
अर्थकारणाचे महत्व
अमेरिकेच्या राष्ट्रपतिंनी, “समसमान आयातशुल्क” बॉम्ब सोडून दिल्याने, सगळ्या जगाचे अर्थकारण ढवळून निघाले आहे. या बॉम्बमुळे भारतीय शेअर मार्केटसह अनेक देशातील शेअर मार्केट आपटले. गुंतवणूकदारांचे काही लाख लाख कोटी रुपये (आभासी कां होईना) अक्षरक्ष: पाण्यात गेले. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी, सध्या सगळ्या राष्ट्रांचे जनजीवन किंवा अर्थव्यवस्था या, “आयात कर” बॉम्बभोवती फिरत असल्याचे दिसून येते. इतर कोणत्याही घटकांपेक्षा अर्थकारण किंवा अर्थशास्त्रच सर्वात महत्वाचे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
२०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात, मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील, प्रवेशाचे विश्लेषण करणाऱ्या बातमीनेही अर्थशास्त्राला मध्यवर्ती भूमिकेत आणले होते. या शैक्षणिक वर्षात मुंबई आयआयटीत प्रवेश घेणाऱ्या देशातील सर्वोच्च प्रज्ञावंतांनी चौथ्या क्रमांकाची पसंती इकॉनामिक्स अर्थातच अर्थशास्त्राला दिली. (पहिली पसंती कॉम्प्युटर सायंस, दुसरी इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर मेकॅनिकल या शाखांना होती.)
आयआयटीमधील प्रज्ञावंत जेव्हा एखाद्या विषयाला किंवा शाखेला अशी पसंती देतात, तेव्हा वारे कोणत्या दिशेने वाहताहेत हे लक्षात येते.
आयआयटीत, बॅचलर ऑफ सायंस इन इकॉनॉमिक्स, हा अभ्यासक्रम करता येतो. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- ॲडव्हान्स्ड, या कठीणतम परीक्षेत अत्युकृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. मुंबई आयआयटीत, अर्थशास्त्र या शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या ५०० किंवा ६०० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांपेक्षा फारतर दोन किंवा तीन गुण कमी पडलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी ठरवले असते तर इतर शाखा किंवा इतर टॉपच्या आयआयटीत कोणत्याही शाखेत सुलभतेने त्यांना प्रवेश मिळाला असता. पण, त्यांनी अर्थशास्त्राला प्रवेश घेऊन, पुढील काळात या ज्ञानशाखेस मिळणारे अत्याधिक महत्व अधोरेखित केले.
या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय आणि विश्लेषणात्मक कौशल्य, सादरीकरण किंवा संवादसंप्रेषण कौशल्याला महत्व देण्यात आलेय. त्यामुळे विविधांगी करिअर संधी उपलब्ध होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आघाडीच्या वित्तीय आणि गुंतवणूक सल्लागार संस्था, खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये तत्काळ मोठ्या पदावर आणि मोठ्या वार्षिक पॅकेजसह सामावून घेतले जाते.
आयआयटीत अर्थशास्त्र शिकवला जातो नि विद्यार्थी त्याला पसंती देतात म्हणूनच काही अर्थशास्त्राचे महत्व आहे, अशातला भाग नाही. अर्थशास्त्र ही कायमच महत्वाची ज्ञानशाखा राहिली आहे. अर्थशास्त्रात उच्च प्रशिक्षित असणारे डॉ. मनमोहन सिंघ हे आधी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर आणि पुढे देशाचे पंतप्रधान झाले. अर्थशास्त्र, या ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांना अशा मोठमोठ्या संधी कायम मिळत आल्या आहेत. प्रत्येक देशातील राज्यप्रमुखांच्या मदतीला एक किंवा अनेक अर्थसल्लागार असतात. (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात नुकतीच मुख्य आर्थिक सल्लागार पदाची निर्मिती केली आहे.) बहुतेक सर्वच मोठ्या कॉर्पोरट कंपन्यांमध्ये फायनांस कंट्रोलर किंवा वित्तीय नियंत्रक अशा मोठ्या पदावर अर्थकारणीच विराजमान आहेत. सगळ्या जगाच्या नाड्या राजकीय सत्ताधिशांच्या हातात असल्याचे दिसत असल्या तरी सारे राजकारण, समाजकारण धर्मकारण हे अर्थसत्तेभोवतीच फिरत असल्याने, अर्थशास्त्रातील तज्ज्ञांचे महत्व लक्षात यावे.
आपल्याकडील प्रज्ञावंत मुले किंवा मुली अजुनही बहुदा इंजनीअरिंग किंवा मेडिकल या शाखांच्या पलिकडे बघत नाहीत किंबहुना त्यांचे पालकही या दोन शाखांच्या पलिकडील तिसरी शाखा नाइलाजानेच स्वीकारताना दिसतात. अर्थशास्त्राचे हे सध्याचे आणि भविष्यातील महत्व लक्षात घेऊन प्रज्ञावंत मुलामुलींना आपला पहिला पर्याय अर्थशास्त्र ठेवायला हवा.
याचा अर्थ कुणीही अर्थशास्त्र या ज्ञानशाखेत प्रवेश घेऊ नये, हे स्पष्टच आहे. जसे, केवळ प्रवेश सुलभतेने मिळतो म्हणून इंजीनीअरिंग करण्याला काहीही अर्थ नसतो, तसेच कोणत्याही महाविद्यालयात अर्थशास्त्राला प्रवेश घेऊन पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केल्यास करिअर घडवण्यासाठी फार उपयोग होत नाही. अर्थशास्त्र हा विषय सांख्यिकी विश्लेषण आणि त्यावर आधारित निष्कर्ष याच्याशी निगडित असल्याने गणित आणि सांख्यिकी या विषयात चांगली गती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढे अभ्यासक्रमाच्या कालावधीत आणि नंतर करिअरमध्ये उत्तम कामगिरी करता येते.
या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जोखावे आणि या ज्ञानशाखेला स्वीकारावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आयआयटीतच प्रवेश मिळेल, हे तर शक्य नाही. मात्र, आपल्या देशात अर्थशास्त्राचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करायलाच हवा. अशा काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
(१) गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स-
या संस्थेने गेली अनेक दशके आपली गुणवत्ता आणि दर्जा टिकवून ठेवला आहे. सामाजिक हिताचे विविध प्रश्न आणि समस्यांवर सखोल संशोधन केले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अशा तिनही क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.
अभ्यासक्रम-
(१) बीएस्सी इन इकॉनॉमिक्स, कालावधी तीन वर्षे, (२) बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, कालावधी चार वर्षे.
मुख्य अर्थशास्त्रीय संकल्पनांचा पाया मजबूत करणे, सध्याचे प्रश्न आणि समस्यांच्या निराकरणासाठी अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा उपयोग, विविध समस्यांकडे बघण्यासाठी विश्लेषणात्मक दृष्टीचा विकास ही प्रमुख उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.
अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट (सीयूइटी-यूजी) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
प्लेसमेंट– या संस्थेत पुढील कंपन्या / विभाग प्लेसमेंटसाठी येत असतात- (१) एडेलविस म्युच्युअल फंड, (२) टाटा स्टिल, (३) निल्सेन, (४) रिलायंस, (५) निती आयोग, (६) भारत सरकारचा वित्त विभाग, (७) एसबीआय, (८) एसबीआय म्युच्युअल फंड, (९) इंडियन ऑइल, (१०) बिर्ला सन लाइफ, (११) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, (१२) केपिएमजी, (१४) फिक्की, (१५) मॉर्गन स्टॅन्ले, (१६) जे.पी.मॉर्गन, इत्यादी.
यंदा १२ वीत असणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी, या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आयआयटी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेपेक्षा, सीयूइटी-अंडर ग्रॅज्युएट किंवा सीयूइटी-पोस्ट ग्रॅज्युएट तुलनेने परीक्षा सोपी असते, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
संपर्क – ८४६ शिवाजी नगर डेक्कन, पुणे ४११००४, ईमेल-gokhleinstitute@ gipe.ac.in संकेतस्थळ-https://gipe.ac.in, दूरध्वनी-०२०-२५६८३३००
(२) डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी, या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान प्रदान करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्था विकसित केली जाणार आहे.
या संस्थेत पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम करता येतो.
अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक अभ्यास करताना विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, नैतिकमूल्ये आदी सामाजिक शास्त्रातील विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्थशास्त्रातील नव्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना शिकवले जाते व स्वतंत्र विचार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या सत्रानुसार क्रेडिट (श्रेयांक) आणि प्रमाणपत्र/पदविका देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुसऱ्या सत्रानंतर सर्टिफिकेट इन इकॉनॉमिक्ससाठी, चौथ्या सत्रानंतर डिप्लोमा इन इकॉनॉमिक्ससाठी, सहाव्या सत्रानंतर बीएस्सी इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी, आठव्या सत्रानंतर बीएस्सी(ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते.
अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. तथापि या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक. विद्यार्थ्यांना १२ वी परीक्षेत किमान ६५ टक्के गुण मिळणे आवश्यक. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीयुइटी-अंडरग्रॅज्युएट), देणे आवश्यक. संपर्क – www.cucetexam.in
संपर्क – जनाभारती मेन रोड, नागरभावी पोस्ट, बेंगळुरु- ५६००७२, दूरध्वनी – ८० – २३९९८५००, ईमेल- info@base.ac.in, संकेतस्थळ- base.ac.in
सुरेश वांदिले