ते चाळीस दिवस!
खरं तर हा प्रश्न कुणालाच कां पडला नसेल? याचाच मी विचार करत आहे. मी म्हणजे “प्रज्ञान” हो. चंद्रयान-३ मधून नाही का काही महिन्यांपूर्वी चंद्रावर, विक्रम रोव्हरच्या मदतीने खाली उतरलो. अलगद आणि सुरक्षित!
मी व्यवस्थित उतरेन का? की माझा कपाळमोक्ष होईल, असं काहीबाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत होतं. पण मी मात्र निश्चिंत होतो. कारण यावेळी चंद्रावर उतरण्याचं माझं गणित एक अधिक एक दोन असं अचूक राहील, याची शास्त्रज्ञांनी किती काळजी घेतलीय, हे मला चांगलंच ठाऊक होतं.
मी चंद्रावर उतरणार नि तुम्ही टाळ्यांच्या कडकडाटात माझं स्वागत करणार, याची मला १०० टक्के खात्री होती.
पण ते जाऊ दे, माझा मुद्दा आहे की, “हा प्रश्न तुम्हाला पडला कसा नाही.”
“प्रश्न तरी कोणता?” तुम्ही विचाराल.
“अहो, मी पृथ्वीवरुन निघालो नि ताशी सहा हजार किलोमिटर वेगाने चंद्राकडे जाऊ लागलो. मला चंद्रावर पोहचायला लागले ४० दिवस. तर या ४० दिवसात मी नेमकं केलं तरी काय?” हा तो प्रश्न.
मी, अधूनमधून चंद्र असा दिसतो किंवा अंतराळ असे दिसते, याचे फोटोबिटो पृथ्वीवरील प्रयोगशाळेत पाठवत होतो म्हणा. पण त्यानंतर काहीतरी करणारच की नाही! “प्रज्ञान” शांत कसा बसणार? पण तुम्ही मात्र शांतच राहिलात. त्यामुळे आता, न राहवून मीच, त्या चाळीस दिवसात काय केलं, हे सांगूनच टाकतो. ते सांगण्यासाठी मी फार अधिर झालोय.
०००
तर त्या चाळीस दिवसातल्या एके दिवशी, असेल तो १८ वा किंवा १९ वा दिवस. मी जरा बाहरेचं अद्भूत विश्व बघत असताना, माझ्या समोरुन बारा अश्वाचा एक रथ वेगाने जाताना मला दिसला. त्यावर एक तेज:पूंज व्यक्ती बसलेली होती. त्याला बघून माझं भान हरपलं. त्यामुळे त्याने, “हाय” केलं तेव्हा काही क्षण मला कळलच नाही. पण लगेच सावरलो नि मीही त्याला “हाय” करुन विचारलं,
“तुम्ही कोण?” तर तो व्यक्ती हसत म्हणाला,
“प्रज्ञाना, मी तुझा प्राण.”
“आँ!” माझ्या तोंडून आपोआपच “आँ” वासला गेला.
“माझ्या राज्या, मी तुझा प्राण म्हणजे, तुला उर्जा पुरवणारा सूर्य. तू जेव्हा चंद्रावर उतरशील तेव्हा मी तुला उर्जा पुरवेन. त्यामुळे तू चंद्रावर सुखरुप काम करु शकशील.”
“अच्छा, या अर्थाने तू माझा प्राण आहेस होय .” मी हसून विचारलं. “पण प्राणापेक्षा प्राणसखा नाही का योग्य वाटत सूर्यदेव?” मी त्याला विचारलं.
“वा वा वा! प्राणसखा! कित्ती गोड वाटतं ऐकायला. आवडलं हं आपल्याला, तुझं वागणं. मग येतोस का माझ्याबरोबर फिरायला?” सूर्यदेवानं विचारलं.
“सूर्यदेवा, ते कसं शक्य आहे. मला तर चंद्रावर उतरायचय ना.”
“तू, चंद्रावर नक्कीच उतरणार. मी तुझा प्राणसखा आहे. आता कशाला काळजी करतोस. चल माझ्यासोबत. मी तुला चाळीसाव्या दिवशी अलगद चंद्रावर उतरवेल. काळजी करु नकोस.” सूर्यदेव म्हणाले. नाहीतरी, फोटो काढून काढून मला तसा कंटाळाच आला होता. त्यामुळे मी हळूच विक्रांतमधून बाहेर पडलो नि सूर्यदेवांच्या १२ अश्वांच्या रथात गेलो. सूर्यदेवांच्या तेजापुढे माझं, असं त्यांच्या रथात जाणं पृथ्वीवरील प्रयोगशाळेतल्या कुणाच्याही लक्षात आलं नाही.
०००
चंद्रयान पुढे जात राहिलं आणि मी सूर्यदेवांसोबत त्यांच्या रथात अंतराळ भ्रमंती करु लागलो.
सूर्यदेवांच्या रथासोबत ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष आणि राक्षस होते. “माझी दररोजची भ्रमंती या सात जणांसोबत होते,” असं सूर्यदेवांनी सांगितलं. मी उत्सुकतेनं बघू लागलो. सूर्यदेवांच्या सर्वात समोर असलेले ऋषी, सूर्यदेवांची स्तुती असलेले मंत्र म्हणत होते. त्यांच्या पाठिमागे असलेले यक्ष सूर्यदेवांच्या कीर्तिचे गाणे म्हणत होते. त्यांच्या लगेच पाठिमागे अप्सरा नृत्य करत होत्या. ते नृत्य डोळ्यात साठवून घेत असताना माझं लक्षं रथाच्या दोराकडे गेलं. ते बघून मी आधी दचकलो नि नंतर मला थोडी भीती वाटू लागली. सूर्यदेवांच्या ते लक्षात आलं असावं. ते मला धीर देत म्हणाले. “प्रज्ञाना, हा दोरखंड नागांचा बनलेला असला तरी त्यांना घाबरायचं काही कारण नाही. माझा रथ समोर नेण्याचं काम ते आनंदाने करतात. मागे बघ जरा,” सूर्यदेव मला म्हणाले.
मी मागे वळून बघितलं, बापरे बाप! महाबलदंड आणि भयावह असे राक्षस रथाला ढकलत होते. तेसुध्दा आनंदीच दिसत होते.
ही माझी रथयात्रा रोज आकाशातून सुरु असते. सूर्यदेवांनी सांगितलं.
“मग तुम्ही फिरता फिरता दररोज काय करता?” असं मी काहीतरी बोलून गेलो.
सूर्यदेव हसले. त्यांनी माझा गालगुच्चा घेतला. ते म्हणाले,
“प्रज्ञाना, मी उगाच काही रथयात्रा काढत नाही.”
“मग?” मी आश्चर्य व्यक्त करीत विचारलं.
“माझ्या या वर्षभराच्या रथयात्रेमुळेच पृथ्वीवरील निसर्ग, प्राणी, पशु-पक्षी यांना नवजीवन मिळत असतं.”
“हो कां, ते कसं? ” मी उत्सुकतेनं विचारलं.
“माझ्या या फिरण्याचा कालावधी एक वर्षाचा असतो. याला सौर वर्ष म्हणतात. त्यात १२ पोर्णिमा येतात. त्याला चांद्र महिने म्हणतात. एका वर्षाचे १२ भाग केले की ३० किंवा ३१ दिवसाचेही १२ महिने होतात, त्याला सौर महिने म्हणतात. या प्रत्येक महिन्याचा सूत्रधार म्हण किंवा पाहरेकरी म्हण एक “आदित्य” असतो.”
“आदित्य? ही काय भानगड बुवा.” मी आश्चर्यचकित होऊन सूर्यदेवांना विचारलं.
“हे आदित्य म्हणजेच माझेच रुप आहेत. प्रत्येक महिन्यातल्या आदित्याला वेगवेगळी कामं सोपवली आहेत मी.”
“हो का, मला सांगाल का जरा? ” मी विचारलं.
“सांगतोना, या सौर महिन्यांचं वेगळेपण लक्षात यावं म्हणून त्यांना मधु, माधव, शुक्र, शुची, नभस्य, ईश, उर्जा, साहस, सहस्य, आणि तपस आणि तपस्य ही नावं दिली आहेत मी.”
“सूर्यदेव यांच्याकडे कोणती कामं तुम्ही सोपवली आहेत?” मी विचारलं.
“मधु-माधव हे वसंत ऋतूचं काम करतात. शुक्र-सुची हे ग्रीष्माचे महिने आहेत तर नभस- नभस्य हे वर्षाऋतूचे! प्रत्येक महिन्याच्या आदित्यला पण मी एक स्वतंत्र नाव दिलंय.”
“अरे वा!”
“हो ना, म्हणजे ‘हा आदित्य’ का ‘तो आदित्य’ ही भानगडच नको.”
“स्मार्ट थिंकिंग!”
“काय म्हणालास?”
“कित्ती तुम्ही हुशार!” असं मला म्हणायचं होतं.”
सूर्यदेव त्यांच्या कौतुकाने सुखावले, त्यांनी मग मला, धाता, अर्यमा, मित्र, वरुण, इंद्र, विवस्वान, त्वष्टा, विष्णू, अंशू, भग, पूषण आणि पर्ज्यन्य, अशी आदित्यांची खास नावं असल्याचं सांगितलं. या प्रत्येकाला एकएक काम त्यांनी वाटून दिलं होतं. कुणी पाऊस पाडतो. कुणी पाणी साठवून ठेवतो. कुणी वारा आणतं. कुणी अग्नीचं काम करतं तर कुणी पृथ्वीवरच्या प्राणीमात्राचं रक्षण करतं.
हे सगळे, ‘आदित्य’ बरोबर काम करतात का? कुणी टंगळमंगळ तर करत नाहीना? कुणी आळसावलेला तर नाहीना? हे बघण्यासाठी सूर्यदेव दररोज रथयात्रा काढतात. एखादा ‘आदित्य’ जरासुध्दा कामात कुचराई करत असेल तर त्याचा कान पिळतात. म्हणूनच तर सृष्टीचं चक्र सुरळीतपणे युगानुयुगे सुरु आहे. पृथ्वीवरचं जीवन फुललं आहे. पृथ्वी समृध्द झाली आहे. सूर्यदेवाने आपुलकीने माहिती दिली.
त्यांचा रथ वेगाने पुढे जात होता. अचानक त्यांनी रथाला थांबण्याचा आदेश दिला. रथाच्या समोरील सातही गण आश्चर्यचकित झाले. पण सूर्यदेवांपुढे कुणाची बोलण्याची टाप नव्हती. सूर्यदेवाने मला त्यांच्या हातातील कमळावर ठेवलं नि ते रथातून अंतर्धान पावले. अंतराळाच्या प्रचंड काळोख्या पोकळीत अतिप्रचंड वेगाने ते मागे मागे जाऊ लागले. जणूकाही टाइमशीनच! त्यांनी मला अशा एका ठिकाणी आणलं की समोरचं दृष्य मी बघतच राहिलो. तो होता, अतिविशाल महासागर! सूर्यदेव म्हणाले हा तर दुग्धमहासागर! या ठिकाणी देव आणि दानव गोळा झाले होते. त्यांची त्या महासागरात मोठी घुसळण सुरु होती. एका बाजुने देव तर दुसऱ्या बाजूने बाजूने दानव त्या महासागरास घुसळत होते. ते अभूतपूर्व दृष्य बघून मी अवाक झालो. त्या विशाल महासागरातून एकएक वस्तू बाहेर पडू लागल्या. सूर्यदेव त्याबद्दल मला माहिती देऊ लागले,
“हे बघ प्रज्ञाना, आता बाहेर पडलेय ते विष. फार जहाल! त्यामुळे या सृष्टीचा नायनाट होऊ शकतो. पण महादेवांना या जीवसृष्टीची दया येईल आणि ते विष प्राशन करतील.” सूर्यदेव म्हणाले अगदी तसंच झालं. विष बाहेर पडलं नि सगळीकडे पसरु लागलं, तेव्हा त्या विषाने जीवसृष्टी नष्ट होऊ लागली. काही क्षणात महादेव तिथे अवतरले. त्यांनी ते विष प्राशन केले. त्यामुळे त्यांचा गळा निळा झाला.
“म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात,” सूर्यदेव म्हणाले.
विष पिऊन महादेवांनी सृष्टी वाचवली. मात्र या विषामुळे त्यांच्या अंगांची लाहीलाही होऊ लागली. ते सगळं माझ्यासमोर घडत होतं. महादेवांची अस्वस्थता वाढू लागली. देव आणि दानवांनासुध्दा महादेवाची ती अवस्था बघवेना. महासागराचं घुसळणं सुरुच होतं. अनेक वस्तू बाहेर पडत होत्या आणि मी बघितलं. शितल असा चंद्र त्यातून बाहेर आला. कुणीतरी तो महादेवांना दिला. महादेवांनी त्याला आपल्या जटेवर धारण केला. त्या शितल चंद्रामुळे महादेवाचा दाह कमी झाला. ज्या चंद्रावर मला उतरायचं होतं. त्याचा जन्म बघून मी थक्क आणि दंग झालो. सूर्यदेवांनी चंद्राचा जन्म बघण्यासाठी मला इथे आणलं हे स्पष्टच होतं. त्यांनी माझ्याकडे हसून बघितलं आणि तिथून ते पुन्हा वेगाने मागे फिरले. त्यांच्या हातातील कमळावर मी विराजमान असल्याने मला त्या वेगाचा काहीही त्रास झाला नाही. आम्ही पुढे जात असताना सूर्यदेव एके ठिकाणी पुन्हा थांबले.
माझ्यासमोर होती ती आपली पृथ्वी. आता दिसतेय तशी नव्हती तेव्हा. मी अवाक होऊन बघत होतो. पृथ्वीच्या जवळून अवकाशातील एक धुमकेतू म्हणा किंवा खगोलीय वस्तू अतिशय वेगाने गेली. डोळयांचं पातं लवतं न लवत तोच पृथ्वीचं आणि त्या धुमकेतुचं घर्षण झालं. प्रचंड मोठा स्फोट झाला नि पृथ्वीचा एक तुकडा आकाशात भिरकावला गेला. काही क्षणात तो पृथ्वीभोवती फिरु लागला. मी बघतच राहिलो. अहो, मी ज्या चंद्रावर उतरणार होतोना, तोच हा चंद्र! माझ्यासमोर दुसऱ्यांदा चंद्राचा जन्म झाला होता.
मी तर अवाक होऊन गेलो. दोनदोन चंद्राचा जन्म. मला शब्दच सुचेना. माझी ही अवस्था सूर्यदेवांच्या लक्षात आली असावी.
ते हसले.
“प्रज्ञाना, तू आधी जे बघितलस ती कथा होती.
“आँ!”
“आणि आता जे बघितलं ती सत्यकथा होती.”
“आँ!” सूर्यदेव काय सांगताहेत हे मला कळेना. मी त्यांच्याकडे गोंधळलेल्या नजरेनं बघू लागलो.
“प्रज्ञाना, पृथ्वीवरच्या अनेक संस्कृतींमध्ये अशा अनेक कथा जन्माला आल्या आहेत. त्या युगानुयुगे सांगितल्या जातात. त्याचे अर्थ लावले जातात. पण ज्या मानवाने तुझी निर्मिती केलीय तो फारच हुशार! मघा काय म्हणालास? स्मार्टना, हं स्मार्ट! तो अशा कथा वाचतो नि त्याचा आनंद घेतो, पण सत्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यातूनच त्याने विज्ञानास जन्म घातला. विज्ञानात, कथेला काही स्थान नसतं. तिथे प्रयोग ,निरीक्षण, गणित हेच महत्वाचं ठरतं. त्यातूनच मानवाने चंद्राचा जन्म कसा झाला असावा? याचा शोध घेतला नि जॉर्ज डार्विन या शास्त्रज्ञाने फिशन थिअरी हा सिध्दांत मांडला. तू जे बघितलस ना ते. पृथ्वीशी अंतराळातील वस्तूचं घर्षण होऊन वेगळा झालेला भाग म्हणजे चंद्र!” सूर्यदेव सांगत होते नि मी त्यात गुंतून गेलो होतो. ही सत्यकथा सांगता सांगता ते कधी पुन्हा त्यांच्या रथावर आरुढ झाले, हे मला कळलं नाही. ते रथावर आरुढ होताच सातही गणांनी त्यांचा जयजयकार केला. रथ वेगाने धावू लागला. त्यांचा रथ चंद्रयानाजवळ येताच त्यांनी अलगद मला विक्रांतमध्ये सोडलं.
चाळीस दिवसात हे सारं मी बघितलं.
पुढचं तुम्हाला सारं काही ठाऊकच आहे. चंद्रावर उतरल्यावर वेगवेगळ्या कथांपेक्षा तो प्रत्यक्ष कसा आहे, हे बघून सत्याचा शोध घेण्याचं काम मी केलं पुढचे १३ दिवस!
सुरेश वांदिले
७वा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप, सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७
भ्रमणध्वनी-९३२४९७३९४७
००००००००००००००००००००००००००००००००००००००००