
नियम महत्वाचा की आनंद?
वाळवंटाची सफारी करायला मिळणार म्हणून कल्याणी खुष होती. वाळूत खेळायचं, उड्या मारायच्या, वाळूच्या टेकडीवर धावत जायचं, घसरगुंडी करायची, वाळूंच्या टेकड्यांवर जाऊन बसायचं. फोटो काढायचे, अशा कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या.
सकाळी सहा वाजताच बाबांच्या गाडितून सगळी मंडळी प्रवासाला निघाली. नऊ वाजेपर्यंत सफारीच्या ठिकाणी पोहचली. येथील माहिती केंद्रात बाबाआईंसोबत कल्याणी गेली. तिथे वाळवंटाची माहिती देणारे माहितीपत्रक देण्यात आले. यामध्ये वाळवंटाचा नकाशा होता. सफारीचा प्रवास कुठून सुरु करायचा? कोणकोणती स्थळं बघायची? चढताना-उतरांना कोणती काळजी घ्यायची? याची माहिती नमूद होती. इतर पर्यटकही हे माहितीपत्रक घेत. पण वरखाली बघून एकतर खिशात किंवा किंवा चुरगाळून कचऱ्याचा पेटित टाकत.
कल्याणीच्या बाबांनीसुध्दा माहितीपत्रक पूर्ण वाचले नाही.
“बाबा, या माहितीपत्रकात काय नमूद आहे, ते वाचातरी.” न राहवून कल्याणीने त्यांना टोकले.
“इतका वेळ कुठे आहे आपणाकडे? त्यापेक्षा थेट वाळवंट बघूया.” बाबा म्हणाले आणि ते चालू लागले.
ही सफारी सुरु करण्याच्या प्रवेशव्दारावर सूचनाफलक लावला होता. त्यावर दोनतीन सूचना मोठ्या अक्षरात लिहिल्या होत्या. त्या सूचनासुध्दा कुणी वाचण्याची तसदी घेत नव्हते. कल्याणीच्या बाबांनींही त्यात रस दाखवला नाही. ते पुढे जाऊ लागताच, कल्याणीने त्यांना पाठीमागे ओढून, त्या सूचना वाचायला लावल्याच.
बाबांनी बळेबळेच त्या वाचल्या. “वाळवंटाची सफारी करताना, वाळूतून काळजीपूर्वक चाला. तुमच्या पायाखाली वाळूत राहणारे कीटक, दुर्मिळ प्राणी येऊ शकतात. त्यांना इजा होऊ शकते. त्यांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी.” असं त्यावर लिहिलं होतं. इतर पर्यटक या सूचनांकडेही दुर्लक्ष करत होते.
वाळंवटात वाळूखाली राहणारे, कीटक, प्राणी यांना इजा होऊ नये म्हणून, वाळवंट सफारीचा मार्ग आणि दिशा ठरवून देण्यात आली होती. पण सफारीला सुरुवात करताच, बहुतेक पर्यटक कसेही चालू लागत, धावू लागत. सूचनाफलकावरील सूचनांशी एैशीतैशीच झाली होती.
वाळवंट सफारीचे जे स्वप्न रंगवले होते, ते जशेच्या तसे साकारता येणार नाही, हे कल्याणीच्या लक्षात आलं. सूचना वाचूनही त्यांचं बाबांचं वागणं, या सूचना विसरल्यासारखच होतं. ते आणि आई कसेही चालू लागले. इतर पर्यटकांचा गोंधळ सुरुच होता. सगळंच जसं वागतात, तसंच आपणही वागायला काय हरकत? आनंद महत्वाचा की नियम महत्वाचा, असे काहीसे विचार कल्याणीच्या डोक्यात पुन्हापुन्हा येत होते. या विचारांना मोठ्या प्रयत्नाने बाजूला सारुन सफारीच्या ठरवलेल्या मार्गानेच ती चालत असल्याने बाबा आणि आईपेक्षा तिचा वेग कमी झाला. बाबांनी एकदोनदा तिला हाक मारुन धावत यायला सुचवलं. पण तिने नकार दिला.
असंच समोर जात असताना, एके ठिकाणी गोंधळ उडालेला दिसला. बाबा त्या ठिकाणी थांबले. कल्याणीही तिथे तोपर्यंत पोहचली. तिथे दोन मुलं जोरजोरानं रडत होती. त्यांच्या पायाला वाळूतील किटक किंवा सूक्ष्म जीवांनी चावा घेतला होता. त्याच्या असह्य वेदना त्यांना होत असाव्यात. हळूहळू त्या दोघांचा पाय सुजू लागला.
हा गोंधळ माहिती केंद्रापर्यंत पोहचला. त्यातील एक गृहस्थ प्रथमोपचाराची पेटी घेऊन धावतच आला. ही पेटी उघडून त्याने दोघांच्याही पायाला मलम लावला. त्यांच्या वेदना कमी झाल्या.
प्रथमोपचार करणाऱ्या गृहस्थाने मग, त्या दोन्ही मुलांच्या पालकांची खरडपट्टी काढली. त्यातल्या एकाला ओढतच त्याने, सफारीच्या दारावर लावलेल्या सूचना फलकांपर्यंत नेलं नि त्या सूचना मोठ्याने वाचायला सांगितलं. त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
प्रथमोचार करणारी व्यक्ती म्हणाली,
“तुमची सुरक्षा आणि वाळंवटाच्या संरक्षणासाठी, असलेल्या या सूचना, तुम्हाला विनोद वाटतात नाहीका? प्रत्येक ठिकाणचे नियम असतात, ते पाळले नाही तर, असे संकट ओढवते. या मुलांना किटक की सापाने चावले, हे माहिती नाही. हे चावणं जिवावर बेतणारं ठरु शकतं.”
असं तो सांगत असतानाच कल्याणीने आईबाबांकडे बघितलं. कानाला हात लावत दोघेही सॉरी म्हणाले.
सुरेश वांदिले