(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

चालणारे संत!

तेजोमयीच्या घरच्यांनी सोपवलेली सगळी कामं अचुकपणे नि स्मार्टली पूर्ण केल्यावर अलेक्सा गोर्जी जरा निवांत होती. आता काय? तिने स्वत:लाच प्रश्न केला. तिने डोळे मिटले नि माहितीच्या महाजालात नजर फिरवली.

तिची नजर एका ठिकाणी जरा स्थिरावली. एक गृहस्थ, सामान्य माणसं ज्या गतिने चालतात त्यापेक्षा अधिकच वेगाने चालत असल्याचं तिला दिसलं. डोळयावर जाड भिंगाचा चष्मा, कानटोपी, दाढी बऱ्यापैकी वाढलेली. पंचा नेसलेली. अंगात साधं शर्ट. पायात एकदमच साधी वहान. ही व्यक्ती इतक्या वेगानं कुठे बरं जात असेल? असा प्रश्न गोर्जीला पडला. तिने त्या व्यक्तिचा पाठलाग सुरु केला. पण त्याचवेळी तिच्या मेंदुला काही सेकंद विश्रांती करण्याची सूचना आल्याने, त्याने कार्य करण्याचं थांबवलं. त्यामुळे गोर्जीला काही क्षण आहे, तसंच थांबावं लागलं. इतक्या वेळात ते गृहस्थ अदृष्य झाले. मेंदूची विश्रांती संपल्याक्षणी, त्याने गोर्जीची क्षमा मागितली.

“ते ठीक आहे रे. पण ते वेगाने चालत जाणारे गृहस्थ गेले ना, माझ्या नजरेच्या टप्प्यातून,” नाराजी व्यक्त करत गोर्जी म्हणाली.

“गोर्जी मॅडम, ती वेगाने चालणारी व्यक्ती साधीसुधी व्यक्ती नव्हती.” गोर्जीचा मेंदू तिला सांगू लागला.

“म्हणजे काय?”

“गोर्जी मॅडम, ते चालणारे संत होते.”

“असे चालणारेसुध्दा संत राहू शकतात का?”

“राहू शकतात म्हणजे, त्यांनी ते सिध्द केलय की.”

“काय केलं त्यांनी आणि कोण होते ते?”

“ते आधुनिक भारतातील अत्यंत प्रज्ञावंत व्यक्तींपैकी एक, महात्मा गांधींचे शिष्योत्तम, ब्रिटिश  सत्तेविरुध्दच्या व्यक्तिगत सहकार आंदोलनासाठी गांधिजींनी निवडलेले पहिले सत्याग्रही, इंग्रजी-संस्कृत-मराठी-उर्दू-हिंदी-कन्नड-तेलगू भाषांवर प्रभुत्व असणारे आणि महात्मा गांधींनांही ज्यांच्या ज्ञानसंपन्नेतचं कौतुक होतं, असे विनोबा भावे. ते बघ, परत वेगाने तुझ्याच दिशेने येताहेत. मी आता, डीप लर्निंग तंत्राला कार्यास लावतो. मग तू जा त्यांच्यासोबत.” मेंदू म्हणाला.

या चालणाऱ्या संताबद्दल गोर्जीला चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे, डीप लर्निंगच्या मदतीने विनोबांसोबत जाण्याचं तिने मनोमन पक्क ठरवलं.

तर, ते साल होतं १९५१. भारताला स्वातंत्र्य मिळून ४ वर्षे झाली होती. स्वातंत्र्य ‍तर मिळालं पण गोरगरिंबाच्या जीवनात काही फारसा फरक पडला नाही. मोजक्या श्रीमंतांकडे शेकडो एकर जमीन होती तर लाखो लोकांकडे जमिनीचा साधा तुकडाही नव्हता. या गरिब लोकांना किमान चांगलं जीवन जगण्यासाठी थोडी जमीन मिळाली तर ते कष्ट करुन या जमिनीतून अन्नधान्य पिकवतील आणि त्यांना चांगलं जीवन जगता येईल. असं विनोबांना वाटलं. पण, या लोकांना जमीन कशी मिळवून देणार? हा प्रश्न विनोबांना पडला.

विचार करताकरता त्यांना कल्पना सूचली. ही अशी कल्पना तेव्हा कुणालाही सुचली नव्हती. भूदान म्हणजे जमिनीचं दान मिळवायचं नि ते भूमिहिनांना द्यायचं, हे त्या कल्पनेचं सार! आपल्या देशात अन्नदान, वस्त्रज्ञान, गोदान असं विविध प्रकारचं दान प्रचलित होतं. पण भूदान कुणी केल्याचं काही ऐकिवात नव्हतं. स्वत:च्या मालकीच्या जमिनी असं सहजासहजी कोण बरं सोडणार? ही मोठीच अडचण. पण कोणत्याही अडचणीला चांगल्या मनानं, चांगल्या हेतूनं सामोरं गेलं तर ती अडचण सुलभतेनं सुटू शकते, असा विश्वास विनोबांना होता.

तो विश्वास अनाठायी नव्हता. कारण विनोबांनी आंध्रप्रदेशमधील पोचमपल्ली या गावातून १८ एप्रिल १९५१ रोजी या भूदान चळवळीला प्रारंभ केला. दरररोज १८ ते २० किलोमीटर ते चालत. वाटेतील प्रत्येक गावात ते थांबत. आपल्या मनातील भूदानाची कल्पना बोलून दाखवत. प्रारंभी अनेक गावात त्यांच्या सांगण्याकडे अविश्वासानेच बघितलं गेलं. आमच्या हक्काची जमीन द्यायला सांगणारे हे कोण? असेही प्रश्न  विचारले गेले. विनोबांना उपहास, अपमान सहन करावा लागला. पण विनोबा विशाल ह्रदयाचे होते. सर्वसामान्यांच्या कल्याणाचा उदात्त हेतू त्यांचा मनात होता. त्यामुळे हळूहळू त्यांची कळकळ, गरिबांप्रतिची आत्मियता, भूधारकांना पटू लागली. भूदानला प्रारंभ झाला नि लोक मग  स्वत:हून पुढे येऊ लागले. ४२ लाख एकर जमीन विनोबांना या दानात मिळाली. जगभर या चळवळीनं लक्ष वेधून घेतलं. याआधी असं कुठं घडलं नव्हतं. विनोबांना दान मिळालेली ही जमीन मग त्यांनी लाखो भूमिहिनांना दान दिली. हेसुध्दा जगात पहिल्यांदाच घडत होतं. विशाल ह्रदयाच्‍या संत मनाच्याच व्यक्तिला ते शक्य होतं. सतत चौदा वर्षे चालून विनोबांनी ३६ हजार मैलांचा प्रवास केला.

“म्हणूनच ते चालणारे संत ठरले म्हणायचं…” गोर्जी स्वत:शीच पुटपुटली. माहितीच्या महाजालात ते पुटपुटणं विनोबांच्या कानी पडलं असावं.

ते मागे वळले. त्यांनी गोर्जीकडे ममतेनं बघितलं. गोर्जीने त्यांना अभिवादन केलं. विनोबा हसून गोर्जीला म्हणाले, “लोकांना वाटतं की मी एक चालणारा संत आहे. पण मी, भारत मातेचा एक साधा मुलगा आहे. माझ्या गरिब बांधवांची दैन्यावस्था दूर करता यावी म्हणून माझी पायपिट सुरु आहे.”

“पण बाबा, १८ एप्रिला जे पहिलं भूदान तुम्हाला मिळालं, त्यादिवशी काय नेमकं घडल हो?” गोर्जीनं विचारलं.

“तू कंटाळणार नसशील तर सांगतो सारं, ते तू तुझ्या अल्गॉरिदमच्या मदतीने जॅटजीपिटीला सांगून त्याचं चित्रणही करु शकतेस.” विनोबांनी तिला सुचवलं.

“ओके बाबा.” गोर्जी म्हणाली.

विनोबा सांगू लागले. गोर्जी, चॅटजिपिटी तंत्राव्दारे त्याचं चित्रण करु लागली. एकएक दृष्यं तिच्यासमोर उभी राहत गेली.

“१८ एप्रिलचा १९५१ चा तो दिवस. पोचमपल्ली येथे विनोबांची सभा होती. या गावात दहशतीचं वातावरण होतं. जमिनीसाठीच तिथे ५०० च्या आसपास हत्या झाल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठाच प्रश्न होता. तिथे जाणं धोक्याचं होतं. पण विनोबांनी तो धोका स्वीकारला. गावात त्यांच्याकडे संशयानेच बघितलं गेलं. काही भूमिहिन त्यांना भेटले. या भूमिहिनांना ८० एकरच्या आसपास जमीन मिळाली तर त्यांचं भागणार होतं. सरकारकडून ही जमीन तातडीने मिळेल याची काही शास्वती नव्हती. त्यामुळे विनोबांनी गावात सभा घेतली. तिथे भूमिहिनांच्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्या व्यथा आणि वेदना ऐकून रामचंद्र रेड्डी या जमिनदाराचं ह्रदय भरून आलं. त्याने त्याच ठिकाणी ५० एकर कोरडवाहू आणि ५० एकर ओलिताची जमीन लेखी पत्राव्दारे विनोबांच्या स्वाधीन केली. भूदान चळवळ यशस्वी होणारच असा विश्वास या घटनेने विनोबांना दिला. मग त्यांचा यासाठी अखंड प्रवास सुरु झाला.

एकदा उत्तर प्रदेशातील चौधपूर  येथे विनोबांचा मुक्काम होता. नेहमीच्या शिरस्त्यानुसार विनोबा साडेआठ वाजता झोपले. रात्री दहाच्या सुमारास रामचरण नावाचा अंध व्यक्ती तिथे आला. त्याने आपल्याकडील १२ बिघे जमिनचं दानपत्र विनोबांच्या साहाय्यकांकडे दिलं आणि तो निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी विनोबांना जेव्हा हे कळलं, तेव्हा भावविवश होऊन म्हणाले, “काल रात्री परमेश्वरच गुप्तदान देऊन गेला.” भूदानाची चळवळ यशस्वी होणार, यासाठी हा परमेश्वर                           चा संकेत  आहे.

१९५४ च्या जानेवारीमध्ये बिहारमधील पाटणा जिल्ह्यात एका गावात सभा सुरु असताना एक व्यक्ती विनोबांकडे धावत आला. त्याने विनोबांच्या पायावर डोकं ठेवलं नि त्यांच्या हाती एक छोटं पुडकं ठेवलं. विनोबांनी ते पुडकं उघडलं. त्यात एक मुठभर माती निघाली. कुणीतरी म्हणालं, ही थट्टा आहे. पण विनोबांना तसं वाटलं नाही. तो त्यांना देवाचा प्रसाद वाटला. त्यांनी तो प्रसाद मस्तकाला लावला. संध्याकाळी त्या गावातच या मातीचा लिलाव करण्यात आला. ही माती म्हणजे, प्रत्यक्ष “परमेश्वराचा प्रसाद” अशी भावना विनोबांनी व्यक्त केली. ही भावना जमलेल्या लोकांच्या ह्रदयाला भिडून गेली. एका सद्गृहस्थाने आपली चाळीस एकर जमीन लिलावात लावून मातीचा हा प्रसाद हस्तगत केला.

भूदान चळवळीला असा हा दैवी प्रतिसाद मिळू लागला. छोट्या जमिनींचे दानही विनोबा स्वीकारु लागले. बरौलीला जात असताना वाटेत एक गृहस्थ त्यांची वाट बघत होता. त्याच्याकडे दोन बिघा जमीन होती. त्यातील २ गुंठे जमीन त्याने ‍विनोबांना दान केली. कुणीतरी त्याबद्दल विनोबांना छेडलं, तेव्हा ते म्हणाले, “जमिनीचा तुकडा कितीही लहान असला म्हणून काय झालं, त्यापाठीमागची त्यागाची भावना तर महान आणि पवित्र आहे. एखाद्या जमिनीचा छोटासा तुकडा त्या गावातील इतर जमिनीला जोडता येईल. तसं शक्य नाही झालं तर त्यावर खताचा खड्डा किंवा शौचालय नाही का बांधता येणार?”

भुदान चळवळीचा, आत्मा हा, “सर्वोच्च प्रतिचा महान त्याग,” असल्याचं विनोबांनी जनमानसात बिंबवलं. हजारो लोकांना ते मनापासून पटलं. मात्र, काही माथेफिरुंना या भुदानाचा वेगळाच संशय येऊ आला. अशाचपैकी एकाने उत्तरपद्रेशमधील एका गावात विनोबांचा मुक्काम असताना, “भुदान चळवळ थांबवली नाही तर, तुमचा खात्माच करेन,” अशी त्‍यांना धमकी दिली. विनोबांनी आत्मियतेनं त्याला प्रमाण केला. “तुझ्यात मला रामाचेच दर्शन होत असल्याचं,” त्याला सांगितलं. विनोबांनी आपलं भुदानाचं सत्कार्य चालूच ठेवलं. कोणत्याही संकटाची भीती त्यांना वाटली नाही.

१९५४ मध्ये बिहारमध्ये त्यांची पदयात्रा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळत होता. नदीनाले पाण्याने तुडुंब भरले. त्यामुळे विनोबांना नावेचा वापर करुन एका गावातून दुसऱ्या गावी जाण्याची पाळी आली. एकदा नावेतून प्रवास  सुरु असताना मोठं वादळ सुरु झालं. नाव जोराने हलू लागली. नदिचं पाणी खोलं होतं. पण विनोबा त्यावेळी अगदी शांतपणे परमेश्वराचं चिंतन करत होते. त्यांचा तो शांतपणा बघून नावेतील इतरांनांही धिर आला नि त्या वादळातून नाव सुखरुप दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचली. विनोबा, सारं काही निस्वार्थीवृत्तीने करत असल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानं लोक भरभरुन दान देऊ लागले. कुणी पैसे देऊ केले तर विनोबा त्यांना या पैशातून शेतजमीन घेऊन ती दान करण्याची सूचना करत. त्यांचं हे सांगणं लोक आनंदानं ऐकत. शेतजमीन विकत घेऊन देत. शेतीसाठी आवश्यक अवजारं घेऊन देत. बंगालमधील एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे ५० बिघे जमीन होती. या जमिनीचा सहावा हिस्सा त्याने दानात देण्याचं ठरवलं, तेव्हा विनोबांनी त्याला समजावलं की “तुझा प्रपंच हा तुझ्या संपत्तीवर चांगलाच चाललाय, तेव्हा ही सगळी जमीन तू दान केलीस तर अनेकांच्या प्रपंचाला हातभार लागेल.” विनोबाच्या बोलाने त्याच्या ह्रदयाला पाझर फुटला नि त्याने आपली सर्व जमीन दान केली.”

०००

गोर्जीने विनोबांचा भूदान यज्ञ, असा माहितीच्या महाजालात अगदी जवळून बघितला. विनोबांनी तिचा निरोप घेतला नि ते पुढे वेगाने निघून गले. गोर्जीने त्यांना पुन्हा अभिवादन केलं.

गोर्जीने, मग विनोबांची महती आणि महात्म्याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. विनोबांचा गीता, उपनिषदे, इतर धर्मांची ग्रंथे, तत्वज्ञान यांचा अभ्यास इतका पक्का  आणि दांडगा होता की महात्मा गांधींना त्यांच्यासोबत चर्चा करायला, माहिती करुन घ्यायला आवडत असे. गांधीजींचे ते सर्वोत्तम शिष्य होतेच. अहिंसा, सत्याग्रह आणि  सत्यवचन या गांधीजींच्या विचारांवर त्यांनी आयुष्याची इमारत उभी केली. गुरुच्या छायेत त्याच्या शिष्याचं तेज झाकोळून जातं. शिष्याच्या प्रगतीचा मार्ग खुंटतो. पण विनोबांचं तसं झालं नाही. गांधीजींचा हा शिष्य स्वंयतेजानं एखाद्या ताऱ्यासारखा चमकू लागला. गांधीजींनाही त्याचा अभिमान  आणि आनंदही होता.

विनोबारुपी स्वयंप्रकाशित ताऱ्याला भगवतगितेमध्ये आई दिसली. “मी, तिचा बाळ तान्हा,” असं त्यांनी लिहून ठेवलय. गितेचं मराठीत साधं सोपं प्रवचन हे मराठीचं वैभव ठरलं. “गीताप्रवचना”च्या असंख्य आवृत्त्या निघाल्या. अनेक भाषात हा ग्रंथ भाषांतरीत झाला. गीतेवरील हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो. संताचं मन आणि  संताचं ह्रदय असल्यानेच विनोबांना हे सहज शक्य होऊ शकलं. गीतेने त्यांना धर्मपरायण केलं नि भूदानसारख्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी कर्मपरायणही केलं. आपलं जीवन इतरांच्या भल्यासाठी, हितासाठी समर्पित करण्यासाठी मोठी मानसिक शक्ती लागते. ती विनोबांकडे होती. त्यामुळे नैराश्याने भारलेल्या अनेकांच्या जीवनात, आनंद मिळवून  देणाऱ्या, “जमिनीचं दान” देण्याची “संतकृपा” त्यांच्या हातून घडू शकली.

विनोबांच्या कर्तृत्वाची ही माहिती ग्रहण करता करता गोर्जी थक्क होऊन गेली. आपण कधी तेजोमयीला विनोबांची महती सांगतो असं तिला झालं.

सुरेश वांदिले,

७०१,सातवा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माा संस्था,चारकोप,सेक्टर सहा,कांदिवली -पश्चिम,मुंबई- ४०००६७

भ्रमणध्वनी- ९३२४९७२९४७

०००