(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भूत जोकोलिया

रॉबिन्सन उंदीर मामा, उदास चेहऱ्याने खाली मान घालून बसलेले मार्गारेट मनी मावशीनं बघितलं. मरु दे, आपल्याला काय त्याचं? असं तिचं एक मन म्हणालं. लगेच तिने एक डोळा बारिक करुन मामाकडे बघितलं. तिला त्याची दया आली. काही झालं तरी दोघांचं पटेना नि एकमेकावाचून वाचून करमेना असच नातं होतं. मामा नसेल तर भांडाभांडी करणार कुणाशी? मावशी स्वत:लाच म्हणाली. मामाला आपल्याशिवाय आणि आपल्याला त्याच्याशिवाय कुणी नाही हे तिच्या लक्षात आलं. बारिक केलेला डोळा मोठ्ठा करुन ती मामाजवळ गेली. त्याच्या डोक्यावरुन तिने हात फिरवला.

कायरे माम्या, एवढा उदास कां? कुणी मारलं बिरलं का? सांग मला, त्याला चांगलाच धडा शिकवते.

तसं नाही गं मार्गे मावशे?

मग?

मला वडापाव खायची इच्छा झालीय?

हात्तिच्या! इतकं फुसकं कारण?

तसं नाही गं,मला भीती वाटते.

कशाची रे भित्रूटल्या?

मावशे, वडा पावासोबत मिरची असते ना,तिची?

तिची कशाला? भीती तर माझी वाटायला हवी.

तुझी वाटतेच. मात्र मिरची तोंडात टाकली की जळायलाच लागतं गं तोंड! हा हा, ही ही, हू हू होतं जिवाचं.

ते मिरचीच्या तिखटपणामुळे होतं.

म्हणजे मावशे, तुला मिरची तिखट कां लागते, ते ठाऊक आहे?

मावशीला माहीत नाही अशी जगात एक तरी गोष्ट आहे का, माम्या?

मग मला सांग की ही गोष्ट.

मामा आणि मावशी सोफ्याच्या बाजूला आरामात बसले. मावशी सांगू लागली. मामा कान लांब करुन ऐकू लागला.

मावशी म्हणाली,

माम्या, सगळयाच मिरच्या काही खूप तिखट नसतात. काही कमी तिखट, काही मध्यम श्रेणीच्या तिखट असतात, तर काही अजिबातच तिखट नसतात.

पण मावशे, मिरचीला हा असा तिखटपणा येतो तरी कसा?

माम्या, मिरचीचा तिखटपणा हा तिच्या बियांमध्ये आणि आतल्या फुगीर शिरांमध्ये असतो.

म्हणजे मला नाही कळलं?

अरे, मिरचीच्या या दोन घटकांमध्ये कॅप्सायसिन नावाचं रसायन असतं. आपल्या जिभेवर स्वाद किंवा रुची निर्माण करणारे बिंदू असतात. त्यांचा या रसायनाचा संपर्क आल्यावर मिरचीच्या तिखटपणाची संवेदना मेंदुला कळते. त्यामुळे आपलं हा हू, हा हू सुरु होऊन जळजळ होऊ लागते. प्रत्येक मिरचीत कॅप्सायसिनचं प्रमाण कमी जास्त असतं.

याचा अर्थ ज्या मिरचीत कॅप्सायसिन अधिक ती मिरची झणझणित आणि ज्या मिरचीत हे रसायन कमी ती मुळमुळीत, असचं ना…

हुषार हो माझा मामू! मावशी त्याचा गालगुच्चा घेत म्हणाली.

मावशीला अंग घासत मामानं विचारलं,

मावशे मिरचीचा हा कमी जास्त होणारा तिखटपणा कळला कसा?

माम्या, हा मानव भारी हुषार. अमेरिकेतल्या विल्बर स्कोव्हिल नावाच्या शास्त्रज्ञानं १९१२ साली ही पध्दत शोधून काढली.

काय केलं त्याने?

त्यासाठी त्याने कॅप्सायसिनचं द्रावण केलं. त्यात पाणी घालून त्याचं प्रमाण कमी कमी केलं. हे द्रावण त्याने त्याच्या प्रयोगशाळेतील पाच सहाय्य्कंना प्यायला दिलं.

कशासाठी?

चवित काही फरक पडतो का हे बघण्यासाठी.

मग?

या प्रयोगाचा अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक मिलीलिटर द्रावणात कॅप्सायसिनचा एखादाच रेणू असतो. त्यामुळे तिखटाची मात्रा कमी असते. ही मात्रा एक असल्याचं त्याने सांगितलं. आपली भोपळी मिरची अशी असते.

त्याच्या अभ्यासातून मिरचीचा तिखटपणा ओळखण्यासाठी एक स्केल तयार झाली. ही स्केल आता स्कोव्हिल ऑर्ग्यानोलेप्टिक स्केल, या नावानं ओळखली जाते.

याचा काय उपयोग?

या स्केलमध्ये जेव्हा कॅप्सायसिनची दहा पटिने वाढ होते, तेव्हा ती मिरची महाभयंकर तिखट असते, हे सिध्द झालं.

अरे वा! पुढे काय झालं?

माम्या, स्कोव्हिल साहेबांना वाटलं संपलं आपलं संशोधन.

तसं नाही झालं का ?

नाही ना! ही माणसं फार खट. काही जणांनी या स्केलवर कॅप्सायसिनचं दहा प्रमाण असणाऱ्या मिरच्या काजूकथली किंवा गुलाबजामूनसारख्या मजेत खाल्या. आता आली का नाही पंचाईत.

म्हणजे कसं?

एखाद्याला एखादी मिरची भयंकर वाटू शकते तर तीच मिरची दुसऱ्याला मिळमिळीत वाटू शकते. त्यामुळे मिरचीचा तिखटपणा हा प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत असल्याचं स्कोव्हिल साहेबांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आणखी एक नवी पध्दत विकसित केली.

कोणती गं?

कॅप्सायसिनमधील वेगवेगळे घटक बाजूला काढण्यासाठी त्याने क्रोमॅटोग्रॅफी या तंत्राचा वापर केला. ही आहे एक रासायनिक पृथ:करणाची पध्दत. त्यात एखाद्या मिश्रणातील पदार्थ त्याच्या भौतिक गुणधर्मावर वेगळे केले जातात.

त्यामुळे काय झालं?

त्यातही स्कोव्हिल स्केलचा वापर केला गेल्याने फार काही नवं संशोधन हाती आलं नाही.

मग…

हा माणूस मागे थोडे हटतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील रिचर्ड क्रॉम्प्टन या शास्त्रज्ञाने नॅनो टेक्नॉलाजीचा वापर करुन मिरचीचा तिखटपणा मोजण्याची नवी पध्दती शोधली.

त्यात काही खोट नाही का काढली या खट माणसांनी?

नाही, कारण ही पध्दत अधिक वस्तुनिष्ठ आणि अचुक अशी आहे. याच पध्दतीचा वापर करुन आसाम, मेघालय, मनिपूर,अरुणाचल प्रदेश या राज्यातील एक मिरची जगात सर्वाधिक तिखट असल्याचं सिध्द झालं.

बापरे!

होना म्हणून तिला भूत जोकोलिया किंवा घोस्ट चिल्ली असं म्हणतात.

याचा अर्थ ही मिरची खाल्ली की भागो भूत आया, असं म्हणण्याची पाळी येते म्हणायचं.

 अगदी बरोबर. माम्या तुला एक प्रश्न नाही पडला.

कोणता?

ही भूत भूत जोकोलिया मिरची, भयानक तिखट असते म्हणजे किती भयानक? असं तुला नाही विचारावं वाटलं.

सॉरी!

माम्या प्रश्न नाही पडले तर ज्ञानात वाढ कशी होणार?

चुकलं माझं, तू सांग आता.

माम्या, स्कोव्हिलच्या स्केलवर ८५,५००० एकक असणारी मेक्सिको देशातील “हाबानेरा जातीची मिरची आढळून आली. तिच्यापेक्षा ही आसामी भूत भूत जोकोलिया ५० पट तिखट असल्याचं सिध्द झालं…

हे ऐकून मामाच्या डोळयापुढे तारे चमकले. त्याचे डोळे गरगरायला लागले. त्याने मान खाली टाकली.

रॉब्या ,गचकला की काय, म्हणून मावशीने त्याच्या नाकाजवळ हात नेला. श्वाच्छोश्वास सुरु होता. मावशीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण मामा काही उठेना. मावशीने इकडेतिकडे बघितले. फ्रिजवर टोपलीत असलेल्या मिरचीकडे तिचं लक्षं गेलं. तिने उडी मारुन एक मिरची तोंडात पकडली. मामाच्या जवळ येऊन त्याच्या उघडया तोंडात टाकली…

मामा मिरची चावू लागला. त्या तिखटाने त्याने खाडकन डोळे उघडले. भ भ भूत असं ओरडून तो थयथयाट करु लागला. मामाची फजिती बघून मावशी छद्मीपणे हसू लागली.

सुरेश वांदिले