(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आयटीआय – कौशल्यातून उन्नतीकडे

मागच्या वर्षी, आयटीआय (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रवेश प्रकियेसंदर्भातील एक बातमिने सर्वांचे लक्ष वेधून  घेतले. आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना १० वीत ९० टक्के गुण मिळाले होते. उत्कृष्ट महाविद्यालयात ११ वी प्रवेशाचा पर्याय उपलब्ध असताना, त्यांनी आयटीआयच्या मार्गावरुन जाणे श्रेयस्कर समजले. (यंदासुध्दा असेच घडेल, अशी आशा करायला हरकत नाही.)

या सर्व मुलांचे आणि विशेषत: पालकांचे कौतुकच करायला हवे. कारण, ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, आपल्या मुलासाठी इंजिनीअरिंग किंवा मेडिकल अशी स्वप्ने बघू लागतात. त्यात काहीही गैर नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या पाल्याला आयटीआयमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, ही बाब अनुकरणीय आहे. हे सर्व विद्यार्थी पुढील काही वर्षात तंत्रकुशल बणून प्रगतीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करु लागतील. बुध्दीकौशल्य, तांत्रिक कौशल्य, परीश्रम आणि संयम या गुणांच्या बळावर काही वर्षात यशाला गवसणीही घालतील. तंत्रकुशल मनुष्यबळाला रोजगार आणि स्वयंरोगाराच्या संधी टप्प्याटप्यावर मिळत राहतील. जे या संधीचे सोने करतील, ते कोणत्याही अभियंत्यापेक्षाही समोर जाण्याची क्षमतासुध्दा प्राप्त करतील.

आयटीआयटमधून प्राप्त होणारी तंत्रकुशलता ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम करु शकते, ही बाब लक्षात ठेऊन  मुलाचा कल, बौध्दिक क्षमता, आर्थिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करुन पालकांनी आयटीआयचा पर्याय स्वीकारायला हवा.

महाराष्ट्रात, ४१९ शासकीय आयटीआय आहेत. यामध्ये १ लाख ३९ हजार ९२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ५८८ खाजगी आयटीआयमध्ये १ लाख ५५ हजार ७३२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दहावीची परीक्षा ज्या जिल्ह्यातून दिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी, त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ९० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

शासकीय आणि खाजगी आयटीआय मधील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाइन पध्दतीने राबवण्यात येतात. अशी पध्दत राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया, या पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होतात.

प्रशिक्षण

आयटीआयमधे एकूण ८३ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अभियांत्रिकी गटातील एक वर्षं कालावधीच्या १८ आणि दोन वर्षे कालावधीच्या ३ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षे कालावधीच्या २८  आणि २ वर्षे कालावधीच्या १ व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश आहे. १ अभ्यासक्रमांसाठी १०वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर ७२ अभ्यासक्रमांना केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दिले जाते). या अभ्यासक्रमांमध्ये ७० टक्के भर प्रात्यक्षिकांवर व ३० टक्के भर सैध्दांतिक (थिअरी) वर दिला जातो.

सुविधा

(१) प्रात्यक्षिकांसाठी हत्यार संच, (२) अॅप्रॉन, (३)  कच्चामाल, (४) स्टेशनरी, (५) ग्रंथालय, (६) पुस्तकपेढी, (७) गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, (८) जाण्यायेण्यासाठी रेल्वे व बसच्या पाससाठी शिफारस, (९) आदिवासी मुला-मुलांकरिता स्वतंत्र वसतिगृह, (१०) रोजगारासाठी नोंदणी, (११) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार सुविधा. (१२) खुल्या संवर्गातील मुलामुलींना माफक शैक्षणिक शुल्क. (१३) आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कात सूट, अनुसूचित  जाती ,जमाती आणि भटक्या जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क माफी, (१४) वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये निर्वाह भत्ता, जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही त्यांना दरमहा ५०० निर्वाह भत्ता, (१५) अनुसूचित जाती संवर्ग आणि अल्पसंख्याक संवर्गातील विद्यार्थ्यांना नियमानुसार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, (१६) २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून अनूसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अल्पसंख्याक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळेल, त्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते. (१७) १५० तासांचे, ऑन द जॉब ट्रेनिंग दिले जाते.

केवळ महिलांसाठी आयटीआय

महिलांना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांनाही विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. यामध्ये ३७७६  मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये ६ ते ८ व्यवसाय अभ्यासक्रम आहेत, त्या ठिकाणी दोन अभ्यासक्रम मुलींसाठी राखीव ठेवावे लागतात.  ४ अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना १ अभ्यासक्रम राखीव ठेवावा लागतो. केंद्रीय प्रवेश पध्दती अंतर्गत उपलब्ध जागांपैकी ३०  टक्के जागा मुलींसाठी आरक्षित ठेवण्यात येतात.

दहावी उत्तीर्ण कोणत्याही विद्यार्थीनींना हे अभ्यासक्रम करता येतात. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मंडळाकडून उमेदवार तांत्रिक वा व्यावसायिक विषय घेऊन दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास त्यांच्यासाठी एकूण उपलब्ध जागांपैकी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात.

शिकावू उमेदवारी योजना

महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील २५ हजाराच्या आसपास उद्योग/ कारखाने/ औद्योगिक आस्थापनांमध्ये ७० हजारच्या आसपास अशी संधी उपलब्ध करुन दिली जाते.

खाजगी, निमशासकीय आणि खाजगी औद्योगिक आस्थापनांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. देशपातळीवर वेगवेगळ्या ३९ गटातील २५८ व्यवसायांमध्ये या योजनेंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाते. महाराष्ट्रात अशा व्यवसायाची संख्या १८१ आहे. आवश्यकतेनुसार या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते. संबंधित आस्थापनांमध्ये, अशा उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाते. प्रादेशिक स्तरावर यासाठी आयटीआयमध्ये भरतीमेळावे आयोजित केले जातात. त्याची जाहिरात वेगवेगळया वर्तमानपत्रात दिली जाते.

अप्रेंटिसशीपच्या काळात विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार पुढीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाते- (१) इयत्ता ५ वी ते ९ वी उत्तीर्ण- ५ हजार रुपये, (२) इयत्ता १० वी उत्तीर्ण- ६ हजार रुपये, (३) इयत्ता १२ वी उत्तीर्ण- ७ हजार रुपये, (४) राज्य किंवा राष्ट्रीय प्रमाणपत्र धारक – ७ हजार रुपये, (५) तंत्रज्ञ (व्यावसायिक) – ७ हजार रुपये, (६) तंत्रज्ञ (पदविकाधारक) – ८ हजार रुपये, (७) पदवीधारक – ९ हजार रुपये. या विद्यावेतनात दुसऱ्या वर्षी १० टक्के आणि तिसऱ्या वर्षी १५ टक्के वाढ केली जाते.

उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना

२०२२ पासून शासकीय आयटीआयमध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी शिकलेल्या कौशल्य (स्किल सेट) संचानुसार  समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू किंवा उत्पादनांची निर्मिती केली जाते. यामुळे प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक या दोघांचीही तंत्रकुशलता वाढते. या योजनेंतर्गत तयार झालेल्या वस्तुंमध्ये आवश्यक सुधारणा करुन त्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. यामुळे प्रशिक्षणार्थींना मोबदला मिळतो व संस्थेलाही आर्थिक लाभ मिळतो.

अभियांत्रिकीची स्मार्ट दिशा

१० वी नंतरचा दोन वर्षे कालावधीचा आयटीआय अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी राखीव ठेवण्यात येतात. हे विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाच्या कोणत्याही शाखेत थेट व्दितीय वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरतात.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने त्यांच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना, आयटीआय विद्यार्थ्यांना काही अटी-शर्तींसह प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले आहे. १ वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम, १ वर्षाची  औद्योगिक अप्रेंटिसशीप व १२ वी आणि दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम व  आणि  १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.

संपर्क- संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुख्य कार्यालय, ३, महापालिका मार्ग, टपालपेटी क्रमांक- १००३६, मुंबई, दूरध्वनी- ०२२ – २२६२०६०३, फॅक्स-२२६५९२३५, संकेतस्थळ- https://admission.dvet.gov.in/, ईमेल -itiadmission@ dvet.gov.in(आयटीआयची प्रवेश प्रकिया १५ मे २०२५ पासून सुर झाली आहे.)

सुरेश वांदिले