(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शहाणी बेडकं!

 एकदा तलावातील जलदेवता बेडकांवर प्रसन्न झाली. त्यांच्यासमोर प्रगट होऊन गप्पाटप्पा करु लागली. या गप्पाटप्पा बऱ्याच वेळा चालल्या.काही वेळाने जलदेवतेला या गप्पांचा कंटाळा आल्याने ती पुन्हा तलावाच्या तळाशी निघून गेली.

आपण इतका वेळ बेडकांसोबत असूनही त्यांनी आपणास एकही वरदान मागितलं नाही याचं जलदेवेतला आश्चर्य वाटलं.काही दिवसांनी जलदेवता पुन्हा प्रगटली.यावेळी ती लहान बेडकांसोबत यथेच्छ खेळली.लहान बेडकांना फार फार आनंद झाला.मोठ्या बेडकांनी येऊन तिचे आभार मानले.संध्याकाळ झाल्यावर जलदेवता पुन्हा पाण्याच्या तळाशी निघून गेली.यावेळी सुध्दा बेडकांनी एकही वरदान मागितलं नाही.याचं जलदेवतेला पुन्हा आश्चर्य वाटलं.

काही दिवसांनी जलदेवता पुन्हा प्रगटली.ती दिवसभर बेडकांसोबत होती. मोठ्यांशी गप्पा केल्या.लहानांना गोष्टी सांगितल्या.तिची जायची वेळ आली.

तेव्हा यावेळी तिने स्वत:हून एका बेडकास विचारलं,मी तुमच्यावर प्रसन्न आहे.तुमच्याकडे तिनदा आले पण तुम्ही एकही वरदान माझ्याकडे कां मागत नाही?

आम्ही काय वरदान मागायचं,जलदेवते? त्याने विचारलं.

आम्हाला कोणत्याही वराची आवशक्यताच नाही.एक ज्येष्ठ बेडूक म्हणाला.

असं कसं?सगळयानांच काहीना काही हवं असतं.त्यासाठी ते देवाची कठोर आराधना करतात.मग देव प्रसन्न होतो.त्यांची इच्छा विचारतो.मग तसा वर देतो.हे काहीही न करता मी तुमच्यावर प्रसन्न झाले तरी तुम्ही काहीही वर मागत नाही!जलदेवतेने आश्चर्यानं विचारलं.

जलदेवते,आमच्या पूर्वजाने एकदा बेडकांना राजा हवा असा वरदान मागितलं.देवाने आम्हाला बगळयाच्या रुपातला राजा दिला.आम्हाला फार आनंद झाला.पण नंतर आमचा हा राजा,आम्हालास खाऊ लागला.कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणतात, तसं झालं!

अरेरे!मग काय झालं?जलदेवता म्हणाली.

आमची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागली.त्यामुळे मग आमच्यातील हुषार बेडकांनी एके दिवशी बगळा झोपला असताना,त्याच्यावर हल्ला करुन त्याची चोच तोडली.ही वेदना त्यास सहन झाली नाही आणि तो इथून उडून गेला.दुसऱ्या बेडकाने सांगितलं.

तेव्हापासून आम्ही ठरवलं,देवतांना वरच मागायचा नाही.तिसरा बेडूक म्हणाला.

शिवाय आम्ही आहोत तसेच छान आहोत,समाधानी आहोत.ज्यांना आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक काही हवं असतं, तेव्हाच ते देवाची आराधना करतात ‍नि मग देव प्रसन्न झाला की काहीबाही वर मागतात.चौथा म्हणाला.

मग या, वराचा उपयोग चांगल्यासाठी कमी आणि वाईटासाठीच अधिक करतात.पाचवा म्हणाला.

हे मात्र बरोबर हं,जलदेवता हसून म्हणाली,तिने आता जाण्याची तयार केली.

तेव्हा एक तरुण बेडूक म्हणाला,आम्हाला वर न मागताच जलदेवतेचं दर्शन होत असेल तर कशासाठी आम्ही वर मागायचा?

हे ऐकून जलदेवता खूष झाली.जाता जाता ती म्हणाली,

मी आता पावसाच्यारुपाने तुम्हाला भेटायलाय येईल.मग आपण खूप गप्पा करु.मी लहानग्यांना गोष्टी सांगेन. त्यांच्याशी खेळेन.

त्याप्रमाणे पाऊस येताच सर्वत्र पाणी साचलं की बेडूक बाहेर पडतात.डराँव डराँव करतात. जलदेवता त्यांना भेटायला आल्याची,ती खूण समजायची. मग आपण हे डराँव डराँव मन लावून ऐकलं तर, जलदेवता बेडकांना कोणती गोष्ट सांगते हे नक्कीच कळेल.

मग आहे ना तुमची तयारी, तशी डरॉव डरॉव काळजीपूर्वक ऐकण्याची?

सुरेश वांदिले