
आळस
एका झाडावर कबुतरताई आणि खारुताई आनंदानं राहत. दोघांची चांगली मैत्री होती. एकदा दोघिंनाही बाळ झालं. दोघिंना फार आनंद झाला. दोघीही एकमेकांच्या बाळांना सांभाळायच्या.
खारुताई बाहेर गेली की, कबूतरताई तिच्या बाळाकडे लक्ष द्यायची. कबूतरताई बाहेर गेली खारुताई तिच्या बाळाकडे लक्ष द्याची. बाहेरुन आणलेला खाऊ एकमेकांच्या बाळांना दोघेही देत.
असं, छान आनंदात दिवस जात होते. दोन्ही बाळं, हळूहळू मोठी होऊ लागली. त्यांचं ते मोठं होणं, खारुताई आणि कबुतरताई, डोळा भरुन बघत असत.
दोन्ही बाळ सतत, एकत्र रहात असल्यानं ते एकमेकांचे मित्र झाले. दोघेही एकत्र खेळत. दंगामस्ती करत. खारुताईचं बाळ आणखी मोठं झालं नि ते अधिक उत्साही झालं. या फांदीवरुन त्या फांदीवर नि त्या फांदीवरुन थेट जमिनीवर. जमिनीवरुन आणखी दुसऱ्याच झाडावर. असं या बाळाचं पळणं, लपणं, सगळीकडे उत्सुकतेनं बघणं, सुरु असायचं. मात्र, इतका उत्साह कबुतरताईच्या बाळाकडे नव्हता. तो थोडाफार उडायचा नि परत येऊन झाडाच्या फांदिवर बसायचा. ज्या झाडावर ते राहत, त्या झाडाच्या सगळया फांद्यासुध्दा, बघणं त्याला आवडायचं नाही.
मात्र, खारुताईच्या बाळाला, त्या झाडाची प्रत्येक फांदी न फांदी माहीत झाली होती. फळं कुठे येतात? फुलं कुठे येतात? किटक कुठे राहतात? मधमाशाचं पोळं कुठे आहे? चिऊताईचं घर कुठे आहे? हे सारं काही या बाळास कळलं होतं. त्यामुळे मध खावं वाटलं की पोळाजवळ जाऊन मधमाशीसोबत तो लाडीगोडी करायचा नि मधाची मेजवाणी मिळवायचा. काही चटकदार खाव वाटलं की किटकांच्या घराकडे बरोबर जायचा. फळाची इच्छा झाली की तिकडे बरोबर पळायचा.
कबुतरताईचं बाळं मात्र, मठ्ठपणे एकाच जागी बसून राहायचं. हळूहळू तो आळशी झाला. कसातरी आपल्या खाण्यापिण्याची सोय करायचा. नंतर झाडाच्या फांदीवर झोप काढायचा. खारुताईच्या बाळाने, त्याला सुरुवातीला आपल्यासोबत येण्यास, खुपदा सांगितलं. पण, आळसालाच आनंद मानणारं, कबुतराचं बाळ खारुताईच्या बाळासोबत जाण्याचं टाळायचा. त्यामुळे हळूहळू खारुताईचं बाळ, एकटचं सगळीकडे जाऊ लागलं.
सुरुवातीला, खारुताई, कबुतराच्या बाळासही, खाऊ आणायची. त्यामुळे, आपणास आयतच मिळतना, चटकदार आणि चमकदार खायला, मग कशाला इकडे जा-तिकडे पळ, अशा उचापती करायच्या? असं स्वत:ला सांगत, कबुतराचं बाळ डोळे मिटून झोपेच्या स्वाधीन व्हायचा.
“असा आळस बरा नव्हे”, त्याच्या आईनं त्याला समजावलं. खारुमावशीनं समजावलं. पण हा, मात्र ढिम्म. एकाच जागी बसूनबसून, हळूहळू त्याच वजन वाढलं. उडण्यासाठीही कष्ट होऊ लागले.
एकदा त्या झाडावर चढणारा एक साप] सर्वत्र संचार असणाऱ्या खारुताताईच्या बाळानं बघितलं. लगेच तिने आईला, कबुतरमावशीला आणि आपल्या मित्राला सावध केलं. दुसऱ्या झाडावर लगेच जाऊन बसं, असं सांगितलं. खारुताई, कबुतरमावशी आणि खारुताईचं बाळ लगेच दुसऱ्या झाडावर गेले.
कबुतरमावशी, आपल्या बाळास ओरडून सांगू लागली, “अरे, आतातरी आळस सोडून, इकडे ये. नाहीतर सर्पोबा, तुला गिळून टाकेल.”
पण आळासवलेल्या, याबाळास झोपेचा आंनद काही सोडायचा नव्हता. “सापबिप काही येणार नाही इथं. खारुमावशीचं बाळ, उगाचच भीती दाखवतं”. असं, उलट तो आईला म्हणाला आणि डोळे मिटून झोपी गेला.
व्हायचं तेच झालं. आळसाने त्याचा घात केला. झोपी गेलेलं हे कबूतराचं बाळ बघून, आयतीच मेजवाणी मिळाली म्हणून साप आनंदला. त्याने कबुतरबाळास, घशात टाकले.
आई, खारुमावशी आणि तिच्या बाळाच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.
सुरेश वांदिले