(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टाइम मशिन !

गोष्ट ऐकायला कुणाला नाही आवडत?  हो ना ! मग, आज मी तुम्हाला आमची गोष्ट सांगतो. फारच भारी बॉ, असं तुम्ही ही गोष्ट संपेल तेव्हा नक्कीच म्हणाल, हे मी माझ्या टोकटार नाकाची शपथ घेऊन सांगतो.

तर, तुम्ही आणि आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचा जन्म १५० (मिलियन)लक्ष वर्षापूर्वी झाला. तुम्हा मानवाचा जन्म साधारणत: सहा दशलक्ष वर्षापूर्वी झाल्याचं, तुमच्याच वेगवेगळया संशोधनात तुम्हाला आढळलं. आता आमच्या जन्माकडे वळतो. माझ्या पहिल्या पूर्वजाचं पहिलं पाऊल १२० दशलक्ष वर्षापूर्वी या वसुंधरेवर पडलं. अबाबा! असे आश्चर्योद्गार तुमच्या मुखातून बाहेर पडलेत ना!

आम्ही तुमच्यापेक्षा ११४ दशलक्ष वर्षे सिनियर म्हणजे तुमच्या शेडकोच काय हजारो वडीलधाऱ्यांपेक्षाही वडीलधारी! तुमच्या बाबतीतली गंमत म्हणजे तुमचा जन्म सहा दशलक्ष वर्षापूर्वी झाला असला तरी तुम्ही तेव्हा जसे होतात तसे आता राहिला नाहीत. ती काय, उत्क्रांती का बित्क्रांती म्हणतात ना ती तुमच्या बाबतीत सतत घडत राहिली आणि आजचं स्मार्ट आणि देखणं स्वरुप तुम्हाला मिळालं. पण आमच्या बाबतीतली जम्मत म्हणजे, आमचे पूर्वज १२० दशलक्ष वर्षापूर्वी जसे एंगडेबेंगडेहोते तसेच आम्ही आतासुध्दा आहोत. ता हे चांगलं की वाईट, हे बुवा, आपणास काही सांगता यायचं नाही. पण आहे ते स्वीकारायचं नि त्याची खंत करत बसायचं नाही हा आमचा स्वभाव. काहीही लपवायचं नाही, हे आमचं वैशिष्ट्य ! म्हणूनच मी तुम्हास आमची गोष्ट सांगायची असं ठरवलय ना!

आम्ही तुमच्यापेक्षा लाखो वर्षांनी वडीलधारे असल्याने पृथ्वीवर लाखो वर्षात ज्या ज्या घटना आणि घडामोडी घडल्या त्या सगळयांचे साक्षीदार आपोआपच ठरलो. आमच्या डोळयात आणि मेंदूत हा सगळा इतिहास बंदिस्त झालाय.

हे सगळं तुमच्या नजरेखालून गेल्यावर आम्ही कोण? नेमके कुठले? हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचली असणार. तर, आम्ही सिचेल्स देशात प्रामुख्याने राहत असू. तेव्हा आमचं नाव सूग्लोसिड्डेई असं काहीसं तुम्हीच ठेवलं. शंभर दशलक्ष वर्षांपूर्वी आम्ही जरा इकडे तिकडे भटकत भारतात आलो. इकडे येताना आम्ही आमचा जाण्याचा रस्ता विसरुन गेलो, मग काय? आता रडून-भेकून काही उपयोग नसल्याचं आमच्या लक्षात आलं. कोणत्याही संकटाशी  दटून सामना करण्याचा धडा आमच्या आईबाबांनी दिला असल्याने, आम्ही इथेच राहण्याचं ठरवलं. इथे आम्हाला नासिकाबॅट्रचूस सह्याद्रेनसीस असं मालगाडीसारखं भलंमोठं नाव तुम्ही दिलं.  खरं तर नासिका हे किती शॉर्ट आणि स्वीट नाव नाही का? पण जाऊ दे, तुम्ही आम्हाला कोणत्या का नावाने होईना ओळख दिली हे महत्वाचं.

आता आमच्या दोन शाखा झाल्या. एक तिकडे सिचेल्समध्ये आणि दुसरी भारतात. या शंभर दशलक्ष वर्षात आमच्या दोन्ही शाखांमध्ये फार फरक पडला नाही. त्यामुळेच आमची गणना “लिव्हिंग फॉसिल्स किंवा जिवंत जिवाश्म अशी होऊ लागली. फॉसिल्स किंवा जिवाश्म हे मृत गोष्टींचे बनतात. म्हणजे एखाद्या जिवंत प्राण्याचा, पक्षाचा किंवा सूक्ष्मजीवांचा सांगाडा, हाडं, दातं किंवा अंगावरचा सूक्ष्म केससुध्दा! दहा हजार वर्षापूर्वी कोणत्या का कारणांमुळे जमिनित,बर्फात गाडल्या गेलेल्या पशु-पक्षी-प्राण्यांच्या, उत्खणन किंवा खोदकामात सापडलेल्या अवशेषांना, फॉसिल्स म्हंटलं जातं. फॉसिल हा शब्द लॅटिन भाषेतला. त्याचा अर्थ खोदून काढणं. म्हणजेच ज्या प्राण्यांची अथवा पक्षांची अवशेषं दहा हजार वर्षापूर्वीची असतात ते सगळे जिवाश्म, अशी तुम्ही व्याख्या केली. या अशा जिवाश्मांचा उपयोग वेगवेगळया अभ्यासासाठी केला जातो. त्यातून मग पृथ्वीवरच्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आम्ही इतके पुरातन असूनही अद्याप जिवंतच असल्याने आमच्या अभ्यासातूनही अनेक नव्या गोष्टी आणि रहस्यसुध्दा कळू शकतं. या अर्थाने आम्ही जिवंत फॉसिल्स!

अरे बापरे, गोष्ट जरा गंभीर झाली ना. मात्र कधी कधी गोष्टीत काय चाललय हे नेमकं कळण्यासाठी असं थोडसं गंभीर व्हावं लागतं!

तर, या १०० दशलक्ष वर्षात वसुंधरेवर अनेक घटना आणि घडामोडी घडल्या. त्यात काही खूप चांगल्या होत्या तर काही अत्यंत वाईट. ते सगळं आम्हाला याची डोळा याची देही बघता आलं. लाखो वर्षापूर्वी एकसंघ असणारी पृथ्वी वेगवेगळया खंडात विभाजित होताना आम्ही बघू शकलो. आमच्या डोळयादेखत हिमालयाचा जन्म झाला. ज्याचं नाव कानी पडताच तुमच्या शरीरावर काटे उभे राहतात, अशा डायनोसारांचं कधीकाळी राज्य होतं या पृथ्वीवर. मात्र, त्याच्या नष्ट होण्याचा क्षण नि क्षण आमच्या डोळयांनी टिपून ठेवलाय. तुमच्यासारख्या सस्तन प्राण्यांच्या जन्माचे आम्हीच साक्षिदार! आमच्या डीएनए (डिऑक्सिरायबोन्युक्लिएक ॲसिड) सूत्रात हे सारं काही सामावलं गेलय. या डीएनएमध्ये सगळया अनुवंषिक बाबी टिपल्या जातात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवल्या जातात. पृथ्वीवरच्या सगळया घडामोडींबद्दल बरंच काही आमच्या डीएनएमध्ये सामावलं असू शकल्याचं तुमच्यापैकी काहीजणांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच ते आमचं वर्णन टाइम मशिन असं करतात.

टाइम मशिन म्हणजे ठाऊकाय ना तुम्हास? अहो, या मशिनमध्ये बसलं की तुम्ही भूतकाळात कितीही मागे आणि भविष्यकाळात कितीही पुढे जाऊन, काय काय घडलं  किंवा काय घडेल हे बघू शकता. अशी तुमचीच एक रम्य कल्पना! पण आमच्या डीएनएमुळे म्हणा किंवा डोळयांमुळे म्हणा ही रम्यकल्पना प्रत्यक्षात साकारु शकते. आमच्या डीएनएत शिरा नि जा मागे लाखो वर्षापूर्वी नि बघा या पृथ्वीवर काय काय घडलं  नि काय  काय बिघडलं ते!

सध्या आमचं वास्तव्य पश्चिम घाटात असतं. पण सगळया ठिकाणी नाही बरं का? फक्त केरळ आणि तामीळनाडूच्या काही भागातच. आम्ही वर्षभर जमिनीखाली असतो. फक्त पावसाळ्यापूर्वी एकदा बाहेर येतो. जमिनीखाली राहण्याचं तंत्र म्हणा किंवा आमची गरज म्हणा ते आम्ही शिकून घेतलं. आमचे पाठीमागचे पाय खूप बळकट असतात. त्यामुळे आम्हाला जमीन खोलवर खोदता येते. आमचं तोंड किंवा समोरचा भाग टोकदार आणि अतिशय संवदेनशील असतं. त्यामुळे आम्हाला पुढं जायला आणि अन्न सेवनासाठी मदत होते. मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं की आमच्याकडे नर मादीच्या मिलनाचा काळ सुरु होतो. पुढच्या पिढीच्या जननासाठी हे आवश्यक असल्याचं तुम्ही जीवशास्त्राच्या पुस्तकात वाचलच असणार. आमच्यातले नर विशिष्ट प्रकारचा आवाज देऊन मादिला बोलावतात. हा आवाज १०० मीटरपर्यंत जाऊ शकतो.  मात्र त्यात काही अडथळा आला तर मग आमची पंचाईत. तेव्हा नाइलाजाने मग पुन्हा आम्हाला जमिनीखाली जावं लागतं.

आम्हाला नैसर्गिकरित्या काही अफलातून शक्ती प्राप्त झालीय. आम्ही प्रचंड वाहत्या प्रवाहात, आखूड जागेत किंवा फटित आणि दगडाखाली अंडी घालू शकतो. आमचं बाळसुध्दा वैशिष्टपूर्ण असतं. तो ज्या दगडाखाली जन्म घेतो, त्याचाच रंग त्याला मिळतो. या दगडांना घटट पकडून ठेऊ शकेल अशा पध्दतीने त्याच्या तोंडाचा आकार बदलवू शकतो. त्यामुळे कितीही वेगाने या दगडावरुन पाणी पडत असलं तरी आमचं बाळं काही पाण्यात वाहून जात नाही. याचा अर्थ आम्ही (तुमच्या एव्हढे बुध्दीमान नसलो तरी ) किंचित किंचित बुध्दीमान आहोतच की.

असो, आम्ही इतक्या लाखो वर्षाचे रहिवाशी, पण आता यापुढे आम्ही शिल्लक राहू की नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय. आम्ही कुणालाही त्रास न देता जमिनीखाली राहतो. पण आता त्या जमिनीवरच कधी शेतीसाठी तर कधी रस्त्यासाठी तर कधी इतर बांधकामासाठी अतिक्रमणावर अतिक्रमण होताहेत. अतिप्रचंड बंधाऱ्यामुळे आमची राहती ठिकाणं उध्दवस्त व्हायला लागली आहेत. आता यात भर पडलीय ती पर्यावरणातील बदलाने. म्हणजे असं की जेव्हा पाऊस पडायला हवा तेव्हा पडत नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी वेळेवर पडत नाहीत. त्या पडत नाहीत म्हणून मग आमच्यातले नर, मादीच्या शोधात बाहेर पडू शकत नाहीत. मग पुढचं सारं गणितच कोसळतं. अंडी उबण्यासाठी त्यावेळी पुरेसं पाणी उपलब्ध नसतं. अशी एक ना दोन कारणं आमच्या मुळाशीच आलीय. किती दिवस आम्ही टिकून राहू याची शंका वाटते. पण आमचा डीएनए खूप पक्का असल्याचंसुध्दा आम्हास ठाऊक आहे. त्यामुळे पृथ्वी असेपर्यंत नक्कीच आम्ही स्वत:ला टिकवून ठेवू. पण यासाठी ही पृथ्वीच वाचायला हवी की राव….ते मात्र तुमच्या हाती आहे बरं का?

आम्ही कुठले हे तुम्हाला कळलय मघा. पण आम्ही कोण हे मात्र कथा संपायला आली तरी अजून सांगितलच नाही की …तसं आमचं शास्त्रीय नाव ओघाओघात माझ्या तोंडून निघून गेलच म्हणा. पण ते लक्षात ठेवायला अवघडच! आमची सोपी ओळख म्हणजे परपल फ्रॉग  अशी किंवा जांभळ्या रंगाचा बेडूक…डराँव डराँव बेडूक…इटुकला नि पिटुकला बेडूक…

        या पिटुकल्या बेडकात, टाइम मशिनची शक्ती असल्याचं समजून, फारच भारी बाँ, असं तुम्ही, आम्हास म्हंटल्याचं ऐकलंय की राव.

            डरॉव डराँव डराँव !

                                       सुरेश वांदिले

७०१,७वा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था, चारकोप,सेक्टर सहा, कांदिवली पश्चिम,मुंबई ६७

९३२४९७३९४७