(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“स्‍टार्टअपच्या”साहाय्यासाठी

द ग्लोबल आंत्रप्रिन्युरशीप मॉनिटर, या कंपनीच्या पाहणीनुसार पुढील तीन ते चार वर्षात भारतात १८ ते ६० या वयोगटातील किमान २० टक्के व्यक्ती स्टार्टअप उद्योजक बनू शकतात. हे चित्र, भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे आहे. त्यामुळे, भारत झपाट्याने विकसित राष्ट्रांच्या पंगतीत जाऊ शकतो.  ही बाब लक्षात घेऊन, उद्योजकीय नवप्रेरणांना प्रोत्साहित आणि प्रेरित केले जाते.

तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा

मायक्रोप्रोसेसर आणि इंटिग्रेटेड चिप्सच्या अनुषंगाने विकसित झालेल्या आणि झपाट्याने पुढचा टप्पा गाठत असलेल्या तंत्रज्ञानामुळे असंख्य, नव्या  स्टार्टअप संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाने, या क्षेत्रात लक्षणीय झेप घेतली. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते.

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग (आयटी इंडस्ट्री) हा जगातील सर्वात मोठा आऊटसोर्सिंग सेवा देणारा उद्योग ठरला असून सध्या, या उद्योगात अंदाजे १० कोटींच्या आसपास तंत्रज्ञानांना रोजगार संधी मिळाल्या आहेत.

इंडस्ट्री फोर

संगणकीय तंत्रज्ञानातील पुढची प्रगती, इंडस्ट्री फोरसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरतेय. यामध्ये (१) आर्टिफिशिल इंटेलिजन्स, (२) मशिन लर्निंग, (३) डीप लर्निंग, (४) व्हर्च्युल रिॲलिटी, (५) ऑगमेंटेड रिॲलिटी, (६) नॅचरल लँग्वेज प्रोसेस, (७) स्मार्ट सेन्सर्स, (८) रोबोट, ऑटोमेशन, (९) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (१०) क्लॉउड कॉम्प्युटिंग, (११) लोकेशन डिटेक्शन टेक्नॉलॉजी, (१२) ह्युमन मशिन इंटरफेस, (१२) थ्रीडी प्रिंटिंग, (१३) बिग डाटा ॲनॅलिटिक्स, (१४) मोबाईल डिव्हायसेस,  अशासारख्या बाबींचा समावेश होतो. इंडस्ट्री फोर किंवा औद्योगिक क्रांती चारच्या, या टप्प्यात, भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक,   नवसंकल्पनाकार आणि तंत्रज्ञ फार मोठी भूमिका बजावू शकतात.

भारत सरकारने, पुढील पाच वर्षात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था विकसित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवलेय. यासाठी प्रामुख्याने स्टार्टअप कंपन्यांचा मोठा हातभार लागू शकतो. दरवर्षी साधारणत: १० कोटी नोकरीच्या वा रोजगाराच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. यामधून अधिकाधिक संपत्तीची निर्मिती होऊ शकते. ही संपत्ती, भारताची अर्थव्यवस्था, पाच ट्रिलियन डॉलरमध्ये विकसित करु शकते.

हे सातत्य किमान पुढील पाच वर्षे टिकले पाहिजे. यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या उद्योगांचा किंवा त्यापेक्षाही अधिक स्टार्टअप उद्योजकांचा अधिक उपयोग होऊ शकतो. हे स्टार्टअप उद्योग, भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन  ठरु शकतात.

स्टार्टअप कंपन्यांचा उदय

भारतात स्टार्टअप कंपन्यांचा उदय, वेगाने होतोय. तंत्राधारित, या स्टार्टअप कंपन्यांनी भारताला जगातील स्टार्टअप कंपन्यांच्या क्षेत्रात तिसरा क्रमांक मिळवून दिला आहे. आपल्यापुढे अमेरिका आणि ब्रिटन हे दोन देश आहेत. या क्षेत्रातील देशाची स्थान आणखी बळकट करण्यासाठी, भारत सरकारने, स्टार्टअप इंडिया उपक्रमास प्राधान्य दिले आहे. स्टार्टअप संस्कृतीच्या माध्यमातून उद्योजकता आणि नाविन्यता(इनोव्हेशन)ला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी https://www.startupindia.gov.in/ या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून आतापावेतो, १ लाख ३६ हजारापेक्षा अधिक स्टार्टअपची दखल घेण्यात आली. या वेबपोर्टलच्या वापरकर्त्यांची संख्या साडेसात लाखांपेक्षा अधिक आहे.

या, वेबपोर्टलवर स्टार्टअपसाठी उपयुक्त ठरु शकेल, अशा पुढील योजनांची विस्तृत माहिती आहे. विशेषत: अर्थसाहाय्याच्या संदर्भातील माहितीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे- (१) स्टार्टअप इंडिया सीड फंड स्किम, (२) स्टार्टअप इंडिया इन्व्हेस्टर कनेक्ट, (३) स्टार्टअप इंडिया क्रेडिट गॅरंटी स्किम, (४) स्टार्टअपच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणे

सध्या आपला देश औद्योगिक क्रांती टप्पा तीन मधून टप्पा चारमध्ये प्रवेशासाठी सज्ज झालाय. हा टप्पा तरुण-तरुणींमध्ये उद्योजकीय प्रेरणा निर्माण व्हाव्यात, यासाठी उपयुक्त ठरेल. भारतीय शैक्षणिक पर्यावरणात, उद्योजकीय प्रेरणांच्या निर्मितीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नावीन्यता आणि उद्योजकता यांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका टप्प्याटप्प्याने तयार करणे गरजेचे आहे. उद्योजकतेचे स्वप्न बघणे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कल्पनांचा विस्तार आणि विकास करणे, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, अंमलबजावणीसाठी नवे प्रयोग करण्याची तयारी ठेवणे, अशासारख्या बाबींवरही स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून लक्ष पुरवले जाते.

०००

अटल इनोव्हेशन मिशन

देशातील तरुणांना स्टार्टअप्सच्या अंतर्गत नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योगाची स्थापना करण्याची प्रेरणा मिळावी, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करता यावे, यासाठी भारत सरकारच्या निती आयोगामार्फत, “अटल इनोव्हेशन मिशन” राबविण्यात येते. शाळा, महाविद्यालये विद्यापीठे, संशोधन संस्था आणि खाजगी वा सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना आणि समस्यांच्या निराकरणासाठीची मनोभूमिका तयार करण्यासाठी, या मिशनमार्फत प्रयत्न केले जातात. हे सगळे उपक्रम सातत्याने तपासले जातात व त्यांचे निरीक्षण आणि संनियंत्रण केले जाते. या उपक्रमात सुधारणा घडून याव्यात यासाठी तिसऱ्या पक्षाकडूनही याची तपासणी करण्यात येते.

अटल टिंकरिंग लॅब-

शाळा पातळीवर, अटल टिंकरिंग लॅबची सुरुवात करण्यात आली आहे. ‍वर्ग ६ ते वर्ग १२ वीच्या विद्यार्थ्यांमधील नावीन्यपूर्ण सर्जनशीलतेला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि साधने उपलब्ध करुन दिले जातात. याशिवाय, इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्रीडी पेंटिंग्ज, रोबोटिक्स, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, आणि “तुम्ही करुन बघा” प्रकारातील साहित्य दिले जाते. आतापावेतो, दहा हजार, अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली.

अटल इनक्युबेशन सेंटर

या योजनेमार्फत देशभरात उद्योजकता आणि स्टार्टअप्सच्या पर्यावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले जातात. ही केंद्रे विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेटमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. नवसंकल्पनाकार तरुणाईला, त्यांच्या संकल्‍पनांना उद्योगात रुपांतरित करता येणे शक्य व्हावे म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान या केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते. शिवाय संसाधनांच्या स्वरुपातले साहाय्य, प्रेरक किंवा मेंटॉरची सुविधा, निधीची उपलब्धता, संपर्क साखळी, भागिदारी, प्रयोगशाळा सुविधा, सह(को-स्पेस)जागा सुविधा, या सोई उपलब्ध करुन दिल्या जातात. सध्या देशात ७२ ठिकाणी अशी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. अशा केंद्रांमधून ३५०० पेक्षा अधिक स्टार्टअप्सना उत्तेजन देण्यात आले. या स्‍टार्टअप्समुळे ३२ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. यामध्ये महिलांच्या १००० पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा समावेश आहे. आरोग्य सुविधा, फिनेटेक , एज्युकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस आणि ड्रोन तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, पर्यटन, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील केंद्रे- (१) बारामती येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने, एआयसी- एडीटी बारामती फाउंडेशन, या, अटल इनक्युबेशन सेंटर (एआयसी) ची स्थापना करण्यात आली. यामार्फत कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसुविधा, औषध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, निर्मिती आणि अभियांत्रिकी, या क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहित केले जाते.

संपर्क संकेतस्थळ- https://www.aicadtbaramatifoundation.org/aic-adt/ , इमेल-aicadt@aicadtbaramati.com

(२) एआयसी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी फाउंडेशन- या केंद्रात स्वच्छ उर्जा, परवडणारी आरोग्य सुविधा, अन्न आणि पोषण सुरक्षा, जल आणि स्वच्छता, या क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहित केले जाते.

संपर्कसंकेतस्थळ- https://www.aicbamu.ac.in/, ईमेल-info.aic@bamu.ac.in

(३) एआयसी -एमआयटी एडिटी- एमआयटी युनिव्हर्सिटीमधील या केंद्रात उद्योजकीय पर्यावरण निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. संभाव्य नवसंकल्पनाकारक स्टार्टअप्सचा शोध घेऊन त्यांना साहाय्य केले जाते. नव्या पिढीतील उद्योजकांमध्ये IDEA (इनोव्हेशन (नावीन्यता), डिझाइन थिंकिंग (अभिकल्पाचा विचार), आंत्रप्रिन्युरशीप (उद्योजकता) आणि आर्ट्स (कला) संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कृषी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक नावीन्यता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते.

संपर्क- संकेतस्थळ- https://aic.mituniversity.ac.in, ईमेल- enquiry.aic@mituniversity.edu.in

अटल न्यू इंडिया चॅलेंज-

ही नीती आयोगाची महत्वाची योजना आहे. राष्ट्रीय महत्वाच्या आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी, तंत्रज्ञान आधारित नवसंकल्पांना पाठिंबा देणे, निवड करणे, साहाय्य करणे यासाठी,  या योजनेंर्तगत मदत केली जाते. या क्षेत्रातील निवड झालेल्या नवसंकल्‍पनायुक्त स्टार्टअप्सचे, वाणिज्यिक (कमर्शिअल) रुपांतर होण्याच्या पातळीपर्यंत संपूर्ण सहकार्य केले जाते. हा कालावधी १२ ते १८ महिन्यांचा असतो. या कालावधीत १ कोटी रुपयांपर्यंतच्या अर्थसाहाय्याचा समावेश आहे. संपर्क-https://aim.gov.in/aic.php

सुरेश वांदिले