
पानगळ!
रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना. कोणताही दुर्धर प्रसंग ओढवू नये म्हणून मावशी, बिळाच्या भोकाजवळ पसरली. काहीवेळाने मालकीनबाईंची वामकुक्षी सुरु झाली. हे लक्षात येताच, मावशीने, शेपूट ओढून रॉबिन्सनला बिळाच्या बाहेर काढलं.
“गधड्या, इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं? मालकीनबाईंच्या लक्षात आलं असतं, तर त्यांनी, माझ्या पोटात तुला टाकण्याची सक्ती केली असती. माझ्याच्याने ते झालं नसतं तर, त्यांनी माझी गच्छंती केली असती.” मार्गारेट मामाला रागावली.
“मावशे, कशातच माझं लक्ष लागत नाहीय.”
“कशामुळे तू, इतका अस्वस्थ झालास?”
“मावशे, माझ्या अस्वस्थेतचं कारण बाहेर आहे. चल तुला दाखवतो.” मालकीनबाई दोनतीन तास, झोपेचा आनंद घेणार हे ठाऊक असल्याने, मार्गारेट मावशी, रॉबिन्सनसह हळूच खिडकीतून बाहेर पडली.
मामाने तिला कॉलनीतल्या बागेत नेलं. त्या बागेत मामाची काही झाडं आवडती होती. पावसाळ्यात ही झाडं हिरव्या पानांनी, रंगीबेरंगी फुलांनी आणि मधूर फळांनी बहरुन जात. रॉबिन्सन बरेचदा, या झाडांकडे येऊन तुरुतुरु वर जायचा. फळं खायचा. हिरव्या पानांच्या सावलीत झोपायचा. मार्गारेटसोबत जशी त्याची मैत्री होती, तशीच या पांनासोबतही होती. तो, त्याच्या मनातल्या गोष्टी, या पानांना सांगयाचा. हवेमुळे पानं हलली की, त्यांना आपलं म्हणणं कळल्याचं समजून त्याला आनंद व्हायचा. या आनंदात टाळीसाठी आपला उजवा पाय पुढे करायचा. या झाडांकडे बोट दाखवत रॉबिन्सन, मावशीला म्हणाला,
“हे आहे, माझ्या अस्वस्थेतेचं कारण.”
“या झाडांनी तुझं काय घोडं मारलं?”
“मावशे, या झाडांनी नाही, तर खाली पडलेल्या पानांमुळे, मी अस्वस्थ झालोय.” मामाने पानांकडे, मावशीचं लक्ष वेधलं. मावशीला हसू आलं
“मावशे, माझ्या दु:खाला हसतेस होय.”
“तसं नाही, पण ही पान पडल्यामुळे, तुला कां बरं दु:ख झालय?”
“अगं, ते माझे जीवाभावाचे मित्र आहेत. असं मला सोडून जाणं बरोबर आहे का?”मामा हुंदका देत म्हणाला.
“तू, दु:ख कशाला करतोस? पान खाली पडली म्हणजे तुला सोडून गेली असं थोडचं आहे.”
“म्हणजे काय?”
“पानं खाली कां पडतात, हे तुला ठाऊक आहे का?”
“कशाला या, बुध्दूची परीक्षा घेतेस. तूच सांग की.”मामा म्हणाला. मावशी पुन्हा हसली. झटपट झाडावर चढली. तिच्या पाठोपाठ मामाही चढला. चांगली जागा शोधून, दोघे आरामात बसले. हवेमुळे पानांची सळसळ सुरु होती. थंडगार वार वाहत होता. मात्र, याचा आनंद घेण्याऐवजी मामाची चुळबूळ सुरु होती.
“आता तरी सांग, माझा अंत नको बघूस.” मामा काकुळतीने म्हणाला.
“सांगते, आधी पोटोबा मग पानोबा.” झाडावरील फळांकडे बोट दाखवत मावशी म्हणाली. मामा चटदिशी तिकडे वळला नि पटदिशी ते फळ तोडून मावशीला दिले. त्या फळाचा आस्वाद घेत मावशी सांगू लागली,
“मामू, हे फळ जाम गोड आहे बघं.” मावशी अजूनही सांगत नाही हे बघून, हिला खाली ढकलून द्यावं, असं मामास वाटलं. पण या बयेला पॅरॉशूटसारखं खाली पडता येत असल्याचं लक्षात आल्यानं तो चरफडला. आपणच खाली उडी मारावी असंही त्याला वाटलं.
“माम्या, तू असं काही करु नकोस नि तसंही काही करु नकोस. आपलं मन कसं या पानांसारखं हवं. प्रेमळ, हळवं, माया करणारं!”
“तुझं भाषण बस्स झालं. आता तू सांगितलं नाहीस तर, त्या नेपोटल्यालाच इथं घेऊन येईल.” मामाने तंबी दिली.
ही मात्रा बरोबर लागू पडली. मावशी सांगू लागली.
“माम्या, ही पानं म्हणजे झाडांची उर्जा असते. ते प्रकाशसंश्लेषणाचं काम करतात. झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकतात. हा झाडांचा उच्छवासच असतो.”
“म्हणजे, आपणतुपण नि मालकीनबाई श्वास घेतात नि मग सोडतात, तसंच ना.”
“अगदी बरोबर. जमिनीतलं पाणी, झाडाची मूळं शोषून घेतात. झाडाच्या वाढीसाठी त्याचा वापर सुरु होतो. मग हळूहळू हे पाणी पानांपर्यंत येतं. तिथे, त्यांचा संयोग हवेतील कॉर्बन डायऑक्साइडशी होतो. सूर्यप्रकाशापासून उर्जा मिळते. त्याच्या साहाय्यानं कर्बोदके म्हणजेच पिष्टमय पदार्थांची निर्मिती होते. ते झाडात साठवले जातात. या पानांमध्ये उरलेल्या पाण्याचं बाष्प होऊन ते हवेत जातं.”
“पण, याचा पानं खाली पडण्याचा काय सबंध?”
“रॉबू, हिवाळा सुरु झाला की सूर्यप्रकाश कमी होतो. जमिनीतून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्रेत घट होते.”
“मग?”
“त्यामुळे, जे काही पाणी उपलब्ध असतं, त्याची बचत केली जाते.”
“कोण करतं ही बचत?”
“हीच तर गंमत! त्यातच या पानाचं खाली पडण्याचं रहस्य दडलय.”
“आँ!”
“हाँ! अरे, शिल्लक असलेलं पाणी पानांव्दारे हवेत सोडलं जाणार नाही, याची काळजी झाडचं घेतो. प्रकाशसंश्लेषन आणि पाणी बाहेर टाकणं, ही दोन्ही कामं, पानांना आता फार करावी लागत नाही. खरंतर त्याची गरजच राहत नाही. शिवाय सतत काम करुन, ही पानं थकतात. म्हातारी होतात. हळूहळू पिकू लागतात. पिवळी पडतात नि मग खाली पडतात. ”
“अरेरे!”
“रॉब्या, पण यात एक वेगळी जंमत होते.”
“कोणती?”
“ही पानं खाली पडण्यापूर्वीच त्याच ठिकाणी नवी पानं येतील याची काळजी झाडं घेतं. जुन्या पानांच्या देठाच्या मुळांजवळ पेशींची गर्दी होते. त्यातून एक विशिष्ट विकर पाझरु लागतो. हे विकर जुन्या पानाच्या देठाला खुडण्यासाठी मदत करतं नि मग पान खाली पडतं.”
“अरे देवा, जिथे तिथे गडबड आणि भानगडच भानगड!”
“पण ही भानगड पानांसाठी चांगलीच असते.”
“आता, हे काय भलतच?”
“अरे,पानं सातआठ महिने सारखे काम करतात. याकाळात, त्यांच्यात काही विषारी पदार्थ साचतात. पानं खाली पडल्याने या पदार्थांचा आपोआपच निचरा होतो. याचा अर्थ ही पडलेली पानं झाडाला नवी उर्जाच देतात. खाली पान पडतं, तेव्हा वर तिकडे झाडाच्या फांदिला नवी पालवीही फुटते. हे नवे पान जुन्यापानांपासूनच तयार झालं असतं, असंच समज.”
“मावशे, हे काहीच माहीत नव्हतं मला. मला वाटलं गेले माझे मित्र मला सोडून कायमचे. पण त्यांनी माझ्यासाठी नव्या मित्रांची सोय केली, हे दिसलचं नाही म्हणाला.” मामा म्हणाला.
तो हलकेच खाली उतरला त्याने खाली पडलेल्या पानाकंडे बघितलं, एक पान उचलून त्याला म्हणाला, थँक्यू मित्रा.
देठाजवळ आलेल्या नव्या पानाला हलकेच स्पर्श करुन, मावशीही खाली उतरली. हळव्या झालेल्या मामाकडे मग ती कितीतरी वेळ बघत बसली.
सुरेश वांदिले