
झोपेच्या गणिताचा गुणाकार नि भागाकार!
मालकीनबाई जेव्हा बघाव्या, तेव्हा झोपलेल्या दिसतात. एव्हढी झोप या बयेला कशी काय लागत असेल, असा प्रश्न रॉबिन्सनला अनेकदा पडायचा. त्याच्या लक्षात आलं की, मालकीनबाईंसोबतच मार्गारेट मावशीही सारखी डुलकी मारते. संधी मिळाली की पाय दुमडून, ढार्रमढूर झोपते. मार्गारेट मावशी, मालकीनबाईंची सख्खी बहीण तर नाही ना, अशीही शंका एकदोनदा रॉबिन्सनला आली. अशा प्रत्येकवेळी, त्याला शिंकावर शिंका आल्याने, आपल्याला आलेली शंका, कुशंकाच असल्याची खात्री त्याला पटली.
मात्र, एके दिवशी न राहवून त्याने, दोघींच्याही झोपेचा काय बरं संबंध? असा सवाल मावशीला केला. मावशी हसली. तिने मामाची मिशी ओढली नि काहीच न बोलता ढार्रमढूर झोपी गेली. मामाला त्यावेळी मावशीचा फार राग आला. त्याने मावशीच्या कानाजवळ जाऊन नेपोटल्या आला, नेपोटल्या आला, अशी बोंब ठोकली. मावशी धाडदिशी जागी झाली आणि घाबरुन इकडेतिकडे बघू लागली. तिला तिथे नेपालियन काही दिसला नाही. रॉबिन्सन शेपटी हलवत, कैसे बनाया, अशा नजरेनं तिच्याकडे बघू लागला.
“रॉब्या, कुठे दडलाय, तो मेला नेपोटल्या.”
“तो मेला नाही, तर इथून गेला.”
“कुठे गेला?”
“झोपायला.”
“मग, माझी झोप कशासाठी खराब केली त्याने?”
“त्याने नाही, मी केली.”
“गधड्या, हा चोंबडेपणा करायला सांगितलं कुणी?”
“काय करणार मावशे, तुम्हा सगळयांना इतकी झोप लागतेच कशी? या विचारानं माझी झोप उडालीय. तुला विचारलं, तर तू भाव खातेस. मग काय करणार मी?” कानाला खडा लावत मामाने मावशीला सॉरी म्हंटलं. मावशीचा राग कमी झाला. रॉब्याची ज्ञानतृष्णा शमवल्याशिवाय, तो शांत बसणार नाही, हे मावशीला ठाऊक होतं. त्यामुळे मावशीने “अट्रमफट्रम फू फू फू” हा मंत्र पुटपुटला. त्याचबरोबर ते दोघेही धुळीच्या आकाराचे झाले. मावशीने त्याला मालकीनबाईच्या बेडरुममध्ये नेलं. मालकीनबाई ढार्रमढूर घोरत होत्या. मावशीने मामाला, मालकीनबाईच्या फुगलेल्या नाकातून आत ढकललं. त्याच्या पाठोपाठ तीही आत शिरली. दोघेही मालकीनबाईंच्या मेंदूत शिरले.
“रॉब्या, आता तुला इथे झोपेचं गणित, झोपची बेरीज, झोपेचा गुणाकार नि भागाकार, सारं काही कळेल. ते बघ काळजीपूर्वक.” मावशीने, रॉबिन्सला सांगितलं. मामा सरसावून बसला.
त्याच्या नजरेसमोर झोपेचं शास्त्र उलगडत गेलं. त्याला दिसलं की, झोपचे वेगवेगळे प्रकार आणि टप्पे असतात. झोपेच्या काळात, मालकीनबाई दोन प्रकारची झोप घेतात. पहिला प्रकार म्हणजे, नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (एनआरइएम) किंवा मंदतरंग झोप. सध्या मालकीनबाई या मंदतरंगात, तरंगत असल्याचं त्याला दिसलं.
“या मंदतरंगाचे तीन टप्पे असतात. या टप्प्यातच मालकीनबाईंची ८० टक्के झोप होऊन जाते.” रॉबिन्सनच्या
कानात मावशी पुटपुटली.
“मग २० टक्के वेळेचं काय?” मामानं विचारलं.
“यावेळेत, मालकीनबाईंची, रॅपिड आय मुव्हमेंट (आरइएम) झोप सुरु असते. यास विरोधाभासी किंवा खळबळजनक झोप म्हणतात.” मावशीने सांगितलं नि मामाचं लक्षं या झोपेकडे वेधलं.
मालकीनबाई आता, २० टक्के झोपेच्या दालनात प्रवेश करत होत्या. त्यांचा हा प्रवेश संपल्यावर, त्या पुन्हा मंदतरंग झोपेच्या दालनात गेल्या. पुन्हा विरोधाभास दालनात आल्या. असं त्यांचं चार पाच वेळा झालं.
“रॉब्या, मंदतरंग झोपेचे तीन आणि विरोधाभास झोपेचे एक, अशा चार टप्प्यांमधून गेल्यावर, झोपेचं एक चक्र पूर्ण होतं. मालकीनबाई अशा चार ते पाच चक्रातून जातात, तेव्हाच त्यांची पूर्ण झोप होते. मनुष्यप्राणी किती वेळा हे चक्र पूर्ण करतो, आणि कोणत्या टप्प्यांमध्ये किती वेळ असतो, यावर झोपेचा काळ आणि गुणवत्ता अवलंबून असते.”
“म्हणजे गं काय?”
“राबू, मंदतरंग झोप ही हलकी, मध्यम आणि गाढ अशा तीन टप्प्यांमध्ये घडते. या वेळी, डोळे बऱ्यापैकी शांत आणि स्थिर असतात.”
“ही झोप म्हणजेच, एनआरइएम-नॉन रॅपिड आय मुव्हमेंट उर्फ मंदतरंग झोप ना मावशे.” मामाने मध्येच आपलं ज्ञान पाजळलं. झोपेचं गणित रॉबिन्सला चटकन कळल्याचं लक्षात आल्याने, मावशीने पटकन त्याचा गालगुच्चा घेतला.
“मामू अगदी बरोबर, मालकीनबाई जेव्हा हा टप्पा पार पाडतात, तेव्हा त्यांची खरी झोप सुरु हेाते.”
“मावशे, हलकी झोप म्हणजे गं काय?”
“अरे, ही झोपेची पहिली पायरी. यावेळी मालकीनबाई तशा अर्धवट जाग्या असतात. त्यांना झोपेची गुंगी यायला सुरुवात होते. याचा कालावधी एक ते सात मिनिटांचा असतो. या काळात शरीर शिथिल झालेलं नसतं. मात्र, मेंदू आणि शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. या काळात, मेंदूत मोठ्या लहरींची हालचाल किंवा क्रिया घडत नाही. ही हलकी झोप फारच नाजूक असते.”
“म्हणजे?”
“यावेळी किंचितसाही प्रकाश डोळयावर पडला किंवा आवाज आल्यास जाग येऊ शकते. मात्र अशावेळी जाग आली नाही तर, समजायचं की मध्यम झोपेचा, म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचा प्रवेश सुरु झालाय. या टप्प्यात शरीराचं तापमान कमी होतं. स्नायू शिथिल होतात, श्वाच्छोश्वासाचा वेग कमी होतो. ह्रदयाची गती मंद होते. डोळ्यांची हालचाल थांबते. मेंदूचं काम संथपणे सुरु राहतं.”
“अच्छा, म्हणूनच या टप्प्यात मालकीनबाईंना जाग येत नाही म्हणायचं.”
“होना, या काळात मेंदू संथ झाला तरी तो, झोपेच्या बाबतीत फार सावध असतो.”
“आँ!”
“प्रकाश किंवा आवाजामुळे झोपमोड होऊ नये म्हणून, मेंदू महाशय स्वत:च उत्तेजित लहरी निर्माण करतो. त्यामुळे बाह्य उत्तेजनाकडे शरीराच लक्षं जात नाही. झोपेच्या पहिल्या चक्रादरम्यान, या दुसऱ्या टप्प्याचा कालावधी साधारणत:१५ ते २० मिनिटे असतो. पुढच्या प्रत्येक चक्रादरम्यान याचा कालावधी वाढतो. त्यामुळे मालकीनबाईंच्या झोपेच्या एकूण कालावधीचा अर्धा कालावधी, या मध्यम टप्प्याचा असतो.”
“पुढे काय घडतं?”
“पुढे मालकीनबाई म्हण किंवा इतर मनुष्यप्राणी म्हण, ते झोपेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात.”
“या टप्प्यात काय घडतं?”
“हा तिसरा टप्पा, गाढ झोपेचा असतो. या काळात शरीराचे स्नायू, नाडी, श्वसनाचा वेग आणखी कमी होतो.” मावशीने सांगितलं. मामाचं लक्ष या टप्प्यातील मेंदूकडे गेलं . मेंदू महाशयांची, ‘डेल्टा स्पंदनं,’ वाढलेली हेाती. ही, ‘डेल्टा झोप,’ असल्याचं, मावशीने मामाच्या कानात सांगितलं. याच टप्प्यातील झोपेच्या काळात, शरीराची वाढ, उतींची दुरुस्ती, हाड आणि स्नायूंचं बळकटीकरण, रोगप्रतिकारशक्तीचं वाढणं, या बाबी घडलेल्या मामानं बघितल्या.
“या टप्प्यात मेंदुची काम करण्याची गती मंदावली असली तरी त्याची विचारक्षमता, सर्जनक्षमता आणि दिवसभराच्या आठवणींचे तो व्यवस्थित वर्गिकरण करतो. या कार्यासाठी असलेल्या स्वत:च्या योग्य कप्प्यांमध्ये अचुकरित्या ही माहिती ठेवतो.”
“मावशे, ही गाढ झोप कधी लागते गं?”
000
“रात्रीच्या पहिल्या प्रहारात ही झोप लागते. झोपेच्या पहिल्या चक्राच्या दरम्यान गाढ झोपेचा काळ २० ते ४० मिनिटांचा असतो. पुढच्या चक्रांमध्ये मात्र, या टप्प्यांचा कालावधी कमी होतो. या काळात मालकीनबाई खळबळजनक किंवा विरोधाभास म्हणजे आरइएम, प्रकारच्या झोपेत असतात. याच काळात मेंदुची क्रिया जागेपणी असताना, जशी असते, तशी आणि तितकी वाढते. त्यामुळे या झोपेला विरोधाभासी झोप म्हणतात.”
“ओके ओके, याचा अर्थ असा की, यावेळी, मालकीनबाईंच्या मेंदूचा आलेख काढल्यास, तो जागे असतानाच्या काळासारखा निघेल, असंच ना”,
“क्या बात है राबू, तुझी चाल तुरुतुरु, मेंदुही पळे भुरुभुरु. तुझं निरीक्षण अगदी बरोबरु. या काळात मनुष्यप्राण्याच्या शरीरातील स्नायू शिथील होतात. काहीजण या अवस्थेला तात्पुरता अर्धांगवायू किंवा पॅरॅलीसीस म्हणतात. मात्र, या स्थितीतही डोळ्यांची हालचाल आणि श्वाच्छोस्वाशाचे नियंत्रण करणाऱ्या स्नायूंच कार्य सुरु असतं. डोळे बंद असले तरी, बुब्बुळाची हालचाल या टोकापासून त्या टोकापर्यंत वेगाने सुरुच असते. जिभेचे स्नायू संथ झाल्याने श्वाच्छोस्वाशाच्या मार्गात अडथळे येऊ लागतात. याच टप्प्यावर मनुष्यप्राण्यास तीव्र स्वरुपाचे स्वप्न पडतात. विरोधाभास झोपेमध्ये मेंदुची क्रिया वाढलेली असल्याने, या काळातील, झोप तीव्र स्वरुपाची असते. झोपेचा हा टप्पा स्मरणशक्ती, ज्ञान, सर्जनशीलता यासारख्या क्रियांसाठी महत्वाचा असतो. याच काळात मेंदूत मोठे रचनात्मक आणि रासायनिक बदल घडतात. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी हे बदल आवश्यक असतात. साधारणत: २० मिनिटांची ही विरोधाभास झोप झाल्यावर, मनुष्यप्राणी त्यातून बाहेर पडतो. पुन्हा मंदगती झोपेच्या पहिल्या टप्प्यात जातो.”
“मावशे, हे चक्र संपतं कधी?”
“मनुष्यप्राणी उठेपर्यंत ते सुरु राहतं. झोपेचा कालावधी ९० मिनिटांपेक्षा कमी असल्यास मनुष्यप्राणी खळबळजनक झोपेच्या टप्प्यापर्यंत पोहचत नाही. मनुष्यप्राण्यास रात्रभर शांत झोप लागल्यास, सकाळच्या सुमारास, उत्तरार्धातील सत्रामध्ये खळबळजनक प्रकारची झोप लागते. बरेचदा झोपेच्या पहिल्या चक्रातील खळबळजनक झोपेचा कालावधी काही मिनिटांचा राहतो. त्यानंतर, मात्र हा कालावधी एक तासाचासुध्दा राहू शकतो. मालकीनबाईंसारख्या प्रौढ मनुष्यप्राण्यांमध्ये या प्रकारची झोप २० टक्के असते.”
“पण मित्रा, झोपेच्या कालावधीसोबतच झोपेची गुणवत्ता महत्वाची असते.” असा आवाज, मावशी आणि मामाच्या कानावर पडला. दोघेही दचकले. मात्र, त्यांच्याशी प्रत्यक्ष मेंदूच बोलत असल्याचे बघून दोघांच्या जिवातजीव आला.
“आम्हाला वाटलं, मालकीनबाईंच्या मेंदूत राक्षस कसा काय शिरला बाँ?” मामा जीभ चावत म्हणाला. मेंदू हसला. मावशीने त्याच्याशी हस्तांदोलन करुन विचारलं,
“मेंदूभाय, झोपेची गुणवत्ता म्हणजे रे काय?”
“मावशे, झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शरीर आणि मेंदू म्हणजे मी, विविध पुनर्रचना करतो, दुरुस्ती करतो. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातली गाढ झोप आणि विरोधाभास झोप योग्य प्रमाणात न मिळाल्यास, आरोग्यावर परिणाम होतो.”
“त्यामुळे, काय घडतं?” रॉबिन्सनने विचारलं.
“ते मी सांगण्याऐवजी, या मालकीनबाईंच्या काळाच्या मागे नि काळाच्या पुढे जाऊन, प्रत्यक्षच दाखवतोना.”
“तुला जादूपण येते,ओ वाव!”मामाने प्रतिक्रिया दिली.
“जादू नाहीरे रॉबू. माझ्यातील मज्जातंतूत बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. म्हणूनच मनुष्यप्राणी, यंत्रमानवात माझ्यासारखा मेंदू आणि त्यातील मज्जातंतूचे जाळे निर्माण करण्याची जोरदार खटाटोप करतोय.” मेंदूने सांगितलं. त्याने मालकीनबाईंच्या बालपणीचा कप्पा उलगडला. मालकीनबाई लहान बाळ असताना, मंदगती झोपेच्या पहिल्या टप्प्यातच गाढ झोपी जात. विरोधाभास झोपेच्या टप्प्यातसुध्दा बालपणातील मालकीनबाई अधिक काळ घालवत असल्याचे रॉबिन्सन मामा आणि मार्गारेट मावशीला दिसून आलं. मालकीनबाईंच्या काकूंना निद्रानाश आणि मामीला, झोपेत पाय झटकनं किंवा रेस्टलेस लेग सिंड्रॉम आणि सासुबाईंना दिवसा झोप येण्याची सवय होती. या असल्या सवयी किंवा आजार हे आनुवंशिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत किंवा जात असल्याचं मेंदुने सांगितलं. मालकीनबाईंचे बाबा खूप कॉफी पित तर आजोबांना चहाची सवय होती. त्याचा परिणाम दोघांच्याही झोपेवर झाला होता.
“मेंदू भाय, मनुष्यप्राण्यास झोप येते, म्हणजे नेमकं होतं काय?” मार्गारेटने विचारलं.
“खरच की, हेच तर मला जाणून घ्यायचं होतं.” मामा म्हणाला.
“राबू अरे, मनुष्यप्राणी जागे असताना, मेंदूमध्ये म्हणजे माझ्यात ॲडेनोसिन नावाचं संदेशवाहक गोळा व्हायला सुरुवात होते. त्याची पातळी वाढली की तो, अॅडेनोसीन रिसेप्टरशी जोडला जातो.”
“ही रिसेप्टरची काय भानगड?”मामाने तत्काळ विचारलं.
“भानगड नाहीरे मामू, माझ्यात, हे संदेशवाहक ग्रहण करण्यासाठी मज्जातंतू असतातना, त्यांना रिसेप्टर म्हणतात.” मेंदुने सांगितलं.
“मेंदू भाय,याचा परिणाम होतो तरी काय?”मावशीने विचारलं.
“मावशे,यामुळे मनुष्यप्राण्याला झोपेची भावना जाणवू लागते. कॉफी किंवा चहा मधील कॅफिन, या ॲडेनोसिन रिसेप्टरसोबत स्वत:ला बांधून घेऊन जागा अडवतो. त्यामुळे ॲडेनोसिन, झोपेची भावना निर्माण करु शकत नाही. कॅफिन, ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिनला उत्तेजित करतो. यांना कॅटॅकोलामाइन्स रसायनं म्हणतात. ही रसायनं उत्तेजित झाल्याने, ह्रदयाची गती, रक्तदाब, सावधपणा वाढतो, त्यामुळे झोप येत नाही.”
“म्हणजे तुझ्यात इतक्या १२ भानगडीची क्षमता आहे म्हणायचं.” मामाने प्रतिक्रिया दिली..
“भानगड नाहीरे मामू, हे शास्त्रीय तथ्य आहे. माझ्यात असणाऱ्या हायपोथॅलॅमस भागात, सरकॅडियन क्लॉक असतं.”
“आता हे काय? त्याचा आणि झोपेचा काय संबंध?” मावशीने विचारलं.
“अगं मावशे, ते एक प्रकारचं जैविक घड्याळच असतं.”
“टिक टिक टिक टिक!!”
“तसचं समज. या घड्याळीवर आवाज, प्रकाश, आहार, ताणतणाव, भावना यांचा परिणाम होऊन जैविकचक्र बदलतं. त्याचा झोपेवर परिणाम होतो. झोपेचं चक्र अनियमित झाल्यास, शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होऊन शरीरातील वेगवेगळया क्रियांवर त्याचा प्रभाव पडतो. शिवाय वय, लिंग, नैसर्गिक चक्र, यावर परिणाम होतो. एखाद्या आजारामुळे हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम झाल्यास, झोपेच्या सगळ्या किंवा काही टप्प्यांवर परिणाम होऊ शकतो. माझ्यातच असणाऱ्या पिनियल ग्रंथीव्दारे स्त्रवणाऱ्या मेलॅटोनीन हार्मोनची पातळी बाहेरील प्रकाश किंवा अंधारावर अवलंबून असते. हे हार्मोन झोपेची इच्छा तीव्र करून आणि शरीराचं तापमान कमी करुन झोपेचं चक्र नियंत्रित करतं. संध्याकाळी मेलॅटोनिनची पातळी वाढू लागते. रात्री ती उच्चतम होते. उजाडलं की कमी होते. रात्री दिवे, कॉम्प्युटर, मोबाईलमधून निघालेल्या कृत्रिम प्रकाशामुळे मेलॅटोनीनची पातळी वाढत नाही, तसंच झोपेची तीव्र इच्छाही निर्माण होत नाही. त्यामुळे झोपेचं चक्र बिघडतं. मंदतरंग टप्प्याच्या काळात शरीरातील पिट्युटरी ग्रंथीव्दारे वाढीसाठी आवश्यक ग्रोथ हार्मोन्स आणि गोनॅडोट्रोपिन हार्मोन तयार केली जातात. याचा अर्थ, शरीराची वाढ, स्नायुंचे बळकटीकरण, जखमेची दुरुस्ती यासाठी नियमित व उत्तम गुणवत्तेची झोप आवश्यक असते.” मेंदू, ही माहिती देत असतानाच कुणीतरी, हाय केलं.
००००
मेंदुने त्याला हॅलो म्हंटलं. रॉबिन्सन आणि मार्गारेटशी त्याच्यासोबत ओळख करुन दिली. तो होता, कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन!
“अरे, तू इकडे कसा काय?”मेंदूने विचारलं.
“काय भिडू, विसरलास वाटतं, माझी महती.”
“तुझी काय महती?” मामाने विचारलं.
“हं हं हं, आठवलं, आठवलं.” पटकन मेंदू म्हणाला.
“काय आठवलं?” मावशीने उत्सुकतेनं विचारलं.
“अगं, हा कॉर्टिसालसुध्दा मनुष्यप्राण्याच्या झोपेवर परिणाम करतो.”
“तो कसा?”
“सांगरे बाब तूच.”मेंदुने कॉर्टिसालला विनंती केली. तो सांगू लागला.
“मावशे, अगं मनुष्यप्राण्याच्या शरीरातील माझी पातळीसुध्दा दिवसरात्रीच्या चक्रावर अवलंबून असते. सकाळी माझी पातळी उच्च असल्याने मनुष्यप्राणी दक्ष आणि जागृत राहू शकतो. संध्याकाळी माझी पातळी कमी होत जाते. झोपेचं तंत्र बिघडल्यास, संध्याकाळनंतरसुध्दा माझी पातळी उच्चच राहते. त्यामुळे मग तणाव वाढतो. हा तणाव मनुष्यप्राण्याच्या झोपेला पळवून लावतो. मग मनुष्यप्राणी निद्रानाशाच्या सापळ्यात सापडतो. अनियमित झोपेमुळे लठ्ठपणा येत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसून आलय.”
“पण भुकेचा आणि झोपेचा काय बरं संबंध? ” मामाने विचारलं.
“लेप्टिन आणि घ्रेलिन या दोन हार्मोन्सच्या समतोलामुळे भुकेची जाणीव होते आणि उर्जेचं संतूलन राखलं जातं.”
“ते कसं?”
“लेप्टिन हार्मोन, ॲडीपोज टिश्यू(उती)मध्ये तयार होतं. त्याच्यामुळे पोट भरल्याचं कळतं. त्यामुळे भुकेची जाणीव कमी होते. जठारात तयार होणारं, घ्रेलिन हार्मोन खूप भूक लागल्याची जाणीव करत राहतं. कमी आणि निकृष्ट दर्जाच्या झोपेमुळे, घ्रेलिनची पातळी वाढते आणि लेप्टिनची पातळी कमी होते. परिणामी कॅलरीयुक्त अन्न खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे, मनुष्यप्राणी वेळीअवेळी काहीबाही खातो. त्यामुळे वजन वाढते. लठ्ठपणा येतो. रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण संतुलीत राखण्याचं काम इन्सुलिन नावाचं हार्मोन करतं. ते स्वादुपिंडात तयार होतं. कमी झोपेमुळे इन्सुलिनच्या परिणामकारक शक्तीत घट होऊन रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यातूनच पुढे मधुमेहाचा धोका संभवतो. पचनशक्तीवरही परिणाम होतो.”
“बापरे बाप, बराच दिसतोय झोपेचा ताप!” मावशी म्हणाली.
“अगं मावशे, एव्हढंच नाही, दुपारी मनुष्यप्राण्याने जास्त झोप घेतल्यास, रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. दुपारी झोपणाऱ्यांच्या शरीरातील रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढत असल्याचही सिध्द झालय. थकवा, डोकेदुखी, तणाव, स्मरणशक्ती, विचारक्षमता, या गोष्टी उत्तम झोपेवरच अवलंबून असतात. झोप आणि प्रतिकारशक्ती यांचाही परस्परसंबंध आहे. चांगली झोप लागते तेव्हा, रोगप्रतिकारक संस्था, सायटोकाइन्स हे घटक रक्तात सोडते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अपुरी झोप झाल्यास सायटोकाइन्स आणि संसर्गाशी लढणाऱ्या अँटीबॉडी कमी संख्येने तयार होतात. त्यामुळे अपुऱ्या झोपेने त्रस्त व्यक्ती सारख्या आजारी पडतात. चांगल्या गुणवत्तेची झोप येणाऱ्या व्यक्ती मंदगती आणि विरोधाभास झोपेच्या एकापाठोपाठ येणाऱ्या चक्रात सहजतेनं जातात. मनुष्यप्राण्याला झोप तशी फार प्रिय असल्याने तो सारखा यावर संशोधन करत राहतो.”
“होका, मग कोणकोणते संशोधन केलेय बुवा, या हुषार मनुष्यप्राण्याने”
“मामू, अरे याने पॉलिसोम्नोग्राफी नावाचं यंत्र शोधलय.”
“ते काय करतं?”
“या यंत्राव्दारे झोपेतल्या चाचण्या केल्या जातात.”
“म्हणजे?”
“मेंदुतील लहरी, स्नायुंची हालचाल, रक्तातील प्राणवायुची पातळी, ह्रदयाची गती, श्वाच्छोश्वासाची गती, डोळ्यांच्या हालचाली मोजल्या जातात.”
“वंडरफूल!”
“एन्सिफॅलोग्रॅम यंत्राव्दारे मेंदुची स्पंदनं, मोजल्या जातात. ॲक्टिग्रॅफी यंत्राव्दारे मनुष्यप्राणी किती क्रियाशील आहे नि किती विश्रांती घेतो, याचं मोजमाप केलं जातं. यामुळे, कधी झोपता, किती वेळ झोपता, झोपेतून किती वेळा उठता. सकाळी जाग कधी येते, झोप यायला किती वेळ लागतो, अशा गोष्टी तपासल्या जातात. त्याव्दारे, जैविक चक्र-सार्केडियम रिदम, मोजलं जातं. दिवसरात्रीचं झोपेचं चक्र कसं आहे, हे यातून कळतं. मल्टिपल स्लिप लॅटन्सी टेस्टव्दारे, दिवसा किती झोपता, दिवसा झोपण्याची इच्छा किती तीव्र होते, हे शोधलं जातं. नार्कोलेप्सी टेस्टव्दारे, सतत झोप घेण्याची इच्छा असणाऱ्यांचा आजार शोधला जातो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया आजारात, मनुष्यप्राणी मोठमोठ्याने घोरतो. अशा व्यक्तींच्या झोपलेल्या अवस्थेत स्नायू शिथिल होऊन जिभ मागे पडते. त्यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो. शरीरातील प्राणवायुची पातळी कमी होते. अशा व्यक्ती झोपेच्या पहिल्या टप्प्यातच जाग्या होतात. त्यांना मग गाढ झोप लागत नाही. झोपेच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक, काळ न घालवल्याने त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. अशा व्यक्ती निरुत्साही असतात. त्यांना कशातच रस वाटत नाही. अशा व्यक्तींच्या झोपेची चाचणी म्हणजेच, स्लिप टेस्ट केली जाते. त्यावरुन त्यांना कोणत्या प्रकारचा स्लिप ॲप्निया झालाय, हे निश्चित करुन औषधं दिली जातात. रेस्टलेस सिंड्रोम आजारात अधूनमधून पाय झटकले जातात किंवा पायांची अचानक हालचाल होते. आरइएम बिहेव्हियर डिसऑर्डर, या आजारात, मनुष्यप्राणी झोपेतील स्वप्नांमध्ये सक्रिय होऊन भाग घेतो. क्रॉनिक इन्सोम्निया म्हणजे दीर्घकाळाच्या निद्रानाश आजारात झोपच लागत नाही. लागली तरी, सतत उठावं लागतं. त्यामुळे झोपेचा दर्जा निकृष्ट असतो.”
“याचे परिणाम फार वाईट होत असतील ना?”
“होना, अपुऱ्या झोपेमुळे ह्रदयरोग, उच्चरक्तदाब, नैराश्य, तणाव, अर्धांगवायू अशासारख्या आजारांची शक्यता फार वाढते.”
“यावर काही उपाय नाही का?”
“उपाय तर आहेच. औषधोपचारपेक्षा उत्तम आहार, योग्य निद्रा आणि नियमित व्यायाम हे ते उपाय. बऱ्याच अभ्यासानंतर, संशोधकांनी, “३-२-१,” हा मंत्र शोधून काढलाय. ”
“काय आहे हा मंत्र?”मामाने उत्सुकतेनं विचारलं .
“झोपण्यापूर्वी तीन तास आधी जेवायला हवं. दोन तास आधी पाणी प्यायला हवं आणि एक तास आधी कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल बंद करायला हवा.”
“पण मनुष्यप्राण्याला, या तिनही सोप्या गोष्टी करणं कठीण जातं. मग तो सापडतो झोपेच्या दुष्काळात.”मेंदू म्हणाला. झोपेची माहिती देऊन बिचारा थकून गेल्याने, तो डुलक्याच द्यायला लागला. मालकीनबाईचं घोरणं जोरजोरात सुरु होतं. झोपची माहिती ऐकून ऐकून मामाही झिंगू लागल्याचं लक्षात येताच, मावशीने त्याला मालकीनबाईंच्या मेंदुतून जोरात नाकपुडीच्या बाहेर ढकललं नि तीही बाहेर पडली. आपल्या मेंदूत इतक्या भानगडी सुरु असतात, याची कोणतीही खबरबात नसणाऱ्या मालकीनबाई सुखनैव घोरतच होत्या. त्यांना तसं बघताच मार्गारेटही बाजूच्या सोफ्यावर जाऊन झोपेच्या स्वाधीन झाली.
हीच ती संधी, एकट्यानेच चीजवर डल्ला मारण्याची,हे रॉबिन्सनच्या लक्षात आलं. तो किचनमध्ये पळाला. चिजच्या भांड्यावर झेपावला. चिजचा आस्वाद घेताघेता, त्याला गाढ झोप लागली. या झोपेच्या टप्प्यात, मालकीनबाईंनी, मार्गेटलीला हाकलून लागवल्याचं त्याला स्वप्न पडलं.
सुरेश वांदिले
l