
टूर निघाली…
अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या वेगवेगळ्या धोरणे आणि निणर्यांमुळे सध्या जग ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेला जाणाऱ्या अनेक देशांच्या प्रवशांच्या संख्येत मोठी घट झाली. याला अपवाद एक देश ठरला तो म्हणजे भारत. याकाळात भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटक पवाशांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे निदर्शनास आले. भारतातून अमेरिकेत (उदा- मुंबई ते सॅनफ्रंसिस्को) थेट विमानसेवेचे तिकिट दरही लक्षणीयरित्या घटल्याचे दिसून आले. याचा अर्थ असाच की भारतीय पर्यटकांना, पर्यटनाचा मनोसक्त आनंद घेणे महत्वाचे वाटते. कोण काय निर्णय घेते किंवा धोरणे आखते, हे काही त्यांच्या पर्यटन आनंदाला ग्रहण लावू शकत नाही.
आता, पेहलगाम प्रकरणानंतर काही काळ काश्मिर पर्यटनाला खिळ बसण्याची शक्यता आहे. (तसे घडेलच असे नाही.) पेहलगाम घटनेनंतर, पर्यटकांनी लगेच दुसऱ्या पर्यांयाचा शोध घेण्यास सुरु केल्याच्या बातम्या यायला सुध्दा लागल्या. याचा अर्थ असा की, पर्यटक आता, अनामिक भीतिने घरी बसून राहणार नाहीत. खरेतर पर्यटन उद्योगासाठी हे सुचिन्हच आहे.
गेल्या दोनतीन वर्षात भारतीय पर्यटन आणि आतिथ्यशीलता उद्योगाने मोठीच झेप घेतली आहे. करोनाकाळात झालेले सर्व नुकसान भरून काढत, या उद्योगाने आता चांगला नफा मिळवायला सुरुवात केली आहे. २०२८ पर्यंत या उद्योगाची उलाढाल ५ लाख १२ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच कालावधीत परकीय पर्यटकांची संख्या ३० मिलियन या आकड्याला पार करण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालायच्या अनुमानानुसार पुढील दशकात या क्षेत्राची वार्षिक वाढ २० टक्केंच्या आसपास राहील.
२०२५-२६ केंद्रिय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी २५४१.०६ कोटींची तरतूद करण्यात आली. पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकासाला प्राधान्य, ५० सर्वोच्च पर्यटन केंद्राचा विकास, होम स्टे सारख्या स्वयंरोजगार संकल्पनेचा अंगिकार करण्यासाठी, मुद्रा कर्जाची सुविधा, इ व्हिजा सुविधेला चालना, दळणवळण आणि संपर्कयंत्रणेला अधिक सक्षम करणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या अर्थसंकल्पताच स्वदेश दर्शन योजना दोन, भारतातच उपचार (हिल इन इंडिया)या संकल्पनेसह वैद्यकीय पर्यटनास चालना, धार्मिक पर्यटन, ज्ञान भारतम मिशनव्दारे वारसा स्थळांची जपणूक या घटकांना साहाय्य केले जाणार आहे. यामुळे विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
या सर्वबाबी लक्षात घेतल्यास, पर्यटन क्षेत्राला वेगवेगळया प्रकारच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. ही गरज भागवण्याचे काम, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीएम) ही संस्था करत असते. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था असून या संस्थेचे ग्वाल्हेर, नॉयडा, भूवनेश्वर , गोवा, आणि नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत.
संस्थेच्या वतिने (१) बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, (२) मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल हे दोन अभ्यासक्रम चालवण्यात येतात.
या दोन्ही अभ्यासक्रमांच्या, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची, प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. यंदा ही परीक्षा ८ जून २०२५ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ ही आहे.
एमबीए आणि बीबीए अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी, दिल्लीशी संलग्नित करण्यात आले आहेत.
बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. खुल्या सवंर्गातील उमेदवारास ५० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा, याच संवर्गातील ज्या उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली असेल, त्यांच्यामधून भरल्या जातात.
प्रवेश प्रकिया- या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो.
(१) आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट– ही परीक्षा ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा, नॉयडा आणि इतर काही केंद्रावर घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावण्यात येईल. तिनही घटकांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल. त्यासाठी या प्रवेश परीक्षेतील किंवा सीयुइटी परीक्षेतील कामगिरीला ७० टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी १५ टक्के वेटज दिले जाते. ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण १००. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा १२वी परीक्षेचा असतो. या अभ्यासक्रमाच्या एकूण ३७५ जागा आहेत.
किंवा
(२) सीयुइटी- युजी २०२५ (सेंट्रल युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट)
(२) एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल. या क्षेत्राशी संबंधित हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारची आव्हानं स्वीकारण्याचं कौशल्य आणि तंत्र प्रदान केलं जातं. एकूण ७५० जागा भरल्या जातात.
अर्हता – विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले विद्यार्थी ही चाळणी परीक्षा देऊ शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेबर २०२५ पर्यंत लागायला हवा.
प्रवेश प्रक्रिया
प्रवेशासाठी दोन पध्दती अवलंबण्यात येतात-
(१) आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट– ही परीक्षा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, नेल्लोर आणि इतर केंद्रांवर घेतली जाईल.
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण १००. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा हा पदवी परीक्षेचा असतो. ही परीक्षा किंवा उपरोक्त नमूद परीक्षेतील गुणांवर आधारित निवड विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावलं जाते. अंतिम निवड करताना प्रवेश चाळणी परीक्षेतील कामगिरीला ७० टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी १५ टक्के वेटज दिलं जातं.
किंवा
पुढील चाळणी परीक्षेपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी- (१) मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, (२) कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट, (३) सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (५) झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट , (६) जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (७) असोशिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल मार्फत घेतली जाणारी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. (८) सीयुइटी-पीजी २०२५ (सेंट्रल युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- पोस्ट ग्रॅज्युएट)
शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या वेगवेगळया संस्थांमार्फत विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. साधारणत: १५० विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो.
प्लेसमेंट
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार (१) मेक माय ट्रिप, (२) थॉमस कूक, (३) ली पॅसेज टू इंडिया, (४) टीयूआय डॉट इन, (५) द रिट्ज कार्लटॉन, (६) कुओनी, (७) यात्रा डॉट कॉम, (८) हॉलिडे इन, (९) आयआरसीटीसी, (९) केरला हॉलिडे मार्ट, (१०) शेरॅटॉन हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस, (११) बनायन टूर ॲण्ड ट्रॅव्हल, (१३) मॅरिऑट हॉटेल्स रिसॉर्ट, (१४) बाल्मर लॅवरी ट्रॅव्हल आणि व्हॅकेशन, (१५) पॅलेस ऑन व्हील्स, (१६) इंडियन हॉरिजॉन-इंडियन ट्रॅव्हल एजन्सी, (१७) जिंजर, (१८) ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, (१९) ग्रीन ॲडव्हेंचर्स, (२०) ॲडव्हेंचर टुर्स इंडिया, (२१) हॅप्पी टूर-कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट, (२२) राजविलास जयपूर आदी कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालं आहे.
संपर्क – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२४३७३००, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in
सुरेश वांदिले
०००