(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सर्वांना संधी असली तरी…

काही दिवसांपूर्वी १२ वीचा निकाल लागला. दरवर्षीपेक्षा यंदाच्या निकालाची टक्केवारी कमी असली तरी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लाखावर जाते. या सगळयांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. जेइइ- मेनचा निकाल लागल्यामुळे, १२ वीमध्ये विशिष्ट टक्केवारी मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, एनआयटी (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)  आणि देशातील इतर संस्थांमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. बऱ्याच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालातील अखिल भारतीय स्तरावरील १५ ते २० टक्के जागा, जेइइ- मेनच्या गुणांचा आधार घेऊन भरल्या जातील. देशातील काही नामवंत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण संस्थांच्याही चाळणी परीक्षा एव्हाना झाल्या असतील व त्यांचेही निकाल लवकरच लागतील किंवा लागले असतील. त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असे म्हणता येईल. महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान सीइटीचा निकाल लवकरच जाहीर होईल. तो झाला की, या गटातील हजारो विद्यार्थी, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील. काही ‍विद्यार्थी औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला जातील. काही कृषी अभ्यासक्रमाला जातील. ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही ते, आपल्या शहरातील किंवा मुंबई, पुणे नागपूर, नाशिक कोल्हापूर अशासारख्या मोठ्या शहरांमधील विज्ञान महाविद्यालयात बीएस्सीला प्रवेश घेतील.

नीट परीक्षा आणि सीइटी जीवशास्त्र गटाचा निकाल लागल्यावर, आणखी काही हजार विद्यार्थी, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएचएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशलन थेरपी, नर्सिंग, पॅरॉमेडिकल अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतील. उर्वरित बीएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील. याचा अर्थ विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी, हे कोणत्या ना कोणत्या ना महाविद्यालयात प्रवेश घेतील.

वाणिज्य आणि कला शाखा

वाणिज्य आणि कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे. यातील काही हजार विद्यार्थ्यांनी, बीबीए/बीएमएस अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सीइटी दिली असणार. तो निकालही नजिकच्या काळात लागेल. काही हजारावर विद्यार्थ्यांना, या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल. पाच वर्षे कालावधीच्या बीए-एलएलबी अभ्यासक्रमाला काही हजार मुले प्रवेश घेतील. हॉटेल मॅनेजेंट, डिझायनिंग अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. या ज्ञानशाखांच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या प्रवेशासाठी, चाळणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतील.

एवढे झाल्यावरही वाणिज्य आणि कला शाखेतील बऱ्याच जणांना, पुढे काय? चा प्रश्न सतावत राहील. सध्यातरी त्यांच्यापुढे चांगली महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये, पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यावाचून पर्याय नाही. ज्यांना बारावीमध्ये चांगले गुण मिळाले असतील, त्यांना त्यांच्या मनाजोगत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. उर्वरित इतरांनी काय करायचं?

खरेतर इतर विद्यार्थ्यांनी लगेच हताश किंवा निराश होण्याचे कारण नाही. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्याने, बऱ्याच महाविद्यालयांनी नवे रोजगाराभिमुख आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करता येतात. या अभ्यासक्रमांमधून टप्प्याटप्याने बाहेर पडता येते. सहा महिन्यानंतर प्रमाणपत्र, एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षानंतर ॲडव्हान्स्ड किंवा प्रगत पदविका तीन वर्षानंतर पदवी प्रदान केली जाते. या प्रत्येक टप्प्यासाठी विशिष्ट अशी कौशल्यपातळी एनएसक्यूएफ (नॅशनल स्किल क्वालिफिकेश फ्रेमवर्क)ने निश्चित केली आहे. त्या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थी, विशिष्ट स्वरुपातील कौशल्य पातळी गाठतो. त्यानुसार त्याला रोजगाराची संधी मिळू शकते. उदा- पदवी प्राप्त उमेदवाराची एनएसक्यूएफ पातळी सात, ॲडव्हान्स्ड पदविका प्राप्त उमेदवाराची – सहा आणि पदविका प्राप्त उमेदवाराची पाच समजली जाते. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर असतो. इंटर्नशीप करावी लागते.

कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नजिकच्या महाविद्यालयांमध्ये अशा अभ्यासक्रमांचा शोध, प्रत्यक्ष जाऊन घ्यायला हवा. अनेक महाविद्यालयांनी, वाणिज्य आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश घेता येतील, असे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (उदा- बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझायनिंग, बीए सॉयकॉलॉजी, बीएस्सी ॲनिमेशन ॲण्ड व्हीएफएक्स, बीएस्सी फॅशन डिझाइन. बॅचलर ऑफ व्होकेशन इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, बीएमएस- रिटेल मॅनेजमेंट, बीएमएस- कॅपिटल मार्केट, बीए- मल्टिमीडिया ॲनिमेशन, बीए/बीएस्सी- व्हिज्युएल इफेक्ट्स, बीएमएस- इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड  पब्लिक रिलेशन, बीएमएस- ॲडव्हर्टायजिंग कम्युनिकेशन डिझाइन, बॅचलर ऑफ व्होकेशन इन रिअल इस्टेट मॅनेजमेंट किंवा फायनांशिअल मार्केट्स ॲण्ड सर्व्हिसेस)  अशासारखे अभ्यासक्रम, हे विशिष्ट प्रकारच्या तंत्र आणि कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात.

कौशल्य विकास

राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख महाविद्यालयांमध्ये, कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतील, असे अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे वाणिज्य आणि कला  शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला कल, आवड, गती, रस, बुध्दिमत्ता, आकलनक्षमता आणि व्यक्तित्व अशा बाबींचा प्रामाणिकपणे विचार करुन अभ्यासक्रमांची निवड करायला हवी. या महाविद्यालयांमध्ये, या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो. आपल्या परिसरातील अशी महाविद्यालये नक्कीच शोधता येतात.

प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षण संस्था किंवा महाविद्यालयात पुढील बाबींची सुविधा असल्याची खात्री करुन घ्यावी, (१) नॅक (नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडेटेशन काऊंसिल) प्रमाणपत्र, (महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेच्या दर्जाचे प्रमाणपत्र) , (२) एनआयआरएफ (नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क) गुणवत्ता व दर्जावर आधारित क्रमांक रँकिंग, (३) प्लेसमेंट सुविधा, (४) इंटर्नशीप सुविधा, (५) ग्रंथालय, (६) प्रयोगशाळा, (७) क्रीडांगण, (८) उच्चप्रशिक्षित मनुष्यबळ, (९) व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणारे उपक्रम. या सर्वच बाबी असणारे महाविद्यालयात निश्चितच दर्जेदार समजावे, व प्रवेशासाठी प्राधान्य द्यावे. अशी माहिती संस्था किंवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असायला हवी. नसल्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती करुन घ्यावी.

कौशल्य निर्मिती आणि रोजगारक्षम अशा या अभ्यासक्रमांमुळे पुढे काय?चा प्रश्न बऱ्याच अंशी मिटू शकतो. मात्र या, अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर करिअर घडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी विद्यार्थ्याला झोकून देऊन अभ्यास करण्याची गरज राहील. या अभ्यासक्रमाचा भर प्रात्यक्षिकांवर अधिक असतो. मात्र, त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सैध्दांतिक ज्ञानही पक्के करावे लागते. त्यासाठी, या अभ्यासक्रमाचा तीन किंवा चार वर्षाचा कालावधी, हा त्यावरच लक्ष केंद्रित करणारा असला पाहिजे. कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना भरपूर वेळ असतो, असा एक समज किंवा अपसमज असतो. समजा असा काही वेळ असल्यास, त्याचा सदुपयोग, या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अवांतर वाचन, तांत्रिक कौशल्ये प्राप्त करणे, इंग्रजी, मराठी या भाषा समृध्द करणे, सादरीकरणाचे कौशल्य हस्तगत करणे, संवादकौशल्य वाढवणे, लिहिण्याचे कौशल्य वाढवणे, अशा चौफेर विकासासाठी करायला हवा.

महाविद्यालयातील ग्रंथालये ओस पडलेली असतात. इतरत्र आणि कोणत्याही सटरफटर गोष्टीत टाइमपास किंवा वेळ घ्यालवण्याएैवजी विद्यार्थ्यांनी आपली पावलं महाविद्यालयातील ग्रंथालयाकडे वळवली पाहिजेत. या काळात, इंडियन एक्सप्रेस, फायनांशिअल एक्सप्रेस, लोकसत्ता सारखी महत्वाची वृत्तपत्रे, नियतकालिके, भारत सरकारचे प्रकाशन असलेले, भारत वार्षिकी अशी पुस्तके, यांचे अधिकाधिक वाचन करायला हवे. त्याचा फायदा, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे वेगळ्या पध्दतीने विचार करण्याची, विविध घटना घडामोडिंचा कार्यकारणभाव समजून घेण्याची, निष्कर्ष काढण्याची क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी होऊ शकतो. हा पाया, या काळात मजबूत केल्यास पुढे केंद्रिय नागरी सेवांपासून ते राज्य नागरी सेवांच्या परीक्षांमधील पेपरमधील उत्तरे सोडवताना, मुलाखतींमध्ये होऊ शकतो. चांगल्या पाठांतरापेक्षा अशा विकसित झालेल्या क्षमता इतर उमेदवारांपेक्षा तुम्हाला चार पावले समोर ठेवता येतात. या काळात महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेने किंवा विद्यापीठाने, प्रत्येक वर्षासाठी जो काही अभ्यासक्रम ठरवून दिला असेल, त्यातील प्रत्येक विषयघटक, उपघटकांचा अभ्यास करायलाच हवा. परिक्षेत हे येऊ शकते किंवा ते येऊ शकत नाही किंवा अमुकतमूक घटकावरच अधिक प्रश्न विचारले जातात, वगैरे बाबींकडे लक्ष दिल्यास, परीक्षेत खूप गूण ‍मिळतिलही, पण तुमचे ज्ञान अर्धवट राहील. आजच्या काळात परीक्षेतील गुणांपेक्षा ,ज्ञानाची उपयोजिता, कौशल्य या बाबीच महत्वाच्या ठरतात.

सुरेश वांदिले