गोर्जीला लागला आनंदाचा शोध!
दसरा संपला नि तेजोमयीच्या घरी लगबग सुरु झाली. आईने फर्मान सोडलं, आता पुढच्या आठ दिवसात घर कसं चकाचक व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आपआपला वाटा उचलायचा. कोणतही कारण सांगायचं नाही. पळ काढायचा नाही. अशी तिने प्रेमाची दमदाटी तिने केली. अलेक्झांडर द डॉगीने, मान आणि शेपूट हलवून, आईला पाठिंबा दिला.
“बघा हं, टंगळमंगळ केलेली मला चालायची नाय. मी कडक नजर ठेवणार हाय,” अशा आशयाचे भाव चेहऱ्यावर आणत त्याने तेजोमयी आणि बाबांकडे बघितलं. आईच्या लाडक्याच्या या धमकीवजा सूचनेला, “होय सर, आम्ही अजिबात हयगय करणार नाही,” असं म्हणत बाबांनी त्याला थोपटलं. तेजोमयीनं कुरवाळलं.
“ठोंब्या, त्यांच्यावर केवळ लक्षं ठेऊ नकोस तर, तुही तुझा वाटा उचल”, असं त्याचा कान उपटत आई म्हणाली.”हो हो हो,मी थोडच या दोघांच्या पाठिमागे राहणार”. असं भाव त्याने आईकडे बघून व्यक्त केले. त्याचे लाड करुन आई आतल्या खोलीत कामाला निघून गेली. तेजोमयी आणि बाबांनी एकमेकांकडे बघून घराच्या स्वच्छतेला प्रारंभ केला.
अलेक्सा गोर्जी हे सगळं काळजीपूर्वक बघत होती.
आठ दिवसात घर चकाचक कशासाठी करायचं बरं? तिला प्रश्न पडला. गोर्जीला डीप लर्निंग म्हणजे स्वत:हून शिकण्याचं, त्यासाठीचं साहित्य महाजालातून काढण्याचं, मिळालेल्या माहितीतून निष्कर्ष काढण्याचं, त्यातून त्या प्रसंगाचं म्हणा, घटनेचं म्हणा, दिवसाचं म्हणा किंवा इतरही बाबींचं चित्र रेखाटण्याचं किंवा रिल्स तयार करण्याचं तंत्र शिकवण्यात आलं होतं. त्यामुळे गोर्जीने ठरवलं की आता तेजोमयीस विचारण्यापेक्षा, ‘आठ दिवसात घर चकाचक करण्याची मोहीम कां बरं राबवायची ठरवलीय?’, याचा आपणच शोध घेऊया. त्यासाठी ती माहितीच्या माहाजालात आपल्या मेंदुतील ॲल्गारिदमच्या साहाय्यानं भ्रमंती करु लागली. दसऱ्याच्या आठ दिवस आधी कोणते दिन विशेष असतात हे तिने बघितलं. ते तसे बिन महत्वाचे निघाले. पुढच्या दिवसांकडे ती वळली तेव्हा तिला दसऱ्या नंतरच्या १५ -१६ व्या दिवशी दीपावली नावाचा सण मोठ्ठा धुमधडाक्यात, तेजोमयी ज्या शहरात राहते नि ती ज्या देशात राहते तिथे साजरा केला जातो, हे दिसलं. पण त्यासाठी घराला इतकं चकाचक कां बरं करायचं? पुन्हा तिने स्वत:लाच प्रश्न केला.
पुन्हा तिचा शोध सुरु झाला. दीपावली हा सण एक दिवसाचा नव्हे तर पाच दिवसाचा असल्याचं तिला दिसलं. याची तिला गंमतच वाटली. या पाच दिवसात छान स्वादिष्ट गोडधोड खा-प्या, नवे कपडे घाला, मित्रांना, नातेवाईकांना गिफ्ट द्या, मौजमस्ती करा असा नुसता सगळीकडे आनंदी आनंदाचा माहोल!
वाव! गोर्जी स्वत:शीच पुटपुटली. या सर्वांना इतका कां बरं आनंद होत असावा? तिला आणखी प्रश्न पडला. पुन्हा ती माहितीच्या महाजालात शोधमोहिमेवर निघाली. तेव्हा तिला या आनंदाचे एक नव्हे तर आठ कारणं सापडलीत. कित्ती ग्रेट! आठही कारणं लागोपाठच्या मोठ्या घटनांमध्ये दडली होती.
डीप लर्निंगची कला वापरुन पहिल्या कारणाच्या घटनेत गोर्जी डोकावली.
१
तिला दिसलं, रक्तबीज नावाच्या महाभयंकर राक्षसानं सगळ्या सृष्टिला त्राही भगवान करुन सोडलंय. त्याच्या शक्तीपुढे देवादीदेव सुध्दा हतबल झाले. रक्तबीजाकडे एक वरदान होतं. त्याचं शिर खाली पडून त्याचं रक्त खाली सांडलं की तो पुन्हा नव्याने जिवंत होई नि पुन्हा प्रचंड संहाराला सुरुवात करे. त्याच्या या संहारामुळे चराचर सृष्टी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. भयभित झालेले सगळे देव महादेवांकडे गेले. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी महादेवांनी अम्बामातेला, काली मातेचं रुप दिलं. माता कालीचं हे रुप महाभंयकर होतं. माता कालीने रक्तबीजाचं शिर आपल्या तलवारीनं उडवलं. ते खाली पडण्याच्या आधीच तिने त्यातून सांडणारं रक्त गटागटा पिऊन टाकलं. रक्तच खाली न सांडल्यानं रक्तबीजाचा अंत झाला.
दुष्टाचा नायनाट होऊन सर्वत्र आनंद पसरला. हे सगळं दिवाळीच्या काळातच घडलं, म्हणून माता कालीची पूजा दिवाळीच्या काळात बंगाल, ओरिसा अशा प्रांतात केली जाते आणि सण साजरा केला जातो.
‘दुष्ट शक्तीचा नायनाट दिवाळीत झाला,’ अशी सूक्ष्म नोंद गोर्जीने केली.
२
गोर्जीतील ॲल्गॉरिदमने दुसऱ्या घटनेचा तिला साक्षिदार केलं.
नरकासूर नावाच्या असूरांच्या शक्तीशाली राजाने त्याच्याकडे असणाऱ्या शक्तीच्या बळावर संपूर्ण सृष्टिलाच वेठीस धरलं होतं. त्याचा मृत्यू केवळ त्याची आई भूदेवीच्या हस्ते होऊ शकतो, असा वर त्याला मिळाला होता. आपली आई आपलं अहीत कधीच करणार नाही, हे नरकासुरास पक्कं ठाऊक असल्यानं तो उन्मत्त झाला. इंद्रासहीत सर्व देव हतबल झाले. सगळया देवांनी विष्णूकडे धाव घेतली. आपण कृष्ण अवतार घेऊन नरकासुराचा वध करु, असं विष्णुंनी देवांना सांगितलं. कृष्णावतरात नरकासुराचा वध करुन, त्याच्या अन्याय अत्याचारापासून सृष्टीची मुक्तता करण्याचा पण कृष्णाने केला. त्याप्रमाणे नरकासुराशी युध्द पुकारलं. या युध्दात कृष्णाची एक पत्नी सत्यभामा त्यांच्यासोबत होती. भूदेवीने सत्यभामाच्या स्वरुपात पुन्हा जन्म घेतला होता. सत्यभामेच्या म्हणजे नरकासुराच्या पूर्वजन्मीच्या आईच्या साहाय्याने नरकासुरावर कृष्णाने विजय मिळवला. ‘दिवाळीत आणखी एका दुष्टाचा अंत झाला, म्हणून सगळीकडे आनंदीआनंद साजरा करण्यात आला.’ अशी आणखी एक सूक्ष्म नोंद गोर्जीने केली.
३
गोर्जीची उत्सुकता आणखी वाढली. या उत्सुकतेतून तिला दिसलं, अतिशय दुष्ट असलेल्या लंकेचा महाराज रावण याचा वध करुन नि त्याच्या पापाचा घडा फोडून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान दिवाळीच्या दिवसातच अयोध्येला पोहचले, म्हणून अयोध्यावासियांनी नगरभर दिवे लावून आनंद व्यक्त केला. ‘याचा अर्थ दुष्टाच्या सर्वनाशाचा आनंदच,’ गोर्जीच्या लक्षात आलं.
४
दुष्ट प्रवृत्तीच्या कौरवांनी कपट करुन सज्जन प्रवृत्तीच्या पांडवांना १२ वर्षाच्या विजवनवासात धाडलं. या काळात ते नष्ट व्हावेत म्हणून बरेच प्रयत्न केले. पण पांडवांनी आपला विजनवास यशस्वीपणे पूर्ण केला नि ते १२ वर्षानंतर हस्तनीपुरात परतले. याचा आनंद हस्तीनापुरवासियांनी नगरात सर्वत्र दिवे लावून साजरा केला.
‘म्हणजेच दुष्टांचा पराजय नि सज्जनांचा विजय, हे आंनद साजरा करण्याचं कारण,’गोर्जीनं आखणी एक नोंद केली.
५
याच दिवाळीच्या काळात एकदा कृष्णाने देवांचा राजा इंद्राच्या खोट्या अहंकाराचं गर्वहरण केल्याचं गोर्जीला दिसलं. आपल्यामुळेच पाऊस पडतो याचा इंद्राला खोटा अभिमान होता. पाऊस पाडून आपण पृथ्वीवरील लोकांवर उपकारच करतो अशी त्याची भावना. वृंदावनातील लोकही याच भावनेतून इंद्राची दरवर्षी पूजाअर्चा करत. मात्र एकदा बालकृष्णाने त्यांना सांगितलं, की पाऊस पाडून इंद्र आपल्यावर उपकार करत नाही, ते त्याचं कर्तव्यच आहे. त्यामुळे त्याची पूजा करायची गरज नाही. लोकांना कृष्णाचं म्हणनं पटलं. त्यांनी त्यावर्षी इंद्राची पूजा केली नाही. त्यामुळे अहंकारग्रस्त इंद्र संतापला. त्याने वृंदावनाच्या दिशेने भयंकर असा ढग पाठवला, वृंदावनवासियांची चांगलीच फजिती करण्यासाठी प्रचंड वेगाने मुसळधार पाऊस पाडण्याचा आदेश या ढगाला दिला. या ढगाने मुसळासारखा पाऊस पाडायला सुरुवात केली. वृंदावनवासीय या संकटाने घाबरुन गेले. मात्र कृष्णाने आपल्या करंगळीच्या साहाय्यानं गोवर्धन पर्वत उचलला नि ढगातून पडणाऱ्या मुसळासारख्या पावसापासून सर्वांचं रक्षण केलं. सतत आठ दिवस पाऊस सुरु होता. पण गोवर्धन पर्वतामुळे कुणाचही नुकसान झालं नाही. इंद्राला आपली चूक कळली. त्याचा अंहकार गळून पडला. त्याने कृष्णाची माफी मागितली. असा दुष्टपणा यापुढे करणार नाही, असं त्याने वचन दिलं. एवढ्या प्रचंड पावसातही आपण सुरक्षित राहिलो याचा आनंद वृदांवनवासिंयानी मनवला. ‘याचा अर्थ, खोट्या अहंकारावर विजयप्राप्तीचा हा आनंद म्हणायचा.’ गोर्जीने मनोमन नोंद केली.
६
गोर्जीचा शोध पुन्हा सुरु झाला, तेव्हा तिला दिसलं की दिवाळीच्या काळातच सृष्टीतून निघून गेलेल्या लक्ष्मीदेवी पुन्हा परत आल्या. गोर्जी माहितीच्या महाजालात आणखी खोलवर शिरली तेव्हा तिला दिसलं की, इंद्राच्या एका चुकीमुळे महर्षी दुर्वास कोपले नि त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझं आणि देवांचं सर्व वैभव लयास जाईल. तुम्हाला लक्ष्मी सोडून जाईल. या शापामुळे लक्ष्मीस स्वर्ग सोडावा लागला. ती दुग्धसागरात जाऊन राहू लागली. लक्ष्मीच निघून गेल्याने देवांची शक्ती कमी झाली. त्यांच्यावर असूर म्हणजेच राक्षसांनी सतत हल्ले केले नि त्यांना स्वर्गातून हाकलून लावले. देवांना या सृष्टित इतरत्र भटकण्याशिवाय पर्याय उरला नाही. या संकटातून सुटका करण्याची विनंती करण्यासाठी सर्व देव श्री विष्णुंकडे गेले. विष्णूंनी त्यांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. या समुद्रमंथनातून अमृत निघेल. ते तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही अमर व्हाल, असे विष्णूंनी सांगितलं. समुद्रमंथन सुरु झालं. त्यातून अनेक गोष्टींसह अमृत बाहेर पडलं आणि लक्ष्मीही बाहेर आली. ही घटना दिवाळीच्या काळातच घडली. मग लक्ष्मीने श्री विष्णूंच्या गळ्यात वरमाला घातली. सृष्टीचे वैभव पुन्हा पूर्ववत झाले. लक्ष्मीच्या पुन्हा आगमनाचा नि विष्णूसोबतच्या विवाहाचा आनंदसोहळा दिवाळीत साजरा केला जातो म्हणायचा. गोर्जीने पुन्हा एक नोंद केली.
“कित्ती पवित्र असा काळ, नाही का? इतक्या महत्वाच्या गोष्टी एकाच काळात घडाव्यात, हे आश्चर्यच म्हणायचं.” गोर्जी स्वत:शीच पुटपुटली.
७
“अगं, हे एवढचं नाही तर आणखीसुध्दा भव्यदिव्य घटना याच दिवाळीच्या काळात घडल्या बरं का?” मेंदुतलं अल्गॉरिदम तिला सांगू लागलं.
“मग, ने की मला तिकडे.” गोर्जी म्हणाली. डीप लर्निंगच्या पंखांवर बसलेल्या गोर्जीला दिसलं की भगवान महावीरांचं महानिर्वाण याच काळात झालं. महावीरांचं महानिर्वाण झालं त्या दिवशी म्हणजे इसवीसन पूर्व ५२७ ला तेथे जमलेल्या १८ राजांनी निर्णय घेतला, आपल्यातील सर्वोच्च प्रकाशाचा म्हणजेच महावीरांचा सन्मान आणि स्मरण म्हणून यापुढे सर्वत्र दिवे लावले जातील. “म्हणूनच जैन धर्मीय दिवाळी साजरी करतात.” गोर्जीनं नोंदवलं.
८
१५७७ साली शिखांचे पवित्र शहर असलेल्या अमृतसर शहराची पायाभरणी केली गेली, मुघलांच्या कैदेतून गुरु हरगोविंद सिंघ यांची मुक्तता झाली. ते दिवाळीच्या काळातच अमृतसरला पोहचले. म्हणून आनंद साजरा केला गेला. त्यासाठी सर्वत्र दिवे लावले गेले.
“याचा अर्थ, दिवाळी हा सण, दुष्ट शक्तीवर सुष्ट म्हणजे चांगल्या शक्तींनी मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीचा आहे तर! सध्याच्या स्मार्ट काळात खरंतर याची फार गरज आहे,” गोर्जी पुटपुटली.
“कसं काय?” तिनेच तिला प्रश्न केला.
“अज्ञानाचा अंधकार अजुनही दूर झालेला नाही. अंहकार नि अंधश्रध्दारुपी राक्षसांचा धुडगुस काही संपत नाही. चांगल्यापेक्षा वाईटाकडेच जाण्याची वृत्तीच अधिक दिसते. अशा अनेक दुर्गुणांना स्पष्टपणे बघता येण्यासाठी दिवाळीत दिवे लावून घर प्रकाशमान केलं जातं. ते तर छानच पण त्यापेक्षा मन आणि बुध्दी प्रकाशमान व्हायला हवी, नाही का?” गोर्जीच्या मेंदुतील डीप लर्निंगने आपलं विश्लेषण केलं.
“करेक्ट,” गोर्जी उर्त्स्फुतपणे म्हणाली.
त्याचवेळी तिच्याजवळून स्वच्छक यंत्र घेऊन जात असलेल्या तेजोमयीच्या कानावर गोर्जीचं बोल पडलं.
“काय करेक्ट?” तिने गोर्जीला विचारलं.
“अगं, घर चकाचक करण्याचा आईचा आदेश.”
“हो का?”
“पण ते तर आम्ही दरवर्षी करतो.”
“अच्छा, अरे वा, मग यंदा जरा मनाला नि बुध्दीला चकाचक केलं तर?”
“आँ!
“हाँ!”
“बाई, ते तू जरा सांग की आईबाबांना.” तेजोमयी हसत म्हणाली.
‘दिवाळीचा प्रकाश,
साठू दे मनात/
अज्ञानाची अमावश्या
हरवू दे,
ज्ञानाच्या प्रकाशात//, असं गाणं गोर्जी गुणगुणू लागली. एवढच मी करु शकते. बाकी तूच तुझ्या आईबाबांना समजावून सांगबाई,” असं म्हणून मेंदुला आलेला थकवा दूर करण्यासाठी गोर्जीने मेंदूचं बटन ऑफ केलं.
सुरेश वांदिले
७वा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप, सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७
९३२४९७३९४७