
“स्टार्टअपच्या”साहाय्यासाठी
द ग्लोबल आंत्रप्रिन्युरशीप मॉनिटर या कंपनीच्या पाहणीनुसार पुढील तीन ते चार वर्षात भारतात 18 ते 60 या वयोगटातील किमान 20 टक्के व्यक्ती स्टार्टअप उद्योजक बनू शकतात. हे नवे आशावादी चित्र भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करणारं आहे. त्यामुळे भारत झपाट्याने विकसित राष्ट्रांच्या पंगतीत जाऊ शकतो. ही बाब लक्षात घेता उद्योजकीय नव प्रेरणांना प्रोत्साहित आणि प्रेरित केल जात आहे.
तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा
मायक्रोप्रोसेसर आणि इंटिग्रेटेड चिप्सच्या अनुषंगाने विकसित झालेलं आणि झपाट्यानं पुढचा टप्पा गाठत असलेलं तंत्रज्ञान यामुळे असंख्य नव्या स्टार्टअप संधी उपलब्ध होत आहेत. भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगानं या क्षेत्रात लक्षणीय झेप घेतलीय. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळू लागले आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग (आयटी इंडस्ट्री) हा जगातील सर्वात मोठा आऊटसोर्सिंग सेवा देणारा उद्योग ठरला असून सध्या या उद्योगात अंदाजे 10 कोटींच्या आसपास तंत्रज्ञानांना नोकरी मिळाल्या आहेत.
पुढील काळ इंडस्ट्री फोरचा असून संगणकीय तंत्रज्ञानातील पुढची प्रगती ही इंडस्ट्री फोरसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरत आहे. यामध्ये (१) आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, (२) मशिन लर्निंग, (३) डीप लर्निंग, (४) व्हर्च्युएल रिॲलिटी, (५) ऑगमेंटेड रिॲलिटी, (६) नॅचरल लँग्वेज प्रोसेस, (७) स्मार्ट सेन्सर्स, (८) रोबोट, ऑटोमेशन, (९) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (१०) क्लॉउड कॉम्प्युटिंग, (११) लोकेशन डिटेक्शन टेक्नॉलॉजी, (१२) ह्युमन मशिन इंटरफेस, (१२) थ्रीडी प्रिंटिंग, (१३) बिग डाटा ॲनालिटिक्स, (१४) मोबाईल डिव्हायसेस अशासारख्या बाबींचा समावेश होतो. इंडस्ट्री फोर किंवा औद्योगिक क्रांती चारच्य या टप्प्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योजक नवसंकल्पनाकार आणि तंत्रज्ञ फार मोठी भूमिका बजावू शकतात.
भारत सरकारने पुढील पाच वर्षात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था विकसित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी अधिकाधिक रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. अशा संधींमधून अधिकाधिक संपत्तीची निर्मिती होऊ शकते. ही संपत्ती भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरमध्ये विकसित करु शकते.
यासाठी प्रामुख्याने स्टार्टअप कंपन्यांचा मोठा हातभार लागू शकतो. दरवर्षी साधारणत: 10 कोटी नोकरीच्या वा रोजगाराच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. हे सातत्य किमान पुढील पाच वर्षे टिकले पाहिजे. यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या उद्योगांचा किंवा त्यापेक्षाही अधिक स्टार्टअप उद्योजकांचा अधिक उपयोग होऊ शकतो. हे स्टार्टअप उद्योग भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन ठरु शकतात.
स्टार्टअप कंपन्यांचा उदय
भारतात स्टार्टअप कंपन्यांचा उदय वेगाने होत आहे. तंत्राधारित या स्टार्टअप कंपन्यांनी भारताला जगातील स्टार्टअप कंपन्यांच्या बाबत तिसरा क्रमांक मिळवून दिला आहे. आपल्यापुढे अमेरिका आणि ब्रिटन हे दोन देश आहेत.
भारत सरकारने स्टार्ट अप इंडिया उपक्रमास प्राधान्य दिलं आहे.स्टार्ट अप सस्कृतीच्या माध्यमातून उद्योजकता आणि नाविन्यता(इनोव्हेशन)ला प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी https://www.startupindia.gov.in/ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे.या पोर्टलच्या माध्यमातून आतापावेतो १ लाख ३६ हजारापेक्षा अधिक स्टार्टअपची दखल घेण्यात आली आहे. या वेबपोर्टलच्या वापरकर्त्यांची संख्या साडेसात लाखांपेक्षा अधिक आहे.
या वेबपोर्टलवर स्टार्टअपसाठी उपयुक्त ठरु शकतील अशी पुढील योजनांची विस्तृत माहिती आहे. विशेषत: अर्थसाहाय्या संदर्भातील माहितीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. (१) स्टार्टअप इंडिया सीड फंड स्किम, (२) स्टार्टअप इंडिया इन्व्हेस्टर कनेक्ट, (३) स्टार्टअप इंडिया क्रेडिट गॅरंटी स्किम, (४) स्टार्टअपच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणे
सध्या आपला देश औद्योगिक क्रांती टप्पा तीन मधून टप्पा चारमध्ये प्रवेशासाठी सज्ज होत आहे. हा टप्पा तरुण तरुणींमध्ये उद्योजकीय प्रेरणा निर्माण व्हाव्यात यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. भारतीय शैक्षणिक पर्यावरणात उद्योजकीय प्रेरणांच्या निर्मितीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नावीन्यता आणि उद्योजकता यांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका टप्प्याटप्प्याने तयार करणे गरजेचं आहे. उद्योजकतेचं स्वप्न बघणे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कल्पनांचा विस्तार आणि विकास करणं, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, अंमलबजावणीसाठी नवे प्रयोग करण्याची तयारी ठेवणं, अशा सारख्या बाबींवरही स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून लक्ष पुरवलं जात आहे.
०००