(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अटल इनोव्हेशन मिशन

देशातीत तरुणांना  स्टार्टअप्सच्या अंतर्गत नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योगाची स्थापना करण्याची प्रेरणा मिळावी, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करता यावं या अनुषंगानं भारत सरकारच्या निती आयोगामार्फत, “अटल इनोव्हेशन मिशन” राबविण्यात येत आहे.

शाळा, महाविद्यालये विद्यापीठे, संशोधन संस्था आणि खाजगी वा सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना आणि समस्यांच्या निराकरणासाठीची मनोभूमिका तयार करण्यासाठी या मिशनमार्फत प्रयत्न केले जातात. हे सगळे उपक्रम सातत्याने तपासले जातात व त्यांचे निरीक्षण आणि संनियंत्रण केलं जातं. या उपक्रमात सुधारणा घडून याव्यात यासाठी तिसऱ्या पक्षाकडूनही याची तपासणी करण्यात येते.

अटल टिंकरिंग लॅब- शाळा पातळीवर, अटल टिंकरिंग लॅबची सुरुवात करण्यात आली आहे. ‍वर्ग ६ ते वर्ग १२ वीच्या विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण सर्जनशीलतेला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, आणि साधनं उपलब्ध करुन दिले जातात. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्रीडी पेंटिंग्ज, रोबोटिक्स, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, आणि “तुम्ही करुन बघा” प्रकारातील साहित्य दिलं जातं. आतापावेतो दहा हजार अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली.

अटल इनक्युबेशन सेंटर– या योजनेमार्फत देशभरात उद्योजकता आणि स्टार्टअप्सच्या पर्यावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले जातात. ही केंद्रं विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेटमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. नवसंकल्पनाकार तरुणाईला, त्यांच्या संकल्‍पनांना उद्योगात रुपांतरित करता येणं शक्य व्हावं म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान या केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलं जातं. शिवाय संसाधानाच्या स्वरुपातलं साहाय्य, प्रेरक किंवा मेंटॉरची सुविधा, निधीची उपलब्धता, संपर्क साखळी, भागिदारी, प्रयोगशाळा सुविधा, सह-जागे(को स्पेस)ची उपलब्धता, या सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातात. सध्या देशात ७२ ठिकाणी अशी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. अशा केंद्रांमधून ३५०० पेक्षा अधिक स्टार्टअप्सना उत्तेजन देण्यात आलय. या स्‍टार्टअप्समुळे ३२ हजार पेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. यामध्ये महिलांच्या १००० पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा समावेश आहे. आरोग्य सुविधा, फिनेटेक , एज्युकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस आणि ड्रोन तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, पर्यटन, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील केंद्रे

(१) बारामती येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्यानं, एआयसी- एडीटी बारामती फाउंडेशन, या नावानं अटल इनक्युबेशन सेंटर (एआयसी) ची स्थापना करण्यात आली. यामार्फत कृषी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान सामाजिक नवसंकल्पना, आरोग्यसुविधा, औषध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, निर्मिती आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहित केलं जातं.

सपंर्क संकेतस्थळ- https://aic.mituniversity.edu.in/मेल- enquiry.aic@mituniversity.edu.in

(२) एआयसी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी फाउंडेशन- या केंद्रात आरोगयसुविधा, कृषी तंत्रज्ञान, ऑटो उद्योगासाठीचे तंत्रज्ञान यामध्ये ऑगमेंटेट रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग यांच्या उपयोगाच्या अनुषंगाने स्टार्टअप्सना प्रोत्साहित केलं जातं. संपर्क https://www.aicbamu.org.in/

ईमेल-ceo.aic@bamu.ac.in

(३) एआयसी -एमआयटी एडिटी-

एमआयटी युनिव्हर्सिटीमधील या केंद्रात उद्योजकीय पर्यावरण निर्मितीला प्रोत्साहन दिलं जातं. संभाव्य नवसंकल्पनाकारक स्टार्टअप्सचा शोध घेऊन त्यांना साहाय्य केलं जातं. नव्या पिढीतील उद्योजकांमध्ये IDEA (इनोव्हेशन/नाविन्यता, डिझाइन थिंकिंग/ अभिकल्पाचा विचार, आंत्रप्रिन्युरशीप/उद्योजकता आणि आर्ट्स/कला) संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कृषी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक नाविन्यता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जातं.

संपर्क-https://aic.mituniversity.edu.in/

ईमेल- enquiry.aic@mituniversity.edu.in

अटल न्यू इंडिया चॅलेंज- ही नीती आयोगाची महत्वाची योजना आहे. राष्ट्रीय महत्वाच्या आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी तंत्रज्ञान आधारित नवसंकल्पांना पाठिंबा देणं, निवड करणं, साहाय्य करणं यासाठी  या योजनेंर्तगत मदत केली जाते. या क्षेत्रातील निवड झालेल्या नवसंकल्‍पनायुक्त स्टार्टअप्सचे वाणिज्यिक (कमर्शिअल) रुपांतर होण्याच्या पातळीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जातं. हा कालावधी १२ ते १८ महिन्यांचा असतो. या कालावधीत १ कोटी रुपयांपर्यंतच्या अर्थसाहाय्याचा समावेश आहे. आतापावेतो १३५ च्यावर अशा स्टार्टअप्सना साहाय्य करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत यशप्राप्तीसाठी, “मेंटॉर इंडिया-मेंटॉर्स ऑफ चेंज”, ही सर्वात मोठा व्यवस्थापकीय योजना कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत आतापावेता ६२०० पेक्षा अधिक मेंटॉरची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी खाजगी, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अशासकीय संस्था यांचं सहकार्य घेण्यात आलं आहे.

संपर्क-https://aim.gov.in/aic.php

सुरेश वांदिले