(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बदलणाऱ्या रंगाचं रहस्य!

                 परवा, रॉबिन्सन आणि मार्गारेट फिरतफिरत एका, केळीच्या बागेत पोहचले. केळीची बाग चांगलीच बहरली होती. सर्वत्र केळीचे हिरवेगार फड लागले होते. हलकंस उन होतं. केळीच्या झाडांमधून झुळूझुळू पाणी वाहत होतं. झाडांच्या मोठमोठ्या पानांमुळे सावली पसरली होती. गार हवाही सुटली होती. अशा, या छान वातावरणात, कुणाचंही आपल्यावर, लक्ष पडणार नाही याची काळजी घेत, दोघांची भ्रमंती मजेत चालली होती.

              रॉबिन्सनचं, केळाच्या फडाकडे बारकाईने लक्षं होतं. बहुतांश झाडांवर, गच्च हिरव्यागार केळी होत्या. पण, बागेच्या एका कोपऱ्यातील केळींच्या फडाचा रंग पिवळसर असल्याचं, त्याला दिसलं.

                 आणखी थोड्या अंतरावर तर, झाडावरील केळी, लख्ख पिवळ्या धम्मक दिसू लागल्या. त्याठिकाणी बरीच लगबग सुरु होती. या पिवळ्याधम्मक केळीचं फड, मोठ्या लाकडीपेट्यांमध्ये पॅकबंद केले जात होते. दोघेही दबकतदबकत तिथे पोहचले.

                 मामाने, मार्गारेटचं लक्षं, पिवळ्या केळींकडे वेधलं,

“मावशे, तुझ्या काही लक्षात आलं का?”

“आलं असेल तरी, मी कां म्हणून सांगू तुला?” मार्गारेट, रॉबिन्सनचा गालगुच्चा घेत म्हणाली.

“मावशे मावशे, असा मध्येच, रंग बदलण्याचा झटका, कां येतो, तुला?”मामा म्हणाला.

“म्हणजे रे काय, गधडुद्दिन पुंग्या!” मावशी डोळे वटारुन म्हणाली.

“मावशे, मी पुंग्या नाही, मी मामू आहे तुझा.”

“हा हा हा! मामू मामू, बिनकामू! मी रंग बदलते म्हणजे, रे काय ढोमू?”

“मावशे, आताआतापर्यंत तू, किती प्रेमानं बोलत होतीस आणि आता बघ माझी, खेचायलाच सुरुवात केली. कसा चटकन, पटकन झटकन, रंग बदललास बघ, या केळींसारखाच.”

“या केळींनी, कधी रंग बदलला?”

“म्हणजे, तुला तो दिसला नाही का? अगं, मार्गे मावशे, आपण जेव्हा, या केळीच्या बागेत फिरायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा रंग हिरवाकंच होता. इथपर्यंत पोहचेपर्यंत, पिवळा धम्म झाला. बघताबघता रंग बदलला. तुला कसा नाही दिसला?”

“मलासुध्दा दिसला की.”

“मग, तुला आश्चर्य नाही वाटलं?”

“कां बुवा?”

“हे घडलं कसं?”

“कसं म्हणजे, सोप्पय ते…”

“आँ!”

“हाँ! आधी, तू जरा, हळूच एक , पिवळधम्म केळ घेऊन ये. मग तुला सांगते, सारंकाही.” मार्गारेट म्हणाली.

“अगं पण, त्या मनुष्यप्राण्याने मला बघितलं नि धोपटलं तर…” मामा काळजीच्या स्वरात म्हणाला.

“हा हा हा! काळानिळा पडशील.” मावशी डोळे मिचकावून हसली. “जातोस की, मीच तुला त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेऊ.” मावशीने तंबी दिली. मावशीला मनात शिव्या देत, रॉबिन्सनने खाली पडलेलं केळ पळवलं नि मावशीच्या पुढ्यात टाकलं. मावशी मिटक्या मारत केळ खाऊ लागली. अर्ध केळं, तिने रॉबिन्सला दिलं.

“माम्या, मी तुझी खेचत होते रे, तुझं, बरवाईट कुणाला मी, कसं करु देणार? तो पहिला हक्क माझाच.” मावशी डोळा किलकिला करत म्हणाली.

“बर बाई, तुझा तर तुझा.आता तरी सांगशील का, हिरवी केळी, पिवळी, कशी काय झाली?”

“माम्या, त्याला पिकणं म्हणतात.”

“म्हणजे?”

“झाडावरची फळं, जेव्हा कच्ची असतात, तेव्हा त्यांचा रंग हिरवा असतो.पिकू लागली की पिवळा होतो. काही फळांचा रंग लाल होतो.”

“कसं काय बाँ?”

“माम्या, केळी म्हण किंवा दुसरं फळ म्हण, यांच्या पोटात संप्रेरक असतात. त्यांचं हळूहळू पाझरणं सुरु असतं. या पाझरण्यात, मेथायनीन नावाचं अमिनो आम्ल असतं. हे आम्ल एथिलीन या वायुची निर्मिती करतं.”

“अच्छा तर, वन टु का, फोरचं गणित सुरु झालं  म्हणायच.”

“अगदी बरोबर. हा एथिलीन वायू फळातील अमायलेझ आणि पेक्टिनेझ, या वितंचकांचं प्रमाण वाढवतो. त्यामुळे फळातील स्टार्च, या पिष्टमय पदार्थाचं साखरेत रुपांतर होतं.”

“म्हणून, फळं गोड लागतात म्हणायची.”

“बरोब्बर ओळखलंस मामू. फळाला गोडपणा देणारा, पेक्टिनेझ, आणखी एक कामगिरी करतो.”

“कामगिरी की भानगड!”

“काहीही समज.”

“काय भानगड करतात हे पेक्टिनेझराव?”

“पेक्टिनेझ, फळाच्या टणकपणाचा आधार असलेल्या पेक्टिन, या पदार्थाचं विघटन करतात. यामुळे टणक फळ, मऊ होऊ लागतं. त्याचवेळी फळातील इतर वितंचकही कामगिरी करत असतात.”

“त्यामुळे काय होतं?”

“हे वितंचक, चांगलेच पॉवरफूल असतात.त्यांच्यामुळेच फळांच्या सालिला हिरवा रंग देणाऱ्या ,क्लोरोफिलचं विघटन होऊन फळांच्या सालीचा रंग बदलू लागतो.”

“इतकं सोप्प आहे, हे सगळं?”

“रॉब्या, सोपं काही नसतं रे.ते वाटतं तसं.”

“मावशे, माझ्या पिटुकल्या मेंदुला कळेल, असं सांगना”

“मामू, फळ पिकण्याची प्रकिया, त्याचा जन्म होतो, तेव्हापासूनच सुरु होते.”

“म्हणजे गं काय?”

“ फळांचा जन्म फुलांपासून होतो. प्रारंभी मिटुकलं असणार फळं आकारानं वाढतं. त्याचा घाट वाढतो. फळाचा जन्म होण्याआधी फुलातील बिजखंडाचं फलन होतं. ते किती प्रमाणात झालं, यावर फळातील बियांचं प्रमाण ठरतं.”

“त्याने काय होतं?”

“कधीकधी पुरेशा प्रमाणात बीजखंडाचं फलन होत नाही. त्यामुळे वाढणाऱ्या फळात पुरेशा बियांची निर्मिती होत नाही. अशा फळांच्या पिकण्याची क्रिया अडखळते. पण, पुरेशा प्रमाणात बीजखंडाचं फलन झालं की, फळं विनासायास पिकतात. विशिष्ट आकारामानापर्यंत फळ पोहचलं की त्याची आणखी वाढ होत नाही. या क्षणाची वाट, संप्रेरक मंडळी बघत असतात. आता, त्यांचं काम सुरु होतं. हे संप्रेरक फळातला टणक असलेला गर मऊ करतात. फळाची गोडी वाढवतात.” मावशी म्हणाली. मामा काहीतरी विचारणार तोच त्याच्याजवळून, एका मनुष्यप्राण्यानं हिरव्या केळीचं फड, पेट्यात टाकायला सुरुवात केली.

“मावशे, ही केळी तर पिकली नाहीत, मग कां बरं, अशी तोडली, या मनुष्यप्राण्याने”

“मामू, केळीच नव्हे तर, इतरही अनेक फळं, झाडावर पिकू न देता कच्चे किंवा अर्धेकच्चेच हा मनुष्यप्राणी तोडतो, कारण त्याला, ही फळं विकण्यासाठी दूरदूर पाठवावं लागतं. पण ही फळं काही, कच्चीच विकत नाही.”

“मग?”

“हा मनुष्यप्राणी भलताच हुषार. त्याने फळ पिकवण्याची कृत्रिम पध्दती शोधून काढलीय.”

“कोणती?”

“कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी मनुष्यप्राणी कॅल्शियम कार्बाइड या रसायनाचे स्फटिक, कच्च्या फळांच्या करंड्यात ठेवतो. या स्फटिकांचा हवेतील बाष्पासोबत संपर्क येतो. त्यातून ॲसिटिलीन वायू तयार होतो. तो फळात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या एथिलीनचा सावत्र भाऊच समज.”

“म्हणजे, एथिलीनचीच कामगरी हा ॲसिटिलीन करतो म्हणायचा.”

“मामू, मनुष्यप्राण्याच्या हुषारीला तोड नाही बघ. तो होत्याचं नव्हतं, ‘यूवं’ करू शकतो नि नव्हत्याचं, ‘त्यूंव’ करु शकतो. बरं ते जाऊ दे. सांगूनसांगून थकले बाबा मी.माझ्या शरीरातील साखर, बहुतेक कमी झालेली दिसते. ती आत्ता, या क्षणी, नाही मिळाली तर, बेशुध्दच पडायची.”मावशी नाटकी स्वरात म्हणाली. मामा काय ते समजला नि आणखी एक केळ लंपास करण्यासाठी त्याने आगेकूच केली.

 सुरेश वांदिले

(वितंचक= एन्झाइम/ संप्रेरक= कॅटॅलिस्ट)