
मंत्राची युक्ती!
तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती संपल्याचं आईच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा बाबांनी दुपारी चहा करायला सांगितलं, तेव्हा तिच्या ते लक्षात आलं.
“अरे बापरे!”, आईच्या तोंडून उत्स्फुर्तपणे निघून गेलं. त्याचवेळी स्वयंपाकघरात तिच्या अवतीभवती घुटमळत असलेल्या अलेक्झांडरने चमकून आईकडे बघितलं.
“तेजोमयीने काय झालं गं?” असं आश्चर्यानं विचारलं.
आईने चहापत्तीचा डबा उपडा करुन दाखवला. “अगं, पण आपल्याकडची चहापत्ती संपल्यांचं तू देशपांडेकाकूंना कां सांगितलं नाहीस.”
“पण माझ्याच्याने नाही म्हणवत नाही ना, तेजो.”
“आता बाबा रागावतील, त्याचं काय?”
“छे! छे! मी रागावणार नाही”. बाबा स्वयंपाक खोलीत येत म्हणाले.
“कां रागावणार नाही,तुम्ही?” असं चटदिशी तेजामयी बोलून गेली.
अलेक्झांडरने आधी तिच्याकडे चमकून बघीतलं. नंतर तो रागाने बघू लागला. आईविषयी असं काही बोललं की त्याला बरोबर कळत असे. तेजोमयीला ते लक्षात आलं. अलेक्झांडरला जवळ घेत ती म्हणाली.
“तसं नाही रे अलेक्झू, पण आता बघ, बाबांना चहा नाही ना मिळणार. देशपांडेकाकूंना आईने चहापत्ती दिली नसती तर अशी स्थिती आली असती का, तूच सांग?
आईकडे वळून प्रश्नार्थक नजरेने अलेक्झांडर बघू लागला.
“बरोबर बोलतेय ठोंब्या ती.पण काय करु राज्या, नकार देताच येत नाही ना मला.”
“मात्र, यावर उपाय योजला पाहिजे. अन्यथा आजच्या सारखी स्थिती पुन्हापुन्हा येऊ शकते”,बाबा म्हणाले.
दोघेही विचार करु लागले. अचानक तेजोमयीला सुचलं. तिने ते आईच्या कानात सांगितलं. पण तिला काही ते रुचलं नाही. तिने नापसंती दर्शवली.
“अलेक्झू, तूच सांग तुझ्या लाडक्या आईला. तुझ्याशिवाय ती कुणाचं ऐकत नाही. तेजोमयी अलेक्झांडरला म्हणाली.अलेक्झांडरने आईला मिठी मारली नि तिच्या चेहऱ्याकडे जीभ लांब करुन कुंईकुंई करु लागला. तेजोमयीचं ऐक असं त्याला सांगायचं होतं.
“बरं बरं बाबा, ऐकतं. तुम्ही सगळे एक झाल्यावर माझी सुटका थोडीच होणार.”आई अलेक्झांडरला कुरवाळत म्हणाली.
०००
दोनतीन दिवसांनी देशपांडेकाकू पुन्हा काहीतरी मागण्यासाठी आल्या. दारात पाऊल ठेवताच, तेजोमयीने आईच्या हातात एक कागद दिला. त्यावर एक श्लोक होता
आई सोफ्यावर बसून तो श्लोक म्हणू लागली
“मौनं कालविलम्बच्छ, प्रयाणं भूमिदर्शनम्/भ्रुकुट्यन्यमुखिवार्ता,नकारा: षडिवध: स्मृत:”
तिच्यासोबत तेजोमयीही म्हणू लागली. ते बघून अलेक्झांडरही कुंईकुंई करत साथ देऊ लागला. बाबाही तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागले. देशपांडेकांकूकडे कुणी लक्ष दिलं नाही. आईने दिशा बदलवली नि पुन्हा तोच श्लोक म्हणू लागली. इतर सर्वजणही तसंच करु लागले. देशपांडेकाकूंनी आधी हळू नंतर जोरात, “अहो तेजोमयीच्या आई,”असा आवाज दिला. दारावर जोरानं टकटक केलं. पण कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. देशपांडेकाकू थोडावेळ थांबून निघून गेल्या.
अलेक्झांडरने उडी मारुन आनंद व्यक्त केला. बाबा व तेजोमयीस हायसं वाटलं.
“अगं पण तेजो, या श्लोकाचा अर्थ तरी काय?कुणी पळून जावं असं काही सांगितलय कां त्यात?” आईने विचारलं.
“अगं आई, तू बरोबरच ओळखलं, श्लोककर्ता म्हणतो की, कुणी काही मागायला आलं किंवा नकार द्यायचा असेल तर तोंडावर नाही म्हणणं अवघड जात असेल तेव्हा, त्यासाठी या श्लोकात जालीम मात्रा दिलीय. कुणी काही मागितलं की कधी गप्प बसायचं,कधी निघून जायचं, कधी जमिनीकडे बघत बसायचं, भुवया वाकड्या करायच्या तर कधी दुसरीकडे बघत बोलायचं,असे नकार देण्याचे सहा प्रकार यात वर्णन केलेय.”
“वा वा छान!”
“आपण देशपांडेकांकुकडं लक्षं दिलं नाही. उत्तर द्यायला वेळ लावला आणि दुसरीकडे बघत बोलत राहिलो. देशपांडेकाकूंवर या श्लोकाच्या मंत्राचा प्रभाव पडला नि त्यांनी पोबारा केला. पुन्हा कधी त्या वस्तू मागण्यासाठी आल्याच तर हाच मंत्र उपयोगात आणायचा.”बाबा हसत म्हणाले.
“हो हो हो,” अशा आशयाची मान आणि शेपूट हलवून अलेक्झांडरने आपली सम्मती दर्शवली.