
कुणाचं चुकलं?
समीरचे बाबा विजयराव. विजयरावांचे बाबा संजयराव. म्हणजे संजयराव समीरचे आजोबा. आजोबांसाठी समीर जणू काही गुलाबाचं फुल. त्याला किती जपू नि कसं जपू. असं त्यांचं होतं. “आजोबा नाही तर, काय ते ट्रम्पबिम्प काका किंवा मोदीबिदी मामा, नातवाचा हट्ट पुरवणार ?” असा त्यांचा खाक्या. “इतके लाड चांगले नाही,” विजयरावांनी, संजयरावांना म्हणजेच त्यांच्या बाबाला एकदोनदा समजावून बघितलं. पण संजयरावांचे कान त्यावेळी हत्तीचे झाले. म्हणजे त्यांनी ऐकल्याचं न ऐकलं केलं. आजोबा आणि नातू यांच्यात आपण यापुढे यायचं नाही असं संजयरावांनी मनोमन ठरवलं.
त्यामुळे समीरचं चांगलंच फावलं. तो सांगणार नि आजोबा ऐकणार. त्याचा शब्द म्हणजे आजोबांसाठी ब्रम्हवाक्यच. समीरचे सगळेच हट्ट पुरवण्याच्या अट्टाहासामुळे आजोबांनी एकदा त्याला टीव्हीचा रिमोट दिला. सध्या देऊ नका, असा, त्यावेळी संजयरावांनी इशारा केला, “पण मी नाही तर ते देणार का?” असे भाव आजोबांच्या डोळयात उमटले नि त्यांनी संजयरावांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाइल समीरच्या हाती दिला.
रिमोट हाती आल्यावर समीरला जणूकाही अलीबाबाची गुहाच मिळाली. संजयरावांनी नुकताच, नवा स्मार्ट टीव्ही घेतला होता. त्यात इतके चॅनेल्स नि त्यांचे इतके कार्यक्रम. शिवाय गुगल, यू ट्यूब, रिल्स नि आणखी काय काय ? समीरचं तर, हे बघू की ते नि ते बघू की हे, असं होऊन गेलं. नातवाइतकेच आजोबा आनंदाने न्हाऊन निघाले.
आजोबांमुळे रिमोट मिळाल्याने, समीरने आजोबाला आपल्या गळ्यातील ताईतच केलं. शाळेत जाईपर्यंत हाती रिमोट नि आल्यापासून झोपेपर्यंत रिमोट, अशी समीरची दिनचर्या झाली. जेवतानासुध्दा, समोर टीव्हीवरील यूट्यूबचा कोणतातरी कार्यक्रम असल्याशिवाय पठ्ठ्याचा घासच तोंडात जाईना. टीव्ही बंद केला की आदळआपट सुरु नि पाठोपाठ जोरात भोकांड पसरणं आलंच. कितीही बाबापुता करा. समीरचं नाही म्हणजे नाही. रिमोट मिळाल्यावरच गडी जेवणार.
“हे सगळं तुमच्यामुळे होतय,” असं विजयरावांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण संजयरावांनी पुन्हा हत्तीच्या कानासारखे कान हलवले.
एकदा संजयरावांचे काका म्हणजे समीरचे चुलत आजोबा मुंबईवरुन आले. बऱ्याच दिवसांनी ते आल्याने त्यांच्यासाठी मेजवाणीचा बेत संजयरावांनी ठरवला. छान पंगत बसली. आजोबांच्या बाजूला समीर बसला. ताटात जिलेबीसह सर्व पदार्थ वाढले गेले. सदगुरुनाथ महाराज की जय, म्हणून भोजनास प्रारंभ झाला. सगळेजण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. पण, समीर मात्र गाल फुगवून बसलेला. कारण, बाबांनी टीव्ही काही सुरु केला नव्हता. नि त्याच्या हातात रिमोटही दिला नव्हता.
समीर जेवत नाही म्हणून आजोबांचा जीव अगदीच कासावीस होऊ लागला. त्यांनी सुरुवातीला समीरला जेवण्याचा आग्रह केला. पण टीव्ही सुरु केल्याशिवाय, न जेवण्याचा हट्ट काही समीर सोडेना .तेव्हा त्यांनी उठून संजयरावांच्या बाजूला असलेला रिमोट घेतला नि टीव्ही सुरु केला. टीव्ही सुरु होताच, समीर खिदळायला लागला. पण इकडे आतापर्यंत दाबून धरलेल्या रागाने संजयरावांना दगा दिला. ते ताडकन उठलेच. त्यांनी समीरच्या हातातून खसकन रिमोट हिसकला. धाडकन टीव्ही बंद केला. फाडकन रिमोट फरशीवर आदळला. रागाने संजयरावांकडे बघत ताट बाजूला सरकावलं नि ताडताड आतल्या खोलीत निघून गेले.
सगळेजण अवाक! हसतखेळत सुरु असणाऱ्या पंगतीवर उदासवाणी छाया पसरली. सगळयांनी कसंतरी जेवण उरकलं.
आपल्याकडे विजयरावांनी रागाने बघितलं याचा राग घेऊन संजयरावांनाही राग आला. त्यांनीही जेवण अर्धवट टाकलं नि ते त्यांच्या खोलित निघून गेले.
या सगळ्या प्रकारानं समीर भांबावून गेला. बाबा आपल्यावर रागवतात इतपर्यंत ठीक होतं.पण ते त्यांच्याही बाबांना रागावतात हे मात्र त्याच्यासाठी अघटीतच होतं.
आता कुणीच कुणाशी बोलेना. समीरचं तोंड बारीक झालं.
मुंबईचे आजोबा त्याला जवळ घेत म्हणाले,
“बघितलंस, तुझ्या हट्टाचा परिणाम? बाबाही उपाशी, तुही उपाशी नि आजोबाही उपाशी. आम्हीसुध्दा धड जेवलो नाही.”
“सॉरी आजोबा!” समीर रडत म्हणाला.
“आधी, आत जाऊन तू बाबांना सॉरी म्हण, नि यापुढे जेवताना टीव्ही बघण्याचा हट्ट करणार नाही, असं प्रॉमीस कर,” मुंबईच्या आजोबांनी त्याला समजावलं.
समीरने मान डोलावली. आतल्या खोलीत जाऊन त्यांने बाबांची क्षमा मागितली नि त्यांना यापुढे असं वागणार नाही हे कबूल केलं.
मुंबईच्या आजोबांनी, संजयरावांना, त्यांच्या खोलीतून बाहेर आणलं.
त्यांचा राग काही शांत झालेला नव्हता.
“अहो पण, भाऊसाहेब, आपणच मुलांचे नको ते हट्ट पुरवण्यासाठी अशा सवयी लावतो. तुमच्या नातवाला आधी ठाऊक होतं का, टीव्हीमधील युट्यूबचे कार्यक्रम? तुम्ही सवय लावली. तुम्ही जर सुरुवातीपासून त्याला समजावलं असतं, त्याला याचे तोटे सांगितले असते, गरज पडली तर रागावले असता, तर अशी आजच्यासारख्या परिस्थिती उद्भवली नसती ना.”
आजोबांना हे सांगणं पटलं असावं. ते तडक आतल्या खोलीत गेले नि त्यांनीही संजयरावांची क्षमा मागितली. संजयरावाच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी बाबांना मिठी मारुन सॉरी म्हंटलं. समीरने त्या दोघांचे हात पकडून समोरच्या खोलीत आणलं नि यापुढे आपण टीव्ही बघण्याचा हट्ट करणार नाही, अशी गळ्याला हात लावून शपथच घेतली.
सगळयांच्या चेह-यावर हसू आलं. वातावरण पुन्हा हसरं खेळतं झालं.
सुरेश वांदिले