(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाग कोमेजली

गावाच्या मध्यभागी सुंदर बाग होती. बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडं होती. काही झाडांच्या खाली पाणी अडवण्यासाठी माती उकरुन जागाही केली होती. बागेत मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी होती.बागेतच उंचवटा होता.मोठ्यांच्या व्यायामासाठी लागणारे साहित्य होते.चालणाऱ्यांसाठी पायवाट होती.

अशा या बागेत सकाळ- संध्याकाळ अनेक मानसं फिरायला, गप्पा मारायला येत.काहीजण बागेत आले की एका आसनावर तासदीड तास बसून राहत. काहीजण मोबाईलवर बोलत बसत.काही जण फार हळूहळू चालत.काहीजण वेगाने चालत.काहीजण धावत असत.

बागेत वेगवेगळया पक्षांचा मुक्त विहार होता. ते या झाडावरुन त्या झाडावर उडत असत. प्राण्यांमध्ये मात्र केवळ डॉगी आणि मनी मावशीच असत.पण सर्वाधिक असत ते डॉगीच.

या डॉगिंना मोगऱ्याच्या झाडाखालील थंड मातिचा शोध लागला असावा.त्यामुळे आजूबाजूचे डॉगी इथे दुपारी येत आणि मस्त ताणून देते.सुरुवातीला चार-पाच डॉगी होते. प्रत्येकानं आपलं एकएक झाड वाटून घेतलं होतं. प्रत्येकजण त्याच झाडाखाली येऊन झोपायचा.इतर डॉगीजनाही ते नीट कळल्यानं तेही एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण करत नसत. त्यामुळे त्या सर्वांचं बागेतलं राहणं मजेत आणि आनंदात चाललं होतं.

रात्र झाली की हे डॉगी बाहेर पडत. खाणं पिणं झाले की पुन्हा येऊन झोपत.त्यांनी असं ठरवलं की,आपण इथे बागेत आपसात भांडायचं नाही.भुंकायंच नाही.कोणाच्या अंगावर धावून जायचं नाही.त्याप्रमाणे ते वागत असत.

या डॉगिजमुळे बागेला आपोआप संरक्षण मिळू लागलं. रात्री कुणी चोर किंवा दांडगट मुले,मानस आत शिरायला धजावत नसत. त्यामुळे बागेसाठी ठेवलेला सुरक्षा रक्षकही खुष होता. त्याच काम सोपं झालं होतं. तो या डॉगिजच्या राहण्याकडे दुर्लक्ष करायचा. हे डॉगीज असल्यावर सुरक्षेची काळजीच नाही,याची त्याला पक्की खात्री पटली होती.

एकदा हा सुरक्षा रक्षक एके दिवशी,तो दूरवरच्या नातेवाईकाकडे गेला.बागेतील डॉगीजमुळे बाग सुरक्षित असल्याची त्याची खात्री असल्याने तो रात्री परतला नाही.

त्याच रात्री कशावरून तरी बागेतल्या डॉगिजचं भांडणं झाली.ते एकमेककांवर भुंकू लागली. त्यातील एका समजतूदार डॉगीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.आपण असेच भुंकत राहिलो तर आपणास बागेचा सुरक्षा रक्षक हाकलून लावील हे त्याने सांगून बघितलं.पण त्याच कुणीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं.ते आणखीनच जोरजोरात ओरडू लागले.आपलं कुणीच ऐकत नाही हे बघून तो समजूतदार डॉगी तिथून निघून गेला.

डॉगिजच्या भुंकण्यामुळे बाजूच्या एका सोसायटीतल्या गृहस्थाची झोपमोड झाली.त्याने तेवढया रात्री महानगरपालिकडे तक्रार केली. रस्त्यावरच्या प्राण्यांना पकडून नेणारी महानगर पालिकेची गाडी काही वेळाने तिथे आली.त्यांनी या डॉगिजना पकडलं आणि गाडीत टाकून त्यांना घेऊन गाडी निघून गेली.दूरवर उभा असलेला तो समजूतदार डॉगी हे बघून दु:खीकष्टी झाला.आपल्या मित्रांना स्वहिताचही कळू नये आणि इतरांनी सांगितलं तर ते वळू नये,याचं त्याला फार दु:ख झालं.

००००

दुसऱ्या दिवशी तो सुरक्षा रक्षक परत आला,तेव्हा त्याला झाला प्रकार कळला.त्यालाही वाईट वाटलं.डॉगिजना पकडून गेल्याने आता अधिक चौकस राहणं भाग होतं.

या बागेत आता डॉगिज राहत नाही,हे हळूहळू बऱ्याच जणांच्या लक्षात आलं.त्यामुळे तिथे रात्री चोर,दारुडे,नशा करणारे लोक शिरु लागले.त्यांच्याकडून बागेची नासाडी होऊ लागली.सुरक्षा रक्षकासही एकदा काहीजणांनी मारलं.त्यामुळे त्यानेही नोकरी सोडली.ती बाग बेवारस झाली.बघता बघता बागेची रया गेली.

बागेच्या समोरच्या इमारतीतून ही सुंदर बाग तेथील रहिवाशांना फार आनंद द्यायची.त्यांचा तो आनंद हिरावला गेला. महानगरपालिकडे डॉगिजच्या भुंकण्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीस त्याची चूक कळली.त्याने संबंधितांशी भेट घेऊन आपण डॉगिजविषयीची तक्रारी मागे घेत असल्याचं सांगितलं.पण तोवर खूप वेळ झाला होता.कारण अशी पकडलेली जनावरं खूर दूरवर नेऊन सोडण्याची पध्दत होती.त्यामुळे त्या डॉगिजना असच दूरवर सोडून देण्यात आलं होतं.

आपल्यामुळे एका सुंदर बाग नष्ट झाली,याचं खूप दु:ख त्या इसमास झालं.आपण तक्रारी केली नसती तर ते डॉगी इथेच राहिले असते आणि बागेचं रक्षण आपोआपच होत राहिलं असतं.असं त्यास वाटलं. पण आता वाटून काय उपयोग?हातातून बाण सुटला की तो परत घेता येत नाही]हे त्या कळून चुकलं.त्याच्या डोळयातून अश्रू ओघळले.

सुरेश वांदिले