
आनंदी व्हा रे!
काही दिवसांपूर्वी जागतिक आनंद क्रमवारी जाहीर झाली. त्यात भारताचा क्रमांक ११८ वा लागला. गेल्या काही वर्षात आपला देश, शंभराच्या पलिकडचा आपला क्रमांक सोडायला तयार नाही. आनंदी देशाची क्रमवारी तयार करण्यासाठी बरीच परिमाणं वापरली जातात. त्यात आपला देश बराच मागे असतो, हे ओघाने आलंच. आता, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, या आनंदी क्रमवारीचा आणि करिअरचा काय बुवा संबंध?
तसा बादरायण संबंध जोडायचा म्हंटला की कशाचाही कुठेही जोडता येतो. पण, आपल्याकडे करिअरच्या अनुषंगाने अपवाद वगळता फारच गंभीर आणि चिंतेचं वातावरण असतं. करिअर ही आनंददायी बाब असतानाही, त्यासाठी मात्र काळजीची सावली पांघरायला बहुसंख्य पालकांना आवडतं. या सावलीचं सावट मग मुलांवरही पडतं. वर्षानुवर्षे हे असच सुरु आहे. काळजीही संपत नाही आणि करिअरही घडत नाही. या दु:खाचे काटे कायम सलत राहतात.
पूर्वी किमान दहावीत मुलगा किंवा मुलगी गेल्यावर पालक, पुढच्या शिक्षणाचा आणि त्यानंतर करिअरचा विचार करु लागत. आता तर मुलगा पाचवीत जात नाही तोच, त्याला आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये किंवा मेडिकलला कसा प्रवेश मिळेल किंवा मिळण्यासाठी तो कशा हुशार वगैरे आहे, या विचाराचा घोडा पालकांच्या डोक्यात धावायला लागतो. त्यापाठिमागे मग लेकराला दौडावे लागते. मैदानात धावताना खेळताना, त्याची दमछाक होणार नाही पण या, आयआयटी ते मेडिकलच्या आभासी दौडिने मात्र बिचाऱ्याची फरफट होते. पण लक्षात कोण घेतो?
पाचवीतच सर्वोत्तम शिकवणी वर्गाचा शोध सुरु होतो. आजुच्याने, आपल्या मुलाला, अमूकतमूक १०० टक्के यश देणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये टाकले, बाजुच्याने तिथे टाकले अशी माहिती इकडून तिकडून मिळवली जाते. मग, याने किंवा त्याने मुलाला आताच टाकले आहे, तर आपलाही मुलगा/मुलगी कसा काय मागे राहणार? त्याला टाकायलाच हवे, या वर्गात. तरच तो स्पर्धेत टिकेल. उत्तम गुण मिळवेल. आयआयटीत आणि तेही मुंबई, दिल्ली, मद्रास, खरगपूर अशाच आयआयटीत जाईल, मेडिकलला जाईल, यावर पालक मंडळीचा जाम विश्वास असतो. या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून ते पाल्यास, सर्वोत्कृष्ट अशा शिकवणी वर्गात टाकतात. भरघोस शुल्क भरण्याचा अभिमान बाळगतात. पुढे घाण्याला बैल जोडल्याप्रमाणे या शिकवणी वर्गातून त्या शिकवणी वर्गात, मुलगा/मुलगी धावत राहते. खेळण्याच्या बागडण्याच्या, मैतर वाढवण्याच्या वयात हा पाल्य आयआयटी, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या अभ्यासात बालपण आणि कुमारपणही घालवून बसतो. इतक्या आधी शिकवणी वर्गांचा मारा सहन करणारे किती मुले/मुली पुढे खरोखरच त्यांच्या मनाजोगत्या आयआयटी किंवा मनोजगत्या अभियांत्रिकी शाखेत किंवा मेडिकलला प्रवेश मिळवतात, हा खरंतर सामाजिक संशोधनाचाच विषय ठरतो.
या सगळया शिकवण्याच्या माऱ्यात बऱ्याच मुलांचा मूळ अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होते. खरंतर कोणत्याही शिक्षणमंडळाची पाठ्यपुस्तकं विचारपूर्वक तयार केली जातात. त्यातले विषयघटक तज्ज्ञांनी निवडलेले असतात. तज्ज्ञांनीच ते लिहिले असतात. विद्यार्थ्यांचा पाया प्रत्येक वर्गात, त्याच्या त्याच्या वयाच्या आकलनानुसार पक्का व्हावा, अशाच पध्दतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. प्रत्येक वर्गातील हा अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, त्याच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि त्याचे विचारविश्व व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण नेमके याकडे दुर्लक्ष होते. पाया अर्धाकच्चा किंवा ठिसूळ राहतो. मग पक्की इमारत कशी उभी राहणार? डगमगत्या इमारतीला शिकवणी वर्गरुपी सोन्याचा मुलामा द्या नाही तर हिरे माणके लावा, इमारतीचं डगमगणं कसं थांबणार?
अभ्यासाचा पायाच जर पक्का नसेल तर शिकवणी वर्गातले असंख्य प्रश्नसंच, शेकड्याने होणाऱ्या सराव परीक्षा, आकर्षक वेष्टनातील मोठमोठ्या नोट्स याचा मर्यादितच उपयोग होणार किंवा काहीच उपयोग होणार नाही.
१२ वीनंतरच्या विविध ज्ञानशाखातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षा या मुलांच्या पाठांतर कौशल्याची परीक्षा घेणाऱ्या नसतात. हे पालकांनी ठामपणे लक्षात घ्यायला हवे. मुलांची संकल्पनात्मक बाजू किती भक्कम आणि ठोस आहे, हे जाणून घेण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. जो काही सिलॅबस असेल त्याच्या अलिकडे किंवा पलिकडे विचारलं जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या विषय घटकांच्या संकल्पना स्पष्ट नसेल आणि त्याला या संकल्पनांचा वापर प्रश्न सोडवण्यासाठी कसा करावा, याचेच आकलन झाले नसेल तर शिकवणी वर्गात शेकड्यानेच काय हजाराने सराव परीक्षा दिल्या असल्या तरी, प्रत्यक्ष परीक्षेत त्याची विकेट अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना किंवा काढताना उडू शकते. तशी ती बहुसंख्य विद्यार्थ्यांची उडतेच. त्याला चांगले गुण मिळत नाही. मग पुढचा सारा प्रवासच कठीण होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन पालकांनी मुलांना भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शिकवणी वर्गाचा रस्ता दाखवण्याएैवजी, मूळ अभ्यासक्रम कसा व्यवस्थित ग्रहण करेल, मनात आणि मेंदूत झिरपवेल याकडे लक्षं दिले पाहिजे. आजच्या अत्यंत स्पर्धेच्या काळात याचीच अधिक गरज आहे.
मूळ अभ्यासाचा पाया पक्का असेल तर, मुलांचा आत्मविश्वासही व्दीगुणित होतो. मग अशांना करिअरच्या वाटा आणि दिशाही चांगल्या तऱ्हेने सापडतात किंवा दिसू लागतात. या वाटेवरुन जाताना खाचखळगे आले तरी, अशी मुलं न खचता, न डगमगता पुढे जातात आणि यशस्वी करिअर घडवतात. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखांशिवाय अशा अनेक ज्ञानशाखा किंवा विषय आहेत, ज्यांचा अभ्यास मनापासून आणि आनंदाने केला, त्या विषयाचा अभ्यासाच्या सर्व संकल्पना आत्मसात केल्या, पदवीच्या काळात केवळ ज्ञानार्जनाकडेच लक्ष दिले तर, कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. करिअर घडणं ही काही एका दिवसातली किंवा एका वर्षातली बाब नाही किंवा आयआयटीतला प्रवेश म्हणजे उत्तम करिअरची गॅरंटी, असे काही आता राहिलेले नाही. गेल्यावर्षी मुंबईच्या आयआयटीतील काही विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवता मिळवता नाकी नऊ आले. मग नको त्या कंपनीत, अत्यल्प असे पॅकेज आणि नावडते काम या विद्यार्थ्यांना स्वीकारावे लागले. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. पण, आयआयटीतला प्रवेश हाच उत्तम करिअर घडवण्याचा राजमार्ग नाही, हे लक्षात ठेवायला हवं. यंदा आयआयएम (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) च्या बऱ्याच मुलांनाही मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी बरेच कष्ट गेले. करिअर घडवण्यासाठी चांगली संस्था निश्चितच हातभार लावते. पण त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांकडे असणारा आत्मविश्वास, ज्ञानसंपन्नता, संकल्पनातील स्पष्टता, प्रश्न आणि समस्यांचे आकलन करण्याची क्षमता आणि ते सोडण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी अशा बहुवीध घटकांवर उत्तम करिअर घडत असतं.
यंदाच्या “मार्ग यशाचा” मालिकेत, इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या पलिकडे असणाऱ्या विविध ज्ञानशाखांमधील करिअर संधीची माहिती दिली जाईल. विशेषत: कौशल्य विकासाला प्राधान्य देणाऱ्या अभ्यासक्रमांचा यात समावेश असेल. या अभ्यासक्रमांना वाणिज्य, कला, विज्ञान यापैकी कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल. सर्वसाधारण बुध्दीमत्तेच्या पण आवड आणि गती असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास हे अभ्यासक्रम करता येतील. यातील बहुतांश अभ्यासक्रम हे पदवीस्तरीय असतील, काही प्रमुख पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रसंगपरत्वे माहिती दिली जाईल. प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील, राष्ट्रीय महत्वाच्या संस्था (इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॅार्टन्स), राज्यशासनाच्या संस्था, शासकीय विद्यापीठे यांच्यातील अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल. यामध्ये या संस्थाच्या अभ्यासक्रामच्या प्रवेशासाठी असणाऱ्या चाळणी परीक्षेची पध्दत, यापरीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रमात नेमकं काय शिकाल, प्लेसमेंटच्या संधी, संपर्क संकेतस्थळ आदी बाबींचा समावेश असेल. गेल्या अनेक वर्षापांसून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या आणि नॅशनल इंस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये पहिल्या ५० मध्ये येणाऱ्या काही महत्वाच्या खाजगी संस्थांची प्रसंगपरत्वे माहिती दिली जाईल. वेगवेगळया शिष्यवृत्ती आणि उद्योजकते विषयी माहिती दिली जाईल.
यंदाचा, “मार्ग यशाचा” ही मालिका २०२५ मध्ये १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेलच, पण यंदा १० वीउत्तीर्ण होणाऱ्या आणि २०२६ मध्ये १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनांही होईल. पुढे काय करायचं? याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या मालिकेतील लेखांचा उपयोग होऊ शकेल.
सुरेश वांदिले
आनंदी व्हा रे!
काही दिवसांपूर्वी जागतिक आनंद क्रमवारी जाहीर झाली. त्यात भारताचा क्रमांक ११८ वा लागला. गेल्या काही वर्षात आपला देश, शंभराच्या पलिकडचा आपला क्रमांक सोडायला तयार नाही. आनंदी देशाची क्रमवारी तयार करण्यासाठी बरीच परिमाणं वापरली जातात. त्यात आपला देश बराच मागे असतो, हे ओघाने आलंच. आता, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, या आनंदी क्रमवारीचा आणि करिअरचा काय बुवा संबंध?
तसा बादरायण संबंध जोडायचा म्हंटला की कशाचाही कुठेही जोडता येतो. पण, आपल्याकडे करिअरच्या अनुषंगाने अपवाद वगळता फारच गंभीर आणि चिंतेचं वातावरण असतं. करिअर ही आनंददायी बाब असतानाही, त्यासाठी मात्र काळजीची सावली पांघरायला बहुसंख्य पालकांना आवडतं. या सावलीचं सावट मग मुलांवरही पडतं. वर्षानुवर्षे हे असच सुरु आहे. काळजीही संपत नाही आणि करिअरही घडत नाही. या दु:खाचे काटे कायम सलत राहतात.
पूर्वी किमान दहावीत मुलगा किंवा मुलगी गेल्यावर पालक, पुढच्या शिक्षणाचा आणि त्यानंतर करिअरचा विचार करु लागत. आता तर मुलगा पाचवीत जात नाही तोच, त्याला आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये किंवा मेडिकलला कसा प्रवेश मिळेल किंवा मिळण्यासाठी तो कशा हुशार वगैरे आहे, या विचाराचा घोडा पालकांच्या डोक्यात धावायला लागतो. त्यापाठिमागे मग लेकराला दौडावे लागते. मैदानात धावताना खेळताना, त्याची दमछाक होणार नाही पण या, आयआयटी ते मेडिकलच्या आभासी दौडिने मात्र बिचाऱ्याची फरफट होते. पण लक्षात कोण घेतो?
पाचवीतच सर्वोत्तम शिकवणी वर्गाचा शोध सुरु होतो. आजुच्याने, आपल्या मुलाला, अमूकतमूक १०० टक्के यश देणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये टाकले, बाजुच्याने तिथे टाकले अशी माहिती इकडून तिकडून मिळवली जाते. मग, याने किंवा त्याने मुलाला आताच टाकले आहे, तर आपलाही मुलगा/मुलगी कसा काय मागे राहणार? त्याला टाकायलाच हवे, या वर्गात. तरच तो स्पर्धेत टिकेल. उत्तम गुण मिळवेल. आयआयटीत आणि तेही मुंबई, दिल्ली, मद्रास, खरगपूर अशाच आयआयटीत जाईल, मेडिकलला जाईल, यावर पालक मंडळीचा जाम विश्वास असतो. या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून ते पाल्यास, सर्वोत्कृष्ट अशा शिकवणी वर्गात टाकतात. भरघोस शुल्क भरण्याचा अभिमान बाळगतात. पुढे घाण्याला बैल जोडल्याप्रमाणे या शिकवणी वर्गातून त्या शिकवणी वर्गात, मुलगा/मुलगी धावत राहते. खेळण्याच्या बागडण्याच्या, मैतर वाढवण्याच्या वयात हा पाल्य आयआयटी, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या अभ्यासात बालपण आणि कुमारपणही घालवून बसतो. इतक्या आधी शिकवणी वर्गांचा मारा सहन करणारे किती मुले/मुली पुढे खरोखरच त्यांच्या मनाजोगत्या आयआयटी किंवा मनोजगत्या अभियांत्रिकी शाखेत किंवा मेडिकलला प्रवेश मिळवतात, हा खरंतर सामाजिक संशोधनाचाच विषय ठरतो.
या सगळया शिकवण्याच्या माऱ्यात बऱ्याच मुलांचा मूळ अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होते. खरंतर कोणत्याही शिक्षणमंडळाची पाठ्यपुस्तकं विचारपूर्वक तयार केली जातात. त्यातले विषयघटक तज्ज्ञांनी निवडलेले असतात. तज्ज्ञांनीच ते लिहिले असतात. विद्यार्थ्यांचा पाया प्रत्येक वर्गात, त्याच्या त्याच्या वयाच्या आकलनानुसार पक्का व्हावा, अशाच पध्दतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. प्रत्येक वर्गातील हा अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, त्याच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि त्याचे विचारविश्व व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण नेमके याकडे दुर्लक्ष होते. पाया अर्धाकच्चा किंवा ठिसूळ राहतो. मग पक्की इमारत कशी उभी राहणार? डगमगत्या इमारतीला शिकवणी वर्गरुपी सोन्याचा मुलामा द्या नाही तर हिरे माणके लावा, इमारतीचं डगमगणं कसं थांबणार?
अभ्यासाचा पायाच जर पक्का नसेल तर शिकवणी वर्गातले असंख्य प्रश्नसंच, शेकड्याने होणाऱ्या सराव परीक्षा, आकर्षक वेष्टनातील मोठमोठ्या नोट्स याचा मर्यादितच उपयोग होणार किंवा काहीच उपयोग होणार नाही.
१२ वीनंतरच्या विविध ज्ञानशाखातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षा या मुलांच्या पाठांतर कौशल्याची परीक्षा घेणाऱ्या नसतात. हे पालकांनी ठामपणे लक्षात घ्यायला हवे. मुलांची संकल्पनात्मक बाजू किती भक्कम आणि ठोस आहे, हे जाणून घेण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. जो काही सिलॅबस असेल त्याच्या अलिकडे किंवा पलिकडे विचारलं जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या विषय घटकांच्या संकल्पना स्पष्ट नसेल आणि त्याला या संकल्पनांचा वापर प्रश्न सोडवण्यासाठी कसा करावा, याचेच आकलन झाले नसेल तर शिकवणी वर्गात शेकड्यानेच काय हजाराने सराव परीक्षा दिल्या असल्या तरी, प्रत्यक्ष परीक्षेत त्याची विकेट अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना किंवा काढताना उडू शकते. तशी ती बहुसंख्य विद्यार्थ्यांची उडतेच. त्याला चांगले गुण मिळत नाही. मग पुढचा सारा प्रवासच कठीण होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन पालकांनी मुलांना भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शिकवणी वर्गाचा रस्ता दाखवण्याएैवजी, मूळ अभ्यासक्रम कसा व्यवस्थित ग्रहण करेल, मनात आणि मेंदूत झिरपवेल याकडे लक्षं दिले पाहिजे. आजच्या अत्यंत स्पर्धेच्या काळात याचीच अधिक गरज आहे.
मूळ अभ्यासाचा पाया पक्का असेल तर, मुलांचा आत्मविश्वासही व्दीगुणित होतो. मग अशांना करिअरच्या वाटा आणि दिशाही चांगल्या तऱ्हेने सापडतात किंवा दिसू लागतात. या वाटेवरुन जाताना खाचखळगे आले तरी, अशी मुलं न खचता, न डगमगता पुढे जातात आणि यशस्वी करिअर घडवतात. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखांशिवाय अशा अनेक ज्ञानशाखा किंवा विषय आहेत, ज्यांचा अभ्यास मनापासून आणि आनंदाने केला, त्या विषयाचा अभ्यासाच्या सर्व संकल्पना आत्मसात केल्या, पदवीच्या काळात केवळ ज्ञानार्जनाकडेच लक्ष दिले तर, कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. करिअर घडणं ही काही एका दिवसातली किंवा एका वर्षातली बाब नाही किंवा आयआयटीतला प्रवेश म्हणजे उत्तम करिअरची गॅरंटी, असे काही आता राहिलेले नाही. गेल्यावर्षी मुंबईच्या आयआयटीतील काही विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवता मिळवता नाकी नऊ आले. मग नको त्या कंपनीत, अत्यल्प असे पॅकेज आणि नावडते काम या विद्यार्थ्यांना स्वीकारावे लागले. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. पण, आयआयटीतला प्रवेश हाच उत्तम करिअर घडवण्याचा राजमार्ग नाही, हे लक्षात ठेवायला हवं. यंदा आयआयएम (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) च्या बऱ्याच मुलांनाही मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी बरेच कष्ट गेले. करिअर घडवण्यासाठी चांगली संस्था निश्चितच हातभार लावते. पण त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांकडे असणारा आत्मविश्वास, ज्ञानसंपन्नता, संकल्पनातील स्पष्टता, प्रश्न आणि समस्यांचे आकलन करण्याची क्षमता आणि ते सोडण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी अशा बहुवीध घटकांवर उत्तम करिअर घडत असतं.
यंदाच्या “मार्ग यशाचा” मालिकेत, इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या पलिकडे असणाऱ्या विविध ज्ञानशाखांमधील करिअर संधीची माहिती दिली जाईल. विशेषत: कौशल्य विकासाला प्राधान्य देणाऱ्या अभ्यासक्रमांचा यात समावेश असेल. या अभ्यासक्रमांना वाणिज्य, कला, विज्ञान यापैकी कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल. सर्वसाधारण बुध्दीमत्तेच्या पण आवड आणि गती असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास हे अभ्यासक्रम करता येतील. यातील बहुतांश अभ्यासक्रम हे पदवीस्तरीय असतील, काही प्रमुख पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रसंगपरत्वे माहिती दिली जाईल. प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील, राष्ट्रीय महत्वाच्या संस्था (इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॅार्टन्स), राज्यशासनाच्या संस्था, शासकीय विद्यापीठे यांच्यातील अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल. यामध्ये या संस्थाच्या अभ्यासक्रामच्या प्रवेशासाठी असणाऱ्या चाळणी परीक्षेची पध्दत, यापरीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रमात नेमकं काय शिकाल, प्लेसमेंटच्या संधी, संपर्क संकेतस्थळ आदी बाबींचा समावेश असेल. गेल्या अनेक वर्षापांसून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या आणि नॅशनल इंस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये पहिल्या ५० मध्ये येणाऱ्या काही महत्वाच्या खाजगी संस्थांची प्रसंगपरत्वे माहिती दिली जाईल. वेगवेगळया शिष्यवृत्ती आणि उद्योजकते विषयी माहिती दिली जाईल.
यंदाचा, “मार्ग यशाचा” ही मालिका २०२५ मध्ये १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेलच, पण यंदा १० वीउत्तीर्ण होणाऱ्या आणि २०२६ मध्ये १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनांही होईल. पुढे काय करायचं? याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या मालिकेतील लेखांचा उपयोग होऊ शकेल.
सुरेश वांदिले