(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

धाडस अंगाशी आले

चंद्रमुखी नावाच्या नदित राहणारा, सोनू कासव खूप प्रेमळ आणि निगर्वी होता. नदित राहणाऱ्या प्राण्यांची तो काळजी घ्यायचा. त्यांना, सर्व प्रकारचं साहाय्य करायचा. आपल्या घरी मेजवाणीला बोलवायचा. नदीतील कोणत्याही प्राण्यांमध्ये भेदभाव करायचा नाही.  सर्व जलचरांना सोनू कासव हाच आपला खरा राजा असल्याचं वाटायचं. ते त्याला खूप मान देत असत.

वननगरीतील इतर प्राण्यांसोबत त्याची चांगली मैत्री होती. या प्राण्यांना नदीची सैर करण्यासाठी तो नेहमी बोलवायचा. प्राण्यांच्या छोट्या बाळांना आपल्या पाठीवरुन नदीची सैर करुन आणायचा.

सिंहमहाराजांचा धाकटा मुलगा ,युवराज लिंकिला त्याचा लळा लागला. त्याला नदीची सैर करणं खूप आवडायचं. वेळ मिळाला की तो नदीकडे पळत सुटायचा. सोनू, त्याला आपल्या पाठीवर बसवून दूरपर्यंत सैर करुन आणायचा. बऱ्याचदा लिंकिला आपल्या, पाठीला घट्ट पकडायला सांगून, तो पाण्याचा आतही घेऊन जाई. लिकिंच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं की पटकन वर यायचा. कासवासारखं पोहता आलं तर कित्ती मज्जा येईल, असं लिंकिला वाटायचं.

एकदा त्याने आपली ही इच्छा सोनूकडे बोलून दाखवली. आजपर्यंत कोणताच प्राणी पोहायला शिकला नव्हता. पोहणं शिकणं खूप कठीण असल्याचं सोनुने लिंकिला सांगितलं. पण लिंकिचा निर्धार बघून सोनूला बरं वाटलं. नदीच्या ज्या ठिकाणी पाणी कमी होतं, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीपासून सोनू, लिंकिला पोहणं शिकवू लागला. लिंकिचं वजन खूप असल्याने तो सरळ पाण्याखालीच जायचा. मग सोनू त्याची शेपटी ओढून बाहेर काढायचा. लिंकिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असायचं. थोडा वेळ विश्रांती घेऊन, तो पुन्हा पाण्यात उडी मारायचा. पोहणं शिकायचच असा निर्धार लिंकीने केला होता. पण त्याला काही जमेना. दररोज प्रयत्न करुनही कित्येक दिवस झाले तरी, प्रगती होईना. सोनूला म्हणावं वाटे,पुरे झालं आता शिकणं-बिकणं. पण लिंकीचा उत्साह कमी झाला नव्हता. एक ना एक दिवस आपण पोहणं शिकूच याची त्याला खात्री होती. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं तर यश मिळतच, असं त्याचे गुरुजी नेहमी सांगत. त्यामुळे तो प्रत्येक दिवशी नव्या उत्साहाने शिकायला यायचा. सोनू कासवही, मग न थकता, त्याला पाण्यात त्याला पाण्यात हातपाय कसे मारायचे, पाण्यावर डोकं ठेऊन श्वासोच्छवास कसा करायचा, पाण्याखाली नाक दाबून हालचाल कशी करायची,अशा ट्रिक्स शिकवायचा.

दोन महिन्यानंतर लिंकिला थोडफार पोहायला येऊ लागलं. त्यादिवशी त्याला खूप आनंद झाला. प्रयत्न केले की असाध्य ते साध्य होतं, याचं मूर्तिमंत उदाहरण लिंकी ठरला होता.

युवराज लिंकी, हा सिंह महाराजांसारखा धाडसी असलातरी थोडा अविचारी होता. थोडं पोहणं येताच तो उथळ पाणी सोडून खोल पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु लागला. सोनूनं त्याला समजावलं की तेव्हढ्यापुरतं तो ऐकायचा आणि सोनू कासवाची पाठ फिरली की त्याला हवं तसंच वागायचा.

एकदा तर लिंकीने कमालच केली. सोनू कासवास न सांगता तो नदीत, खूप खोलवर पोहायला गेला. पोहतापोहता तो नदीच्या जोरदार प्रवाहात सापडला. त्याचा काहीच सुचेना. काय करावं हेही कळेना. तो आराडाओरड करु लागला. पण त्याच्या आजूबाजूला कुणीचं नव्हतं. सुदैवाने एका छोट्या माशानं त्याला बघितलं. सोनू कासवासोबत पोहायला येणारा लिंकी संकटात सापडल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो ताबडतोब सोनूकडे पळाला. त्याला सगळं सांगितलं. सोनू घाबरला आणि वेगाने लिंकीकडे निघाला. तोपर्यंत लिंकी दूरपर्यत गटांगळया खात गेला. त्याच्या नाकातोंडात पाणी शिरलं. त्याचा जीव गुदमरायला लागला. सोनू कासवाने, नदीतल्या मालू आणि गोलू मगरींना लिंकीचे प्राण वाचवण्याची विनंती केली.

मालू आणि गोलू दुष्ट स्वभावाच्या होत्या. सोनू कासवाला राजासारखा मिळणारा मान त्यांना खुपत असे. सोनुला, या दोघीही पाण्यात पाहत असत. त्याला कधी ना कधी अडचणीत आणयचंच, अस त्यांनी ठरवलं होतं. आज ही संधी आयतीच चालून आली होती. ही संधी सोडायची नाही आणि सिंहमहाराजांच्या नजरेतून सोनूचं महत्वं कमी करायचं. जमलं तर त्याला इथून हाकलून लावायचं, असं त्यांनी ठरवलं.  दोघांनींही सोनूला मदत करण्यास नकार दिला.

लिंकिचं, काही बरंवाईट झालं तर, सिंह महाराज आपणास सोडणार नाही हे सोनूला माहीत होतं.पण आपल्या प्राणापेक्षा त्याला लिंकीच्या जिवाची अधिक काळजी होती. लिंकी वाहतच चालला होता. पुढे एक धबधबा होता. धबधब्याखाली लिंकी पडण्याआधीच त्याला काहीही करुन थांबवणं आवश्यक होतं. सोनूने, पुन्हा मगरींना मदत करण्याची विनंती केली. पण दोघींनींही नकार दिला.

लिंकिचे प्राण वाचवण्यासाठी काय करता येईल याचा सोनू विचार करु लागला.

पाण्यात, दोन-तीन मोठे मासे होते. त्यांच्याशी सोनुची चांगली मैत्री होती. पुढे जाऊन धबधब्याजवळील जमेल तितक्या झाडांना वाकवण्याची विनंती सोनूने त्यांना केली. मासे दुप्पट वेगाने निघाले. इतरही छोटेमोठे मासे,काही कासव आणि जलसर्पसुध्दा त्यांच्यासोबत होते.लिंकी धबधब्याच्या टोकावर पोहचण्याआधी त्यांनी तीन चार झाडांना वाकवलं. प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने, त्यांनी मोठ्या शर्थीने झाडं वाकवून ठेवली. प्रवाहात वाहत येणारा लिंकी त्या झाडांना अडकला. पण त्याचं अर्ध शरीर धबधब्याच्या खाली गेलंच. सर्व जलचरांचा तोल जाऊ लागला. सोनू कासवानं गतिनं हालचाल केली. लिंकीची शेपटी तो ओढू लागला.  प्रवाहाच्या वेगामुळे त्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले. अचानक, एक मोठा ओंडका तिथे प्रवाहासोबत वाहत आला. अडवलेल्या झाडांना तो अडकला. त्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. आता, सोनूला लिंकिला वर ओढणं सोपं झालं. त्याने कसाबसा त्याला वर ओढला. नाकातोंडात पाणी गेल्यानं लिंकी गुदमरुन बेशुध्द पडला होता. सोनूने त्याला बाजूला खेचून पाण्याच्या बाहेर काढलं. सर्व जलचरांनी हुर्ये केलं. लिंकीचे प्राण वाचले.  असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही असं सोनूने, लिंकी शुध्दीवर आल्यावर त्याला समजावलं. आपले प्राण वाचवल्याबद्दल लिंकी, पुन्हापुन्हा सोनू आणि इतर जलचरांचे आभार माणू लागला.

 यापुढे, आपल्या हिताच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, हा धडा त्याला मिळाला होता.

०००

लिंकिंचं हे प्रकरण सिंह महाराजांच्या कानावर गेलं. आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल सोनूचे आभार मानण्यासाठी  ते, त्याला खास भेटायला आले. वननगरीचा राजा आजपर्यंत असा कधीच जलचरांना भेटायला आला नव्हता. त्यामुळे सिंहमहाराजांची ही भेट त्यांच्यासाठी अप्रुपच ठरलं. महाराजांच्या स्वागताला सगळे जलचर जमले. दोन्ही मगरीही आल्या. लिंकीचे प्राण धोक्यात येण्यास, सोनूच कसा जबाबदार आहे. हे त्यांनी सांगण्याचा आगावूपणा केला. मोठ्या माशांना त्यांचा हा आगावूपणा सहन झाला नाही. सर्व जलचर लिंकिचे प्राण वाचावेत म्हणून प्रयत्न करत असताना या दोन्ही मगरी कशा गंमत बघत होत्या, हे ही सांगितलं.

मगरींचा डाव त्यांच्यावरच उलटला. महाराजांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलं.संकटात सापडलेल्याला मदन न करणं दुष्टपणा असून तो केल्याबद्दल दोन्ही मगरींना नदीतून ताबडतोब निघून जाण्याची शिक्षा फर्मावली.

महाराजांनी सोनू कासवाला आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा भेट दिला.

सुरेश वांदिले