(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

लष्करात थेट भरती

नुकताच जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- मेन परीक्षेचा निकाल घोषित झाला. जेइइ मेन परीक्षेच्या गुणांवर आधारित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्ट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, (आयआयआयटी), इतर केंद्रिय अभियांत्रिकी/तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश दिला जातो. त्याच बरोबर जेइइ-मेन गुणांच्या आधारावर भारतीय नौदल आणि भारतीय थल सेनेत, थेट प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध होते. सैन्यामध्ये उच्चश्रेणीचे करिअर करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या व प्रज्ञावंत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर तरुण/तरुणींनी तरुण/तरुणींनी या पर्यायाचा अवश्य विचार करायला हवा.

वेगळे करिअर आणि दर्जेदार जीवनशैली जगण्याची संधी यामुळे मिळू शकते. नागरीसेवांपेक्षा अधिक सुविधा, व्यक्तीमत्व विकासाच्या संधी, निवृत्तीनंतर उत्तम आयुष्य जगण्यासाठी करण्यात येणारे साहाय्य, देशात आणि देशाबाहेरही नियुक्ती, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, ही काही या सेवेची वैशिष्ट्ये सांगता येतील.

(१) नौदलात थेट भरती

भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत मुलीनांही अर्ज करता येतो. बीटेक पदवी जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीमार्फत दिली जाते.  

या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती (कमिशन) दिले जाते. त्यांना नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्दूत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी, जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेइइ) – मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर, जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.

या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारास १२  वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने  ७० टक्के आणि १२  वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.

निवड प्रकिया

प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना एसएसबी(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड- सेवा निवड मंडळ)च्या केंद्रांमध्ये मुलाखती/ चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते.  चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/ बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी  झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह  चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार, ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळातील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला

जातो.

संपर्क- www.joinindiannavy.gov.in

०००

 थलसेनेत थेट प्रवेश

भारती थलसेनेत थेट प्रवेशासाठी, १०+२ टेक्निकल एन्ट्री स्किम, ही योजना राबवली जाते. यासाठी केवळ पुरुष उमेदवारच अर्ज करु शकतो.

अर्हता- (१) जेइइ मेन परीक्षा, (२)१२  वी विज्ञानशाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये सरासरीने ६० टक्के गुण मिळवणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. (३) वयोमर्यादा साडेसोळा वर्षे ते साडे एकोणवीस वर्षे.

या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. हा कालावधी संपल्यावर त्यांना, लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.

या योजनेंतर्गत प्रशिक्षणाचे टप्पे- (१) मुलभूत लष्करी प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते ऑफिसर प्रशिक्षण केंद्र गया, येथे दिले जाते. (२) फेज वन (टप्पा एक) – नियुक्तीपूर्व प्रशिक्षण – याचा कालावधी तीन वर्षाचा असून ते कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते. (३) नियुक्ती नंतरचे प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते सुध्दा कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते.

अभ्यासक्रमाच्या पूर्तेतनंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची अभियांत्रिकी पदवी  प्रदान केली जाते. या उमेदवारांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाल्यावर दोन वर्षात कॅप्टन या पदावर पदोन्नती दिली जाते. पुढे टप्प्याटप्प्याने पदोनत्ती होत राहते.

अभ्यासक्रम/प्रशिक्षणाचे तीन वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५६,१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना लेफ्टनंट पदाचे संपूर्ण वेतन, भत्यासह लागू केले जाते.

निवड प्रकिया

या योजनेअंतर्गत निवडीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, १२  वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. यासाठी विशिष्ट कटऑफ गुण निर्धारित करण्यात येतात. निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन (एसएसबी)बोर्डा पुढे मुलाखती/चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही चाळणी मानसोपचार तज्ज्ञ, समूह चाळणी अधिकारी आणि मुलाखत घेणारे अधिकारी यांच्याव्दारे घेतली जाते.

प्रत्येक उमदेवारास दोन टप्प्यातील निवड प्रकियेतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारासच दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. पहिल्या  टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना लगेच परत पाठवले जाते. चाळणी परीक्षा पाच दिवस चालते. दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाळणी  घेतली जाते. एसएसबीने निवडलेल्या आणि वैद्यकीय बोर्डाने, वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठरवलेल्या उमदेवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते. अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार करताना एसएसबीच्या मुलाखतीमधील गुण आणि जेइइ-मेन मधील गुण, यावर तयार केली जाते. या दोन्हींचे वेटेज निवड मंडळामार्फत ठरवले जाते.

या चाळणी परीक्षेत काही अपघात किंवा जखम झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.

संपर्क-www.joinindiaarmy.nic.in

०००

अग्निपथ योजना

लष्करातील तिनही दलातील भरतीसाठी केंद्रसरकारने, अग्नीपथ ही योजना कार्यान्वित केली आहे.  साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील १०वी/१२वी उत्तीर्ण मुले या योजनेंतर्गत अर्ज करु शकतात. चार वर्षासाठी या उमेदवारांची निवड केली जाते. त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी त्यांना ४ लाख ७६ लाख रुपयाचे पॅकेज दिले जाईल. चौथ्या वर्षापर्यंत या पॅकेजमध्ये ६ लाख ९२ हजार रुपयांपर्यतंची वाढ होईल. चार वर्षानंतर सेवानिधीच्या स्वरुपातील, १० लाख ४ हजार रुपये दिले जातील. शिवाय यामध्ये व्याजाची रक्कम समाविष्ट केली जाईल. सेवानिधीच्या रक्कमेला आयकर लागणार नाही. निवड झालेल्या अग्निविरांमधून २५ टक्के अग्निविरांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे सेवेत कायम केले जाईल. काही राज्यसरकार आणि वेगवेगळया शासकीय आस्थापनांनी, या उमेदवारांना सामावून घेण्याचे ठरवले आहे. या अग्निविरांना लष्करी शिस्तीतील प्रशिक्षण मिळाल्याने, चार वर्षाच्या कालावधीत अग्निवीरांचे रुपांतर, सक्षम, समर्थ आणि आधुनिक कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.

संपर्क https://www.mygov.in/campaigns/agniveer/

(१) अग्निवीर थलसेना- अग्निवीर जनरल ड्युटी- १० वी उत्तीर्ण, अग्निवीर टेक्निकल- १२ वी (भौतिकशासत्र, गणित, रसायनशास्त्र), अग्निवीर क्लार्क/ स्टोअरकीपर- कोणत्याही शाखेतील १२वी, अग्निवीर ट्रेडसमन- १० वी, अग्निवीर जनरल ड्युटी (महिला पोलीस)- १० वी, संपर्क- https://joinindianarmy.nic.in/eligibility-criteria-for-agniveer-recruitment-process.htm

(२) वायूसेना- अग्निवीरवायू नॉन कोम्बॅटंट- १० वी, संपर्क- https://agnipathvayu.cdac.in/

(३) नौसेना- अग्निवीर एसएसआर (सिनिअर सेकंडरी रिक्य्रुट)- १२ वी- भौतिकशास्त्र, गणित किंवा ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी, एमआर (मॅर्टिक रिक्य्रुट)- १०वी, संपर्क- https://www.joinindiannavy.gov.in

(इथे दिलेली माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे. १०+२ टेक्निकल एन्ट्री किंवा १०+२ नौदल एन्ट्री  आणि अग्निवीर निवडीबाबतच्या विविध टप्पे आणि शैक्षणिक, वैद्यकीय अर्हता, प्रशिक्षण, वेतन, पदोन्नती, याची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित दलाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.)

सुरेश वांदिले