
हाच (खरा)मार्ग यशाचा!
गेल्या दोन महिन्यात, संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणारी नागरी सेवा परीक्षा, नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी (एनडीए) परीक्षा, चार्टर्ड अकाउंट (सीए) अंतिम परीक्षा, जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- मेन आणि ॲडव्हान्स्ड, महाराष्ट्र बोर्डासह इतर वेगवेगळया बोर्डांच्या १२ वींच्या आणि १० वीच्या परीक्षांचा निकाल लागला. या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थी- विद्यार्थींनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्यापैकी बऱ्याच जणांच्या छोटेखानी मुलाखती, किंवा मनोगत वृत्तपत्रादी वेगवेगळया माध्यमांमधून प्रकाशित झाले. या सगळयाच मुलाखती किंवा मनोगत हे, “मार्ग यशाचा” दाखवणाऱ्या आहेत. या, यशवंत आणि गुणवंतांनी दाखवलेल्या मार्गाने, जे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे जातील, त्यांना, ते कोणत्याही ज्ञानशाखेत शिकत असतील, कोणत्याही महाविद्यालयात असतील, निराश होण्याची गरज नाही. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, ते यशाला गवसणी घालतील किंवा यशश्री त्यांच्या पायाची दासी बनेल.
वेगवेगळया राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये घवघवित यश मिळवणाऱ्या गुणवंतांच्या मनोगतांच्या विश्लेषणातून पुढील काही बाबी लक्षात येतात-
(१) या सर्वच विद्यार्थ्यांनी, अभ्यासासाठी कोणताही शार्टकट (जवळचा सुलभ मार्ग) वापरला नाही. परीक्षेसाठी, जे जे विषयघटक असतील, त्यापैकी हा महत्वाचा, तो बिनमहत्वाचा असा दुजाभाव न करता, सर्वांना समान न्याय दिला. याचा अर्थ कोणत्याही घटकाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही.
(२) जिथेजिथे संकल्पना समजून घेण्याची गरज असेल, त्या संकल्पना स्वयंस्पष्टपणे समजून घेतल्या. त्यानंतरच पुढचा अभ्यास केला.
(३) आपली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, भवताल किंवा इतर कथित वैगुण्याचा कोणताही परिणाम अभ्यासावर होऊ दिला नाही. स्वत:चे लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्यामुळे महागडे शिकवणी वर्ग न लावताही, त्यांना यश मिळवता आले.
(४) ज्या विद्यार्थ्यांनी महागडे शिकवणी वर्ग लावले, त्यांनी शिकवणी वर्गातील नोट्स वा इतर साहित्यासोबतच, बोर्डाने किंवा परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे मुळातून अध्ययन केले.
(५) या विद्यार्थ्यांकडे इतर विविध माध्यमातून उपलब्ध झालेले रेडिमेड अभ्यास साहित्य असतानाही, त्यांनी, शक्य होईल तितक्या स्वत:च्या नोट्स तयार केल्या.
(६) या विद्यार्थ्यांपैकी काहिंनी संपूर्णपणे मोबाइल व इतर गॅजेट्सना प्रयत्नपूर्वक दूर ठेवले. तर काहिंनी, या गॅजेट्सचा उपयोग, अभ्यासासाठी कसा करता येईल, याचा हुषारीने विचार करुन, मर्यादित स्वरुपात वापर केला.
(७) या विद्यार्थ्यांनी, अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या संपूर्ण कालावधित पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि योग्य आहार, या सूत्रांचा अंगिकार केला.
(८) विशिष्ट प्रकारची शिस्त अंगी बाणवून, अभ्यासक्रमासह इतर दैनंदिन गोष्टींसाठी वेळापत्रक तयार केले. त्या वेळापत्रकानुसार, या साऱ्या गोष्टी घडत राहतील, याची काटेकोर काळजी घेतली.
(९) राष्ट्रीय स्तरांवरील परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी, वेगवेगळया प्रश्नपत्रिकांचा सराव, नियमितपणे व पारदर्शकपणे केला. या सराव परीक्षेत येणाऱ्या अडचणी व त्रुटी समजून घेतल्या. स्वत:च्या कमकुवत बाबी समजून घेतल्या. या त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले.
(१०) इतरांची अभ्यासपध्दती, इतरांकडे असलेली साधने वा त्यांना मिळत असलेले, महागड्या शिकवणीसारख्या मार्गाने होणारे मार्गदर्शन, या घटकांचा, स्वत:शी तुलना करण्याचा मोह टाळला.
(११) याकाळात स्वत:वरचा आत्मविश्वास अजिबात ढळू दिला नाही. परिपूर्ण अभ्यास केल्यानेच, उत्तम यश मिळवू ही खात्री, या सर्वच विद्यार्थ्यांना होती.
(१२) प्रत्यक्ष परीक्षेच्या दोन-तीन दिवस आधी, या विद्यार्थ्यांनी अजिबात तणाव घेतला नाही. तणावरहित मनाने ते परीक्षा केंद्रांवर गेले आणि त्यांनी पेपर सोडवले.
(१३) या यशस्वी विद्यार्थ्यांनी पाठांतरावर अजिबात भर दिलेला नाही. पाठांतराने अभ्यासाचा पाया पक्का होत नाही, सर्वंकष तयारी होत नाही. हे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने, ते या मोहाला बळी पडले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये कशाही रितीने किंवा पध्दतीने प्रश्न विचारले गेल्यास, त्यांना सोडवणे कठीण गेले नाही.
(१४) बऱ्याच विद्यार्थ्यांनी, अभ्यास एके अभ्यास, असे न करता, आपल्या आवडत्या छंदांना जोपासण्यासाठीही वेळ काढला. यामुळे अभ्यास आणि परीक्षेचा ताण कमी करण्यास त्यांना साहाय्यच झाले.
०००
उपरोक्त सर्वच बाबी सोप्या, सहज आणि सुलभ अशा आहेत. त्या कोणत्याही विद्यार्थ्याला अंगिकारणे जरासुध्दा कठीण जाऊ नये. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती हवी. पारदर्शकपणा हवा. स्वत:च्या प्रयत्नांकडे, वस्तुनिष्ठपणे बघायला हवे. सर्वच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांध्ये तीव्र स्पर्धा आणि चुरस असते. ही बाब कायम लक्षात ठेऊनच, “आजचा अभ्यास आज”, हे सूत्र अंगिकारले पाहिजे. त्यासाठी, टाळाटाळ, उद्या बघू किंवा मॅनेज करु, एक दिवस रिलॅक्स राहिल्याने काय बिघडेल? मित्रांसोबत थोड्याफार टवाळकीसाठी वेळ काढू, आईबाबांचे लक्ष नाही, हे बघून हळूच नेटफ्लिक्समध्ये डोकावू, असे जर घडत असेल तर, इच्छाशक्तीची कमतरता आहे, हे नक्कीच समजावे.
प्रत्येक विद्यार्थ्याची बौध्दिक कुवत, विविध विषयघटक समजून घेण्यासाठीची आकलन क्षमता वेगवेगळी असणे, स्वाभाविकच आहे. कुणाला एकदोनदा वाचले तरी समजून जाते किंवा लक्षात राहते. काहिंना, त्यासाठी चारपाच वेळा वाचावे लागते. यात काही गैर नाही. त्यामुळेच, स्वत:ची आकलनक्षमता लक्षात घेऊन, अभ्यासाला वेळ देणे गरजेचे ठरते. एखादा विद्यार्थी, जो अभ्यास पाच तासात पूर्ण करत असेल तो, पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला सात तास लागू शकतो. ही बाब लक्षात ठेऊन, संबंधित विद्यार्थ्याने, स्वत:च्या वेळेचा काटेकोर हिशेब ठेवला पाहिजे. त्यासाठी प्रामाणिकपणा हवा. नाहीतर, ती स्वत:ची फसवणूक ठरेल. अशा स्वफसवणुकितून अपयशाच्या खोल दरीत स्वत:च ढकलले जातो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
याकाळात पालकांनीसुध्दा, त्यांच्यावरच सगळया जगाचे ओझे असल्यासाखे वागू नये. विद्यार्थ्याच्या अवतीभवती सतत राहिल्याने त्याला प्रोत्साहन आणि उत्साहाची उर्जा मिळण्याऐवजी, तो दडपण आणि तणावाखाली जाऊ शकतो. ही बाब लक्षात ठेवायला हवी. “मुलाच्या अभ्यासासाठी सुटी घेतली किंवा रजा टाकली, आम्ही अवतीभवती असू तरच तो व्यवस्थित अभ्यास करेल, नाहितर इकडेतिकडे भरकटेल,” असे बऱ्याच पालकांना वाटते. हा आपल्याच मुलावर अविश्वास दाखवण्यासारखे झाले. या काळात विद्यार्थ्यांला मन:पूर्वक पाठिंब्याची, प्रेमाची गरज असते. त्याच्या आत्मविश्वासाला कोणत्याही कारणाने कां होईना, तडे जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज असते. त्याच्या अभ्यासात लुडबूड करुन किंवा सतत त्याच्या अवतीभवती राहून, हे काही साध्य व्हायचे नाही. आजचे विद्यार्थी अपवाद वगळता, सुज्ञ आणि समंजसच असतात. असलेली तीव्र किंवा जिवघेणी स्पर्धा, परीक्षेची काठिण्य पातळी याची योग्य ती समज आणि ज्ञान त्यांना असते. त्यामुळे त्याला सतत त्याबद्दल जाणिव करुन देणे किंवा टोकत राहणे, यामुळे त्याचे मनोधैर्य आणि मनोबल कमी होऊ शकते.
या लेखमालेच्या पहिल्या लेखात, करिअर घडवणे ही आनंददायी प्रकिया असल्याचे नमूद केले होते. हा आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकालाही घेता येणे शक्य आहे. त्यासाठी दोघांनींही आपल्यामध्ये किंचित बदल केला आणि त्याप्रमाणे वाटचाल केल्यास अडचणिंचा कथित डोंगर पार करता येऊ शकतो किंबहुना अडचणींशिवाय, मार्ग यशाचा दिसू शकतो.
निरोप घेण्यापूर्वी…
मार्ग यशाचा, या सदरात गेल्या दोन महिन्यात २०० च्यावर वेगवेगळया ज्ञानशाखांच्या अभ्यासक्रमांची माहिती करुन दिली. हे अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थ्याला करता येतात. या अभ्यासक्रमांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्र आणि कौशल्य विकासास साहाय्य होते. अशा कौशल्यातूनच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दिशा, वाटा आणि वळणेसुध्दा स्पष्टपणे दिसू लागतात. आजच्या काळात कौशल्य मिळवणे (स्किलिंग), ते सतत उन्नत करणे (अपस्किलिंग), आणि नवी कौशल्ये (रिस्किलिंग) मिळवत राहणे, याला पर्याय नाही. कोणतेही क्षेत्र निवडले तरी, ते याला अपवाद नाही. प्लेसमेंटसाठी येणारे निवडकर्ते, यावर बारकाईने लक्ष ठेवतात. विद्यापीठीय परीक्षेतील गुणांपेक्षा, तुमच्याकडे असलेले कौशल्य, त्याचा प्रभावीपणे वापर करण्याचा आत्मविश्वास आणि अथक परिश्रम या त्रिसूत्रीवर कोणत्याही करिअरमध्ये यश मिळवता येते आणि हे यश टिकवतासुध्दा येते.