(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाणेदारपणा

मी टरफलं खाल्ली नाहीत, त्यामुळे ती मी उचलणार नाही, हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरुन गेलं होतं. तसं त्यांचं बरोबरच होतं. आपण चूक केली नसताना शिक्षा कां बरं भोगायची? पण वर्गात जर कुणी टरफलं म्हणा किंवा पॉपर्कार्नचं प्लॅस्टिक म्हणा, तसच टाकून देत असेल तर मग दुस-या दिवशी, स्वच्छक येईपर्यंत ते तसंच ठेवायचं का? हा प्रश्न नेहमी रविला पडायचा.

वर्गातील बंटी बावनकुळे हा दानगट मुलगा, असा कचरा अधूनमधून करायचा. हे रविला अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे तो स्वत: हा कचरा ताबडतोब उचलून कचरापेटीत टाकायचा. इतर मुलं काही या फंदात पडत नसत. उलट ती रविला हसत. हे बघून बंटीला आणखी चेव येई. तो कधीकधी जास्तच कचरा टाके. पण हा कचरा सुध्दा उचलण्यात रविने हयगय केली नाही.

परवासुध्दा असच घडलं. बंटीने नेहमीपेक्षा आज अधिक कचरा सरांच्या टेबलच्या बाजूला टाकला. रवी त्यावेळी नेमका ग्रंथालयात पुस्तक आणण्यासाठी गेला होता. तासिकेची घंटी झाली. तसा तो पुस्तक घेऊन तत्काळ वर्गाकडे धावत सुटला. वाटेत त्याच्या वर्गाच्याच सरांनी त्याला बघितलं.

अरे, असा कां धावतोस? त्यांनी रविला थांबवत विचारलं. त्याच्याकडील पुस्तक बघितलं.

वा वा शाबास! अवांतर वाचन केलं की, आपण आणखी समृध्द होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी रवीजवळील पुस्तक बघून दिली. त्याला सोबतच घेऊन ते वर्गाकडे निघाले.

वर्गात रवी नाही हे बंटीच्या लक्षात आलं नव्हतं. बघू आता गंमत कशी होते ती, असे भाव चेह-यावर आणून त्याच्या जागेवर चूळबूळ करत बसला होता. तासिकेची घंटी झाली तरी, रवी कसा काय कचरा उचलण्यासाठी उठला नाही, हे बघण्यासाठी बंटी इकडे तिकडे बघू लागला. रवी वर्गात नाही हे लक्षात येताच त्याच्या घशाला कोरड पडली. आता सर आले तर काय? हा प्रश्न पडून तो जरा शहारला.

त्याचवेळी सरांसोबत रवी वर्गात दाखल झाला. आपल्या टेबलजवळील कचरा बघून सर संतापले. त्यांनी रवी सोडून सर्व वर्गाला उभे केले.

आपली तक्रार करण्यासाठी तर रवी सरांकडे गेला नव्हता ना, अशी शंका बंटीस आली. शाळा सुटली की याला चांगलंच पिदाडून काढू, असं त्याने मनोमन ठरवलं.

कचरा कुणी केला? रागावून सरांनी विचारलं. सगळयांच्या माना खाली गेल्या. कुणीही तोंड उघडेना. बंटीसोबत पंगा घेण्याची कुणाची तयारी नव्हती. सर आणखी चिडले. ज्याने कचरा केला असेल तो दोन मिनिटात समोर आला नाही तर, सर्वांनाच शिक्षा करेन. असं सर गरजले.

सर्वांच्या माना खालीच होत्या. सरांचा राग अनावर होत होता. ते आता शिक्षा करणार हे पक्कच होतं. एवढयात रवी कचऱ्याजवळ जाऊन कचरा उचलू लागला.

म्हणजे, तू कचरा केलास की काय ? सर त्याच्यावर ओरडले. पण त्यांच्या लगेच लक्षात आलं की, हा तर ग्रंथालयात होता. आपल्यासोबतच वर्गात आला.

ते थोड्या नरमाईने रविला म्हणाले,

अरे, तू कशाला कचरा उचलतोस? याचा अर्थ तूच हा गुन्हा केला असं सिध्द होईल.

सर, मी कचरा फेकला नसला तरी तो उचलून वर्ग स्वच्छ करणं मला माझं कर्तव्य वाटतं. कचरा कुणी केला याचा शोध घेण्यापेक्षा आता ते मला अधिक महत्वाचं वाटतं. कारण स्वच्छ वर्गात तुम्हालाही शिकवायला चांगलं वाटेल ना. याची शिक्षा तुम्ही मला देत असाल तर त्यासाठी मी तयार आहे. असं बोलून रविने एकटयाने कचरा उचलून बाहेरच्या कचरा पेटीत टाकला. सरांच्यासमोर येऊन त्याने हात पुढे केला. हे बघून सरांसोबत सारा वर्ग अवाक झाला. बंटीला तर मेल्याहून मेले झाले. तो झर्रदिशी सरांच्या समोर आला. त्याने रविचा हात बाजूला करुन स्वत:चा हात सरांच्या समोर केला.

म्हणजे खरा गुन्हेगार तू आहेस तर? सर त्याला रागावत म्हणाले.

होय सर…मीच कचरा टाकला. त्यामुळे रविला काही करु नका. याची गंमत करण्यासाठी, याला खिजवण्यासाठी दररोज मी असा कचरा टाकतो. हा दररोज शांतपणे हा कचरा उचलतो. पण आज हा वर्गात नाही, हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण त्याच्या आत्ताच्या वागण्याने, कचरा करण्यात कसलाच पराक्रम नाही तर तो उचलण्यात आहे हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मलाच शिक्षा करा. बंटी रडवलेल्या चेहऱ्याने म्हणाला. त्याच्या बोलण्यातून प्रामाणिकपणा जाणवत होता.

शिक्षा तर झालीच पाहिजे. उद्या सगळा वर्ग तू स्वच्छ कर. सरांनी बंटीला शिक्षा फर्मावली आणि रविची मनसोक्त प्रशंसा केली. कधीकधी बाणेदारपणा दाखवणं हा प्रश्न सोडवण्यात असतो,तो अधिक चिघळवण्यात नसतो, हे रविनं आपल्या कृतिनं वर्गाच्या लक्षात आणून दिलं.