(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

चंद्र फुलाचं रहस्य!

वननगरीतील एका ससोबास नेहमी वाटायचं की सगळे प्राणी आपणास भित्रोबा कां बरं म्हणतात? आपल्याला खरोखरच भीती वाटते की हा केवळ भास म्हणायचा? त्याने डोळे मिटले नि तो विचार करु आपणास कुणाची बरं भीती वाटते? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपणास केवळ अंधार  आणि सिंह महाराजांचीच भीती वाटते, बाकी कुण्णाचीही नाही.

या दोघांची वाटणारी भीतीसुध्दा मनातून काढून नि आपण कुणालाही भीत नाही हे सिध्द करुन सगळयांच्या तोंडाला कुलूप लावायला हवं. पण त्याच्यासाठी काय करावं बरं? त्याने स्वत:लाच प्रश्न केला. तेव्हा आठवलं, एकदा त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं होतं की, ज्याची भीती वाटते, तीच गोष्ट आपण हिमतीने केली तर भीतीचा नायनाट होऊ शकतो.

या विचाराने त्याला हायसं वाटलं. तो पुन्हा विचारमग्न झाला की आपणास कशाची अधिक भीती वाटते?  तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याला सिंह महाराजांपेक्षा अंधार अधिक भीतिदायक वाटतो.

ससोबाने डोळे उघडले नि मोठ्ठा श्वास घेऊन या अंधारालाच आधी भिडायचं असं त्याने ठरवलं. एकदा का त्याने निर्धार केला की मग शेंडी तुटो वा पारंबी, तो काही मागे हटायचा नाही. हा निर्धार केला त्या दिवशी अंधार कधी पडतो याची ससोबा वाट बघू लागला.

०००

अंधार पडला.

किर्र रात्र झाली.

ससोबा हळूच घराबाहेर पडला नि जंगलाच्या दिशेने चालू लागला. किर्र अंधारात जंगल अधिकच भेसूर वाटू लागलं. जंगलातील चित्रविचित्र आवाजांनी आणखी भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. मध्येच वाघाची आणि सिंहाची डरकाळी आली. ससोबा जागच्या जागी थिजून गेला. पण त्याने लगेच स्वत:ला सावरलं.

अंधाराला घाबरायचं नाही, म्हणजे नाही असं स्वत:ला समजावत तो जंगलाच्या मध्यभागी पोहचला. तिथे एक सरोवर त्याला दिसलं. या सरोवराकडे दिवसा अनेकदा तो आला होता. पण अंधारात त्याला हे सरोवर वेगळंच वाटू लागलं. सरोवराचं पाणी शांत होतं. इतकं शांत पाणी त्याने कधीच बघितलं नव्हतं.

नुकताच चंद्र उगवला होता. त्याचा प्रकाश सरोवरावर पडू लागला. सरोवर लखलख चमकू लागलं. ते दृष्य बघून ससोबा भारावून गेला नि भान हरपून सरोवराकडे बघू लागला.

किर्र अंधारात एकटाच निघालेल्या या ससोबाकडे चंद्राचं लक्ष गेलं. हा पिटुकला धाडसी असल्याचं  त्याच्या लक्षात आलं. चंद्र ससोबावर खुष झाला. सरोवरातील चंद्रबिंबाकडे एकटक बघत असतानाच ससोबाचं लक्ष आभाळाकडे गेलं. आभाळातील चंद्र त्याच्याकडेच बघत असल्याचा त्याला भास झाला. खरंतर तो भास नव्हताच. या बहादूर ससोबाकडेच चंद्र कौतुकानं बघत होता.

ससोबावर खुष होऊन चांदोबाने एक शिडी खाली सोडली. काही क्षणात ही शिडी ससोबाजवळ पोहचली.

“अरे वा!”, ससोबा स्वत:शीच खुष होऊन म्हणाला.

“चढ की मग त्यावर नि जा चंद्रावर!” कुणीतरी त्याच्या कानात म्हणालं. त्याने इकडेतिकडे  बघितलं. तिथे आसपास कुणीच नव्हतं. त्याला स्वत:चच हसू आलं. कारण शिडीवर चढ नि जा चंद्रावर, असं दुसरं कुणी नाही तर त्याचं मनच म्हणालं होतं. ससोबा खुदकन हसला. आधी सरोवरातल्या चंद्राला नि नंतर आभाळातील चंद्राला त्याने दंडवत घातला नि शिडीवर चढून वरवर जाऊ लागला. बघताबघता तो कितीतरी वर पोहचला. सहज त्याने खाली बघितलं तर खाली ठिकपेच ठिपकेच दिसू लागले.

“बापरे! आपण आलो तरी कुठे?” त्याला वाटलं. त्याने वर बघितलं. चमचमणाऱ्या चंद्राच्या अगदी नजिक तो पोहचला होता. शिडीच्या शेवटच्या काही पायऱ्या संपल्या नि ससोबाचं पाऊल चंद्रावर पडलं.

ससोबा हरखून गेला नि पुढे पाऊल टाकणार तोच त्याच्या स्वागताला, चंद्रावरचे काही प्राणी तिथे आले होते. त्यात एक कोंबडेराव, एक मांजरु, एक उंदरोबा नि एक भूभू मोती असल्याचं ससोबास दिसलं.

“तुम्ही इथे कसे?” ससोबाने विस्मयचकित होत विचारलं.

“आम्ही कसे म्हणजे?” उंदरोबानं आश्चर्य व्यक्त केलं.

“म्हणजे असं की, तुम्ही पृथ्वीवरुन चंद्रावर आलात कधी? असं म्हणायचं होतं.”

“पण आम्ही कुठे इथे आलो? आम्ही इथलेच.”

“मग खाली पृथ्वीवर तुमच्यासारखे दिसणारे कोण?” ससोबाने विचारलं.

“ते आमचे नातेवाईक असतील. नातेवाईक नाही का एकसारखे दिसतात. म्हणून तुला तसं वाटत असेल.” मांजरु म्हणाली.

ससोबा हसला.

ते चारही जण हसले. त्या हसण्याचा गडगडाट झाला नि त्याचा प्रतिध्वनी बराच वेळ येत राहिला.

“इथल्या वातावरणाचा परिणाम”, कोंबडोबा म्हणाला.

“अरे, आपण बोलत काय बसलो, आपल्या या मित्राला चंद्रसफर घडवूया ना.” मांजरु हसत म्हणाली.

“वा वा,  कां नाही…मला तर फिरायला फारच आवडतं,” ससोबा म्हणाला. चौघांनी एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी केली. मंद मंद स्मित केलं. ससोबा त्यांच्यासोबत पुढे निघणार तोच, त्याच्या कानाजवळ एक भुंगा येऊन म्हणाला,

“तू, यांच्यासोबत जाऊ नकोस. हे दुष्ट तुला फसवून एका गुहेजवळ नेतील नि तुझा खातमा करतील. सावध हो.” असं बोलून तो भुंगा निघून गेला. आता पुढे जावं की न जावं, या पेचात ससोबा पडला. त्यामुळे तो मागेच रेंगाळला. ते भूभूच्या लक्षात आलं. चारही जण मागे वळले नि त्याच्याजवळ आले. मांजरु ससोबाला म्हणाली,

“भुंगा, तुझ्या कानाशी लागला ना. इथे नवीन पाहुणे आले की असाच करतो तो, दुष्ट मेला! त्याला काही चांगलं बघवत नाही. पृथ्वीवरुन आला नि इथेच राहिला. इथं कुणी आलं की त्यांच्या कानाशी लागतो नि सांगतो, बाबारे नका जाऊ यांच्यासोबत हे नेतील गुहेकडे नि करतील तुझा खात्मा. असंच तुलाही सांगितलं ना रे,” भूभूने विचारलं.

“हो हो, हो हो, असंच नव्हे, हेच सांगितलं.” ससोबा उत्तरला.

“मग घाबरलास की काय?”

“छे छे छे !!! घाबरलो असतो, भीती वाटली असती तर इथे आलो असतो का?”

“मग निघायचं का पुढे?” मांजरुने विचारलं.

“अलबत”, ससोबा म्हणाला. कुणाला घाबरायचं नाही पण अनोळख्या व्यक्तिंवर लगेच विश्वास ठेवायचं नाही. अशी त्याच्या आजोबांची शिकवण त्याला आठवली. तो सावधगिरी बाळगून नि त्या चौघांवर बारिक लक्ष ठेऊन चालू लागला. चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाचा दाब पृथ्वीपेक्षा कमी असल्यानं त्यांचं पुढे पडलेलं एक पाऊल हे उडी मारण्यासारखंच होतं.

अशा उड्या मारतमारत ससोबा त्या चौघांसोबत गुहेजवळ पोहचताच भूभू त्याला म्हणाला,

“ही, चंद्रावरील सर्वात गुढ आणि रहस्यमय गुहा! यात अनेक रहस्य दडलेली आहे. ही सगळी रहस्यं दाखवण्यासाठी आम्ही चंद्रावर येणाऱ्या पाहुण्यांना इथे घेऊन येतो.”

“अरे वा! फारच छान! मग जाऊया का या गुहेच्या आत.” ससोबा उत्सुकता आणि उत्साहाने म्हणाला.

“हो हो, कां नाही? पण एक अट आहे.” मांजरु म्हणाली.

“कसली अट?”

“पाहुण्याने आतमध्ये एकट्यानेच जायचं असतं. तरच त्याला ती रहस्य दिसतात. आमच्यापैकी कुणी आत आलं तर काहीच दिसत नाही.”

“पण असं का?” ससोबांनी विचारलं.

“हा हा हा”, भूभू जोरात हसू लागला. मांजरुनेही त्याला साथ दिली. चौघांनी त्याच्याभोवती फेर धरला.

“हा हा हा, म्हणे कारण?

विचारतो विनाकारण/

हा हा हा, म्हणे कारण?” असं गाणं ते गाऊ लागले. ससोबा सावध होताच. चौघांचा कावेबाजपणा त्याच्या लगेच लक्षात आला. त्या चौघांचं फेर धरुन गुणगुणनं सुरु असतानाच ससोबाने चपळतेने बाहेर उडी मारली नि तो गुहेत शिरला.

०००

इकडे ससोबा गुहेत वेगाने समोर जाऊ लागला. गुहा अंधारलेली असली तरी त्याचं पाऊल पुढे पडताच ती प्रकाशमान व्हायची त्यामुळे त्याला पुढे जाणं शक्य होत गेलं. पुढे जाताजाता त्याचा अचानक तोल गेला नि तो एका दुसऱ्याच गुहेत खाली पडला.

ही गुहा लख्ख सोनेरी प्रकाशाने भरुन गेली होती. सर्वत्र हिरे-माणिक-मोत्यांसारखे दिसणारे दगडं विखुरलेले होते. त्याचा हा प्रकाश होता. हे सगळं बघून ससोबा विस्मयचकीत झाला. आता तो आणखी पुढे जाऊ लागला.

पुढचं दृष्य बघून तो दचकलाच. कारण त्याच्याकडे एक भला मोठा ग्रंथ विहरत विहरत म्हणजे पक्षासारखा उडत उडत येत होता. ससोबा जागच्या जागीच थांबला. थोड्याच क्षणात तो ग्रंथ ससोबाजवळ आला. नि त्याच्यासमेार येताच ग्रंथातून आवाज आला. ५२३ वं पृष्ठ वाच लगेच.

    “आँ!”

“आता आँ नाही की वाँ नाही. ५२३ वं पृष्ठ वाच लगेच,” पुन्हा आवाज आला. ससोबानं ५२३ वं पृष्ठ उघडलं. त्यात काहीच लिहलं नव्हतं.

“इथे तर काहीच नाही.”

“नीट बघ,” ग्रंथ म्हणाला. ससोबाने पुन्हा बघितलं. त्यापृष्ठावर काहीच लिहिलं नव्हतं, पण कमळाचं चित्र त्याला दिसलं.

“कमळ!” ससोबा आश्चर्यानं उद्गारला.

“त्यावर हात ठेव.” ग्रंथातून आवाज आला.

“आँ!”

“हात ठेव कमळावर!” ग्रंथातून पुन्हा आवाज आला.

ससोबाने पंजा ठेवला नि चमत्कार घडला. तो त्या कमळाकडे ओढला गेला नि त्या कमळातून आणखी एका गुहेत पोहचला. ससोबाने इकडेतिकडे बघितलं. ग्रंथ तिथे नव्हता. आधीची प्रकाशमान गुहाही नव्हती. ससोबाला क्षणभर वाटलं, आता हे नवं संकट की आणखी काय    ?

‘संकट असेल तर संधी समजायची आणि संधी असेल तर त्याचं सोनं करायचं.’ आजोबांनी कधीतरी त्याला सांगितलेलं आठवलं. त्याला आणखी हुरुप आला. संकट असो नाही तर संधी, सोनं तर नक्कीच करायचं, असा निर्धार ससोबाने केला नि त्याने इकडेतिकडे नजर फिरवली.

त्या गुहेत सर्वत्र फुलच फुलं फुलेलेली होती. त्या फुलांमध्ये एक वेगळं फुल होतं. पांढरं शुभ्र स्फटिकासारखं लखलख करणारं. ससोबाला पृथ्वीवरील असच एक फुल आठवलं.

“अरे, ते तर सूर्यफुल! याचा अर्थ त्याच्यासारखं दिसणारं हे चंद्रफुल!” होय होय चंद्रफूल! ससोबा उद्गारला नि उड्या मारत चंद्रफुलाजवळ पोहचला. तो त्या फुलाला हात लावणार तोच तिथे आधीच्या गुहेतील ग्रंथ अवतरला.

“थांब. फुलाला हात लावण्याआधी पृष्ट क्रमांक ८८८ वाच.” ग्रंथातून आवाज आला.

ससोबानं तसच केलं. पृष्ठ क्रमांक ८८८ वर लिहिलं होतं,

“फक्त एकच पाकळी तोड. पूर्ण फुल तोडू नकोस.”

“कां पण?” असा प्रश्न ससोबाच्या मनात आला. तो प्रश्न विचारणार, त्याआधीच ग्रंथ तिथून अंतर्धान पावला. ससोबा विचारात पडला. या विचारातच तो चंद्रफुलाजवळ पोहचला.

ते सुंदर नाजूक फुल होतं. त्यातून मंद सुगंध येत होता. ससोबाला हे फुल खूप आवडलं. हे पूर्ण फुलचं तोडावं असं त्याला वाटलं. फुल तोडू नकोस, फक्त पाकळीच तोड असं पृष्ठ क्रमांक ८८८ ने इशारा दिला होता.

पाकळी तोडली तर या सुंदर फुलाला जखम होईल. या जखमेचं त्याला दु:ख होईल. वेदना होतील. या वेदनेने तो कोमेजून जाईल. नको नको, असं काही करायचं नाही. या सुंदर फुलाला दु:ख द्यायचं नाही. असं ससोबाने मनोमन ठरवलं. त्याने चंद्रफुलाला हलकेच स्पर्श केला. त्याचा गंध घेतला नि तो पुढे जाण्यासाठी निघाला. तोच पुन्हा तो ग्रंथ त्याच्यासमोर आला नि त्यातून आवाज आला, पृष्ठ २२२ बघ.

ससोबाने ते पृष्ठ उघडलं. त्यावर लिहिलं होतं,

“या चंद्रफुलाची पाकळी ज्याच्याकडे असेल त्याला एक शक्ती मिळेल. या शक्तीच्या बळावर तो चंद्रावर राज्य करु शकेल.”

“आँ!”

“ही संधी सोडू नकोस. चंद्राचा राजा होण्याची ही संधी सोडलीस तर तुझ्यासारखा मुर्ख तूच.” ग्रंथातून आवाज आला.

ससोबाने काहीतरी विचार केला नि तो चंद्रफुलाजवळ जाऊन म्हणाला,

“चंद्रफुला, मी राजा होण्यासाठी तुला वेदना देणार नाही. तुझी पाकळी तोडणार नाही. राजा होण्यापेक्षा तू असा कायम सुंदर राहिलेला मला फारफार आवडेल.” असं बोलून ससोबाने फुलावरुन हळूवार पंजा फिरवला नि ग्रंथाकडे बघितलं. त्याचे डोळे विस्फारलं.

ग्रंथातून एक दिव्य पुरुष बाहेर येताना त्याने बघितला. दिव्य पुरुष ग्रंथातून बाहेर आल्यावर ससोबास म्हणाला,

“ससोबा अरे, किती मोठ्या मनाचा तू. स्वत:च्या हितापेक्षा दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणारा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे.”

“पण, आपण कोण?”

“मी चंद्र. तुझी परीक्षा घेत होतो. ससोबा इतका पिटुकला असूनही तू साहसी आहेस. घाबरत नाहीस, बुध्दीचा वापर करुन संकटावर  मात करतोस. मीच पाठवलेल्या कोंबडोबा, भूभू मोती, मांजरु नि उंदरोबांच्या जाळ्यातून बरोबर निसटलास. भुंग्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाहीस. तुझ्या बुध्दीचा बरोबर वापर करुन तू इथपर्यंत आलास.”

“आँ! म्हणजे तुम्ही ते केलत?” ससोबाने डोळे विस्फारुन विचारलं.

“होय, मीच त्यांना पाठवलं होतं. माझ्या परीक्षेत जे उत्तीर्ण होतात तेच इथपर्यंत पोहचू शकतात. ससोबा, तू या परीक्षेत उत्तीर्ण झालासच पण, संकटाचं रुपांतर संधीत करेन नि त्याचं सोनं करेन, हे तू ठरवलेलंसुध्दा साध्य केलंस.” चंद्र म्हणाला.

” काय काय साध्य केलं मी?” ससोबाने उत्सुकतेनं विचारलं.

” ससोबा, तुला चंद्राचा राजा होण्याची संधी होती पण ती तू घेतली नाहीस, पण त्याचं सोनं मात्र केलंस.”

“म्हणजे?”

“ससोबा, अरे तू, ज्या पृथ्वीवर राहतोस. त्या पृथ्वीच्या ऱ्हासाला मानवाची हावरट वृत्ती कारणीभूत झालीय. एक ना एक दिवस ही पृथ्वी संकटात सापडेल. तेव्हा तू आणि जंगलातील पशुपक्षीच चंद्रावर राहू शकतील, असं वरदान तुला मी देतो.”

“आँ!”

“होय, ज्या शिडीवरुन तू इथे आलास त्याच शिडीवरुन तुझे, प्राणी पक्षी मित्र इथे येऊ शकतील.”

“अरे वा!” ससोबा आनंदाला. त्याने चंद्राला दंडवत घातला. चंद्राने शिडी खाली टाकली. ससोबा त्यावरुन उतरुन खाली त्याच्या वनात आला. प्रकाशाचं आगमन झालं होतं.

पृथ्वीच्या ऱ्हासामुळे मनुष्यप्राणी संकटात सापडला असला तरी वनगरीतील प्राणी आणि पक्षांनी भिण्याची गरज नाही, हे आपण कधी सिंह महाराजांना सांगतो असं ससोबाला झालं. त्याने सिंह महाराजांच्या गुहेकडे धाव घेतली. अंधाराची भीती तर गेली होतीच आता सिंह महाराजांची भीतीसुध्दा मनातून काढण्याची संधी आयतीच मिळाल्याचा विचार ससोबाच्या मनात आला आणि त्याने आणखी जोराने धावायला सुरुवात केली.

सुरेश वांदिले

७वा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण  संस्था,चारकोप, सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७

भ्रमणध्वनी-९३२४९७३९४७

०००००००००००००००००००००००००००००००००००००