिलं लक्ष या शिक्षण प्रवेश मिळवण्यासाठी ठेवायला हवं. आयआयटी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेपेक्षा सीयूइटी- पदवी किंवा सीयूइटी पदव्युत्तर पदवी परीक्षा सोपी असते, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
या संस्थेत प्रामुख्याने कृषी अर्थशास्त्र, ग्राम विकास आणि सहकार, लोकसंख्येचा अभ्यास, नियोजन आणि विकास, सार्वजनिक अर्थशास्त्र,आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आदी विषयांमध्ये संशोधनाला प्राधान्य दिलं जातं. संशोधन अभ्यासक्रम केल्यावर आणखी उच्च श्रेणीच्या करिअर संधी मिळणं सुलभ जातं.
संपर्क – ८४६ शिवाजी नगर डेक्कन, पुणे ४११००४, ईमेल-gokhleinstitute@ gipe.ac.in संकेतस्थळ-https://gipe.ac.in, दूरध्वनी-०२०-२५६८३३००