(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ग्रंथालयात युध्द!

ग्रंथालयातील ग्रंथांना रात्री विश्रांती मिळायची. ग्रंथपाल आणि कर्मचारी घरी जाताना दिवे बंद करुन जात. या अंधार आणि शांततेमुळे ग्रंथालयातलं वातावरण भयाण व्हायचं. याची भीती वाटून, रहस्यमय विभागातील ग्रंथातील पात्रांना, या भयाण वातावरणातून पळून जावसं वाटे. भुताखेतांच्या, राक्षसांच्या ग्रंथातील पात्र भीतिने थरथर कापत. आपल्याला लेखकाने कशासाठी जन्मास घातले असेल, यावर डोकेफोड करत. आपल्याला खलनायक म्हणून रंगवणारा लेखकच, खरा खलनायक‍ असल्याचं, सगळया पात्रांचं एकमत झालं. या शहरावर हल्ला करुन, लेखकांनाच नष्ट करायला हवं, असं एकदोन पात्रांना वाटलं. “आपल्यासारख्या भित्रोबांना हल्ला करणं खरंच जमणार का? एका वयस्क भुताने लक्षात आणून दिलं. “मग, सगळ्यांनी बाजुच्या डोंगरातील धबधब्यात जाऊन उड्या मारु. प्रचंड वेगाने खाली पडणाऱ्या पाण्यातून, कुठल्याकुठे निघून जाऊ. त्यामुळे, न रहेगा बास ना रहेगी बासुरी.” एकाने तर्कट चालवले.

“वेड्यांनो, इथे अंधारात, तुम्हाला इतकी भीती वाटते, तर मग, अंगावर शहारे आणणाऱ्या धबधब्याजवळ जाताक्षणीच तुमच्या हातापायातली शक्ती जायची. धबधब्यावरुन उडी मारायला हिम्मत पाहिजे. ती आहे का आपल्याकडे?” एक वयस्क चेटकीण म्हणाली.

“जर, आपला जन्मच, भीती दाखवण्यासाठी झाला असताना, आपल्याला कां भीती वाटावी?” एका प्रेमळ भुताने प्रश्न विचारला. या प्रश्नाचं काही उत्तर कुणाला देता आलं नाही.

भुत-चेटकीन-राक्षसांच्या, ग्रंथदालनातील ग्रंथातील पात्रांची, ही दररोजची चर्चा, इतर दालनाच्या ग्रंथातील पात्रांच्या कानावर पडायची. भूताप्रेतांच्या ग्रंथातील पात्रांना वेड लागल्याचं, इतर ग्रंथांतील पात्रांना वाटू लागलं. अशा, वेड्यांसोबत राहिल्यास, आपणासही वेड लागेल.” असं, या पात्रांना वाटलं.

भुताप्रेतांना नष्ट करण्याचा विचार, युध्दकथा ग्रंथातील पात्रं करु लागली. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने, या पात्रांचा संहार करता येणं शक्य असल्याचं, एक योध्दा दुसऱ्या योध्द्याला म्हणाला. युध्दकथांच्या पात्रातील सर्वात शूर पात्राला सेनापती केलं गेलं. त्‍याच्या नेतृत्वाखाली, एके रात्री, या पात्रांनी, भूतप्रेत ग्रंथातील पात्रांवर हल्ला चढवला. ते जरी बेसावध असले तरी, क्षणात सावरले. त्यांच्याकडील अतिंद्रिय आणि जादुई शक्तीचा वापर करु लागले. त्यामुळे युध्दकथेतील आणि या भुतप्रेतांच्या पात्रांचं तुंबळ युध्द सुरु झालं. युध्दकथेच्या पात्रांना वाटलं, तसं काही चटदिशी, भूतप्रेतपात्रांचा नायनाट झाला नाही.

युध्दाच्या खणखणाट, कर्कश आवाज यामुळे, जादुच्या ग्रंथातील पात्रांना उत्साह आला. बाहेर पडून त्यांनी, जादुने अनेक भुतांना पक्षी केले आणि युध्दकथेतील पात्रांना कोंबडे केले. एका जादुगार पात्राने, मंत्र म्हणून आग ओकली. हे बघून देवदेवतांच्या कथांमधील काही पात्रं बाहेर आली. त्यांनी मंत्र म्हणून, ग्रंथालयात नदी आणली. आग विझली. पण, युध्दात सामील झालेली पात्रं वाहून जाऊ लागली. पाण्याच्या रेट्यात इतर दालनातील ग्रंथही त्यात सापडले. आता, सगळ्याच दालनातील ग्रंथातील पात्रांचे धाबे दणादले. आपला शेवट लक्षात आल्याचे, लक्षात आल्याने, ते रडू लागले. स्वत:हून संकट ओढवून घेतलेल्या, या पात्रांना, वाचणं शक्यच नसताना, एक चमत्कार घडला.

०००

आतापर्यंत, आपल्या प्रेमळ वागण्याने मिळवलेल्या शक्तीचा वापर करुन, प्रेमळ भुताने ग्रंथालयात शिरलेलं प्राणी पिऊन टाकलं. शस्त्र गिळली. भुतप्रेत, जादुगारांची जादू नष्ट केली. सगळया पात्रांनी मान खाली घातली.

प्रेमळ भूत सगळयांना                                      रागावले, “आपसातील, भांडणाने सर्वनाश होतो, हे तुम्हीच, या ग्रंथातून सांगताना. मग कुठे गेला तो सुज्ञपणा? आपला जन्म, मनुष्यप्राण्याला ज्ञान देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, हुषार बनवण्यासाठी झालाय. हे लक्षात ठेवा. आपणच असे अगोचरांसारखे वागलो तर, या मनुष्यप्राणास रान मोकळे मिळेल. पुस्तकांमुळे, पृथ्वीवर संस्कृती निर्माण झाली. मनुष्यप्राण्याचा मेंदू विध्वंसाकडे जास्त जातो. त्याला वाचवण्याचं, सावध करण्याचं आणि  सावरण्याचं काम ग्रंथांनी केलं. आपण, त्याच्यासारखं  वागून सर्वनाश करुन घ्यायचा नाही. मनुष्यप्राण्याचा  नाश झाला तरी, पुन्हा ग्रंथांमुळेच, नवी संस्कृती जन्मास येऊ शकते. हे लक्षात  ठेवा.”

प्रेमळ भूताने असं बरच काही सांगितलं. काहिंना पटलं, तर काहिंना नाही. बऱ्याच पात्रांना, आजचं संकट टळल्याचा आनंद झाला. काहीजण या आनंदात, उद्या रात्री, नव्या उर्जेने इतर पात्रांवर कसं तुटून पडायचं, या विचारात गुंग झाले. हे लक्षात आल्याने प्रेमळ भूताने कपाळावर हात मारुन घेतला.

सुरेश वांदिले