(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अवघड जागेचं दुखणं!

आज मागार्रेट मावशी थयथयाट करतच रॉबिन्सन मामाकडे आली. तिने स्वत:चं नाकही दाबून धरलं होतं. बराच वेळ झाला तरी दाबून धरलेलं नाक ती उघडेना. मामाने हातवारे करुन काय झालं, ते विचारलं. पण मावशी ढिम्म!

“मार्गेटली, अशीच नाक दाबून राहिली तर गचकल्याशिवाय राहणार नाही.” मामाचं एक मन म्हणालं.

“राहू दे की, सुंटी वाचून खोकला जाईल. तुझ्या पाठिमागची ब्याद जाईल.” त्याचं दुसरं मन म्हणालं.

“छे, छे, छे!!! मावशीच नसेल तर मग मामाचं काय महत्व?” दुसऱ्या मनाला समजावत पहिलं मन म्हणालं.

मग, पहिलं मन मावशीचं नाक उघडण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करु लागलं. त्याने मावशीला हलवलं. ढुशी मारली. तिची मिशी ओढली. कानाला हलकेच चावा घेतला. शेपटीला ओढलं. पण मावशीचं बंद नाक काही उघडेना. आता काय करावं बरं? असा विचार करताकरता मामाला एक कल्पना सुचली. तो मावशीच्या कानाला लागला नि जोरात ओरडला, “नेपोटल्या आला, नेपोटल्या आला.”

मावशीने बंद नाक तत्काळ उघडलं नि कावरीबवारी होत इकडेतिकडे बघत म्हणाली, “कुठे आहे, कुठे आहे? तो नेपोटल्या बिपोटल्या.”

“अगं मावशे, काही नेपोटल्या बिपोटल्या नाय. मीच हाच. तुझं बंद नाक उघडण्यासाठी केला म्या उपाय, तुझ्या बंद नाकाचं रहस्य तरी काय?” मामा मावशीभोवती फेर घालत म्हणाला.

“रॉब्या, तुझ्या आगावूपणामुळं माझा जीव गेला असता, त्याचं काय?”

“मावशे, माझ्या आगावूपणामुळे नाही तर तुझ्या बंद नाकामुळे तुला हरीहरी करावं लागलं असतं. म्हणून केला मी आगावूपणा. पण, मावशे इतका वेळ नाक दाबून धरण्याचं कारण तरी काय?”

“कसं सांगू नि काय सांगू राब्या.”

“असंही सांग नि तसही सांग मावशे.”

“अरे ती मालकीनबाई…”

“गचकली का? मग दे टाळी.” मामा उत्साहाने म्हणाला.

“नाही रे..”

“मग?”

“अरे, तिला आज काय दुर्बध्दी झाली कुणास ठाउ क? पण तिने मला लाडाने जवळ घेतलं.”

“अगं, मग छानच झालं की.”

“छान नव्हे घाण, राब्या.”

“लाडाला घाण म्हणतेस? डोक्यावर पडलीस की काय मावशे”

“राब्या, मालकीनबाईच्या तोंडातून इतकी दुर्गंधी येत होती की काही विचारुच नको.”

“म्हणून तू नाक बंद केलस होय?”

“हो ना.”

“मावशे, या माणसांच्या तोंडाला कां बरं दुर्गंधी सुटत असेल गं?” मामाने विचारलं.

“त्याचाच विचार करत होते मी इतका वेळ.”

“नाक दाबून बुक्क्यांचा मार, असं ऐकलं होतं पण नाक दाबून दुर्गंधीचा विचार, असं पहिल्यांदाच कानावर पडलय. मग तुझ्या या दुर्गंधीच्या विचारमंथनातून निघालेला सुगंध माझ्यापर्यंत पोहचव की.”

“मामू, या मनुष्यप्राण्याचं म्हण किंवा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा, हवा नसतानाही ज्यांची वाढ होते असे ॲनेरोबिक जातिचे विषाणू, सल्फर असलेल्या संयुगाची (कॉम्प्लेक्स कम्पाउंड) निर्मिती करतात.”

“यानेकी फिर एक बार शास्‍त्रीय भानगड!” मामा तोंड वाकडं करत म्हणाला.

“भानगड म्हण की गडबड, अरे हे, ॲनेरोबिक विषाणू, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथाइल मरकॅप्टान या संयुगाची निर्मिती करतात. हे दोन्ही वायू दुर्गंधी पसरवतात.”

“बापरे! या भानगडीची गडबड फारच अवघड दिसतेय.”

“हो ना मामू, आपलं किंवा मनुष्यप्राण्याचं तोंड कोरडं झालं की लाळेचा स्त्राव कमी होतो. या लाळेतील लायसोझाइन नावाचं विकर(एन्झाइम) जिवाणुंना मारुन जिभेचा ओलावा टिकवण्यास मदत करतो. पण जेव्हा लाळेचा स्त्राव थांबतो, तेव्हा मात्र लायसोझाइम, ना जिवाणुंना मारु शकत ना आपल्या जिभेवरचा ओलावा राखू शकत. त्यामुळे ॲनेरोबिक जिवाणूंना आणखी जोर चढतो. ते दुर्गंधीयुक्त रसायनं तोंडात साठवत राहतात.”

“हे म्हणजे अवघड जागेचं दुखणंच समजायचं.”

“होना मामू, बरेचदा आपल्या हिरड्यांच्या खालची जागा, दातातल्या फटी कोरड्या ठणठणित असतात, या ठिकाणी थोडासा काळोखही असतो. अशा ठिकाणी हे जिवाणू आणखी वेगाने वाढतात.”

“म्हणजे भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, असंच ना.”

“अगदी बरोबर मामू, शिवाय मनुष्यप्राणी जेव्हा कॉफी खूप पितो, तेव्हा त्यातील आम्ल पदार्थ तोंडातील ओलसरपणा  कमी करतो. त्याने साखरेचं पदार्थ खूप खाल्ले की जिवाणू त्याचं विघटन करतात, तेव्हाही दुर्गंधी पसरवणारे संयुगं निर्माण होतात. मसाल्याचे पदार्थ किंवा कांदे खाल्ल्‍यावरही त्यातले वायू रक्तात शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुफ्फुसातून बाहेर पडतात. त्यावेळी तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी वाटते.” असं सांगत असताना मावशीने जरा दम घेतला. तिने मामाकडे बघितलं. आता त्याने नाक दाबून धरलं होतं. दोघेही बोलत असताना कुठून तरी कुजकं अंड तिथे आलं होतं.

“माम्या, आता नाक बंद करण्याची नव्हे तर इथून धूम ठोकण्याची वेळ आलीय.” मामाला ढुशी देत मावशी म्हणाली.

दोघांनींही क्षणार्धात तिथून पळ काढला.

सुरेश वांदिले