मालकीनबाई दोन दिवसांसाठी बाहेर गेल्या. “घराबाहेर जाऊन आगावूपणा केलास तर,तुला हाकलून लावीन”, अशी तंबी त्यांनी मार्गारेटला दिली. मालकीनबाईचं हे बोलणं रॉबिन्सनला आवडलं नाही. लपलेल्या जागेतून बाहेर पडून मालकीनबाईच्या पायाला चावा घ्यावा असं तीव्रतेन वाटून तो चुळबूळ करु लागला. मावशीचं त्याच्याकडे लक्षं गेलं. तिने गप्प बसण्याचा इशारा त्याला केला.
मालकीनबाई घराबाहेर पडताच, मार्गारेटने रॉबिन्सनच्या शेपटीला तोंडात पकडून बाहेर खेचलं.
“मावशे, तुझे दात आहेत का खिळे! चांगलेच रुततात. कशाला मला अशी शिक्षा देतेस?”
“गधड्या, मालकीनबाई घरात असताना काय चालली होती तुझी चुळबूळ-पुळबूळ! त्यांच्या लक्षात आलं असतं तर त्यांनी मलाच तुझा काटा काढायला सांगितला असता. मग कोणत्या भावात गेला असतातस?”
“ती खाष्टबाई तुला वाट्टेल ते बोलत होती, ते मला सहन होत नव्हतं.” मामा मिशी फेंदारुन म्हणाला. त्याला जवळ घेत मावशी म्हणाली,
“रॉब्या, बाई रागिष्ट असल्या तरी अधूनमधून माझ्यासाठी प्रेमिष्टपण बनतात. तेव्हढं पुरेसं आहे माझ्यासाठी.”
“मावशे तू, त्या खाष्टीचं खरंच ऐकणार का?”
“छे रे! रॉब्या, या दोन दिवसात आपण धम्माल करु.”
“मग मावशे, बँडस्टँड जवळच्या मन्नत बंगल्यात जायचं का? तिथे म्हणे शाहरुख माझ्या आतेभावाची नि तुझ्या मावस बहिणीची राजेशाही काळजी घेतो. त्यांच्यासोबत आपणही दोन दिवस घेऊ मस्त मेजवाणी, लज्जतदार हैदराबादी टिंगटाँगी बिर्याणी.” बिर्याणीचं नाव कानावर पडताच मावशीच्या तोंडाला पाणी सुटलं.
मालकीनबाईंच्या तंबीकडे दुर्लक्ष करुन मग मावशीने, रॉबिन्सनसह बँडस्टँडकडे प्रस्थान केले. कडेकडेनं जात ते मन्नतजवळ पोहचले. पण बंगल्यात जाण्यासाठी कुठेही फट दिसेना. दोघांनी सुरक्षारक्षकांची नजर चुकवून आत शिरायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला. दोघांनी तिथून धूम ठोकली नि बाजूच्या समुद्रकिनाऱ्यावरील काळ्या दगडांच्या आडोशाला जाऊन ते बसले. समुद्राच्या थंडगार हवेनं दोघांनांही बरं वाटलं. मावशीने एका बुट्टेवाल्याचं लक्षं नाही बघून हळूच बुट्टा लंपास केला. मामा आणि मावशी दोघेही बुट्ट्यावर ताव मारु लागले. अचानक, आतापर्यंत शांत वाटणाऱ्या समुद्राच्या पाण्याचा आवाज वाढू लागला. पाणी वरखाली होऊ लागलं नी दूरुन पाण्याचा लोंढा त्यांच्या बाजूने येऊ लागला. दगडावर बसलेले मनुष्यप्राणी तिथून लगबगीने उठून किनाऱ्यापासून दूर गेले. मामा आणि मावशीही पळाले. रस्त्यावर एका झाडाचा आडोसा बघून समुद्राच्या पाण्याच्या लोंढ्याकडे बघू लागले.
“मावशे, त्या दुष्ट मालकीनबाईने तर पाठवलं नसेल या पाण्याच्या लोंढ्याला. घरी गेल्यावर चांगलाच इंगा दाखवतो बघ.”
“गधड्या, मालकीनबाईंना उगाच यात ओढू नकोस.”
“पण मग, कुणाचा तरी यात हात असल्याशिवाय का इतका मोठा लोंढा अचानक आला आपल्या दिशेने.”
“माम्या, आभाळातील चांदोबाची ही करामत!”
“त्याचं तर आपण काहीच वाईट केलं नाही. मग, कशाला त्याने पाठवला हा लोंढा, आपल्याला गिळायला!”
“त्याने हे मुद्दाम केलं नाही.”
“मावशे, तू म्हणालीस ही चंद्राची करामत. तुला गं कसं कळलं?
“मावशीला ठाऊक नाही अशी एकतरी गोष्ट आहे का या जगात?”
“सॉरी मावशे, हे मी विसरुनच जातो. मग सांग की याचं रहस्य मला.” मामा म्हणाला.
“माम्या, आता जो लोंढा वेगात त्याला भरती म्हणतात. सध्या समुद्राची भरती सुरु झालीय. म्हणून या लाटांवर लाटा किनाऱ्याकडे येताहेत.” समुद्राकडे बघत मावशी सांगू लागली.
“यात त्या चांदोबाची करामत कशी?”
“आपली पृथ्वी ही अवकाशात फिरत असते नि हा चांदोबा तिच्याभोवती फिरतो. दोघेही गोलमगोल! या दोघांना एकमेकांच्या गुरुत्वाकषर्णाची ओढ जाणवत राहते.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं की, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ चंद्राला त्याच्या विवक्षित कक्षेतून फिरायला लावते.”
“ही विवक्षितची काय भानगड… स स सॉरी गणित…” मामा दात चावत म्हणाला.
“विवक्षित म्हणजे, ठरलेल्या किंवा निश्चित असलेल्या…”
“ओके, असं सोप्पं सांगना.”
“तर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची ओढसुध्दा पृथ्वीला जाणवते. त्यामुळे पृथ्वी चंद्राच्या दिशेने ओढली जाते.”
“पुढे काय होतं?”
“या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीची तीव्रता दोन गोष्टींवर अवलंबून असते.”
“कोणत्या?”
“पहिली म्हणजे, या गोलांचं वस्तुमान आणि दुसरं म्हणजे या गोलांमधलं अंतर. वस्तुमान जास्त असल्यास ओढ जास्त. पण चांदोबाचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यानं त्याची ओढ कमी. शिवाय पृथ्वीची जमीन टणक असल्याने या ओढीचा प्रभाव जमिनीवर फारसा पडत नाही.”
“याचाच अर्थ समुद्राच्या पाण्यावर या ओढीचा प्रभाव अधिक पडत असणार.” मामा टुणकन उडी मारत म्हणाला.
“अगदी बरोबर, पृथ्वीवरचं समुद्राचं पाणी लवचिक असल्यानं ते चंद्राकडे ओढलं जाऊन त्याचा फुगवटा होतो. याला भरती म्हणतात.”
“मावशे, हे तर गणितच म्हणायचं.”
“पण हे अर्धवटच गणित झालं.”
“हो का? मग पूर्ण कर की”
“मामू, गुरुत्वाकर्षणाची ओढ ही अंतरावर अवलंबून असते. हे अंतर दुपटीने वाढलं की ओढ चारपटीने कमी होते. चंद्र पृथ्वीच्या ज्या भागाला असतो त्यापासून त्याचं अंतर कमी नि विरुध्द बाजूला अंतर जास्त असतं. त्यामुळे विरुध्द बाजूला गुरुत्वाकर्षणाची ओढ कमी होते. या दोन्ही बाजूला असणारी ओढ यामध्ये बराच फरक पडतो. त्यामुळे विरुध्द बाजूचं समुद्राचं पाणी चंद्रापासून दूर ओढलं जातं. त्या बाजूलासुध्दा फुगवटा येऊन तिथे भरती येते. या दोन्ही बाजूला फुगवटा आल्यावर त्याच्याशी काटकोनात असणाऱ्या भागातील पाणी ओसरतं. चांदोबापासून अंतर सारखं असल्याने या दोन्ही टोकांना भासणारी गुरुत्वाकर्षणाची ओढ समानच असते. तेथील पाणी कमी झाल्यामुळे किंवा ओसरल्यामुळे ओहोटी येते.
“वाव! वंडरफूल, किती गं हे कूलकूल!”
“मामू, आपली पृथ्वी स्वत:भोवती फिरताना तिच्या वेगवेगळया बाजू कधी चंद्राच्याजवळ येतात, तर कधी चंद्रापासून दूर जातात. त्यामुळे भरतीची जागाही बदलते. अर्धा दिवस संपला की पुन्हा त्याच ठिकाणी भरती येते. असं हे भरतीओहटीचं गणित सारखं सुरु राहतं.”
“ मग मावशे, ही करामत करणं, सूर्योबाला कां शक्य नाही?”
“गड्या, सूर्योबाच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ चांदोबापेक्षा अधिक असली तरी, पृथ्वी सूर्यापासून खूपच दूर असल्याने, त्याच्या दिशेने असणाऱ्या आणि विरुध्द बाजूंवर या ओढीचा फार फरक पडत नाही.”
“मस्त मस्त!”
“काय ते?”
“मावशे, शाहरुखच्या बंगल्यातील बिर्याणी मिळाली नाही हे बरचं झालं?
“कां रे?”
“बिर्याणी पोटात गेल्यावर निद्रादेवीच्या जाळयात सापडून ही भरतीओहटीची गंमतजंमत घालवून बसलो असतो ना.” मामा जिभल्या चाटत म्हणाला. त्याला काय म्हयायचय हे मावशीच्या लक्षात येताच तिने इकडेतिकडे बघितलं. लाटांमुळे एकदोन पापलेट किना-यावर आल्याचं मावशीला दिसलं. तिने झर्रदिशी उडी मारुन झपदिशी पापलेट पकडून मामासमोर ठेवला. या मेजवाणीत दंग होऊन दोघेही लाटा मोजण्यात रंगून गेले.
सुरेश वांदिले