(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गजराजांची मैत्रीण

सिंह महाराजांच्या दरबारात आज जरा विपरीत घडलं. दरबारात आल्या आल्या गजराज रडू लागले. ते बघून महाराजांना फार आश्चर्य वाटलं. गजराजांना रडताना बघून इतर दरबारी थक्क झाले.

गजराज,अहो रडायला काय झालं?तुमच्यावर काही संकट कोसळलं का? महाराजांनी विचारलं.

नाही महाराज,तसं काही नाही.कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी हा गजराज समर्थ आहे.

मग तुम्ही कशासाठी रडता आहात?महाराजांनी विचारलं.

महाराज,माझी मैत्रीण मुंगीताई माझं ऐकतच नाही हो?

मुंगी आणि तुमची मैत्रीण?कोल्होबांनी उपहासानं विचारलं.

का?ती माझी मैत्रीण राहू शकत नाही कां? ती सुध्दा या जंगलाचा भाग आहे ना.हे जंगल काही केवळ सिंह-वाघ-हत्ती-कोल्ह्यांच नाही.हत्ती कोल्होंबाकडे वळून रागावून म्हणाले.

अहो गजराज,मैत्री आपल्या बरोबरच्यांशी करायची असते. टिचुकली मुंगीशी मैत्री करुन तुम्हाला काय मिळणार बरं? लांडगोबांनी विचारलं.

लांडगोबा, तुमच्या सारख्या सतत दुसऱ्याला फसवून आपला कार्यभार साधणाऱ्यास नाही कळायची मैत्री म्हणजे काय ते?गजराज,लांडगोबाकडे वळून म्हणाले. आपल्याला नाव बोट ठेवणाऱ्या गजराजाचा लांडगोबास राग आला.त्याच्यावर हल्ला करावा नि त्याचे लचके तोडावे असे त्यास वाटले.त्याच्या चेह-यावरचा राग स्पष्ट दिसत होता.त्याने कोल्होबास इषारा केला.अस्वलीसही इशारा केला.ही इशाऱ्यांची भाषा महाराजांना पटकन कळली.त्यामुळे ते हस्तक्षेप करत म्हणाले,

गजराज, लांडगोबाचं म्हणणं इतकं काही मनावर घेऊ नका?

पण महाराज?लांडगोबा चिडून म्हणाले.

अहो लांडगोबा,असं चिडणं बरं नव्हे. त्यामुळे तुमची तब्येत खराब होईल.तुम्ही असं करा, जरा जंगलात जा आणि मुंग्याच्या राणीस, दरबारात येण्यासाठी आम्ही बोलावले असल्याचा निरोप द्या. सिंह महाराज, लांडगोबांना म्हणाले.गजराजाकडे जळजळीत कटाक्ष टाकून,लांडगोबा दरबारातून बाहेर पडले. बघून घेईन तुला असं जाता जाता लांडगोबा म्हणाला.

जा रे जा,आला मोठा बघून घ्यायला,असे भाव आपल्या डोळयात आणत,गजराजाने जोरात पाय आटपला.त्यामुळे बरेच प्राणी बसल्या जागेवरुन वर फेकले जाऊन धाडकन खाली आपटले.

अहो गजराज, हे चाललय तरी काय,सिंह महाराजांनी त्यांना रागावून विचारलं.

महाराज क्षमा असावी,पण मैत्री कुणासोबतही होऊ शकते,त्याचा अपमान करण्याचा अधिकार फसव्या लांडग्यास दिला कुणी?

गजराज बरोबर आहे तुमचं म्हणणं! पण आपली चर्चा भलतीकडे वळली.तुमची मैत्रिण मुंगी तुमचं ऐकत नाही असं तुम्ही सांगत होतात.ती तुमचं काय ऐकत नाही.

महाराज मी तिला म्हंटल,

तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तीशाली आहेस.

यावर दरबारात एकच हशा पिकला.गजराज वेडा झाल्याचे काही प्राण्यांना वाटलं.महाराजांनांही हसू आलं.

अहो महाराज, असं हसू नका,ती चिटकूली मुंगी जेव्हा चावते ना,तेव्हा अंगाची लाही लाही होते.मग काही सुचत नाही.आमच्या एका पूर्वजास ती अशीच चावली होती. तिच्या चावण्याच्या वेदना सहन न झाल्याने तो नदिकडे धावत सुटला.धावताना त्याच्या लक्षातच आलं नाही.

काय लक्षात आलं नाही?महाराजांनी अधिरतेनं विचारलं.

समोर दरी आहे म्हणून.

अरे बापरे! मग काय झालं?

जे घडायचं तेच घडलं महाराज,तो आमचा धिप्पाड पूर्वज दरीत पडून मेला.

अरेरे!

बघा महाराज ती चिटुकली मुंगी किती शक्तीशाली निघाली.

अहो गजराज असं कधीतरीच घडू शकतं.तुमच्या पूर्वजाने एक लाथ जरी उगारली असती तरी लाखो मुंग्या नष्ट झाल्या असत्या.वाघोबा म्हणाले.

अहो वाघोबा,लाथ उगारुन हाणेपर्यंत मुंग्या,तुरुतुरु इकडून तिकडे निघून जातात.काही लाथेखाली आल्या तरी बऱ्याच निसटून जातात नि पुन्हा चावू शकतात.

बापरे!

होना,एकदा असच झालं..,हत्ती सांगू लागला.त्यांना मध्येच थांबवत महाराज म्हणाले,

तुमच्या पूर्वजाने लाथ उगारली,काही मुंग्या मेल्या,काही त्याच्या अंगावर चढल्या.त्याला चावू लागल्या.या वेदना सहन न होऊन तो वेड्यासारखा धावू लागला.धावता धावता त्याच्या लक्षात न आल्याने तो डोंगराच्या कडेवर पोहचला नि खाली कोसळला.बरोबर ना…

अगदी बरोबरच महाराज,अगदी बरोबर,म्हणूनच म्हणतो मुंगीच श्रेष्ठ.तर ती ऐकायला तयार नाही.गजराज म्हणाले.एव्हाना,लांडगोबाने राणी मुंगीस बोलावून दरबारात आणले होते.

तिने महाराजांना नमस्कार केला.

महाराजांनी तिला तू गजराजाचं ऐकत कां नाहीस असं विचारलं.

महाराज हा माझामित्र भोळा आहे.त्याला कळत नाही की या जंगलात कुणी श्रेष्ठ नाही आणि कुणी कनिष्ठ नाही.आपणा सर्वांना देवानेच काही ना काही शक्ती दिली आहे.त्याचा उपयोग करुन कुणीही कुणाला नमवू शकतो.घोडोबा प्रचंड वेगाने धावून कुणालाही थकवू शकतो.गाढवोबाची लाथ इतकी जबरदस्त लागते की प्राण कंठाशी येते.

तुला म्हणायचं तरी काय?महाराजांनी विचारलं.

महाराज, या जंगलातील प्राणी,सर्व समान आहेत. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा उपयोग एकमेकांना ठार करण्यासाठी,एकमेकांना हरवण्यासाठी,एकमेकांना हाकलून लावण्यासाठी न करता,एकजुटीने केला पाहिजे.तरच आपण या जंगलात राहू शकू.नाही तर तो आपल्या नंतर पृथ्वीवर आलेला मनुष्यप्राणी आपल्याच डोक्यावर बसायचा नि हे जंगल माझं माझं करत बसायचा.आपण होऊ मग बेघर…

असं घडेल म्हणतेस तू?महाराजांनी काळजीने विचारलं.सर्वांच्या चेहऱ्यावर हीच काळजी उमटली.आपण एकजुटीने राहत नाही याचा फटका प्रत्येकास कधी ना कधी या मनुष्यप्राण्यामुळे बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.मुंगीचं म्हणणं त्यांना पटलं.

गणराज राणीमुंगीस प्रेमानं आपल्या सोडेंने उचलून घेतो. महाराजांनी जरी निर्णय दिला नसला तरी, तू मात्र माझ्यासाठी सर्वश्रष्ठच हं मुंगीताई, असं म्हणून तो जोरात राणी मुंगीचा जय अस म्हणतो. महाराजांसह सर्वजण तिचा जयजयकार करतात.

सुरेश वांदिले